मुक्त संवाद

गावगाड्याच्या रहाटगाडग्यात आदरून गाठणारी ‘मांजरखिंड’

अशी ही दर्याची दौलत असलेली गावगाड्याच्या रहाटगाडग्यात गाठणारी ‘मांजरखिंड’. ही वाचक काचबारत, भितभित, दबक्या पावलांनी नाहीतर मोठ्या आशेनं ओलांडतील आणि काळजाच्या सांदडीत जपून ठेवावतील. म्हणूनच या ‘मांजरखिंडी’चं त्वांड भरून कौतुक.

रवींद्र शिवाजी गुरव, 9822254047

मांजरखिंड ही ज्येष्ठ साहित्यिक मित्र मारुती ज्ञानू मांगोरे यांची गावपण शाबूत ठेवणारी बहुचर्चित पहिलारू कादंबरी दर्या प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केली आहे. गाव, वाडी, वस्ती, शिवार, राजकारण, शिक्षण, बेकारी, भ्रष्टाचार, दलित योजनांची पळवा पळवी अशा बाराबचाक अंगांनी ती वाचकाला गाठतेच.

साहित्यिक मारुती मांगोरे हे उत्तम कथाकथनकार, कथालेखक, कवी आणि कादंबरीकार म्हणून नावलौकिक असणारं साहित्यातील कसदार लेखणीचा पाईक असलेलं जाणकार बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या व्यापक अनुभवविश्र्व असलेल्या दमदार लेखणीतून त्यांनी ‘मांजरखिंड’ भरभक्कमपणे उभारली आहे.

कोल्हापुरी भाषेतील शिवी शिवाय पाणी न पिणारी अस्सल शिवी संपदा पात्रांच्या तोंडून घेऊन मिरवत गावचा कानाकोपरा, वाडीवस्ती जातपात धर्म बगलेला ठेवून त्यात जीव ओतून सजीव केली आहे. कादंबरीचा साच्या धरून जरा वेगळा पायंडा पाडत बगलेला सारलेल्यावरच भर देत आपला लेखणीचा आवाका प्रस्थापित केला आहे. इतकच नाही तर ही कांदबरी ग्रामीण बोलीतील संवाद, निवेदनशैली नवख्या तसेच बोलीत रूळलेल्या वाचकाच्या काळजाचा ठाव घेते आणि न्हानगं गावच्या जोडीला मानेवाडीवर भर देते. अवास्तव निवेदन नाही की जाणीवपूर्वक वाडाचार. त्यामुळं कादंबरी बयाजवार वाचकांसोबत पुढं सरकत राहाते ते कथानक कवेत घेऊनच.

ही कादंबरी म्हणजे सुखदुःखांशी समरस झालेलं गाव न्हानगं आणि मानेवाडीची ही काळीजबोली. ती गुण्यागोविंदानं नांदणारी. एकजीव होऊन पवार, देसाई, पाटील, देशमुख यांचं वतनदारी राजकारण मोडून पाडायला दबकत धजणारी. आकारामसारखा लढवय्या पिंड हीच अन्यायविरुद्ध उभा करते. त्याच्या माघारी खस्त्या खात शिक्षक झालेला त्याचा पोरगा जोतीवर धुरा ठेवते.

इदरणी, जालीम, खिन्न, दोरखंड सांगड, आस्तीआस्ती, शिवाशिव, खतीर, खडावणं, पायाला खत, खंडान, पातळ, दादणी, गुळाचा हेंडा, राव्हटी, रवरव, बुरुंब, भाव, ढाक, रिणवं, न्हानगं, भवन, मापटं, आईच्यान, आवळून, माणूस घाण, हाताबुडी, निकतं, डेंगलंया, आब, आमासनी, दिनवानून, लवांडतो, पाठवानातनं कळ, मधघर दांडगावा, आवघातकं दाजीपावणं, आंडील पाडी, रापली, येदवा, आदन, दागदुम, तंडवाद, कुजलं, संजोक, परमाळलं, बाळासाब, राजेशभार, चूल, भानुसा, पोतिरा, भिताड, लच्यांड, इगत, फुकटपसरी, काशी, पैशाला खार, कुकाऱ्या, झांबळ, गंजी, गुदस्ता, पयान, चिनभिन, पायखानं, साठातली शेरडं, पैपावणं, कपडेलत्ते, साकाटणं, सवळंकरी, ध्याडा, गुदरंना, येरबडला, जमत्यात, पावण्यापयात, उभाउभी, जागं, तोडपात, कुणगं, वाट्यान, जापणावर, चक्रम, रतीब, वार्गीतली, पोटात चावाय, पोटगी, बदमाली अशा गाव खेड्यासकट भोतीभोरचं जगणं समृद्ध करणाऱ्या शेतकऱ्याच्या अवतीभवतीच्या बाराबचाक खंडीभर शिव्याबी हासडीत शब्दसंपदे सोबत बालपणी खेळलेलं मातीतलं वाळूचे घड्याळ, तिथली काऊ माती आणि तांबीट कंदोर आणि बोऱ्यासारखे गवत सुद्धा वळीन मांडते. पाकाड्यात ठेवलेल्या फुटक्या कानाच्या कपातून जातीयता गडद करते.

