संशोधन आणि तंत्रज्ञान

ईव्ही की हायड्रोजन कार? भविष्यातील वाहनक्रांतीची दिशा नेमकी कोणती? Electric vs Hydrogen cars Future of Green Transport

इलेक्ट्रिक कार की हायड्रोजन कार ?

भारतात हायड्रोजनवर धावणारी पहिली रेल्वे सुरू झाल्याने स्वच्छ आणि पर्यावरणपूरक वाहतुकीच्या चर्चेला नवी दिशा मिळाली आहे. मग उद्याच्या रस्त्यांवरही हायड्रोजन कार धावताना दिसतील का? अवघ्या ३ ते ५ मिनिटांत इंधन भरण्याची सुविधा आणि धुराऐवजी पाण्याचे उत्सर्जन ही हायड्रोजन कारची मोठी जमेची बाजू असली, तरी महागडे तंत्रज्ञान, हायड्रोजनची मर्यादित उपलब्धता, पायाभूत सुविधांचा अभाव आणि उत्पादनातील ऊर्जा खर्च यामुळे तिच्यासमोर मोठी आव्हाने आहेत. दुसरीकडे, वेगाने विस्तारत असलेले चार्जिंग नेटवर्क आणि तुलनेने कमी चालू खर्च यामुळे ईव्हीने आघाडी घेतली आहे. त्यामुळे प्रश्न केवळ ‘ईव्ही की हायड्रोजन?’ एवढाच नाही; तर भविष्यात कोणत्या वाहतुकीसाठी कोणते इंधन अधिक योग्य ठरणार, हा खरा प्रश्न आहे.

प्रा.डॉ.संजय छाया त्रिंबकराव खडक्कार,
माजी तज्ज्ञ सदस्य,विदर्भ वैधानिक विकास मंडळ.
मोबाईल क्रमांक: 7276614260

भारतातील पहिली हायड्रोजन रेल्वे १७ जुलै २०२६ पासून हरियाणातील जिंद- सोनपत मार्गावर सुरू झाली.ही १० डब्यांची स्वदेशी ट्रेन हायड्रोजन इंधन सेल तंत्रज्ञानाचा वापर करते. यामुळे कार्बन उत्सर्जनाऐवजी केवळ पाण्याची वाफ बाहेर पडते, त्यामुळे पर्यावरणात प्रदुषण होत नाही.तसेच दररोज ३,००० लिटर डिझेलची बचत होते. मग काय अशाच तंत्रज्ञानावर आधारित हायड्रोजन कार पेट्रोल किंवा इलेक्ट्रिक कारला (ईव्ही) पर्याय होऊ शकते?

सध्या भारतात हायड्रोजन कार व्यावसायिक रित्या (सर्वसामान्यांसाठी विक्रीसाठी) उपलब्ध नाहीत. सध्या या गाड्या केवळ प्रायोगिक किंवा पायलट प्रोजेक्ट स्तरावर आहेत. हायड्रोजन कारमध्ये फ्यूएल सेल स्टॅक नावाचे यंत्र असते. कारच्या कार्बन -फायबर टाकीत हायड्रोजन वायू भरला जातो. कार सुरू झाल्यावर हायड्रोजन थेट इंजिनमध्ये जळत नाही,तर टाकीतील हायड्रोजन वायू आणि वातावरणातील ऑक्सिजन (हवा) एकत्र करून या सेलमध्ये रासायनिक प्रक्रिया होऊन वीज तयार होते,ज्यावर कारची मोटार चालते. या प्रक्रियेत कचरा किंवा धूर निघत नाही तर फक्त शुद्ध पाणी सायलेन्सर मधून बाहेर पडते.आता हे बघणे जरूरीचे की सध्या लोकप्रिय होत असलेली ईव्ही कार चांगली की येणारी हायड्रोजन कार?

