April 30, 2026
Home » झुंज जीवनाशी… जिंकले प्रेमाने !
मुक्त संवाद

झुंज जीवनाशी… जिंकले प्रेमाने !

मध्यमवर्गीय आयुष्याच्या साध्या वाटेवर चालताना अचानक उभा राहिलेला कॅन्सरसारखा भीषण अडथळा… क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटतं. पण प्रेम, धैर्य आणि जिद्दीच्या बळावर एक दांपत्य या संकटाशी दोन हात करतं आणि मृत्यूच्या सावटातून आयुष्याला नव्याने उजाळा देतं—ही आहे त्या जिद्दी झुंजीची हृदयस्पर्शी कहाणी…

जयंत कुलकर्णी

एका मध्यमवर्गीय माणसाचे जीवन अत्यंत साधे सरळ असते. प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण, मग नोकरी किंवा व्यवसाय आणि मग लग्न. अर्थशास्त्राचा एक नियम आहे, “माणसाला अनंत गरजा आहेत आणि त्या गरजा भागवण्यासाठी साधने मात्र कमी आहेत.” जगण्यासाठी धडपड करताना तोच मध्यमवर्गीय माणूस नोकरी, व्यवसायातील अल्प उत्पन्नातून आपल्या गरजा भागवण्याचा प्रयत्न करतो. मूलतः या गरजा “अन्न, वस्त्र, निवारा” अशा प्राथमिक स्वरूपाच्या असतात. कुणाच्या अध्यात – मध्यात नसलेला हा मध्यमवर्गीय माणूस आपली जीवननौका पार करण्यासाठी धडपडत असतो. या धडपडीमध्ये अनेक प्रकारचे अडथळे, अडचणी येतात. त्यावर मात करत तो पुढे जात राहतो. त्या अडचणी पार करत करत तो किनाऱ्याला लागण्याच्या प्रयत्नात असतो. या प्रयत्नातूनच माणसे यशस्वी होतात !

अशाच प्रकारच्या वेगळ्या अडचणीतून, अनुभवातून माझे लेखक मित्र प्रल्हाद दुधाळ यांना नुकतेच जावे लागले. प्रल्हाद हे उपविभागीय अभियंता म्हणून भारत संचार निगम लिमिटेड पुणे येथून सहा वर्षांपूर्वी निवृत्त झाले. त्यांनी पूर्वीपासूनच लेखनाची आवड जोपासलेली आहे. पु. ल. देशपांडे म्हणतात त्याप्रमाणे नोकरी हे जगण्याचे साधन म्हणून, तर छंद हा जगण्याचे कारण म्हणून माणसाला उपयोगी पडतो. या लेखनाच्या छंदातून त्यांचे दोन कवितासंग्रह, एक वैचारिक लेखसंग्रह, एक चारोळी संग्रह, एक कथासंग्रह, एक प्रातिनिधिक काव्यसंग्रह इत्यादी साहित्य प्रकाशित झाले आहे.

मातृभारती व योर कोट मोबाईल ॲप वर सातत्याने ते लेखन करत असतात. त्यांच्या कविता मनाला उभारी देणाऱ्या असतात. त्यांच्या सुविद्य पत्नी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातून निवृत्त झाल्या आहेत. एक मुलगा, त्याचे लग्न झालेले आहे. तो सध्या अमेरिकेत असतो. पुण्यात हे दोघेच असतात. आयुष्यभर कष्ट करून, समाधानाने निवृत्त झालेले हे जोडपे आता पुढील निवृत्तीचे आयुष्य स्वतःकडे लक्ष देण्यासाठी, एखादी परदेशवारी करण्याचे ध्येय ठरवून मार्गक्रमण करीत होते. मनुष्य काही सुप्त इच्छा बाळगून असतो. त्या साध्य करण्यासाठी नोकरीच्या काळात वेळ मिळत नाही. आता वेळही होता आणि पैसेही होते. पण ठरलेली युरोप टूर कोरोनाच्या काळात रद्द झाली आणि परदेशवारीचे स्वप्न, स्वप्नच राहिले! मग त्यांनी छोट्या-मोठ्या भारतातील टूर्स केल्या. शिवाय नोकरी नंतर योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा, पंचकर्म अशा गोष्टी करून तब्येत चांगली ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