विंचू दंशावर औषध देणारा दाजीबा त्या औषधाचा थांगपत्ता कुणाला न सांगता मेला हे ही अधोरेखित करते ते त्याच्या हेकाडी आडमुठ्या स्वभावातून. त्याच्या माघारी त्यांनं दिलेलं औषध चोरून बघणारा सिद्धाप्पा मानेवाडीत विंचू उतरवणारा; पण त्याच्याकडे गावातलं कुणी न जाणारं. त्यांची सावली पडली की जखम चिघळती म्हणणारी अंधश्रद्धा त्यांना अडवून ठेवते. एक जीव घेते.

शाहिरी गाणं साख्यातून पद, भारुड, गण, गवळण, रामायण, महाभारत भगवद्गीता यांची अख्यानंही मनात पेरते. भजन, शिमगा अन्य सण रितभात यातून पारंपरिक गावपण जपते. खऱ्याची बाजू घेणारा, समाज व्यवस्थेची चीड असणारा, वावगंण न खपणाऱ्या ताड की फाड जे असेल ते तोंडावर मांडणाऱ्या तोंडाळ आकाराम पाठोपाठ जोतीबाला नायक करत अनेक जणांना सहनायक म्हणून सामावून घेत देशमुखच्या खलनायकीवर बार भरते. खोटं अंगठं उठवून जमिनी हडप करणाऱ्या गणपा सावकारावरही घसरते.

आंदू पाटलाचा बैल मेल्यावर मानेवाडी जाणारी खरं किड्यान हूळ बैल कसा काढायचा म्हणून विचार करणारी पाटलाच्या धावण्यावर आकाराम रेड्यासारखा गडी अन्यायाविरुद्ध पेटून उठतो. गाव आणि मानेवाडीच्या मधला लोंढा भरून वाहणारा त्यामुळे ही अडचण झालेली पण लक्षात कोण घेतो. इथं धुसफूसही तेवढीच.

ढोलकीच्या तोड्या पायी घोंगडं ठेवून तमाशा बघायला जाणाऱ्या हौशी भाऊ दादून गावची अब्रू खुट्टीवर टांगली म्हणून न्हानगं आणि मानेवाडी एक झालेली. देशमुखांना कसब्याला जाऊन जाते. गावची माफी मागायला लावते. हणमाचा धोंडा, तिथं रुसून गेलेला देव, त्याचा दागदुम, देवाप्पाच्या अंगातल्या शिवकळा याचाही डांगोरा पिटते.

थिरथिरं, कैन्या, तिरपा, बातरं , कानफाट्या अशा ग्रामीण बोलीतील उपाधींनी एक एक पात्र सजीव करते आणि तोंडात मेतकोंड्याची चवही रूदीवते.
राजा हालं परज्या डुलं, बडा घर पोकुळ वासा अशा म्हणींतून आबातलं घोडं दाबात दामटते.

पायतानं खाणे, नाबर असणे, नाके नौ, गोष्टीकडनं मार खाणे, नावाजणे, बार भरणे, बार उडवून देणे, बैलावाणी उट्या, आतडं करकांडणे, डोस्कं डोंगराला लावणे, मागं सर म्हणणे, मळबाला हात लावणे, पिरतुमी जितून येणे, रंग हवाला बघणे, मिट्टी पडणे अशा वाक्प्रचारांची मराठी भाषेला व्हईक काय राजीक म्हणीत सादवून देणगी बहाल करते.

