कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक जाणीव यांच्याशी जोडलेली गंभीर समस्या आहे. भारताला कुपोषणमुक्त करण्यासाठी शासनाच्या योजनांसोबतच कुटुंब, समाज, स्वयंसेवी संस्था आणि प्रत्येक नागरिकाची सक्रिय सामाजिक बांधिलकी आवश्यक आहे. गर्भावस्थेपासून बालकाच्या वाढीपर्यंत योग्य पोषण, स्तनपान, पूरक आहार आणि आरोग्यसेवा यांची प्रभावी अंमलबजावणी झाली तरच सुदृढ पिढी घडविण्याचे स्वप्न साकार होईल. कु. रेणुका विनायक मिसाळ (एम. टेक विद्यार्थी, अन्न तंत्र महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी) मो. नं. = ८५३०५७५२०४ डॉ. के. एस. गाढे (हेड ऑफ डिपार्टमेंट, फूड केमिस्ट्री अँड न्यूट्रिशन, अन्न तंत्र महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी) मो. नं. = ९४२१४५९४६१
UNICEF संस्थेच्या माहितीनुसार भारतात पाच वर्षाखालील 48 टक्के मुले कुपोषित आहेत. जगाच्या तुलनेत, तीन मुलांपैकी एक भारतीय मुलगा कुपोषणाचा बळी ठरत आहे.यासाठी भारत सरकारतर्फे कुपोषण निर्मूलनासाठी बालविकास योजना (1975) राबवित आहेत. ह्या योजनेअंतर्गत लहान मुलांना पौष्टिक आहार देणे, माध्यान्ह भोजन, आरोग्य व शिक्षण इत्यादी बाबी सदरील योजनेअंतर्गत, तसेच विविध अंगणवाडी, आरोग्य केंद्रांमार्फत, शाळेतून राबविले जाते.
कुपोषण टाळणे व कमी करण्यासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान हे असायला हवे. जसे:-
- कुपोषण टाळण्यासाठी घरातील ज्येष्ठ महिला जसे आई, सासू, बहीण, इत्यादी घरातील गर्भवती स्त्रीची तिच्या आरामाची पूर्ण काळजी घेतील, तिला हिरव्या पालेभाज्या, डाळी, अंडी, दूध आणि फळे यासारखे पोषक अन्न भरपूर प्रमाणात देतील. तसेच आयोडीनयुक्त मीठ घालून शिजवलेले अन्न- आयर्न फॉलिक अॅसिड गोळ्या वेळेवर देतील.
- पतींनी गर्भधारणेनंतर पत्नीची सर्वाधिक काळजी घ्यावी, पत्नीचे वेळेवर जेवण आणि भरपूर आराम मिळेल याची खात्री करावी.
- बाळाच्या जन्माच्या सहाव्या महिन्यापासून बाळाला घरचे पोषक अन्न व मातेचे दूध मिळेल याची खात्री करतील.
- माता आपल्या बाळाला पहिले घट्ट दूध पाजतील आणि पहिले सहा महिने त्या बाळाला केवळ स्तनपान करवतील व सातव्या महिन्यानंतर मातेच्या दुधासोबत घरचे पौष्टिक आहार सुरू करतील.
पोषणावर कार्य करणाऱ्या विविध संस्था कोणत्या व त्यांचे कार्य काय आहे ?
भारतात व भारताबाहेर कुपोषणावर विविध संस्था कार्य करतात पण देशामध्ये प्रामुख्याने कार्य करणाऱ्या संस्था अशा आहेत.
1) W.H.O. – जागतिक आरोग्य परिषद.
2) I.C.D.S. – बाल विकास योजना.
3) N.N. Policy – भारतीय पोषण धोरण.
4) N.N.M.B – राष्ट्रीय पोषण संस्थान हैदराबाद.
5) I.C.M.R. – भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद.
