मुक्त संवाद

वर्तमानाचे रूपक ठरलेली विज्ञानकाल्पनिका : बुटक्यांचे बेट

तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या युगात माणूस अधिक सक्षम होत आहे की अधिक संवेदनाहीन, हा मूलभूत प्रश्न आज जगासमोर उभा आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, उपभोगवाद, सत्तेची केंद्रीकरणे आणि नैतिक मूल्यांची होत चाललेली झीज या पार्श्वभूमीवर बाळासाहेब लबडे यांची “बुटक्यांचे बेट” ही कादंबरी समकालीन वास्तवाचे प्रभावी रूपक ठरते. विज्ञानकाल्पनिका, राजकीय व्यंग, मिथक आणि तात्त्विक चिंतन यांचा संगम साधणारी ही कादंबरी केवळ एका काल्पनिक बेटाची कथा न राहता आपल्या समाजाचा, वर्तमानाचा आणि भविष्याचा वेध घेणारी साहित्यकृती ठरते

डॉ. रमेश वरखेडे, ज्येष्ठ समीक्षक

ही कादंबरी पारंपरिक कथनरचनेच्या चौकटी मोडणारी आहे. पोस्टमन उर्फ ‘कबीर’ हा सूत्रधार, त्याच्या सोबतीला असलेले ‘डिजिटल कबुतर’, तसेच इतिहास, मिथक आणि वर्तमान यांची एकत्रित विण या साऱ्यांतून लेखकाने एक बहुपरिमितीय कथाविश्व उभे केले आहे. या कथनतंत्रामुळे कादंबरी केवळ वाचनाचा अनुभव राहत नाही, तर ती विचारप्रक्रियेचा एक प्रवास बनते.

राजकीय वास्तवावर भाष्य करणारी, सत्तेच्या खेळांचे भंडाफोड करणारी आणि लोकशाहीतील अंतर्विरोध उघड करणारी ही कादंबरी आपल्या काळाचा दस्तऐवज ठरते. त्याचवेळी महात्मा गांधींच्या विचारांद्वारे आत्मनिर्भरता, मूल्यशिक्षण आणि मानवी पुनर्जागरणाची दिशा सुचवणारी ही कृती आशेचा किरणही दाखवते. तर तुकारामांच्या तत्त्वनिष्ठतेचा अविष्कार घडविणारी आहे.

विज्ञानकाल्पनिका, रूपक, राजकीय व्यंग आणि तात्त्विक चिंतन यांचा संगम असलेली “बुटक्यांचे बेट” ही कादंबरी समकालीन मराठी साहित्यात एक महत्त्वपूर्ण आणि प्रयोगशील टप्पा ठरते. बदलत्या तंत्रज्ञानयुगात साहित्याची नवी शक्यता काय असू शकते, याचे प्रभावी उत्तर ही कादंबरी देते. ही केवळ एका बेटाची कथा नाही तर ती आपल्या समाजाची, आपल्या काळाची आणि कदाचित आपल्या भविष्याचीही गोष्ट आहे.

कादंबरीला प्रस्तावना असावी का, आणि असल्यास तिचे प्रयोजन काय यासंबंधी फारशी चर्चा यापूर्वी झालेली नाही, प्रस्तावनेमुळे वाचकाच्या वाचनप्रक्रियेला खरोखरच काही मदत होते की वाचकाचे वाचनस्वातंत्र्य त्यामुळे कुंठित होते हा खरा प्रश्न आहे. समीक्षा आणि प्रस्तावना यातली व्यवच्छेदकता कशी ठरवावी, हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ग्रंथसमीक्षा आणि प्रस्तावना ह्या दोन्हींचे प्रयोजन आणि रूपबंध वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे इथे कादंबरीची समीक्षा न करता कथानकाच्या खेळापलीकडे जाऊन वाचकवर्गाला प्रतिपाद्य विषयाच्या संदर्भचौकटींचा अवकाश खुला करून देणे हे प्रयोजन केंद्रस्थानी ठेवून येथे कादंबरीच्या रचनासूत्रांच्या वेगळेपणाची चर्चा करावयाची आहे. अशा प्रयोगशील लेखनाला सामोरे जाण्याची किमान पार्श्वभूमी तयार करता यावी इतकेच या प्रस्तावना लेखनाचे मर्यादित उद्दिष्ट आहे.