इलेक्ट्रिक आणि हायड्रोजन कार या दोन्ही पर्यावरणपूरक असून ईव्ही कार,बॅटरीमध्ये वीज साठवून,चालतात,तर हायड्रोजन कार,हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या प्रक्रियेतून स्वतःच वीज निर्माण करतात.हायड्रोजन वायू हा कारमध्ये हायड्रोजन पंपावर भरला जातो तर ईव्ही कार ही घरीच किंवा चार्जिंग स्टेशनवर चार्ज करता येते. कार बॅटरीच्या क्षमतेनुसार, पुर्ण चार्ज होण्यासाठी, साधारणपणे,३० मिनिटांपासून ते १२ तासांपर्यंत वेळ लागू शकतो.पण हायड्रोजन कारमध्ये इंधन भरण्यासाठी फक्त ३ ते ५ मिनिटे लागतात. सध्या भारतात ईव्ही कार चार्जिंग स्टेशनचे जाळे वेगाने वाढत आहे,तर हायड्रोजन पंपांची उपलब्धता खूपच कमी आहे.

सध्या भारतात ईव्ही कार या ७ ते २५ लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत,तर हायड्रोजन कार, ज्याचे तंत्रज्ञान अत्यंत महाग आहे,त्या भारतात आल्या तर,त्याची किंमत ६० ते ७० लाख रुपयांपर्यंत जाईल.तसेच ईव्ही कारचा प्रति किलोमीटर खर्च ८० पैसे पासून १.५० रुपयांपर्यंत आहे, तर हायड्रोजन कारचा ४ ते ५ रुपये प्रति किलोमीटर असेल. तसेच भारतात पेट्रोल कारचा खर्च साधारणपणे प्रति किलोमीटर ८ ते १० रुपये आहे.

हायड्रोजन वायूची वाहतूक आणि साठवणूक हा हायड्रोजन वाहनांचा मुख्य तोटा आहे.हायड्रोजनची साठवणूक,वायू किंवा द्रव,अवस्थेत असली तरी, वाहतुकी दरम्यान गळतीमुळे नेहमीच नुकसान होते.तसेच हायड्रोजनला संकुचित करण्यासाठी किंवा द्रवरूप करण्यासाठी अधिक ऊर्जेची आवश्यकता असते. या प्रक्रियेमुळे हायड्रोजन वाहनांची एकूण ऊर्जा कार्यक्षमता कमी होते.हायड्रोजन हवेच्या संपर्कात आल्यावर अत्यंत ज्वलनशील असतो, ज्यामुळे संभाव्य वापरकर्त्यांना सुरक्षेची चिंता वाटू शकते.

हायड्रोजन गाड्या बनवण्यासाठी क्लिष्ट तंत्रज्ञान आणि विशेष घटकांचा वापर केला जातो,ज्यामुळे त्यांचे उत्पादन पारंपरिक पेट्रोल किंवा इलेक्ट्रिक वाहनांच्या तुलनेत अधिक महाग होते.एका बाजूला हायड्रोजन कार मधून जरी शून्य प्रदूषण होते तरी हायड्रोजन उत्पादनात मोठ्या प्रमाणात जीवाश्म इंधनाचा वापर होतो. यामुळे हरितगृह वायूंचे लक्षणीय उत्सर्जन होते आणि स्वच्छ इंधन म्हणून हायड्रोजन वायूशी संबंधित काही पर्यावरणीय फायदे नाहीसे होतात.

सध्या तरी हायड्रोजन वायूवर चालणाऱ्या गाड्यांची भूमिका मर्यादित राहण्याची शक्यता आहे, तर पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणाऱ्या गाड्या प्राथमिक वाहतुकीसाठी अव्यवहार्य राहतील. त्याऐवजी, प्रमाणित बॅटरीवर चालणाऱ्या ईव्हीचे वर्चस्व राहील.त्यात ईव्ही कारच्या छतावर सोलर पॅनेल्स बसविले तर ते सूर्यप्रकाशाचे रूपांतर थेट विजेमध्ये करतील, त्याने दिवसाला साधारण १५ ते ३० किलोमीटर इतका अतिरिक्त मायलेज मिळू शकतो. हायड्रोजन वायूचा वापर रोजच्या प्रवासी गाड्यांऐवजी अवजड ट्रक वाहतुकीसाठी राखीव ठेवला जाण्याची शक्यता आहे.

