पर्यटन

निर्मनुष्य दिन नववर्षाचा अद्भुत सण : बालीतील ‘नेपी डे’ जगाला देतो शांततेचा संदेश

नवीन वर्षदिन ‘निर्मनुष्य दिन’

बालीमध्ये नवीन वर्ष मार्च-एप्रिलपासून सुरू होतं. नववर्षाचा पहिला दिवस ‘नेपी’ या नावाने ओळखला जातो. या दिवसाची खासियत म्हणजे हा दिवस त्यांचा शांतता दिन असतो. या दिवशी सर्व व्यवहार पूर्णतः बंद ठेवण्यात येतात. वैद्यकीय आणीबाणी वगळता एकही वाहन रस्त्यावर दिसत नाही. सर्व दुकाने बंद राहतात. रस्ते, मॉल निर्मनुष्य असतात…

जयप्रकाश प्रधान, ज्येष्ठ पत्रकार अन् जगप्रवासी

गुढी पाडवा नुकताच साजरा झाला. तो हिंदू धर्मातील नववर्षदिन म्हणून आपल्याकडे पाळण्यात येतो. त्यानिमित्ताने ठिकठिकाणी हिंदू धर्मीय मोठ्या संख्येने जमा होतात. मिरवणूका काढल्या जातात. रांगोळ्या काढल्या जातात. पण इंडोनेशियातील बाली येथील हिंदू समाज मात्र हा दिवस प्रदूषण, रोगराई यांच्यावर मात करण्यासाठी निर्मनुष्य दिन म्हणून पाळतो. ही परंपरा तेथे फार पूर्वीपासून सुरू आहे. बालीच्या आठवड्याच्या मुक्कामात त्याची माहिती हिंदू धर्मीयांकडूनच करून घेता आली.

इंडोनेशिया हे मुस्लीम राष्ट्र. पण बालीमध्ये जवळजवळ शंभर टक्के हिंदू. अर्थात् अन्य राष्ट्र व बाली यांच्यात कोणताही तणाव नाही. बालीतील हिंदू बांधव नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत आगळ्या-वेगळ्या पद्धतीने करतात. आजच्या काळात साऱ्या जगानेच त्याचे अनुकरण करावे अशी ही प्रथा आहे. तेथील हिंदू कॅलेंडरला ‘साक’ म्हणतात. त्यांचं नवीन वर्ष मार्च – एप्रिलपासून सुरू होतं. तो दिवस ‘नेपी’ या नावाने ओळखला जातो. वाईट प्रवृत्तींचा नायनाट व्हावा म्हणून नवीन वर्षाच्या आधल्या दिवशी दीपोत्सव साजरा केला जातो. पण ‘नेपी डे’ हा शांतता दिन असतो. त्या दिवशी काही बंधनांची अंमलबजावणी संपूर्ण बालीमध्ये अत्यंत काटेकोरपणे केली जाते. प्रत्येकजण प्रामाणिकपणे ते नियम पाळतो. त्या दिवशी सर्व बाली बेटाला सुट्टी असते. पण ती मौजमस्ती करण्यासाठी नसते. या दिवशी सर्व व्यवहार पूर्णतः बंद ठेवण्यात येतात. वैद्यकीय आणीबाणी वगळता एकही वाहन रस्त्यावर दिसत नाही. सर्व दुकाने बंद राहतात. रस्ते, मॉल निर्मनुष्य असतात. बाली रेडियो – दूरचित्रवाणीही थंड असते. प्रत्येकजण घरात बसून वाचन, अन्य कामे किंवा ध्यानधारणा, पूजाअर्चा करीत असतो.

त्याचवेळी विजेचा अगदी गरजेपुरता वापर करून विजेची मोठी बचत केली जाते. विशेष म्हणजे सन २००० पासून या दिवशी बालीचा आंतरराष्ट्रीय विमानतळही बंद ठेवण्यात येतो. म्हणजे जवळजवळ चोवीस तास बाली हे संपूर्ण बेट निर्मनुष्य असते…. आणि मग दुसऱ्या दिवशी अत्यंत शुद्ध, प्रसन्न वातावरणात बालीमधील नवीन वर्षाला सुरुवात होते. सारे बेट जणू प्रदूषण विरहित झालेले असते. रोगराईवर मात करण्यासाठीही त्याचा फार उपयोग होतो असे तज्ञांचे मत पडते. पुण्या-मुंबईसारखी शहरे प्रदूषण, अस्वच्छता यांची माहेरघरं झाली आहेत. गुढीपाडवा किंवा अन्य कोणत्याही एखाद्या दिवशी असा ‘व्यवहार बंद’ दिन आपल्याकडेही पाळायला काय हरकत आहे?