6) Hunger Scheme – भुकबळी विरोधी योजना (N.G.O.) यांनी चालवले कुपोषण कमी करण्यासाठीचे उपक्रम.
7) UNICEF
पोषण कमी करण्यासाठी संस्थेचे कार्यक्रम/कार्य
1) सर्वेक्षणे (कुपोषित बाधीत भागाचे निरीक्षण करणे)
2) विविध माध्यमातून लोक जागृती करणे.
3) बालकांना व कुपोषितांना माध्यान्ह भोजन.
4) अक्षयपात्र योजना.
5) कुपोषित मुलांचे पुनर्वसन करणे.
6) वैद्यकीय सेवा पुरविणे.
7) संतुलित व पौष्टिक आहार पुरविणे.
पोषणावर सहजसाध्य घरगुती उपाय कोणते आहेत ?
कुपोषणावर मात करण्यासाठी सहजसाध्य असे घरगुती उपाय असे…
१) शरीर स्वच्छता व परिसर स्वच्छता.
२) वेळेवर व पुरेसा आहार घेणे.
३) योग्य प्रमाणात झोप घेणे.
४) आहारामध्ये प्रथिनांची मात्रा वाढविणे.त्यासाठी आहारात सोयाबीन व त्याचे विविध पदार्थ यांचा वापर वाढवावा, कडधान्याचा वापर वाढवावा.
५) दूध व दुग्धनिर्मित पदार्थ खाणे (200-300 मिली लिटर दूध रोज घ्यावे).
६) रोज जेवणात हिरवा भाजीपाला / कडधान्य / हंगामी फळे यांचा समावेश असावा.
७) उदा. 50 ग्राम किशमिश रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खावे. 2-3 महिन्यात वजन वाढेल.
कुपोषण निर्मूलनासाठी शासन स्तरावर काय उपाय आहेत ?
1) ६ महिने ते ६ वर्ष वयोगटातील बालके, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता यांना सूक्ष्म पोषक युक्त आहार (Take Home Ration) देण्यात येत असून, ३ ते ६ वर्ष वयोगटातील बालकांना, महिला बचतगट, महिला मंडळे यांच्या मार्फत सकाळचा नाश्ता गरम ताजा आहार देण्यात येतो.
2) कुपोषित बालकांची दर पंधरवड्याला नियमित आरोग्य तपासणी, वैद्यकीय उपचार, बालकांचे लसीकरण, स्तनपान व शिशुपोषणावर भर देण्याबाबत व समुदाय वृद्धी कार्यक्रमाद्वारे पालकांमध्ये जाणीव जागृती निर्माण करणे यासाठी सुद्धा अशा आहेत उपाय योजना…
➢ ०-६ वर्ष वयोगटातील बालकांचे १००% सर्वेक्षण करण्यावर भर दिला जात आहे.
➢ तीव्र कमी वजनाच्या बालकांना ग्राम बाल विकास केंद्रामध्ये दाखल करून त्यांना अतिरिक्त पोषण आहार व आरोग्य सुविधा उपलब्ध करून आरोग्य केंद्रात उपचारासाठी पाठविले जाते. तसेच जनजागृती करण्याकरिता अंगणवाडी स्तरावर दरमहा माता बैठकीचे आयोजन केले जाते.
➢ नवजात बालकाला अर्ध्या तासाच्या आत स्तनपान देण्याकरिता जनजागृती केली जात आहे.
➢ वयोगटानुसार लसीकरण करून बालकांचे आजारांपासून संरक्षण करणे.
➢ योग्य प्रमाणानुसार जंतुनाशक औषधांचा वापर करणे.
➢ अंगणवाडीतील बालकांची दर तिमाही आरोग्य तपासणी करणे.
➢ तीव्र कमी वजनाच्या बालकांची तसेच वजनवाढ नसलेल्या बालकांची नियमित आरोग्य तपासणी करणे व बालरोग तज्ञामार्फत तीव्र कमी वजनाच्या बालकांची तपासणी करणे.
