संशोधन आणि तंत्रज्ञान

कृत्रिम बुद्धिमत्तेची क्रांती : भारताच्या अर्थकारणाला नवी संधी की नवे संकट ? AI Revolution and Indian Economy

कृत्रिम बुद्धिमत्ता आता केवळ तंत्रज्ञानाचा विषय राहिलेला नाही; ती जागतिक अर्थव्यवस्थेच्या रचनेलाच नवा आकार देत आहे. उत्पादनापासून शेतीपर्यंत, बँकिंगपासून आरोग्यसेवेपर्यंत आणि शिक्षणापासून सार्वजनिक प्रशासनापर्यंत एआयचा वाढता प्रभाव आर्थिक विकासाची समीकरणे बदलत आहे. भारतासाठी ही अभूतपूर्व संधी आहे; मात्र त्याचवेळी रोजगाराचे बदलते स्वरूप, कौशल्यांची वाढती गरज, डेटा सुरक्षा आणि नैतिकतेची आव्हानेही समोर आहेत. त्यामुळे प्रश्न केवळ ‘एआय किती वेगाने स्वीकारायचे?’ हा नाही, तर ‘एआयच्या क्रांतीतून भारताच्या अर्थव्यवस्थेला खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाची दिशा देता येईल का?’ हा आहे.

डॉ. नितीन बाबर
सहायक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग श्री संपतराव माने महाविद्यालय खानापुर जि सांगली nitinbabar200@gmail.com
९७३०४७३१७३

कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence–AI) ही एकविसाव्या शतकातील सर्वाधिक प्रभावशाली तांत्रिक क्रांती म्हणून उदयास आली आहे. औद्योगिक क्रांतीने उत्पादन व्यवस्थेत, संगणक क्रांतीने माहिती व्यवस्थापनात आणि इंटरनेटने जागतिक संपर्कव्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले; त्याचप्रमाणे एआय आता जागतिक अर्थव्यवस्थेची रचना आणि विकासाची दिशा बदलत आहे. उत्पादन, शेती, बँकिंग, आरोग्य, शिक्षण, वाहतूक, ई-कॉमर्स, संरक्षण, वित्तीय सेवा आणि सार्वजनिक प्रशासन अशा जवळपास सर्वच क्षेत्रांत एआयचा वापर झपाट्याने वाढत असून, उत्पादकता, कार्यक्षमता, स्पर्धात्मकता आणि नवोपक्रमाला नवी गती मिळत आहे. परिणामी, ज्ञानाधारित आणि तंत्रज्ञानकेंद्रित आर्थिक विकासाच्या नव्या पर्वाची पायाभरणी होत आहे.

एआयमुळे बदलते जागतिक अर्थकारण

जगभर उद्योग, वित्त, आरोग्य, शिक्षण, कृषी, संरक्षण आणि सार्वजनिक प्रशासन अशा अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांतील एआयचा वापर वेगाने वाढत आहे. त्यामुळे उत्पादकता, कार्यक्षमता आणि नवोन्मेषातुन खर्च कमी होणे, गुणवत्तेत सुधारणा, जलद निर्णयप्रक्रिया आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर शक्य होतोय. संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यापार व विकास परिषदेच्या तंत्रज्ञान आणि नवोन्मेष अहवाल २०२५ नुसार २०३३ पर्यंत जागतिक ए आय बाजारपेठेचे मूल्य सुमारे ४.८ ट्रिलियन अमेरिकी डॉलर इतके होण्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे, हा आकार आजच्या जर्मनीच्या अर्थव्यवस्थेच्या सुमारे ५ ट्रिलियन अमेरिकी डॉलरच्या अर्थव्यवस्थेच्या जवळपास समतुल्य असेल. बहुराष्ट्रीय व्यावसायिक सेवा संस्था (PwC) च्या २०१७ च्या कृत्रिम बुद्धिमत्तेचे वास्तविक आर्थिक मूल्य या अभ्यास सन २०३० पर्यंत एआयमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत तब्बल १५.७ ट्रिलियन अमेरिकी डॉलरची अतिरिक्त भर पडू शकते. यापैकी ६.६ ट्रिलियन डॉलरची भर उत्पादकतेतील वाढीमुळे, तर ९.१ ट्रिलियन डॉलरची भर ग्राहकांच्या वाढत्या मागणीमुळे आणि नव्या बाजारपेठांच्या विस्तारातुन होईल असे सांगतो.

