मुक्त संवाद

कथा धार्मिक प्रथांच्या आणि जीवनप्रवास….. एका विचार धारेचे दोन प्रवाह.

प्रा. देवबा शिवाजी पाटील हे नाव साहित्य क्षेत्रात एक वैचारिक साहित्यिक म्हणून सर्वश्रुत आहे. केवळ अध्यापनाचे कार्य न करता सर्वांनाच मार्गदर्शक ठरेल अशी साहित्य निर्मिती त्यांनी केली आहे. यामध्ये काव्यसंग्रह, धार्मिक रचना, देशभक्ती, निसर्ग, स्त्री विषयक काव्य, कथासंग्रह, बालकुमार व युवा साहित्य अशा विविधांगी साहित्याचा समावेश आहे. धर्म, परंपरा आणि विज्ञान यांची सांगड घालून कुमारांना समजेल असे लेखनही त्यांनी केले आहे. या पुस्तकांचा वाचकवर्ग भिन्न असला तरी लेखकाची मूळ विचारधारा पक्की असल्याने, एकाच नदीचे दोन प्रवाह वाहत असावेत तसे हे लेखन झालेले दिसते. पहिले पुस्तक आहे ‘ कथा धार्मिक प्रथांच्या ‘ व दुसरे पुस्तक आहे ‘ जीवनप्रवास ‘. या दोन्ही पुस्तकांना स्वतंत्रपणे समजून घेऊ.

सुहास रघुनाथ पंडित, सांगली
   ९४२१२२५४९१

‘कथा धार्मिक प्रथांच्या’  हे पुस्तक बाल व किशोर वयोगटातील वाचकांसाठी आहे. त्यामुळे आपण वाचावे की नाही असा संभ्रम पडतो. पण काही पाने वाचल्यावर लक्षात येते की यातील खूपसे आपल्यालाही माहित नाही. म्हणजे विषय समजून घेण्याच्या बाबतीत आपण अजून  ‘बाल’ च आहोत. त्यामुळे फक्त बालकांनीच नव्हे तर पालकांनीही वाचावे असे हे संस्कारक्षम पुस्तक आहे.

या पुस्तकात रत्ना हे तेरा चौदा वर्षांच्या मुलीचे मध्यवर्ती पात्र आहे. ती हुशार व जिज्ञासू आहे. त्यामुळे तिला सारखे प्रश्न पडत असतात. या प्रश्नांची उत्तरे माहित असायला हवीत. ती माहिती न कंटाळता द्यायला हवी. हे काम करते रत्नाची आजी. रत्ना आणि तिची आजी यांच्यातील प्रश्नोत्तरातून घडणारा संवाद म्हणजे या ज्ञानदायी कथा !

कोणते प्रश्न पडतात बरे रत्नाला ? रोजच्या जीवनात ती जे पाहते, कुटुंब व समाजात जे जे दिसते त्या सर्वाविषयी तिला प्रश्न पडत असतात. धार्मिक आचरण करत असताना केवळ परंपरा म्हणून आचरण न करता त्यामागचे शास्त्र व विज्ञान समजून घेतले पाहिजे हे अत्यंत तळमळीने सांगण्यासाठी लेखकाने हा शंका निरसनाचा मार्ग निवडला आहे.