आज हायड्रोजन वायूवर चालणाऱ्या गाड्या प्रामुख्याने कॅलिफोर्निया (यूएसए),पूर्व आशिया (जपान, दक्षिण कोरिया, चीन) आणि पश्चिम युरोपच्या काही भागांमध्ये (जर्मनी, फ्रान्स, यूके) चालतात, जिथे हायड्रोजन इंधन भरण्याची प्रस्थापित पायाभूत सुविधा आहे. जपान व दक्षिण कोरिया या देशात हायड्रोजन कार व हायड्रोजन वायू खरेदीवर मोठ्या प्रमाणात सबसिडी आहे, त्यामुळे तेथील नागरिकांना या आर्थिक दृष्ट्या परवडतात.

जागतिक वाहतूक उद्योग मोठ्या प्रमाणावर बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये गुंतवणूक करत आहे. ही वाहने अत्यंत कार्यक्षम असतात तसेच त्यांना वेगाने विस्तारणाऱ्या सार्वजनिक चार्जिंग स्टेशन करता येते तसेच ते आधीपासून स्थापित असलेल्या विद्युत ग्रिडवर अवलंबून असतात.

सध्या हायड्रोजन कार एक पर्यावरण पूरक प्रयोग म्हणूनच उत्तम आहे. कंपन्या हायड्रोजन कार ऐवजी हायड्रोजन ट्रक्स आणि बसेस वर जास्त भर देत आहेत कारण मोठ्या इलेक्ट्रिक ट्रक्स व बसेससाठी मोठ्या व जड बॅटऱ्या लागतात. त्यामुळे त्यांची प्रवासी/सामान वाहून नेण्याची क्षमता कमी होते. पण हायड्रोजन वायू खूप हलका असल्याने ट्रकमध्ये कमी वजनाचे जास्त इंधन साठविता येते. त्यामुळे सध्या वैयक्तिक व छोट्या पल्ल्याच्या वापरासाठी ईव्ही कार हा सर्वोत्तम पर्याय आहे.सध्या इंधनावरील वाढत्या खर्चाला पर्याय म्हणून व प्रदुषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहकांचा वाढता कल दिसून येतो. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन उद्योग वेगाने विस्तारत असून भारतात २०३० पर्यंत ३ ते ४ कोटी रोजगार होण्याची शक्यता आहे. परंतु भारतात अवजड वाहतूक व लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी हायड्रोजन हे भविष्यातील सर्वात महत्त्वाचे इंधन असणार आहे,हे पण तेवढेच खरे.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

मराठी कथा बदलत्या समाजाचा आरसा ठरतेय का ? ‘कथावकाश’मधून उलगडले आधुनिक कथेचे नवे विश्व

मराठी कथा म्हणजे केवळ मनोरंजनासाठी सांगितलेली गोष्ट नाही; ती काळाच्या बदलत्या चेहऱ्याची संवेदनशील नोंद असते.…

3 hours ago

Tanjavar Marathi Samhelan : सरफोजीराजे मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद गोरे निवड

तंजावरच्या भूमीत रंगणार ऐतिहासिक सोहळा पुणे: अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने येत्या २३ सप्टेंबर…

12 hours ago

PM CARES Fund : पीएम केअर्समध्ये ८,४५२ कोटींची शिल्लक; खर्च फक्त ८७ लाख ! मग पैसा जातो कुठे?

‘पीएम ' नॉट ' केअर्स’' बाबतचा विशेष आर्थिक लेख. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी…

14 hours ago

एफडीए चे सिंघम: तुकाराम मुंढे FDA Singham Tukaram Mundhe

स्टेटलाइन - महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाला केवळ फाईलवर चालणारे सरकारी खाते न ठेवता थेट…

2 days ago

कृत्रिम बुद्धिमत्तेची क्रांती : भारताच्या अर्थकारणाला नवी संधी की नवे संकट ? AI Revolution and Indian Economy

कृत्रिम बुद्धिमत्ता आता केवळ तंत्रज्ञानाचा विषय राहिलेला नाही; ती जागतिक अर्थव्यवस्थेच्या रचनेलाच नवा आकार देत…

2 days ago

विश्व व्यापून उरला तोच एक प्रकाश; ज्ञानेश्वरांची विभूतीयोगाची अद्भुत दृष्टी Discovering the Divine Through the Dnyaneshwari

माणसाच्या बुद्धीत उमटणारा विचार, अंतःकरणात जागणारे ज्ञान, ओठांवर येणारे सत्य, क्षमेतून प्रकटणारी करुणा आणि सुख-दुःखाच्या…

3 days ago