अमेरिका, चीन, ब्रिटन, कॅनडा आणि दक्षिण कोरिया यासारखे देश एआयच्या वापरात आघाडीवर आहेत.तर भारत, ब्राझील, इंडोनेशिया आणि संयुक्त अरब अमिराती यांसारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थाही एआय आधारित उद्योग,डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि स्टार्टअप परिसंस्था विकसित करून जागतिक स्पर्धेत वेगाने पुढे येत आहेत. स्टॅनफर्ड कृत्रिम बुद्धिमत्ता निर्देशांक २०२५ नुसार, २०२४ मध्ये जगभरातील खासगी ए आय गुंतवणूक सुमारे २५० अब्ज अमेरिकी डॉलरपेक्षा अधिक झाली आहे. एकंदरितच एआय ही केवळ खर्च कमी करणारी किंवा कामाची गती वाढविणारी तांत्रिक प्रणाली नसून उत्पादन, उपभोग, गुंतवणूक आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणारी आर्थिक परिवर्तनाची प्रेरक शक्ती म्हणून उदयास येत आहे.तथापि यातुन रोजगाराचे स्वरूप, कौशल्यांची मागणी, डेटा सुरक्षा, गोपनीयता आणि नैतिकतेसंबंधी नवी आव्हानेही निर्माण होतायेत. त्यामुळे याचा स्वीकार करताना नवोन्मेष आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा ताळमेळ साधणे हीच भविष्यातील शाश्वत आर्थिक विकासाची खरी गुरुकिल्ली ठरणार आहे.

एआय आणि भारतीय अर्थव्यवस्थेचे बदलते अर्थकारण –

भारताने कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात अल्पावधीत उल्लेखनीय प्रगती साधली आहे. मजबूत माहिती-तंत्रज्ञान उद्योग, जगातील सर्वाधिक तरुण मनुष्यबळ, वेगाने वाढणारी डिजिटल अर्थव्यवस्था आणि व्यापक डेटा संसाधनांच्या बळावर माहिती-तंत्रज्ञान, बँकिंग, उत्पादन, आरोग्य, कृषी, शिक्षण आणि सार्वजनिक प्रशासन आदी क्षेत्रांत एआय चा वापर वाढविला आहे. केंद्र सरकारने इंडिया ए आय मिशन अंतर्गत १०,३७१.९२ कोटीं रूपयांची तरतूद करून संगणकीय क्षमता (GPU), संशोधन, स्टार्टअप्स, कौशल्य विकास आणि सार्वजनिक डेटा प्लॅटफॉर्म उभारणीला चालना दिली आहे. विविध उद्योग ट्रॅकर्स आणि इंडियाएआय २०२६ मधील अंदाजानुसार देशात ८,५०० ते ९,५०० हून अधिक एआय-केंद्रित स्टार्टअप्स कार्यरत आहेत. अमेरिका आणि चीननंतर भारत ही वेगाने वाढणारी एआय स्टार्टअप परिसंस्था मानली जाते.

याची क्षेत्रनिहाय स्थिती विचारात घेता माहिती-तंत्रज्ञान व डिजिटल सेवा क्षेत्रात एआयचा सर्वाधिक, म्हणजे ३० ते ३५ टक्के वापर होत आहे. बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्राचा एआय वापरातील वाटा २० ते २५ टक्के आहे. उद्योग आणि उत्पादन क्षेत्रात स्मार्ट फॅक्टरी, रोबोटिक्स, गुणवत्ता नियंत्रण, पुरवठा साखळी व्यवस्थापन आणि यंत्रसामग्रीची पूर्वसूचना देखभाल यामुळे उत्पादन खर्च कमी होत असून निर्यात स्पर्धात्मकता वाढत आहे. आरोग्य क्षेत्रात एआयचा वापर १० ते १२ टक्के असला तरी आरोग्य सेवा अधिक वेगवान, अचूक आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणाऱ्या बनत आहेत. याशिवाय ई-कॉमर्स, शिक्षण, वाहतूक आणि सार्वजनिक प्रशासन या क्षेत्रांमध्ये मिळून १५ ते २० टक्के एआयचा वापरातुन डिजिटल सार्वजनिक पायाभूत सेवा अधिक वेगवान, पारदर्शक, कार्यक्षम आणि नागरिकाभिमुख बनत आहेत. शेती क्षेत्रातील ५ ते ८ टक्केच्या दरम्यान असलेला एआयचा वापर हवामानाचा अचूक अंदाज, मृदा विश्लेषण, पीक रोग निदान, स्मार्ट सिंचन, ड्रोनद्वारे पिकांचे निरीक्षण आणि बाजारभावाचे विश्लेषणास मदतकारक ठरतो आहे.

स्टॅटिस्टा मार्केट इन्साइट्सच्या सन २०२५ मधील अहवालानुसार, भारतातील कृत्रिम बुद्धिमत्ता बाजारपेठेचे मूल्य सुमारे ८ ते ९ अब्ज अमेरिकी डॉलर इतके असून, २०३० पर्यंत ही बाजारपेठ सुमारे ३० अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत विस्तारण्याची शक्यता आहे. नॅसकॉमच्या अभ्यासानुसार, एआयमुळे २०३० पर्यंत देशाच्या अर्थव्यवस्थेत ४५० ते ५०० अब्ज अमेरिकी डॉलर इतके अतिरिक्त आर्थिक मूल्य निर्माण होऊ शकते. भारत जागतिक ए आय वापरात दुसऱ्या क्रमांकावर तर दरडोई वापरात १०१ व्या स्थानी आहे., म्हणजेच याचा वापर प्रामुख्याने महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक आणि दिल्ली या चार राज्यांमध्ये केंद्रित आहे. ही चार राज्ये एकत्रितपणे भारतातील निम्म्याहून अधिक एआय वापरतात. यावरून एआयचा विकास अद्याप काही मोजक्या राज्यांपुरताच केंद्रित असल्याचे दिसते.

