विशेष संपादकीय

कल्पकम – अणुऊर्जेचे अभियांत्रिकी ‘अक्षय पात्र’ !

विशेष आर्थिक लेख…

ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रामध्ये आपल्यापुढे विविध आव्हाने उभी ठाकलेली असतानाच अणुऊर्जा निर्मिती बाबतचे एक अभूतपूर्व यश भारताने संपादन केले. जागतिक पातळीवर नोंद घेतली जाणारी ही महत्त्वाची व उत्साहवर्धक घटना आहे. या अभूतपूर्व यशाचा घेतलेला मागोवा…

प्रा. नंदकुमार काकिर्डे

6 एप्रिल 2026 या दिवशी चेन्नई जवळील कल्पकम अणुऊर्जा प्रकल्पातील ५०० मेगा वॅट क्षमतेची प्रारूपिक द्रुतगती इंधनजनक अणुभट्टी – प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर ( पीएफबीआर) कार्यान्वित म्हणजे ‘क्रिटिकल’ झाली. “क्रिटिकल ” याचा अर्थ या रिॲक्टरमध्ये एक सातत्यपूर्ण अणुसाखळी अभिक्रिया सुरू झाली असून त्यामुळे अणुऊर्जेपासून वीज निर्मितीची नांदी भारताने यशस्वीपणे केलेली आहे. याबद्दल या प्रकल्पातील सर्व अणुशास्त्रज्ञ, तंत्रज्ञ व कर्मचाऱ्यांचे खास अभिनंदन.

वास्तविक पाहता कल्पकम अणुऊर्जा प्रकल्प सुमारे पंधरा वर्षांपूर्वी केंद्र सरकारने हाती घेतला. त्यावेळी त्याचा अंदाजीत खर्च 3492 कोटी रुपये इतका होता. या प्रकल्पाला तब्बल पंधरा वर्षे विलंब झाल्यामुळे आजच्या घडीला त्याचा खर्च 8181 कोटी रुपयांवर पोहोचलेला आहे. या प्रकल्पातील झालेली वेळेची दिरंगाई व त्याचबरोबर खर्चात झालेली दुपटीची वाढ ही सकृत दर्शनी अवाजवी वाटत असली तरी अणुऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रामध्ये भारताने मिळवलेले तंत्रज्ञान विषयक यश लक्षात घेतले तर या दोन्ही गोष्टी निश्चितपणे क्षमा करण्यास पात्र आहेत. 

मुळामध्ये एक गोष्ट आवर्जून नमूद केली पाहिजे की प्रारूपिक द्रुतगती इंधनजनक अणुभट्टी – प्रोटोटाइप फास्ट ब्रिडर रिऍक्टर ( PFBR) उभारणे हे तांत्रिकदृष्ट्या खूप आव्हानात्मक आहे. अनेक विकसित राष्ट्रांनी त्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यात अमेरिका व जपान या देशांनी याबाबतचे तांत्रिक आव्हान व त्याच्या निर्मितीसाठी होणारा प्रचंड भांडवली खर्च लक्षात घेऊन त्यांचे प्रयत्न अर्धवट सोडून दिले. आजच्या घडीला फक्त रशिया हा एकमेव देश अशा प्रकल्पाची उभारणी करण्यामध्ये यशस्वी झाला असून ते व्यावसायिक रित्या अणुऊर्जा निर्मिती करत आहेत.जेव्हा अमेरिकेसारख्या बलाढ्य व श्रीमंत देशाने या प्रकल्पातून आर्थिक कारणामुळे माघार घेतली त्याच प्रकल्पाच्या निर्मितीमध्ये भारताने पंधरा वर्षांमध्ये अतुलनीय मिळवले आहे याची सन्मानाने दखल घेतली पाहिजे यात शंका नाही.

रशियाबरोबरच आज चीन सुद्धा या क्षेत्रात चांगली प्रगती करत आहे. त्यांनी ‘सीएफआर 600’ नावाने हा प्रकल्प हाती घेतला असून तो नजीकच्या काळातच सुरुवात होईल अशी दाट शक्यता आहे. म्हणजे रशिया व चीन बरोबरच व्यावसायिक फास्ट ब्रिडर रिऍक्टर बनवून ऊर्जा निर्मिती करणारा भारत हा जगातील तिसरा देश बनत आहे. भारतीय अणुशास्त्रज्ञ, तंत्रज्ञ यांनी अथक परिश्रमाने हे यश मिळवलेले आहे. या प्रकल्पाच्या आणखी काही चाचण्या व टर्बाइनचे सिंक्रोनायजेशन केले जाईल व पुढील एक ते दीड वर्षाच्या काळातच ग्रीडला वीज पुरवठा सुरू केला जाईल. दरम्यान अणुऊर्जा विभागाच्या विविध शाखांनी या ऊर्जा निर्मितीतील सर्व प्रकल्पांची अंमलबजावणी करण्याची गरज असून काही ठिकाणी नियोजन करावयाचे असेल तर ते जलतगतीने पूर्ण करण्याची आवश्यकता आहे.