म्हारकी, तांबोळा, नाळवा, बामणाचा मळा, नमाणकी, सातवार, एकोंडी, तराळकी, म्हेतरकी अशा शेतांचा उदो उदो करते. म्हारोड्याकडं जाऊन येतो म्हणण्याच्या पद्धतीनं वादंग उठवते. राम मंदिरात वारकरी भानू कांबळे तोंडाला तांब्या लावून पाणी प्याला म्हणून दंगा घालते. शामरावच्या बायकोच्या रुपान जात मुळात नाहीच सगळ्यांचं रक्त एकच हे बिंबवते. जात डबऱ्यात गाडते. तिच्या भावान रक्त दिलं म्हणून जगलास याची आठवण करून देते. आंतरजातीय विवाहाला खत पाणी घालते. एवढंच नाही तर सगळ्या जाती एका गांडीन हागणाऱ्या हाईत हे धाडसान म्हणते.

बंधू प्रेमा खातर भावाला मदत करून झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवणारा जोतबा, विविध उपक्रमांतून आर्थिक तसेच अन्य अंगान शिक्षकाला गृहित वर्गणीदार ठरवून वेठीस धरणाऱ्या समाजाला विचारणा करत व्यसनाधीन आणि लेकीसमान विद्यार्थिनींवर वाईट नजर टाकणाऱ्या चिमूटभर शिक्षकांवर वर्मी घाव घालते. इंग्रजी शाळांचे फ्याड, नवीन शिक्षकाला पेन्शन नाही ते इथून पुढे शिक्षकाची नोकरी कोण करेल असं वाटत नाही असा सूर मुख्याध्यापकाच्या वतीन धरते.

गावच्या सरपंच निवडणुकीतील पैसे वाटप, भ्रष्टाचार, आयुष्यातून उठवणारी कट कारस्थाने, अंधश्रद्धा यावर रंगा मस्कराचा नववीतला गोदू होऊन शपथ घेऊ नको नाहीतर घर सोडीन म्हणीत ताकीद देते. मांत्रिक, लिंबू, पानाचे विडे, हळद-कुंकू याला बगलेला ठेवते.

खऱ्याचं राजकारण नाही. कोण कधी खिंडीत कसलं चांगलं ‘मांजरखिंडी’तच गाठील हे ठासून सांगते. नरक्या तस्करीत लाखोंची कमाई करणारा देशमुख गावच्या निवडणुकीत पराभूत होतो आणि खोट्या जातीवाचक केसचा कारभार सुरू करतो. खोटं नाटं करू नका माझ्या बाबासाहेबांनी असं नाही सांगाय म्हणत कायदा माणसाकिंदी मोठा हाय व्हय गा हे चंद्राप्पाच्या कलेन सांगते. म्हारं, मांगं, कुरवाडी गुण्यागोविंदान नांदंतीत त्याचा इगोड केला म्हणून देशमुखाला जाब विचारायाला धजते ती चंद्राप्पा होऊनच. आधी शिवाशिव पाळणारं गाव आयुष्यभर खस्ता खाऊन जोडलेलं. ग्वाडवाणी बोलणारं गाव खोट्या केसीन तुटलं. परत जवळ करतील ही आशा संपलेली. यांना आपल्या वाडवडलांनी लांब ठेवलेलं तेच बरं होतं हेच पोटातलं भ्या बळवत ठेवते.

पोरांनी माणसं तोडली याचं चंद्राप्पाला वाईट वाटतं; पण तो काहीच करू शकत नाही. म्हातारपण भाकरीला महाग असतं या जाणीवेन तो गप्प बसतो ते एकीकड गाव तुटतंय आणि दुसरीकड पोरं तुटतील म्हणून. मधल्या मध्ये त्याचं मरण होतं. मनातली उबळ लव्हज्या सोबत तो बाहेर काढतो. पोरांच्या विरोधात जाऊन कसं जगायचं हाच प्रश्न त्याचाही. राजकारण करण्यासाठी या पोरांना पाठनं हिंडिवणारे राजकारणी आणि जीवघेणं राजकारण घरं मोडतं.

चंद्राप्पा आपल्या म्हातारीला देसाई-पवारांची पोरं सुटली की घासभर खाईन म्हणतो. तोवर आन पाणी सोडतो. गाव नि मानेवाडी दोन नाहीत असं घोकत झांबळ्याची भाल मारून मुरकटून आडवा होतो. म्हातारी भुक्यावल्यापोटी उपाशीच गावातील निरोपाची वाट बघत बसते. गाव नि मानेवाडी ‘मांजरखिंडीग’त सामसूम… उद्या काय वाढून ठेवलंय कुणाल दखल….