बालीमधील आणखी एक महत्त्वाचा सण म्हणजे- ‘गालुगान.’ हा वर्षातून दोनदा येतो. चांगल्या प्रवृत्तींचा वाईट प्रवृत्तींवर विजय ही त्यामागची भावना. प्रत्येक देवळात तो दिवस रोषणाई करून व फळाफुलांचा नैवेद्य दाखवून साजरा होतो. शाळांना, कार्यालयांना या दिवशी सुट्टी असते.

बालीमधील हिंदू कमालीचे धार्मिक. देऊळ म्हणजे त्यांचा जीव की प्राण. तेथील पावित्र्य, स्वच्छता खरोखरच वाखाणण्यासारखी असते. प्रत्येक खेड्यात पाच देवळे असतातच. देवळांची रचना अगदी जुन्या पद्धतीची, दगडांची. प्रवेशद्वापाशी दीपस्तंभ असतात. विशेष म्हणजे गावातील सर्व बैठी घरं, देवळं यांची रचना, आकार जवळजवळ सारखाच असतो. कोणत्याही समारंभाच्यावेळी देवळांच्या प्रवेशद्वारावर नारळाच्या सुकलेल्या झावळ्यांच्या उंच कमानी उभारणे ही येथील पारंपरिक पद्धत. प्रत्येक गावातील कमानी निरनिराळ्या आकाराच्या असतात.

आजच्या काळात बालीमध्ये एकत्र कुटुंबपद्धती ऱ्हास पावत असली तरी तरुणवर्ग आपल्या आईवडिलांची चांगली काळजी घेताना दिसतो. नोकरी धंद्यानिमित्त तो शहरात राहायला गेला तरी आईवडिलांची जबाबदारी आपल्यावर आहे याची त्याला जाणीव असते आणि वृद्धांसाठी शासकीय योजनांचा फारसा आधार नसल्याने त्यांनाही मुलांच्या साहाय्याची जरुरी असते. लग्न जमविण्याच्या बाबतीत मात्र बाली तरुण- तरुणी स्वतःच्या स्वातंत्र्याबद्दल कमालीचे जागरुक आहेत. सर्व मुले-मुली आपापलं लग्न स्वतःच्या पसंतीनेच ठरवतात. पालक त्यात सहसा हस्तक्षेप करीत नाहीत व कोणी केला तर मुलं त्यांचं न ऐकता पळून जाऊन लग्न करतात. लग्नाचं वय आता वाढून २८ ते ३० वर्षांपर्यंत गेलं आहे. पण विशेष म्हणजे घटस्फोटाचं प्रमाण अगदी नगण्य आहे. कितीही मतभेद झाले तरी लग्नगाठ कायम ठेवायचीच अशी वृत्ती मुला-मुलींमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येते.