➢ ग्राम बाल विकास केंद्र, बाल विकास केंद्र सुरू करण्यावरही भर देण्यात आलेला आहे.
➢ गर्भधारणेदरम्यान त्या मातेला त्या वेळी योग्य आहार मिळण्याची खात्री करा. तिला अधिक प्रमाणात अन्न, नेहमीपेक्षा एक तृतीयांश अधिक अन्न मिळाले पाहिजे. गर्भवती मातेला दिवसा किमान दोन तास विश्रांती मिळाली पाहिजे. रात्री आठ तास झोप व घरामध्ये आनंदी वातावरण ठेवले पाहिजे.
स्तनपान आणि सहा महिन्यानंतरचे अन्न
जन्मानंतर एक तासाच्या आत मातेचे घट्ट, पहिले दूध (कोलेस्ट्रम) बाळाला दिले पाहिजे. ते अत्यंत आवश्यक आहे. मातेचे पहिले दूध सर्वोत्कृष्ट असते, ते फेकून देऊ नका ते बाळाला मिळेलच याची खात्री करा. कारण हे दूध अत्यावश्यक आहे त्यामुळे पुढील काही दिवसांना बाळाला जे पक्क दूध मिळेल त्यासाठी ते दूध बाळाची पाचन संस्था तयार करते. तसेच (कोलोस्ट्रम) कच्च्या दुधात झिंक, कॅल्शियम आणि इतर जीवनसत्त्वांचे पोषक घटक असतात.
जन्मानंतर पहिले सहा महिने बाळाला केवळ मातेचे दूधच द्यावे अगदी पाणी सुद्धा नाही त्यामुळे बाळामध्ये अतिसार, न्यूमोनियासारख्या आजारांपासून संरक्षण मिळते. व बाळ मृत्यूचे प्रमाण कमी राहते तसेच बाळास होणारे आजारपण लवकर बरे होण्यास मदत होते.
सातव्या महिन्यापासून मातेचे दूध पुरेसे नसते. तिच्या दुधासोबत विविधांगी आहार द्या. दिवसातून 3-4 वेळा पुरेसा आहार बाळाला द्यावा व सोबत मातेचे दूध चालू ठेवावे.
पोषणाची चिन्हे, परिणाम आणि प्रतिबंध कसे कराल ?
नेहमी आजारी पडणारी, सहजपणे दमणारी आणि समजण्यास मंद असलेल्या मुलांना कुपोषणाची समस्या असू शकते. मूलं गर्भात असल्यापासून ते वयाच्या दोन वर्षापर्यंत एखाद्या लहान मुलाला विशेष धोका असतो, कुपोषणाची सुरुवात जन्माच्या आधीपासून होते. सामान्यतः ते मूल पौगंड आणि प्रौढ अवस्थेत येईपर्यंत ती चालू राहते आणि अनेक पिढ्यांपर्यंत कायम राहू शकते. ही समस्या बरेचदा दुरुस्त होऊ शकत नाही.
आईचं आरोग्य, मुलाचं आरोग्य आणि जिवंत राहणं यांना धोकादायक ठरणारी ही वाढ आणि विकासाची समस्या टाळण्यासाठी, कुपोषण जीवनचक्रामध्ये शक्य तितक्या लवकर टाळणं अतिशय महत्त्वाचं असतं.
उदा. मेलेलं रोपटं (मलूल रोपटे) डेरेदार झाडामध्ये पुन्हा जिवंत होऊन, माती, पाणी, ताजी हवा आणि सूर्यप्रकाश यासारख्या पोषकविना सामान्यपणे वाढू शकत नाही; तसंच योग्य निगा आणि पोषण नसेल तर एक लहान मूल देखील सुदृढ प्रौढ होऊ शकत नाही.