अशातच अचानक एक मोठा अडथळा समोर येऊन उभा राहिला, एका संकटाला सामोरे जावे लागले, ज्याची कधी कल्पनाही केली नव्हती. साधे राहणीमान, घरचे जेवण निवृत्तीनंतर मिळालेल्या वेळेत योगासने हास्य क्लब वगैरे करून आरोग्य सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतानाच स्मिताताईंना कर्करोगाचे निदान झाले. एकुलता एक मुलगा तोही जवळ नव्हता. क्षणभर जीवनाचे राहट गाडगे थांबल्यासारखे वाटायला लागले. कवी मनाचे आमचे मित्र “मी कधी कोणाचे वाईट केले नाही, अगदी वाईट चिंतलेही नाही अशा परिस्थितीत आमच्याच वाट्याला हे दुःख, हा आजार का यावा?” असा क्षणभर विचार मनात येऊन नाराज झाले पण क्षणभरच!

मग हा कवी मनाचा हळवा माणूस डोळ्यातील पाणी पुसून टाकून या गंभीर आजाराला सामोरे जाण्यासाठी उभा राहिला. त्याला आपल्या त्या जीवन भराच्या सहचारिणीला वाचवायचे होते. जिने आजपर्यंत त्यांच्या घरासाठी खस्ता खाल्ल्या होत्या. नोकरी, घर सांभाळून मुलाला मोठे केले होते. नवऱ्याचे आरोग्य सांभाळले होते. घराला घरपण आणले होते. संसाराच्या सुखासाठी, आनंदासाठी ती झटत होती अहोरात्र. त्या सौभाग्यवतीसाठी, सहचारिणीसाठी, मैत्रिणीसाठी तो घट्ट पाय रोवून उभा राहिला. ध्येय एकच, काहीही करून पत्नीला वाचवायचे! आणि मग हा या कठीण आजाराविरुद्धचा संघर्ष सुरू झाला. कॅन्सरशी झुंज सुरू झाली. आर्थिक, शारीरिक, मानसिक प्रश्न समोर येऊन उभे राहिले. कोणाचे मार्गदर्शन मिळेल? कोणाचे पाठबळ मिळेल? कोणत्या डॉक्टरांकडे जायचे? कारण प्रत्येकाचे अनुभव वेगळे. कोणाला विचारायला जावे तर वेगवेगळ्या अनपेक्षित गोष्टी समोर यायला लागल्या. कॅन्सरची स्टेज कोणती असेल? कोणत्या टेस्ट कराव्या लागतील? पत्नीचे मानसिक संतुलन ढळू न देता यातून मार्ग कसा काढायचा? कारण कॅन्सर झाला आहे एवढे समजल्यानंतरच पेशंटची अवस्था बिकट झालेली असते.

“मन चिंती ते वैरी न चिंती” या उक्तीप्रमाणे पेशंटच्या मनात वाईट विचारा अगोदर येतात. त्यातून पेशंटला सावरणे महत्त्वाचे असते. हे झाले मानसिक. आता आर्थिकचा विचार करूया. किती खर्च येईल? आपल्याकडे प्रोव्हिजन काय आहे? विमा असल्यास ठीक. नसल्यास वेगळा विचार, वेगळ्या विवांचना. विमा असला तर कव्हर किती व कोणते मिळेल? अगदीच इमर्जन्सी आली तर आर्थिक मदत कुणाकडे मागायची? मुलगा असला तरी तो दूर देशी आहे, त्याला हे कसे कळवायचे? तो कसा रिऍक्ट होईल? एक ना दोन अनेक प्रश्नांची जणू जंत्रीच तयार झाली. आर्थिक नाही पण मानसिक पाठबळ तरी नातेवाईक देतील का? कोणते मित्र पाठीशी खंबीरपणे उभे राहतील? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले.