रत्नाला जे समजत नाही ते ती विचारते आणि तिला मिळणाऱ्या उत्तरातून आपले ज्ञान वाढत जाते. उपासना म्हणजे काय ? स्तोत्रे ,आरत्या का म्हणायच्या ? संकल्पयुक्त पूजा कशी असते ? देवाचा प्रसाद का घ्यायचा ? गोमूत्र, गोमाता, सडा, रांगोळी, स्वस्तिक, फुले, दुर्वा, सुपारी, बेल इत्यादी विषयीं तिला कुतूहल आहे. त्यामुळ’ हे सर्व कशासाठी ? हा प्रश्न‌ तिला पडतो. यासारख्या शंका दूर करतानाच लेखकाने शंख, शंखध्वनी, कापूर, समई, श्रीफळ, प्राणप्रतिष्ठा, मंदिरातील कासव, नंदी,घंटा, आचमन अशा धार्मिक क्रियांशी संबंधित अनेक वस्तू व प्रथा यांचे वैज्ञानिक संबंध समजावून दिले आहेत. यावरुन आपल्या लक्षात येईल की धार्मिक प्रथांच्या या संबंधी सर्वांच्याच मनात ज्या शंका असतात किंवा काही प्रमाणात अज्ञान असते ते नात व आजीच्या संवादातून दूर होते. म्हणूनच हे पुस्तक फक्त बालकांचे नसून पालकांचेही आहे. कुटुंबातील सर्वांनी संवाद साधून समजून घ्यावे असे हे पुस्तक आहे.

प्रा. पाटील यांचे दुसरे पुस्तक आहे ‘ जीवनप्रवास ‘.

जीवन प्रवास हा ललित लेख संग्रह हातात घेण्यापूर्वी प्राध्यापक देवबा पाटील यांचा आणि माझा काहीही परिचय नव्हता. त्यांनी विविध प्रकारचे विपुल लेखन केलेले असले तरी माझ्या वाचनात ते फारसे आलेले नव्हते. परंतु जेव्हा जीवनप्रवास हा लेखसंग्रह माझ्याकडे आला आणि तो मी वाचायला वाचायला सुरुवात केली तेव्हा एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे प्राध्यापक पाटील हे जीवनाकडे अत्यंत गंभीरतेने आणि सूक्ष्मतेने पाहणारे लेखक आहेत. वाचन, मनन आणि चिंतन या तीनही पायऱ्या पार केल्या नंतर सरस्वतीच्या मंदिरात त्यांनी शब्दांची जी पूजा आरंभली आहे ती अत्यंत विलोभनीय आणि सर्व वाचकांच्या मनाला भुरळ घालणारी आहे. विचार प्रवर्तक, बोध प्रधान, स्फूर्तीदायक लेखांचा हा संग्रह म्हणजे लोकांना उपदेश करण्याची भूमिका नसून उलट आपल्याजवळ जे काही ज्ञान आहे, जे काहीविचारांचे संचित आहे ते इतरांना वाटून द्यावे एवढा एकच उद्देश त्यांनी आपल्या सर्व लेखनामागे ठेवला आहे. त्यामुळे ‘शहाणे करून सोडावे सकल जन ‘ हीच त्यांची भूमिका आहे.

या लेख संग्रहातील पहिला लेख ‘जीवन प्रवास’ या शीर्षकाचा आहे. या लेखाचे बारकाईने वाचन केल्यावर आपल्या लक्षात येईल की जीवन जरी एकच असले तरी त्याकडे पाहण्याचा लेखकाचा दृष्टिकोन किती भिन्न भिन्न प्रकारचा असू शकतो. जीवनाला ते ओबडधोबड रस्ता म्हणतात तर त्याच जीवनाला त्यांनी धुळीने बरबटलेला रस्ता असेही म्हटले आहे. हा रस्ता चालल्यानेच संपतो. थांबण्याने नाही. रस्ता चुकला तरी आंतरिक विवेकशक्ती माणसाला योग्य मार्गावर आणून सोडते. आपल्या अंगावर धूळ उडणार नाही याची काळजी घेऊन रस्ता चालत राहायचे असते. जीवनाकडे ते अनेक दृष्टीने पाहतात. कधी जीवन त्यांना आगगाडी वाटते,  तर कधी जीवन म्हणजे बुद्धिबळाचा पट आहे असे वाटते. माणूस आशेच्या रुळावरून धावत असतो, निराशेचा धूर सोडत असतो आणि सहानुभूतीच्या स्टेशनवर थांबत असतो.