एकविसाव्या शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रांत अनेक क्रांतिकारी बदल झालेत. विशेषत: गेल्या तीन दशकांमध्ये रोबेटिक्स, मेनफ्रेम्स, इंटरनेट, डिजिटल आणि क्लाऊडपर्यंत तंत्रज्ञानाचा माणसाच्या दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाला. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रांतल्या या नव्या बदलांचा एकीकडे स्वीकार होत असताना त्याचवेळी या नवीन बदलांबाबत भीती आणि चिंतांचे ढगही पसरू लागतात. संगणकीय क्रांतीचे क्षेत्र जेव्हा व्यापार-उद्योग आणि दैनंदिन कामात विस्तारू लागले, तेव्हाही असेच भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. संगणकामुळे नोकर्‍या जातील अशी भीतीची लाट आली होती. अर्थात्‌, संगणकामुळे माणसाचे कामाचे स्वरूप बदलले, परंतु पाठोपाठ नव्या संधीही निर्माण झाल्या, हा इतिहास आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. सायबर क्रांतीचा माणसाच्या दैनंदिन जीवनावर पडलेला प्रभाव आपण पाहतो आहोत.

स्मार्ट आणि अलेक्सा एकत्रितपणे ग्राहकांना उत्तम सेवा देतात. ग्राहकांच्या मागण्या आणि आवडीनुसार उत्पादनांची शिफारस करतात. डॉक्टर ए.आय.चा वापर करून रुणांना उत्तम सेवा देतात. सायबर माध्यमे लोकांच्या विचारक्षमतेवर परिणाम करतात. सिस्टिममध्ये घुसखोरी करून राजकीय पुढार्‍यांचा प्रभाव उचलून टाकतात. आता कृत्रिम बुद्धिमत्तेचे, ए आय क्रांतीचे नवे वारे वाहू लागले आहेत. या तांत्रिक बदलाच्या लाटेमुळे पुन्हा एकदा नोकर्‍या जातील, वर्गखोल्यांतल्या शिक्षणाचे आकृतिबंध कोलमडतील, लेखक, संगीतकार यांचे महत्त्व संपेल, प्रकाशक ए. आय. तंत्रज्ञानाने पुस्तके लिहून घेतील, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. ए आय हा केवळ तांत्रिक बदल नाही, सांस्कृतिक बदल आहे, या मुद्यावरून सध्या अनेक पातळ्यांवर वैचारिक मंथन सुरू आहे. ए. आय. तंत्रज्ञान ही विकासाची पुढची पायरी असून या तंत्रज्ञानकडे कौशल्य परिवर्तनाचे उत्प्रेरक तंत्र म्हणून पाहिले पाहिजे, असा विचारप्रवाह जोर धरू लागला आहे. ए. आय. अर्थात्‌ कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने माणसाचे काम कमी होईल, शिक्षणप्रणालीत अत्याधुनिक ए. आय. समुपदेशक, ऑटेमेटेड ट्युटरिंग, ग्रेडिंग सिस्टिम यांचा वापर वाढेल. ए. आय. च्या मदतीने चित्रपटनिर्मिती, संगीत, ऑनलाइन खेळांची निर्मिती होईल. ए. आय. काही सेकंदात कथा लिहून देईल, क्लायमेक्स बदलून देईल, कवितांना चाली लावून देईल. हे स्वयंचलित तंत्रज्ञान लोकांच्या विचारशक्‍तीला आणि आनंदाला बंधनात ठेवायला मदत करत आहे. पण प्रेम, मैत्री, हसणं हे कदाचित ए. आय. करू शकणार नाही.

२०२४ मध्ये मार्क्स झुकेरबर्ग यांनी व्हॉईससह मेटा ए. आय. सादर केला, आणि त्यानंतर  एआय मॉडेल्सना कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रशिक्षण देण्यासाठी लिबजेन या “शॅडो लायब्ररी” चा वापर करण्यास मान्यता दिली. इंग्लंड- अमेरिकेत लेखकांनी ए. आय. मेटाविरुद्ध लढा सुरू केला. रिचर्ड ओस्मान या बेस्ट सेलिंग लेखकाने एआय कॉपीराइट वापरावर मेटाशी लढण्याची शपथ घेतली. इंग्लंड, अमेरिकेत लेखकांनी निदर्शने केली. अमेरिकेच्या न्यायालयात या विषयावर एक खटलाही चालू आहे.