आरोग्य विमा ही एक काळाची गरज आहे. अचानक उद्भवणाऱ्या समस्यांवर तो एक जालीम इलाज आहे. पण प्रकृती चांगली असेपर्यंत माणसे आरोग्य विमा घेत नाहीत. जेव्हा दुर्धर आजाराचे निदान होते, तेव्हा विम्याचा शोध सुरू होतो. पण आजाराचे निदान झाल्यानंतर आरोग्य विमा मिळत नाही. त्यामुळे अगदी तरुण वयापासून आरोग्य विमा घ्यायला हवा आणि तो चालू ठेवायला हवा. काही कंपन्यांचा कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स असतो. काही कंपन्यांचा नसतो. मुले हल्ली वरचेवर कंपन्या बदलतात तेव्हा नवीन कंपनी शोधताना तिथे कॉर्पोरेट इन्शुरन्स आहे का ते आवर्जून पहावे. नसेल तर स्वतःची वेगळी पॉलिसी कुटुंबीयांसमवेत घ्यावी. असो, हे आपले माझे विचार.

प्रल्हाद दुधाळ यांना आरोग्य विम्याची काही प्रमाणात मदत झाली. पत्नी स्मिताताई कॅन्सरचे निदान झाल्याचे समजल्यावर खचून न जाता धीरोदात्तपणे या दुर्धर आजाराला सामोरे गेल्या. त्यांच्यासाठी “योग्य वेळी योग्य डॉक्टरांकडून मिळालेले उपचार महत्त्वाचे ठरले.” केवळ आठ महिन्यात कॅन्सरवर मात करून त्या सध्या सर्वसामान्यांप्रमाणेच उत्तम आयुष्य जगत आहेत. श्री. प्रल्हाद दुधाळ आजाराच्या निदानानंतर सुरुवातीला थोडे गडबडले पण लवकरच आलेल्या कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रयत्नाला लागले. उपचारासाठी आर्थिक पाठबळ उभे करून आपल्या सहचारिणीला दुर्धर आजारातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी कंबर कसली. उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर श्रद्धा ठेवून ते कामाला लागले. ध्यानधारणेने स्मिताताईंचे मनोबल वाढले. उपचारादरम्यान डॉक्टर असलेल्या सुनबाईंचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.

मुलगा, सून, नातू वेळेवर हजर राहिले. रक्ताच्या नात्याबरोबरच श्री. दुधाळ व सौ. स्मिताताईंनी जोडलेली माणसे त्यांना मानसिक आधार देऊन गेली. त्यामध्ये ते जेथे राहिले त्या जुन्या सोसायटीतील शेजारी व नव्या सोसायटीतील शेजारी यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. यापैकीच डॉक्टर सचिन इंगळे, दुधाळ दांपत्याचे मानसपुत्र श्री. अमित कुलकर्णी व सौ रमा कुलकर्णी, टी. आर. कुळे व कुटुंबीय आणि त्यांचे व्याही सूर्यकांत कर्णे यांची वेळोवेळी मदत मिळाली. डॉक्टर हे आपल्यासाठी देवदूतच असतात. त्यामुळे ट्रीटमेंट देणारे सगळे डॉक्टर्स, हॉस्पिटल स्टाफ यांचाही आवर्जून उल्लेख करावा लागेल.

प्रल्हाद दुधाळ यांनी “रोगाचे निदान ते रोगमुक्ती” असा जो प्रवास अनुभवला तो जसाच्या तसा या त्यांच्या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. याचा उपयोग अशा संकटाच्या प्रसंगी अंधारात चाचपडणाऱ्या एखाद्या व्यक्तीसाठी नक्की होऊ शकेल या प्रांजळ भावनेने त्यांनी हे लिखाण केले आहे.