बुद्धिबळातील सोंगट्यांप्रमाणे प्रत्येक स्त्री-पुरुष आपापल्या आखून दिलेल्या मार्गाने प्रवास करत असतात त्यांना त्यांच्या मर्यादा ही महित असतात. जीवनात प्रतिकूल आणि अनुकूलतेच्या लाटा येतच असतात. त्यामुळे जीवन हे सागरा सारखे आहे असे लेखकाला वाटते. आयुष्यभर तडजोड करत करत जीवन जगावे लागते. त्यामुळे कधी ते तारेवरची कसरत आहे असे वाटते. परंतु त्याच वेळेला जीवन हा एक रंगत जाणारा खेळही आहे. कधी आक्रमक व्हायचे, कधी माघार घ्यायची याचे भान ठेवून खेळल्यास हा खेळ रंगत जातो. सकारात्मकता आणि आशावादी दृष्टिकोन, सामुदायिक जीवनातील जबाबदाऱ्यांची जाणीव, संकटांना सामोरे जाण्याची तयारी, जीवनाचा उद्देश ओळखून तो गाठण्याची तयारी या सर्वावर जीवनाचे यश अवलंबून असते. तीन खंडांच्या या जीवन पुस्तकातील प्रत्येक खंड महत्त्वाचा असतो. आपला स्वच्छ व सकारात्मक दृष्टिकोन आणि जीवनातील आनंद टिपत जाण्याची वृत्ती यावरच या तीनही खंडांचे यश अवलंबून असते. लेखकाचा जीवनाकडे पाहण्याचा हा व्यापक दृष्टिकोन उपदेशात्मक नसून मित्रत्वाच्या नात्याने केलेला सुसंवाद आहे, असे म्हटले तर अगदी योग्य ठरेल.

आयुष्यातील कर्तव्य कर्म याविषयी ही लेखकाने विचार व्यक्त केले आहेत. कर्तव्य आणि हक्क सदैव सोबतच चालत असतात. प्रत्येकाला कर्तव्ये ही करावीच लागतात .जबाबदारी पेलावी लागते. परंतु कर्तव्य पालन करत असताना ईश्वराचे स्मरण ठेवून केले गेले तर हे देवाचेच काम आहे. ही श्रद्धा मनात उत्पन्न होऊन कर्तव्य अगदी सहजपणे पार पाडले जाते. प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावेच लागणार आहे, याची जाणीव ठेवून प्रत्येकाने कर्म केले तर आपल्या कर्माचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागणार नाहीत हे प्रत्येकाने जाणून असावे.

प्रयत्न व कष्ट हा प्रत्येकाच्या जीवनाचा मूलमंत्र असला पाहिजे, असे ते म्हणतात. कठोर परिश्रमाशिवाय यश मिळत नाही. यासाठी त्यांनी मुंगी, मधमाशी, छत्रपती शिवाजी महाराज अशी वेगवेगळी उदाहरणे देऊन आपला मुद्दा पटवून दिला आहे. परंतु आंधळेपणाने कष्ट न करता कामाचे व आपल्या उद्दिष्टाचे सुनियोजन करणे आवश्यक आहे. कामाच्या सूत्रबद्ध आराखडा असेल आणि आपल्या कामावर आपली श्रद्धा असेल तर यश नक्कीच मिळते. काम करण्याची वृत्ती असणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. अनुभव आणि व्यवहार ज्ञान यांची सांगड घालून आणि मेंदूला सतत ताजेतवाने ठेवून आनंदाने कष्ट करत गेल्यास यश हे हमखास मिळतेच.

या ठिकाणी पहिल्या काही प्रकरणांविषयी सविस्तरपणे लिहिले आहे. उद्देश एवढाच की प्रा. पाटील यांचे लेखन किती वैचारिक आहे व वाचकांना ते कसे उपयुक्त ठरु शकते याची कल्पना यावी. यापुढील सर्व प्रकरणे ही जीवनाच्या विविध पैलूंवर प्रकाश पाडणारी आहेत. माणसाच्या स्वभावाचे विविध पैलू, त्यातील गुणदोष, मनोबल व चारित्र्य यांचे महत्त्व, सद्वर्तन व सद्विचार यांची आवश्यकता, मैत्री, पैसा, ताणतणाव, वाचन, मानसिक व शारीरिक आरोग्य व विश्रांती, धर्म,श्रद्धा, पूजा, प्रार्थना, समाजशीलता अशा सर्व बाजुंनी जीवनाविषयी विचार करून अत्यंत साध्या, सोप्या भाषेत ते व्यक्त करण्यात प्रा. पाटील यशस्वी झाले आहेत. या शिवाय एका प्रकरणात त्यांनी जीवनोपयोगी गोष्टींची चर्चाही केली आहे.