कादंबरीकार केट मोसे, ट्रेसी शेव्हेलियर (Tracy Chevalier), कवी दलजीत नागरा, ‘सोसायटी ऑफ ऑथर्स’च्या अध्यक्षा व्हेनेसा फॉक्स ओ’लॉघलिन यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रशिक्षित लेखकांकडून पुस्तके लिहून घेणार्‍या प्रकाशकांविरुद्ध चळवळ सुरू केली. केट बुश आणि पॉल मॅककार्टनी यांच्यासह एक हजाराहून अधिक संगीतकारांनी परवानगीशिवाय त्यांचे संगीत वापरण्याच्या अशाच योजनांना विरोध केला आहे.

ए. आय. तंत्रज्ञान जरी कादंबर्‍या लिहून घेण्यासाठी वापरले जाणार असेल, तरी सर्जनशील लेखक त्यावरही काही नवा उपाय शोधतीलच. खरं सौंदर्य हे मानवी लेखनातच आहे, हे सिद्ध करू शकतील. कुठलेही नवे तंत्रज्ञान आल्यावर लेखक-कलावंत भविष्यकालीन सामाजिक बदलांचे चित्रण रंगविणार्‍या काल्पनिका लिहित असतात, तशा नव्या काल्पनिका लिहिल्या जातील. ‘युटोपिया’ आणि ‘डिस्टोपिया’ अशा दोन्ही प्रकारचे भविष्य रेखाटन या काल्पनिकांतून चित्रित होऊ शकेल. ए. आय. तंत्रज्ञानाच्या आक्रमक झंझावातात मानुषतेच्या मूल्यांची झीज होईल याचे चित्र काही लेखक रेखाटतील; तर काही लेखक हे नवे तंत्रज्ञान आणि मानवी भावना व नैतिकता यांचा समतोल साधणारे पर्यायी जीवनाचे कल्पनाबंधही पुढे आणतील. इतकेच नाही तर ए. आय. तंत्रज्ञाची सोबत घेऊन लेखक सर्जनाची नवी प्रारूपे निर्माण करू शकतील‘. विज्ञान साहित्यात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहित्याचे नवे पर्व सुरू होईल. यापूर्वी नेटवर्क क्रांतीमुळे मानवी संवादाची केवळ उपकरणेच बदलली नाहीत, तर संवादशैलीही बदलली आहे. डिजिटल देशस्थांच्या सायबरकट्ट्यांनी भाषेची व्याकरणिक बंधने तोडून लोकसंवादाचा पैस अधिकच मुक्‍त केला आहे.आता ए. आय. तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळे भाषेला नवी संवेदनशीलता, नवी शब्दरूपे, नवी शैली, नवे रिमिक्स, अभिव्यक्‍तीचे नवे आकृतिबंध आत्मसात करण्यासाठी योग्य वातावरण निर्माण झाले आहे.

बाळासाहेब लबडे यांची ‘बुटक्यांचे जग’ ही या नव्या पर्वातली एक प्रयोगशील कादंबरी आहे. समकालीन तंत्रज्ञात्मक बदल आणि त्यांचा राजकीय-सामाजिक जीवनावरील प्रभाव ह्या विषयावर आधारलेली ही एक तंत्रवैज्ञानिक काल्पनिका आहे. यापूर्वी रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांना केंद्रस्थानी ठेवून आर्थर क्लार्क, आयझॅक असिमोव्ह , फ्रँक हर्बर्ट ह्यांनी विज्ञान काल्पनिका लिहिल्या आहेत. विज्ञान व तंत्रज्ञानातील शोधांमुळे माणसाचे आंतरिक भावविश्व आणि बाह्य जगातील सामाजिक व संस्थात्मक जीवन यावर होणार्‍या परिणामांचा वेध घेणार्‍या या काल्पनिका वाचकाला विज्ञानाबद्दल आणि भविष्याबद्दल विचार करण्यास प्रवृत्त करतात.‘बुटक्यांचे जग’ ही या परंपरेतली कादंबरी आहे.