त्यासाठी पुढील गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
1) प्रसुतीपूर्व गर्भधारणेच्या दरम्यान निगा
गर्भधारणेच्या दरम्यान प्रसूतीपूर्व काळजी घेण्याचा थेट संबंध माता आणि जन्माला येणाऱ्या बाळाचं आरोग्य आणि तब्येतीशी आहे. संबंधित पालकांनी बाळाच्या जन्माबाबत माहिती कळताच लगेच अंगणवाडीला भेट द्यावी. आणि माता आणि बाल सुरक्षा कार्ड घ्यावे. हे साधं पण अत्यंत उपयोगी कार्ड त्यांना त्यांच्या बाळाचं पोषण आणि वाढीवर सतत लक्ष ठेवण्यास मदत करेल.
भारतात 75% नवमाता अशक्त असतात आणि गर्भधारणेच्या दरम्यान त्यांचं जितकं वजन वाढायला हवं त्यापेक्षा कमी वजनाच्या असतात यामुळे गर्भाची वाढ नीट होत नाही. जन्माच्या वेळेत बाळाचं वजन कमी राहतं, आणि जन्माच्या वेळेस बाळाला विकृती निर्माण होतात.
पोषणाची कारणे कोणती आहेत?
कुपोषणाची कारणे अनेक आहेत त्यातील प्रामुख्याने सांगितली जाणारी कारणे अशी…
1) कमी वयात मुलीचे लग्न होणे.
2) गर्भधारणा झाल्यानंतर त्वरीत आरोग्य केंद्राशी संपर्क न साधणे.
3) मातेच्या प्रसुतीपूर्व हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणे.
4) जन्माला येणारे मूल अशक्त व कमी वजनाचे असणे.
5) वारंवार होणारे बाळंतपण.
6) मूल जन्मतः एक तासाच्या आत स्तनपान न करणे.
7) सहा महिन्यानंतर बाळाला पूरक आहार न देणे अथवा उशिरा देणे.
8) आहारविषयक व मुलांच्या पोषणाविषयी माहिती नसणे.
9) कुटुंबात अपुरा व कमी प्रतीचा आहार असणे. ह्याशिवाय इतर कारणे जसे.
10) अस्वच्छता, गैरसमजुती उदा. अंधश्रद्धा, बाबा किंवा वैदूकडून उपचार करणे.
11) संसर्गजन्य आजार उदा. अतिसार, गोवर इ. आजारांमुळे वजन कमी होऊन कुपोषणाच्या आहारी जाणे.
12) गरीबी, बेरोजगारी, साक्षरतेचा अभाव.
13) अंगणवाडीतून मिळणाऱ्या पूरक पोषण आहाराव्यतिरिक्त लाभार्थ्यांना त्यांच्या आहारातून आवश्यक पुरेसे अन्न न मिळणे.
पोषणात भारताची स्थिती काय आहे?
➢ 2016 च्या ग्लोबल हंगर इंडेक्स (जागतिक भुकबळी प्रमाण) च्या पाहणीनुसार जगातील 141 देशांपैकी कुपोषणामध्ये सर्वाधिक कुपोषित व्यक्ती / मुलांचे राष्ट्र म्हणून मध्य आफ्रिकेचा क्रमांक (118) वा लागतो त्यांचा ग्लोबल हंगर इंडेक्स (50 पैकी) 46.1% आहे. भारताचा क्रमांक 97 वा लागतो. भारताचा ग्लोबल हंगर इंडेक्स हा 28.5% इतका आहे.
➢ भारतामध्ये कुपोषणाचे सर्वात जास्त प्रमाण हे बिहार राज्यात आढळून येते त्याची टक्केवारी ५०% आहे, त्यानंतर उत्तर प्रदेश ३६%, दिल्ली ३५%, महाराष्ट्र १७%, तामिळनाडू १२% असे कुपोषणाची टक्केवारी आढळून येते.
➢ भारतात एकूण मुलांच्या संख्येपैकी 2-3 कोटी मुले कुपोषित आढळतात व त्याची टक्केवारी 28% इतकी आढळते.