बाली खाद्यपदार्थ

काही बाली कुटुंबांतही जाण्याचा योग आला आणि खास बाली खाद्यपदार्थांची माहिती पत्नी जयंतीने करून घेतली. कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन जेवणाची पद्धत दिसली नाही. प्रत्येकजण आपापल्या सोईनुसार जेवतो. भात व मासे हे त्यांचे मुख्य जेवण, पण नानाविध प्रकारचे सॉस ही तेथील जेवणाची खासियत आहे. टोमॅटो सॉस, केचप, कांदा, लसूण, चिली, दालचिनी व साखर यांचं मिश्रण म्हणजे लालभडक बाली सॉस. थोड्या प्रमाणात काळपट रंगाचं आणखी एक सॉस असतं.
लाल सॉस खूप तिखट, पण चवदार असतं. काळं सॉस थोडं गोड. मासा भाजला किंवा तळला की त्यावर हे सॉस टाकण्यात येतं. चिकन प्रामुख्याने गावठी कोंबडीच. तीसुद्धा या सॉसमध्ये किंवा काही वेळेस नारळाच्या दुधात बनवली जाते. जेवणात भात हा हवाच. तो बाऊलमध्ये नुसता घेतला जातो किंवा प्लेटमध्ये त्याची उंच मूद असते. भात, सॉस, चिकन म्हणजे मस्त मेजवानी. बाली किंवा संपूर्ण इंडोनेशियातच एक पदार्थ परिचयाचा वाटला तो म्हणजे आपल्याकडच्या तांदळाच्या कुरडया. हे पापडासारखे भाजण्यात येतात. अगदी विमानतळापासून गावाकडच्या टपरीवरच्या हॉटेलमध्येही त्या दिसून आल्या. मासे खाणाऱ्या पर्यटकांची बालीमध्ये तबीयत खूश न झाली तरच नवल !

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी
Tags: Bali environment traditionBali environmental traditionBali Galungan festivalBali Hindu calendarBali Hindu New YearBali island ritualsBali island silence dayBali island traditionsBali new year celebrationBali Nyepi DayBali religion cultureBali silent festivalBali spiritual cultureBali spiritual tourismBali temple cultureBali templesBali tourism cultureBali traditionsBali travel cultureBali village traditionsHindu culture BaliHindu festivals IndonesiaIndonesian Hindu festivalIye Marathichiye NagariNyepi festival IndonesiaSaka calendar BaliSilent Day Baliइंडोनेशिया संस्कृतीइंडोनेशिया हिंदू संस्कृतीइये मराठीचिये नगरीनेपी दिवसबाली खाद्यपदार्थबाली गालुगान सणबाली जीवनशैलीबाली देवळेबाली धार्मिक जीवनबाली नववर्षबाली नेपी डेबाली परंपराबाली पर्यटनबाली पर्यटन संस्कृतीबाली प्रदूषणमुक्त दिवसबाली बेट परंपराबाली बेट संस्कृतीबाली मंदिर संस्कृतीबाली शांतता दिवसबाली सणबाली समाजरचनाबाली संस्कृतीबाली हिंदू कॅलेंडरबाली हिंदू परंपराबाली हिंदू समाजसाक कॅलेंडर

Recent Posts

हळदीचे कंद सडतायत, पीक मरतंय? कारणे ओळखा, वेळीच करा प्रभावी व्यवस्थापन ! Turmeric Rhizome Rot and Wilt

हळद पिकातील कंद सड व मर : कारणे, लक्षणे आणि प्रभावी व्यवस्थापन हळद आणि अद्रक…

13 hours ago

सृष्टी निर्माण झाली कशी? श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेले गूढ काय?

सृष्टीकडे पाहिले की असंख्य रूपे, जीव, शक्ती आणि घडामोडी आपल्याला दिसतात. या विराट पसाऱ्यामागे नेमकी…

2 days ago

सर्व महामानवांच्या सामर्थ्याची बेरीज म्हणजे भारत: डॉ. श्रीपाल सबनीस

कोल्हापूर : भारत हा कोणत्याही एका महामानवाचा,एका धर्माचा किंवा एका विचारपरंपरेचा नाही. बुद्ध, महावीर, संत…

2 days ago

अंदाजाची शेती संपणार? ड्रोन, सेन्सर अन् एआय ठरवणार पिकांचे भवितव्य ! Smart Farming with Drone and AI Techique

डिजिटल क्रांती: समृद्ध शेतीचा पाया/ 'स्मार्ट शेती, भरघोस प्रगती' ड्रोनची फवारणी, मोबाईलवर मातीचे रिपोर्ट आणि…

2 days ago

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कार २०२६ जाहीर

ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे (नाशिक)यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार,संहिता राजन (पुणे)…

2 days ago

२२ परीक्षा रद्द, दोन हजार नोकऱ्या मात्र धोक्यात!

स्टेटलाइन - झारखंडच्या राजकारणात सध्या सत्तेच्या खुर्चीपेक्षा विद्यार्थ्यांच्या संतापाची ताकद मोठी ठरताना दिसत आहे. रांचीच्या…

3 days ago