एका काल्पनिक बेटावर हे कथानक घडते. या बेटावर बुटकी वाडी आणि उंचवाडी अशा दोन लोकवस्त्या आहेत. बुटक्या वाडीत बुटके लोक राहातात, उंचवाडीत उंच लोक राहतात. बुटक्या वाडीतले लोक स्वार्थी, भोगवादी, कपटी मनोवृत्तीचे आहेत. त्यांच्या लेखी पैसा हा देव, फसवणुक हा धर्म आहे. नैतिकता ही पुस्तकी कल्पना आणि संवेदनशीलता म्हणजे दुर्बलता अशी त्यांची व्याख्या आहे. बुटके लोक व्यापार करतात, पण त्यांच्यात व्यावसायिकता नाही. त्यांच्या लेखी माणसे ग्राहक नसून शिकार असतात. त्यांनी माणुसकी गहाण ठेवली आहे. दुसर्‍यांना चिरडून मोठं होण्यात त्यांचा आनंद आहे. बुटक्यांच्या लोकवस्तीत फ्रीज, वॉशिंग मशीन, मोटारी आणि यंत्रमानवांची रेलचेल आहे. ए. आय. साहाय्यकांची कुमक सतत त्यांच्या दिमतीला असते. ए. आय.च्या साहाय्याने संगीत ऐकणे, करमणूक करवून घेणे यात ते मश्गुल असतात. मात्र त्यांची ही करमणूक उधार घेतलेली असते. आभासी हसू, दिखाऊ सौजन्य हे त्यांचे खरे वास्तव आहे. त्यांचं दैनंदिन जीवनकर्म ए. आय. नियंत्रित करते; परंतु प्रेम, मैत्री, हसणं हे ए. आय. करू शकत नाही. या अर्थाने ते अधिकच बुटके आहेत. बुटकेवाडीवर गुन्हेगारी जगतातल्या ‘भाई’ची सत्ता आहे. प्रत्येक सत्तांतरात याने योग्य वेळी रंग बदलून स्वत:ला सुरक्षित ठेवणारा हा टोळीनायक स्वत:ला समाजाचा तारणहार म्हणून मिरवणारा आहे.

याउलट उंचवाडीतल्या लोकांचे जीवन आहे. ते यांत्रिक सुख-सुविधांपासून दूर आहेत. ए. आय. तंत्रज्ञानाची अजून त्यांना बाधा झालेली नाही. निसर्गसान्निध्याशी जवळीक साधणारे, साधेपणात आनंद मानणारे, स्वत:ची कामं स्वत: करणारे हे लोक आहेत. त्यांच्याकडे फ्रीज नसला तरी माठातले थंड पाणी आहे, वॉशिंग मशीन नसले तरी नदीवर कपडे धु्ण्यातला आनंद आहे. मोटारी नसल्या तरी सायकलींवर विहार करण्याचे भाग्य आहे. बुटक्या वाडीतल्या आणि उंचवाडीतल्या जीवनशैलीत प्रचंड विरोधाभास आहे. हे द्विध्रुवात्मक वास्तव हा या कादंबरीच्या कथानकाचा गाभा आहे. मात्र ‘कादंबरी’ या वाड्मयप्रकाराच्या परिचित घाटांपेक्षा ‘बुटक्यांचे जग’ या कादंबरीचा घाट वेगळा आहे. कथनपरंपरेतील सर्व रूढ रूपबंधांची चाकोरी ओलांडणारा एक नवाच ‘स्व‍च्छंद घाट’ घडविण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. या कथनबंधात वास्तव आणि कल्पिताची अनेक अंतर्वर्तुळे एकमेकांत मिसळून गेलेली आहेत. कादंबरीतल्या पात्रांची सुष्ट आणि दुष्ट अशी दुभाजक रेषा काढता येईल; परंतु कादंबरीकाराचा दृष्टिक्षेत्रबिंदू ही दुभाजक रेषा ओलांडणारा आहे.