झुंज कॅन्सर शी ही कथा आहे प्रल्हाद दुधाळ यांच्या पत्नीची आणि त्यांची काळजी घेणाऱ्या पतीची. कॅन्सर’ हे नाव जरी घेतलं तरी सामान्य माणूस हादरून जातो. स्मिता दुधाळ यांना ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचं जेव्हा या दांपत्याला कळतं तेव्हा हे दांपत्यही घाबरून जातं. पण दोघेही वस्तुस्थिती स्विकारतात आणि स्थितप्रज्ञ बनून या आजाराशी दोन हात करायला उभे ठाकतात. दोघांच्या वागण्यात कोणताही आक्रस्ताळेपणा नाही, खचून जाणे नाही. दोघेही संयमाने परिस्थिती हाताळत जातात आणि या जीवघेण्या आजारावर विजय मिळवतात.

प्रल्हाद आणि त्यांच्या पत्नीचं मला आता खरंच कौतुक वाटू लागलेलं आहे. जीवनमरणाच्या प्रसंगातही कुणी एवढं संतुलित आणि खंबीर कसं राहू शकते? कथा पुढं जाते तसतसे या दांपत्याच्या स्वभावाचे पदर हळूहळू उलगडत जातात. तुम्ही इतरांशी चांगले वागलात की इतर लोकही तुमच्याशी चांगलेच वागतात. यांच्या आजारपणाच्या काळात जे लोक यांच्या मदतीला येतात तेही असेच. हे सगळे लोक यांच्या मदतीसाठी तत्परतेने उभे राहतात ही ‘जगण्याची’ ही लढाई सोपी करून टाकतात.

लेखकाच्या लेखणीची जादू अशी की ही अमित, डॉ.भूरट, डॉ. राजभोज, रमा ही सगळी मंडळी कथा वाचता वाचता आपल्या डोळ्यांसमोर उभी राहतात आणि आपणही ही कथा अनुभवत पुढे पुढे सरकत राहतो. छोटेमोठे सर्वच प्रसंग सविस्तरपणे चितारल्यामुळे हे पुस्तक जिवंत होते. आयुष्यात संकटे तर येतच असतात. पण या संकटांना विचारपूर्वक कसे सामोरे जावे हे हे पुस्तक शिकवते. मृत्यूच्या दाढेतून परत आल्यावर आनंदोत्सव साजरा करणं हे तर अप्रतिम.

आयुष्याच्या साठीनंतरही लेखकाचं आपल्या पत्नीवरचं प्रेम पाहून आपल्याला भरून येतं. म्हटलं तर ही ही एक जगण्यासाठीची झुंज आहे म्हटलं तर ही एक प्रेमकथा आहे. शेवटी प्रेम म्हणजे तर काय ? प्रेमाची माझी एक व्याख्या आहे; “ आपल्याला हव्या हव्याशा वाटणाऱ्या व्यक्तीसाठी वाटेल तो त्याग करायची भावना म्हणजे प्रेम.” या अर्थानं लेखकाची ही प्रेमकथाच आहे.

या छोटेखानी पुस्तकात कोणताही बडेजावपणा नाही, दांभिकपणा नाही, शब्दांचं अवडंबर नाही. आहे ती एक साधी सरळ कथा. मनाला भावणारी आणि अंतःकरणात उतरणारी.

डॉ. अशोक माळी, मिरज

पुस्तकाचे नाव – झुंज कॅन्सरशी
लेखक – प्रल्हाद दुधाळ
प्रकाशक – चपराक प्रकाशन, पुणे
किंमत – १५० रुपये

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

महिलांना स्वावलंबी बनवण्याचा वसा घेतलेल्या आरती सोनग्रा

भ्रमणध्वनीचा अतिवापर : वाढता धोका !

झोप लागत नाही ? हे उपाय करून पाहा…

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!