अशी ही दर्याची दौलत असलेली गावगाड्याच्या रहाटगाडग्यात गाठणारी ‘मांजरखिंड’. ही वाचक काचबारत, भितभित, दबक्या पावलांनी नाहीतर मोठ्या आशेनं ओलांडतील आणि काळजाच्या सांदडीत जपून ठेवावतील. म्हणूनच या ‘मांजरखिंडी’चं त्वांड भरून कौतुक. आणि साहित्य प्रांतात भरभक्कमपणे उभारणी केलेल्या ‘मांजरखिंड’सारखी मुलखावेगळी साहित्य उभारणी करणाऱ्या कादंबरीकार शिल्पकारांचं मनस्वी अभिनंदन आणि अनंत शुभेच्छा.

🌹🙏🌹
पुस्तकाचे नाव – ‘मांजरखिंड’.
लेखक – मारुती ज्ञानू मांगोरे.
प्रकाशन – दर्या प्रकाशन, पुणे.
पृष्ठे – २००.
मूल्य – ३००₹.

‘मांजरखिंड’ ही मारुती मांगोरे यांची आजच्या खेड्याचे वर्तमान चित्रित करणारी कादंबरी आहे. ही कादंबरी भारतीय संस्कृतीतील सनातन जित-जेत्या संस्कृत्यांचा संघर्ष चित्रित करते. कादंबरीतील मानेवाडी गावाची विभागणी मधे वाहणाऱ्या लोंढ्यामुळे झाली असली तरी, मध्ययुगीन काळापासून चालत आलेला गावगाडा आतला आणि बाहेरचा यातील दुभंग येथे अधोरेखित होतो. आंबेडकरी विचारधारेच्या जागृतीनंतर निर्माण झालेले नवे ताणतणाव येथे अधिक तपशिलाने चित्रित होताना दिसतात. स्वातंत्र्यपूर्व पिढीतील आकाराम हा समता, शिक्षण आणि मानवमुक्तीसाठी आशावादी आहे तर, स्वातंत्र्योत्तर काळातील बदलत्या परिस्थितीचा लाभार्थी झालेला वर्ग येथे लेखकाने अधिक सजगपणे चित्रित केला आहे. जोतीराम हा नव्या लबाड शिक्षणव्यवस्थेचा बळी आहे. स्वातंत्र्योत्तर राजकारणात फसत गेलेली खेडी, दलितांचा हत्यार म्हणून राजकारणासाठी केला जाणारा वापर येथे अधिक गांभिर्याने चित्रित केला गेला आहे. जित-जेत्या पारंपरिक संघर्षासाठी तयार झालेले गाव आणि त्यातून निर्माण झालेले अनेक प्रश्न चंद्राप्पासारख्यालाही हतबल करून टाकतात. यातून भारतीय खेड्यातील नवे संघर्षरूप वाचकांसमोर येते. राधानगरी परिसरातील बोली हे या कादंबरीचे वैशिष्ट्य असून अस्सल व्यक्तिचित्रणामुळे ही कादंबरी लक्षणीय ठरते. कादंबरीतील जीवनचित्रणाचा आवाका विशाल व व्यापक असल्यामुळे ती बहूमुखी झालेली आहे.

गोमटेश्वर पाटील

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

5 hours ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

6 hours ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

15 hours ago

Weather Forecast : १७ ऑगस्टपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…

15 hours ago

फिदेलसोबत १०० वर्षे : अमेरिकन दादागिरीसमोर न झुकलेल्या क्रांतिकारकाची कहाणी

फिदेल कास्त्रो यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अखिल भारतीय किसान सभेकडून अभिवादन नवी दिल्ली :क्यूबाच्या क्रांतीचे कमांडर-इन-चीफ, जननेते…

1 day ago

कोल्हापूरच्या युवा दिग्दर्शकाच्या ‘अनघा’ला जम्मू फिल्म फेस्टिव्हलची पसंती

https://youtu.be/xcTeVoV7ItY कोल्हापूर येथील युवा चित्रकार व दिग्दर्शक स्वप्निल बळवंत पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या “अनघा” या…

2 days ago