पोस्टमन उर्फ कबीर उर्फ मी हे पात्र नाटकातल्या सूत्रधाराप्रमाणे निवेदकाच्या भूमिकेत वावरणारे आहे. सायबर संस्कृतीत पोस्ट ऑफिसमध्ये नवे बदल झाले आहेत.लाल रंगाच्या पेट्या इतिहासजमा झाल्या असून आधुनिक मेलबॉक्स आले. स्पीड पोस्ट, पार्सल ट्रॅकिंग सारख्या सेवा आल्या आहेत. इ-मेल आणि मोबाइल क्रांतीमुळे पत्रे पाठवण्याचे प्रमाण घटले आहे. परिणामत: पोस्टमनच्या नोकर्‍या धोक्यात आल्या आहेत. कादंबरीचा कथानिवेदक पोस्टमन याच्याही नोकरीवर गंडांतर आले आहे. त्याची संदेशवाहक म्हणून सर्वत्र संचार करण्याची सवय मात्र कायम आहे. संपूर्ण कथावकाशात स्चच्छंद विहार करणारा हा पोस्टमन जगभर संचार करून सत्याचा माग काढतो आहे. प्राचीन ज्ञान, इतिहास आणि महाकाव्यातील रहस्यमय गोष्टींचा आणि मिथके आणि पुराणकथांत दडलेल्या अद्भुत सत्यांचा शोध घेण्याचा छंद या निवेदक पात्राला जडलेला आहे. सातवाहन-वाकाटकांच्या काळातील मंदिरशिल्पे, अजिंठा-वेरुळच्या लेण्या, इजिप्शियन पिरॅमिडच्या प्राचीन वास्तू, देहूच्या तुकोबांच्या भूमीतले इंद्रायणीकाठचे जीवनरंग आणि समालीन बुटक्यांच्या बेटावरील घटना नाट्य अशा कालावकाशाचा सीमा भेदून सार्वकालिक स्थळ भ्रमण करीत संवाद प्रस्थापित करण्याची किमया या निवेदक पोस्टमनला साधलेली आहे.

या पोस्टमनच्या सोबतीला डिजिटल जगातलं हुषार ‘कबुतर’ हे आणखी एक पात्र आहे. हे कबुतर केवळ संदेशवाहक नाही, त्याला मानवी इतिहासाची चांगली जाण आहे. त्याच्या पंखाखाली राज्यघटनेतील समानतेच्या हक्काचा उतारा आहे. उंचवाडी आणि बुटकेवाडीतल्या दोन्ही जगांवर ते नजर ठेवून आहे. या दोन जगांपैकी खरं जग कोणतं आहे, हा प्रश्न या कबुतराला पडला आहे. या दोन्ही सूत्रधार पात्रांनी वर्तमानाची सम्यक समीक्षा आणि भविष्यातील पर्यायी दिशांचे संसूचन करण्यासाठी लेखकाने महात्मा गांधींचे पात्र मध्ये आणले आहे. कादंबरीगत गांधीजी देशातील बेकारीचा प्रश्न, शिक्षणाची अधोगती, शहरांत वाढणार्‍या बकाल वस्त्या यावर भाष्य करतात. ‘‘बेरोजगारी ही गुन्हेगारीची सावली आहे. तरुणांना काम दिलं नाही, की ते बंदुका उचलतात. काम निर्माण करायचं असतं, मिळवायचं नसतं.

सरकारला दोष देणं सोपं आहे. प्रत्येक तरुणाने स्वत:चा विकास केला तर गुन्हेगारी संपेल, असा आशावाद ते व्यक्‍त करतात. गांधीजींच्या माध्यमातून लेखक देशवासीयांचे प्रबोधन करणारे दिशादिग्दर्शन करण्याची संधी घेतो. गांधीजींच्या तोंडून लेखक देशवासीयांना आत्मनिर्भरतेचा संदेश देऊ इच्छितो. खेड्याकडे चला’ हा मंत्र फक्‍त स्थलांतराचा नाही. तो आत्मनिर्भरतेचा मंत्र आहे, मोठ्या नोकर्‍या हव्यात म्हणून मुलं बेट सोडून जातील. पण त्यांनी इथे राहून काहीतरी निर्माण केलं तर ते स्वत: मालक असतील हा विचार लेखक अधोरेखित करतो. शिक्षणाचं मूळ उद्दिष्ट फक्‍त पैसा कमावणं असेल तर तो समाज स्वत:लाच विकू शकतो, असा इशाराही गांधीजींच्या माध्यमांतून दिला जातो. शिक्षण केवळ पुस्तकी ज्ञान देण्यासाठी नसतं, ते जीवन समृद्ध करण्यासाठी असतं. मूल्यशिक्षणाशिवाय शिक्षण अपूर्ण आहे. मूल्यं हरवली की समाज दिशाहीन होतो. देशाला आत्मस्वच्छतेची गरज आहे. आणि लोकांनी बदल करायचं ठरवलं तर कोणत्याही व्यवस्थेपेक्षा ती ताकद मोठी असते, हे मध्यवर्ती आशयसूत्र गांधीजींच्या संवादातून लेखक मांडतो आहे. पोस्टमन आणि कबीर यांच्या नजरेत चमकणारे मानवतेचे उज्ज्वल भविष्य ते गांधीजींच्या संवादांतून मांडण्याची संधी घेतात.