प्रत्येक लेख वाचताना लक्षात येते की त्या त्या विषयाचा पूर्ण अभ्यास करुन मग लेख लिहिलेला आहे. उदाहरणार्थ, ‘मनाचे सामर्थ्य’ हा लेख पाहू. हा लेख लिहीताना मन म्हणजे काय, मेंदूची कार्यपद्धती कशी असते, मन प्रसन्न का असले पाहिजे, मनाचा शरीराशी काय संबंध आहे, अंतर्मन व बहिर्मन म्हणजे काय, ते कसे कार्य करते, मन आणि विचार, इच्छाशक्ती यांचा काय संबंध आहे, मनाची चंचलता, मनाचा वेग तरीही ती एक शक्ती कशी आहे, अशा सर्व बाजुंनी मनाचा विचार करुन मनाचे सामर्थ्य वाढवण्यासाठी काय करता येईल या विषयीही त्यांनी चर्चा केली आहे. अन्य लेखांच्या बाबतीतही असेच अभ्यासपूर्ण लेखन दिसून येते.

प्रा. पाटील यांच्या लेखनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या लेखणीतून सुविचाराप्रमाणे अनेक चांगली वाक्ये बाहेर पडली आहेत. संकटे ही पुरुषार्थाची संधी असतात, कर्तव्य हा शास्त्राचा धर्म आहे तर प्रेम हा अंत:करणाचा धर्म आहे, सदाचाराविना जीवन म्हणजे होकायंत्राविना प्रवास करणारे जहाज, मैत्री म्हणजे सहवासाची सुरेल मैफिल असते. नशिबाचे कुलूप उद्योगाच्या किल्लीनेच उघडते. यासारखी वाक्ये त्यांच्या चिंतनशीलतेचे दर्शन घडवतात.

‘जीवनप्रवास’ हा लेख संग्रह तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच उपयुक्त ठरणारा आहे. किंबहुना जीवनाचा प्रवास करणाऱ्या प्रत्येकाने क्षणभर थांबून, या संग्रहातील लेखांचे वाचन करुन पुन्हा प्रवास चालू ठेवला तर पुढचा प्रवास अधिक सुखकर होईल यात शंकाच नाही. ‘कथा धार्मिक प्रथांच्या’ आणि ‘जीवनप्रवास’ ही दोन्ही पुस्तके वाचकांच्या ज्ञानात भर घालून सद्विचाराला प्रवृत्त करणारी आहेत.
                           
पुस्तकाचे नाव:  कथा धार्मिक प्रथांच्या
लेखक 
         : प्रा. देवबा शिवाजी पाटील, खामगाव. ९४२०७९५३०७
प्रकाशक       : नावीन्य प्रकाशन, पुणे
पृष्ठसंख्या.      :  ७८
किंमत.          : १५० रुपये

पुस्तकाचे नाव : जीवनप्रवास
लेखक          : प्रा. देवबा शिवाजी पाटील, खामगाव. ९४२०७९५३०७
प्रकाशक : कृष्णायन प्रकाशन , पुणे
पृष्ठसंस्था : १२०
किंमत : २०० रुपये

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

जागतिक अर्थकारणाच्या नव्या समीकरणांचा वेध घेणारे ‘ब्रिक्स अँड इंडिया’ ‘BRICS & INDIA: PROSPECTS & CHALLENGES

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…

8 hours ago

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

21 hours ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

1 day ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

2 days ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

2 days ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

2 days ago