मुक्त संवाद

अरिष्टकाळाचे भयसूचन : काळाच्या मनाची कविता

‘अरिष्टकाळाचे भयसूचन’ या एकनाथ पाटील यांच्या कवितासंग्रहातील कवितांवर प्रफुल्ल शिलेदार यांनी केलेल भाष्य….

‘अरिष्टकाळाचे भयसूचन’ या एकनाथ पाटील यांच्या कवितासंग्रहातील कविता जगण्याच्या सांदीकोपऱ्यापर्यंत शिरत असलेल्या अरिष्टाच्या भयावह रूपाचे आकलन मांडतात. हे अरिष्ट केवळ व्यक्तिगत आयुष्यात वादळे उठवण्यापुरते मर्यादित राहिलेले नसून, ते लोकजीवनाचे सामाजिक आणि राजकीय अंग छेदत खूप खोलवर शिरत असल्याचे संकेत या कवितेत आहेत. अफवा, संभ्रम, संशय, भीती, मुस्कटदाबी या गोष्टींचा धूर्तपणे वापर करीत चालून येणारे हे अरिष्ट पाशवी बहुमताच्या जोरावर समताधिष्ठित मानवी जीवनशैलीवर आघात करीत प्रसंगी संविधानाच्या गाभ्याला नख लावण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा गंभीर इशारा ही कविता देते. समाजातील संवेदनशील सहिष्णू माणसं, सत्तेला जाब विचारणारे लेखक तसेच समतेसाठी लढणारे कार्यकर्ते पत्करत असलेली जोखीम या कवितेत अधोरेखित झालेली आहे. माणसाच्या अभिव्यक्तीला कुंपण घालण्यासोबतच त्याच्या मेंदुचादेखील ताबा मिळवण्याच्या प्रयत्नांकडे निर्देश करीत ही कविता आजच्या संभ्रमित काळाचे स्वरूप स्पष्ट करते.

एका बाजूला गोतावळा, गावगाडा, कुणबिकी यात गुंतलेली मुळं तर दुसऱ्या बाजूला फक्त वावरातच नव्हे, तर मेंदूतही माजलेला कुंधा अशा दुहेरी पेचात अडकलेल्या मनाची तगमग या कवितेतून परिणामकारकरित्या अभिव्यक्त झाली आहे. व्यक्तिगत जगण्यातला ताण मानवी जीवनातील कोलाहलापर्यत विस्तारत नेणारी ही कविता आजच्या जटिल काळाचे अनेक संदर्भ घेत त्यातले बहुविध पेच उलगडण्याचा प्रयत्न करीत संथपणे वाचकाला अंतर्मुख आणि अस्वस्थ करते.

या कवितासंग्रहातील एक कविता…

चिकोत्रा

चिकोत्रे,
मनसोक्त फिरलोय मी
तुझ्या काठाकाठावरून
आणि डुंबलोय तुझ्या डोहात मन भरून
तुझेच प्यायलोय पाणी
गायलोय मनमुराद तुझी हिरवीगार गाणी
लहानाचा मोठा झालोय तुझ्याच बळावर
तुझी गर्द सावली माझ्या बालपणीच्या काळावर.

तुझ्या प्रवाहाचा चैतन्यनाद
भिनलाय माझ्या नसानसांत
तुला पुरेपूर साठवून ठेवलंय मी माझ्यात
म्हणूनच बळ एकवटून लढू शकतोय जगण्यात…

तसा तुझा अवकाश मर्यादित
अगदी मर्यादित
एका डोंगराच्या कुशीतून संथपणे निघालीस
आणि वळणावर वळणं घेत
काठावरची गावंशिवारं फुलवीत
वेदगंगेला जाऊन मिळालीस
तेवढेच तुझे अस्तित्व.

तुलनेने तू तशी लहान
खूपच लहान.
तरीही कितीजणांची शतकानुशतकांची
भागवलीस तहान
कित्येकांना अंगाखांद्यावर खेळवलीस
अनेकांचे संसार सावरलीस
तुझ्या साक्षीनेच वसली तुझ्या काठावर
सहानुभावाची समूहसंस्कृती.

चिकोत्रे,
बाई तुझे किती उपकार आमच्यावर
जेव्हा दुष्काळाचा धाक जगण्यावर
तेव्हा गावंच्यागावं
कशी बांधून ठेवलीस काठावर.
तशी तू नव्हेस बारमाही
तरीही भरून वाहिलीस काठोकाठ
कधी रुसलीसही पाठोपाठ
कोरडी पडलीस
तेव्हाही सोडला नाहीस परोपकाराचा वसा.
आमच्या जगण्यावर तुझ्या मायेंचा ठसा
उघड्या पात्रात खोदल्यावर खोल
सापडतेच की ओल
सांगितलीस समजावून जगण्याचे मोल.

शिकवलीस जगायला
परिस्थितीशी झुंजायला
टिकून राहायला
आणि ओल जपायला.

कितीतरी रूपं तुझी
जशी तुझी
तशीच तुझ्या सहवासातली माझीही
मनाच्या तळात खोल ठेवलेत साठवून
आणि आता अस्वस्थ होतो मी तुला आठवून.

आज तुझ्यापासून इतके शहरात मी इतका दूर
आणि तुझ्या ओढीची मनात ही अनावर हूरहूर…

पुस्तकाचे नाव – अरिष्टकाळाचे भयसूचन
कवीएकनाथ पाटील
प्रकाशकललित पब्लिकेशन, मुंबई
किंमत – २०० रुपये
पुस्तकासाठी संपर्क – ९८६९३७७८०६ शशिकांत पवार

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

23 minutes ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

9 hours ago

Weather Forecast : १७ ऑगस्टपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…

10 hours ago

फिदेलसोबत १०० वर्षे : अमेरिकन दादागिरीसमोर न झुकलेल्या क्रांतिकारकाची कहाणी

फिदेल कास्त्रो यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अखिल भारतीय किसान सभेकडून अभिवादन नवी दिल्ली :क्यूबाच्या क्रांतीचे कमांडर-इन-चीफ, जननेते…

23 hours ago

कोल्हापूरच्या युवा दिग्दर्शकाच्या ‘अनघा’ला जम्मू फिल्म फेस्टिव्हलची पसंती

https://youtu.be/xcTeVoV7ItY कोल्हापूर येथील युवा चित्रकार व दिग्दर्शक स्वप्निल बळवंत पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या “अनघा” या…

1 day ago

शेतकऱ्याचं जगणं, मरणं आणि मरणानंतरची परवड सांगणारं नाटक : ‘कर्जबळी’

शेतकऱ्याच्या कष्टाला निसर्गाची साथ मिळत नाही, कर्जाच्या विळख्यातून त्याची सुटका होत नाही आणि अखेर आत्महत्येचा…

1 day ago