ह्या मूल्यदृष्टीतूनच लेखक कादंबरीच्या शेवटी उंच माणसे आणि बुटके सैनिक आता एकत्र येऊन नवे भविष्य घडविण्यासाठी सिद्ध होत आहेत; भाईंच्या पराभवाबरोबर त्याच्या अत्याचाराचे पर्वही समाप्त झाले आहे, असे दिवास्वप्न रंगवितो. मात्र त्याचवेळी समकालीन वास्तवाचा दाब इतका मोठा आहे की, हे दिवास्वप्न खरोखर साकार होईल का, याविषयीची साशंकता लेखकाला ह्या दिवास्वप्नात रेंगाळू देत नाही. मानवी स्वातंत्र्य आणि समतेचा भक्षक ‘भाई’ बेटावरच्या लौकिक जीवनातून संपला असला तरी त्याला पर्यायी तसाच नवीन राजा आला. बेटावरची पाणथळ प्रदेशातली सत्ता बदलली, पण परिस्थिती मात्र अजुनही तशीच आहे.समीरा रेस्टॉरंटवाला नव्या गोड्या पाण्याच्या दलदलीत नव्या साम्राज्याचा उद्घाटन सोहळा करायला निघाला आहे.सत्तेचा खेळाचा शेवट अजून ठरलेला नाही, कारण ‘बुटक्यांचे जग’ हे केवळ सटायर नसून वास्तवाकडे इशारा देणारी गोष्ट आहे.

समकालीन राजकारणावर भाष्य करणारी राजकीय कादंबरी असेही ह्या कल्पनाबंधाचे एक महत्त्वाचे परिमाण आहे. “चौकशी म्हणजे नेमकं काय करतात हो हे लोक? चौकशी म्हणजे फक्‍त लोकांना वाटायला हवं की काही तरी होतंय. नाहीतर एवढे मोठे लैंगिक अत्याचार होतात, पण शिक्षा कोणाला होते?. पोलिसांनी दाखवायचं की आम्ही चौकशी करतोय. मग तीन गोष्टी होतात – एकतर ज्या लोकांना अडकवायचं नाही त्यांना बाहेर काढतात, दुसरं म्हणजे मोठ्या माणसांचा तपास सुरू झाला की केस कुठेतरी गहाळ होते आणि तिसरं म्हणजे तपास करणारेच बदलले जातात.” गुन्हेगार आमच्या संसदेत आणि विधानसभेत बसलेत, सामान्य माणसांचं काय? / तपास यंत्रणांचा प्रश्न हा कायद्याचा नसून त्याचा गैरवापर करणार्‍या व्यवस्थेचा आहे.जोपर्यंत आपण लोक ‘पांढर्‍या पिसां’च्या आड दडलेल्या कारस्थानांना ओळखत नाही, तोपर्यंत आपण फक्‍त टपरीवर चर्चा करत राहू, ही टिप्पणी या कादंबरी्चे प्रयोजनमूल्य निर्देशीत करणारी आहे.