केंद्र सरकारने हा ब्रिडर रिऍक्टर बांधण्यासाठी व चालवण्यासाठी भारतीय नाभीकीय विद्युत निगम लिमिटेड – “भाविनी” नावाची स्वतंत्र सरकारी कंपनी स्थापन केली असून त्यांच्या माध्यमातून अशा प्रकारचे आणखी दोन-चार रिॲक्टर  बांधण्यासाठीची योजना कंपनीने आत्मनिर्भरतेसाठी हाती घेण्याचे ठरवले आहे आहे. पीएफबीआर (PFBR) मध्ये सोडियम-कूल्ड पूल-टाइप रिॲक्टरचा वापर केला जातो. भविष्यात थोरियमचा वापर करण्याच्या उद्देशाने याची रचना केली असली तरी, हवा किंवा पाण्यासोबत तीव्र प्रतिक्रिया देणाऱ्या द्रव सोडियमच्या वापरामुळे कार्यान्वयनाची गुंतागुंत वाढते. या अणुभट्टीमध्ये प्लुटोनियम 239 व युरेनियम 238 यांच्या ऑक्साईडच्या मिश्रणाचा इंधन म्हणून वापर केला जातो. हे इंधन भारतात चालणाऱ्या पारंपरिक दाबयुक्त जड पाणी अणुभट्ट्यांमधून (ज्याला प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिऍक्टर्स म्हणतात) मिळू शकते. या ब्रीडरच्या कामाबद्दल सांगावयाचे झाले तर तो युरेनियम 238 चे अधिक प्लुटोनियम 239 मध्ये रूपांतर करून तिच्या वापरापेक्षा जास्त प्लुटोनियम 239 तयार करते.

पुढील दोन ब्रीडर अणुभट्ट्यांमध्ये ब्रीडिंग रेशो वाढवण्यासाठी धातूरूप इंधनाचा वापर केला जाणार आहे. याचा अर्थ त्यांच्या ऑक्साईड्स ऐवजी शुद्ध प्लूटोनियम 239 व युरेनियम 238 यांचे मिश्रण वापरले जाणार आहे. धातुरूप इंधन हे फास्ट ब्रिडर अणुभट्ट्यांचे अंतिम ध्येय आहे. त्यामुळेच धातू रूप इंधनाकडे वळण्याला भारताने सर्वाधिक प्राधान्य दिलेले आहे. एकदा प्लुटोनियम 239 चा पुरेसा साठा तयार झाला की मग आपण थोरियम चक्राकडे वळू शकतो. आजच्या घडीला भारतात थोरियम मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे या फास्ट ब्रीडर अणुभट्ट्या   थोरियमचे रूपांतर युरेनियम 233 या दुसऱ्या विखंडनक्षम पदार्थात करू शकतात.

थोडक्यामध्ये कल्पकम पीएफबीआर हा प्रकल्प भारतासाठी अणुऊर्जा निर्मितीसाठी अक्षय पात्र ठरणारा अभियांत्रिकी चमत्कार असून स्वदेशीकरणाचा अभिमानास्पद क्षण आहे. त्याच्या निर्मितीची कहाणी ही अत्यंत तांत्रिक आणि आर्थिक अडचणी विरुद्धच्या चिकाटीची आहे. अणुऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्णतेच्या मार्गावर प्रचंड संयम, वाढता खर्च आणि काटेकोर व्यवस्थापनाची आवश्यकता असते. भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याला यानिमित्ताने सुरुवात झाली असून देशाच्या ऊर्जा सुरक्षेच्या प्रवासातील हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. सध्या देशात 7.5 गिगावॅट अणुऊर्जा निर्मिती होत आहे. पुढील वीस वर्षात आपल्यासमोर अणुऊर्जा माध्यमातून 100 गिगा वॅट उद्दिष्ट आहे. त्यामुळेच कल्पकम प्रकल्प अणुऊर्जा निर्मितीमध्ये क्रांतिकारी बदल करणारा ठरणार आहे.

( प्रस्तुत लेखक पुणेस्थित अर्थविषयक जेष्ठ पत्रकार असून माजी बँक संचालक आहेत )

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

माझं भारतीयत्व : तिरंग्याचे रंग My Indiannessः Urmila Chakurkar

तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…

1 hour ago

अयोध्येतील दानपेटी प्रकरण : श्रद्धा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची कसोटी Ram Mandir Donation Box Case

स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…

7 hours ago

Dnyneshwari Tips On Karma : कर्म सोडू नका तर त्यातला अहंकार सोडा अन् चमत्कार पाहा

आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…

23 hours ago

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

2 days ago

विरोधकांचा आवाज क्षीण झालायं… की सरकार अधिक बळकट झालंय ? Monsoon session of the legislature

मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…

2 days ago

इतिहास वाचनातूनच संस्कार अन् सुराज्याची जडणघडण : संयोगिताराजे छत्रपती Good State Formed Through Reading History

वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…

3 days ago