विवेकपूर्ण व नैतिक वापर हवा –

भारताकडे असलेले विपुल युवा मनुष्यबळ, जागतिक दर्जाचा माहिती-तंत्रज्ञान उद्योग आणि वेगाने विस्तारत असलेली डिजिटल अर्थव्यवस्था ही कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रासाठी मोठी बलस्थाने ठरतात. तथापि डेटा संरक्षण, सायबर सुरक्षा, नैतिक एआय, बौद्धिक संपदा, कौशल्य विकास आणि रोजगारातील संक्रमण यांसारख्या आव्हानांवर प्रभावी धोरणात्मक उपाय आवश्यक आहेत. भविष्यात रोजगार संपणार नाहीत; उलट त्यांचे स्वरूप बदलेल आणि ज्ञान, सर्जनशीलता व उच्च-कौशल्यावर आधारित नव्या रोजगारसंधी अधिक वेगाने उदयास येतील.या बदलाशी सुसंगत री-स्किलिंग ,अप-स्किलिंग आणि ए आय-केंद्रित कौशल्य विकासाला प्राधान्य देणे अपरिहार्य ठरणार आहे.

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० व्दारे विद्यापीठे, महाविद्यालये आणि कौशल्य विकास संस्थांनी उद्योगाभिमुख अभ्यासक्रम, संशोधन, नवोन्मेष आणि स्टार्टअप परिसंस्थेला बळ देऊन भविष्योन्मुख कौशल्य विकासाला गती देण्यासाठी सुयोग्य धोरणे, कुशल मनुष्यबळ आणि अधिकाअधिक नवोपक्रमाभिमुख गुतंवणूक महत्वाची ठरणार आहे. एकंदरितच कृत्रिम बुद्धिमत्ता ही नैतिकता, पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सर्वसमावेशतेव्दारे आर्थिक प्रगती, सामाजिक परिवर्तनातुन मानवी जीवनमान उंचावण्याचे प्रभावी साधन ठरेल. जेणेकरून त्याच्या विवेकपूर्ण, नैतिक आणि सर्वसमावेशक वापराव्दारे भारत जागतिक ज्ञानाधारितअर्थव्यवस्थेत अग्रगण्य राष्ट्र म्हणून नावारूपास येईल.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

विश्व व्यापून उरला तोच एक प्रकाश; ज्ञानेश्वरांची विभूतीयोगाची अद्भुत दृष्टी Discovering the Divine Through the Dnyaneshwari

माणसाच्या बुद्धीत उमटणारा विचार, अंतःकरणात जागणारे ज्ञान, ओठांवर येणारे सत्य, क्षमेतून प्रकटणारी करुणा आणि सुख-दुःखाच्या…

15 hours ago

निकृष्ट दर्जामुळे दोन मोठ्या मसाला ब्रँडच्या मिश्रित हिंगाच्या विक्रीवर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडून मनाईचा आदेश जारी

मुंबई - ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, भारतीय अन्न सुरक्षा आणि…

16 hours ago

वर्ध्याची समृद्ध वाङ्मय परंपरा Wardha rich literary tradition

विदर्भ साहित्य संघ, नागपूर चे तिसरे जिल्हा साहित्य संमेलन वर्धा येथे झाले. यामध्ये डॉ .राजेंद्र…

1 day ago

परदेशी विद्यार्थी भारताकडे वळत आहेत; भारतीय विद्यापीठे ही संधी साधणार का ? India has major opportunity to attract foreign students

‘स्टडी इन इंडिया’चे २०३० पर्यंत दोन लाखांचे लक्ष्य; जागतिक विद्यापीठांच्या शर्यतीत भारताला अजून मोठी झेप…

1 day ago

‘मी’पासून मन, मनापासून सृष्टी; माऊलींनी उलगडले विश्वनिर्मितीचे गूढ!

एकत्वातून विश्वाचा विस्तार; ‘मी’पासून मन आणि मनापासून सृष्टीची निर्मिती सृष्टीच्या आरंभी काय होते? देव, जीव,…

1 day ago

साखरेच्या कारखाना स्तरावरील दरात सुमारे 20% घट, किरकोळ दरही होणार कमी

गेल्या काही दिवसांत साखरेच्या कारखाना दरात सुमारे 20% घट झाली असून किरकोळ दरातही कालपासून घट…

2 days ago