मिथकांचा सर्जनशील वापर हे या कादंबरीच्या लेखनतंत्राचे एक अनोखे लेणे आहे. बुटक्यांचे पापवाचन आणि शिक्षा प्रदान करण्यासाठी यम आणि चित्रगुप्ताच्या पुराणकथेची लेखक योजना करतो. बुटक्यांच्या बेटावरील आपापसातल्या सत्तासंघर्षाचे नाट्य खुलवण्यासाठी लेखक तळ्यावर मालकी कोणाची या लोककथेची योजना करतो. तलाव हा सर्वांचा आधार असला तरी बगळे आणि कावळे दोघेही तलावावर मालकी हक्क सांगतात. या दोघांच्या भांडणात गरुड दोघांमध्ये फूट पाडण्याची खेळी करतो. दोघांना आपापसात लढायला लावून गरुड तलावाचा मालक बनतो. राजकीय सत्ताखेळाच्या समकालीन वास्तवावर प्रकाश टाकण्यासाठी लेखक दोघांचे भांडण, तिसर्‍याचा लाभ ह्या पारंपरिक कल्पनाबंधाचे सर्जनशील उपयोजन करतो.

थडग्यात, मंदिरात आणि धार्मिक वास्तूतल्या चित्रशिल्पांच्या प्रतिमाशास्त्रीय परंपरा आणि त्यातल्या प्रतीकांतून ध्वनित होणारा आध्यात्मिक, राजकीय आणि सांस्कृतिक अर्थ वाचण्याची क्षमता या निवेदक पोस्टमनकडे आहे.त्यामुळे कालप्रवाहातील भौतिक, आध्यात्मिक आणि कलात्मक परिवर्तनाच्या मुशी उलगण्याचे काम हा निवेदक करतो. या स्मारकांशी संवादाचा खेळ मांडल्यावर प्राप्त होणार्‍या चिंतनप्रसादाचा मेवाही कर्तव्यबुद्धीने लेखक आपल्या वाचकांकडे सुपूर्त करतो. शंकराचं तांडव नृत्य, बौद्ध लेण्यांतल्या ध्यानस्थ बुद्धाच्या डोळ्यांतला निर्विकारपणा, जैन लेण्यांतल्या तीर्थंकराच्या मूर्तीतून सूचित होणारे अहिंसामूल्यांचे दिग्दर्शन, महाभारतातल्या पांडवांचा वनवासातून हाती लागणारे राखाडी वास्तव अशा कालप्रवाहातील चैतन्याचे स्त्रोत उलगण्याची किमया लेखकाला साध्य झाली आहे.बुलेट ट्रेन, आयटी पार्क, पान टपरी, पर्यावरणासाठी पुरेसा वाटणारा बाल्कनीतला मनीप्लांट अशा अर्बन फॉरेस्टमधूनही पोस्टमनचा संचार आहे. ह्या भ्रमंतीतून सत्याच्या शोधाबरोबरच त्याच्या आत्मशोधाचाही समांतर प्रवास सुरू असतो. या शोधयात्रेत तो स्वत:ला सतत कुरतडत राहातो आणि शेवटी हा सगळा जीवनानुभव म्हणजे एक ‘लिंबोळं’ आंबट-गोड मिश्रण आहे, अशा निष्कर्षाप्रत येतो. शाश्वत असं काही नसतं. फक्त Inbox भरलेलं आणि Outbox मध्ये अपूर्ण drafts हेच काय ते खरं असतं हे सनातन सत्य तेवढं अधोरेखीत होतं. कादंबरीच्या आशयाचा आणि मूल्यावकाशाचा पैसही विस्तारण्यासाठी ह्या निवेदनतंत्राचा निश्चितच कलात्मक उपयोग झाला आहे.

पुस्तकाचे नावः बुटक्यांचे बेट
लेखकः बाळासाहेब लबडे
मुखपृष्ठ:चंद्रकांत बाबर
प्रकाशक: अथर्व पब्लिकेशन, जळगाव.
किंमत – ५७५ रुपये

बाळासाहेब लबडे यांची ‘बुटक्यांचे बेट' ही या नव्या पर्वातली एक प्रयोगशील कादंबरी आहे. समकालीन तंत्रज्ञात्मक बदल आणि त्यांचा राजकीय-सामाजिक जीवनावरील प्रभाव ह्या विषयावर आधारलेली ही एक तंत्रवैज्ञानिक काल्पनिका आहे. यापूर्वी रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांना केंद्रस्थानी ठेवून आर्थर क्लार्क, आयझॅक असिमोव्ह, फ्रँक हर्बर्ट ह्यांनी विज्ञान काल्पनिका लिहिल्या आहेत. विज्ञान व तंत्रज्ञानातील शोधांमुळे माणसाचे आंतरिक भावविश्व आणि बाह्य जगातील सामाजिक व संस्थात्मक जीवन यावर होणार्‍या परिणामांचा वेध घेणार्‍या या काल्पनिका वाचकाला विज्ञानाबद्दल आणि भविष्याबद्दल विचार करण्यास प्रवृत्त करतात.‘बुटक्यांचे बेट' ही या परंपरेतली कादंबरी आहे.

समकालीन मराठी साहित्यात तंत्रज्ञान, राजकारण आणि मानवी मूल्यांचा संगम साधणाऱ्या कादंबऱ्यांची संख्या फारच कमी आहे. या पार्श्वभूमीवर “बुटक्यांचे बेट” ही कादंबरी केवळ एक काल्पनिक कथा नसून आजच्या युगाच्या गुंतागुंतीच्या वास्तवाला भिडणारा एक विचारप्रवर्तक साहित्यिक हस्तक्षेप ठरते. विज्ञान–तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या जगात माणूस, त्याची संवेदना आणि त्याचे नैतिक अस्तित्व यांची होत चाललेली झीज या कादंबरीत प्रभावीपणे उलगडली जाते.

एका काल्पनिक बेटावर उभ्या केलेल्या ‘बुटकेवाडी’ आणि ‘उंचवाडी’ या दोन परस्परविरोधी जगांतून लेखकाने आधुनिक समाजाची रूपकात्मक मांडणी केली आहे. एका बाजूला कृत्रिम बुद्धिमत्ता, उपभोगवाद, सत्ताकेंद्रितता आणि नैतिक अध:पतन; तर दुसऱ्या बाजूला साधेपणा, निसर्गनिष्ठ जीवन आणि मानवी मूल्यांचा शोध या द्वंद्वातून कादंबरी आपल्याला वर्तमानाचे आरसे दाखवते.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी
Tags: AI in literatureartificial intelligenceBalasaheb LabdeButkyanche Betcontemporary Marathi writingdigital age noveldystopian fictionethical crisisexperimental novelfuturistic novelfuturistic societyGandhi thoughtsHuman ValuesIye Marathichiye Nagariliterary criticismMarathi book reviewMarathi LiteratureMarathi NovelMarathi science fictionpolitical satiresci-fi Marathi novelsocial commentaryspeculative fictiontechnology and societyutopian fictionइये मराठीचिये नगरीउंचवाडीएआय साहित्यकृत्रिम बुद्धिमत्तागांधी विचारज्येष्ठ समीक्षकडिजिटल युगडॉ. रमेश वरखेडेतंत्रज्ञान आणि समाजतात्त्विक चिंतननैतिक अधःपतनप्रयोगशील कादंबरीबाळासाहेब लबडेबुटकेवाडीबुटक्यांचे बेटभविष्यकालीन साहित्यमराठी कादंबरीमराठी विज्ञान कथामराठी साहित्यमानवी मूल्येराजकीय व्यंगरूपकात्मक कादंबरीविज्ञानकाल्पनिकासत्ताकेंद्रिततासमकालीन साहित्यसामाजिक भाष्यसाहित्य समीक्षा

Recent Posts

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

5 hours ago

विरोधकांचा आवाज क्षीण झालायं… की सरकार अधिक बळकट झालंय ? Monsoon session of the legislature

मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…

17 hours ago

इतिहास वाचनातूनच संस्कार अन् सुराज्याची जडणघडण : संयोगिताराजे छत्रपती Good State Formed Through Reading History

वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…

1 day ago

अर्पणामागचा भाव : शुद्ध भक्तितत्त्वाचा ज्ञानेश्वरीतील अमृतसंदेश Pure Bhakti from Dnyaneshwari |

हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…

1 day ago

आकाशातील ढग व युद्धाच्या धगीत अडकलेली अर्थव्यवस्था ! an economy caught in the grip of war

विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.…

2 days ago

स्त्रीवादी साहित्याची नवी दिशा : डॉ. ऊर्मिला चाकूरकर यांचे अभ्यासपूर्ण अध्यक्षीय भाषण New direction of feminist literature

स्नेहलता मारुती पाटील सन्मानार्थ पुरोगामी सामाजिक, सांस्कृतिक फाऊंडेशन द्वारा आयोजित २रे स्त्रीवादी साहित्य संमेलन यामध्ये…

2 days ago