FIFA World Cup 2026: ₹5,400 Crore Prize Pool, Record Revenue & India's Football Challenge
फुटबॉल विश्वचषकमध्ये ५ हजार ४०० कोटी रुपयांच्या बक्षिसांची लयलूट जगभरातील तब्बल ६०० कोटी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारा फिफा फुटबॉल विश्वचषक हा केवळ क्रीडा महोत्सव नसून अब्जावधी डॉलरच्या जागतिक अर्थकारणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.यंदाच्या स्पर्धेत तब्बल ५,४०० कोटी रुपयांची बक्षिसे,एक लाख कोटी रुपयांहून अधिक महसूल आणि ४१५ कोटी रुपयांचे विजेतेपदाचे पारितोषिक यामुळे फुटबॉलचा आर्थिक डंका जगभर वाजत आहे.मात्र या प्रचंड वैभवाच्या पार्श्वभूमीवर भारताचा संघ पात्रता फेरीतच बाद होणे ही भारतीय फुटबॉलसमोरील कटू वास्तवाची जाणीव करून देणारी बाब आहे. प्रा डॉ संजय छाया त्रिंबकराव खडक्कार, माजी तज्ज्ञ सदस्य, विदर्भ वैधानिक विकास मंडळ. मोबाईल क्रमांक :7276614260
अमेरिका,कॅनडा व मेक्सिको या तीन देशात होत असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक-२०२६ मध्ये एकंदरीत ४८ देशाचे संघ भाग घेत आहेत व एकंदरीत १०४ सामने खेळले जाणार आहे. ही फुटबॉल स्पर्धा ११ जून ते १९ जुलै २०२६ या कालावधीत होत आहे. दर विश्वचषकाआधी प्रदीर्घ पात्रता फेऱ्या खेळविण्यात येतात ज्यामधून ४८ संघ निवडले जातात.२०२६ च्या पात्रता फेरीतच भारतीय संघ शर्यतीतून बाहेर पडला.
फुटबॉल जगातील जवळपास २०० हून अधिक देशात खेळला जातो.अमेरिका,कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत एकूण १०४ सामने खेळले जाणार आहेत.स्टेडियममध्ये जाऊन थेट सामना पाहणाऱ्यांची संख्या ५० ते ६० लाखांच्या घरात जात आहे.जगातील जवळपास प्रत्येक कोपऱ्यात फुटबॉल पोहचल्यामुळे,यात जगभरात सुमारे ६०० कोटी लोक विविध माध्यमांद्वारे हे सामने बघतील असा अंदाज फिफाने वर्तवला आहे.याची तुलना भारतात सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेट मधील नुकत्याच झालेल्या टी-२० क्रिकेट विश्वचषकाशी (२०२६) केली तर,जवळपास १३ लाख लोकांनी स्टेडियमवर जाऊन हे क्रिकेट सामने बघितले, तर भारतातच एकूण ५० कोटींपेक्षा जास्त प्रेक्षकांनी हा टी-२० विश्वचषक कोणत्या ना कोणत्या माध्यमातून टीव्ही किंवा मोबाईलवर पाहिला.प्रत्यक्ष प्रेक्षक किंवा विविध माध्यमांतून बघणाऱ्यांची संख्या यात मोठा फरक असल्याने,फिफा फुटबॉल विश्वचषक २०२६ व टी-२० क्रिकेट विश्वचषक (२०२६) यांच्या अर्थकारणात बरीच मोठी तफावत दिसून येते.फिफा फुटबॉल विश्वचषक अपेक्षित महसूल हा अंदाजे १ लाख कोटी रुपयांहून जास्त आहे,तर टी-२० क्रिकेट विश्वचषकात तो अंदाजे फक्त ९ हजार कोटी रुपये होता,म्हणजे फुटबॉल विश्वचषकाचा एकूण अपेक्षित महसूल हा टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या महसूलापेक्षा १० पटीने जास्त आहे.एकूण बक्षिसांची रक्कम अनुक्रमे ५ हजार ४०० कोटी रुपये व ९३ कोटी रुपये,तर विजेत्या संघाला बक्षीस अनुक्रमे ४१५ कोटी रुपये व २२ कोटी रुपयांचे.
या विश्वचषक फुटबॉलमध्ये इतिहासातील सर्वात मोठा ‘फिफा’ ने (फेडरेशन इंटरनॅशनल दे फुटबॉल असोसिएशन),जी फुटबॉल खेळावर नियंत्रण ठेवणारी सर्वोच्च आंतरराष्ट्रीय संस्था आहे) अंदाजे ११ अब्ज डॉलर्सचा (अंदाजे १ लाख ३ हजार कोटी रुपये) महसूल आणि जागतिक अर्थव्यवस्थेत ८० अब्ज डॉलर्स पर्यंतची (७ लाख ५५ हजार कोटी रुपये) भर पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे.
पायाभूत सुविधांवर प्रचंड खर्च करणाऱ्या पूर्वीच्या यजमान देशांच्या विपरीत,२०२६ ची स्पर्धा अमेरिका,कॅनडा आणि मेक्सिकोमधील आधीपासून अस्तित्वात असलेल्या स्टेडियमचा वापर करत आहे.फिफाचा महसूल प्रामुख्याने प्रसारण हक्क अंदाजे ४०,००० कोटी रुपये,प्रायोजकत्व आणि विपणनाचे अंदाजे २७,००० कोटी रुपये,व तिकिट विक्री आणि आतिथ्य यात २५,००० ते ६८,००० कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.
यंदा फुटबॉलचे सामने पाहण्यासाठी तिकिटांच्या दरात अभूतपूर्व वाढ झालेली दिसते. फिफाने पहिल्यांदाच डायनॅमिक व्हेरिएबल प्राइसिंग मॉडेल (मागणीनुसार बदलणारे दर) लागू केले आहे. सुरवातीच्या सामन्यात हे दर अंदाजे ११,००० रुपये ते ८५,००० रुपये आहेत तर फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या तिकिटांची मूळ किंमत (फेस व्हॅल्यू) श्रेणीनुसार अंदाजे १.७ लाख रुपये ते २७.६ लाख रुपयांच्या दरम्यान आहे.
यंदाच्या फुटबॉल विश्वचषकमुळे अंदाजे १ लाख कोटी रुपयांहून अधिक नफा मिळेल असे फिफाचे म्हणणे आहे.परंतु मागील २०२२ मध्ये फुटबॉल विश्वचषक स्पर्धा ही यजमान देश कतारसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरली नाही,ज्यात जरी विक्रमी ७२,००० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला तरी यजमान देशाला थेट आर्थिक नफा जवळपास मिळालाच नाही,कारण प्रसारण, प्रायोजकत्व आणि तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या महसूलाचा मोठा भाग फिफा स्वतःकडे ठेवते.त्याचबरोबर,कतारने त्यावेळी पायाभूत सुविधा व मैदान निर्मितीवर जवळपास २१ लाख कोटी रुपये खर्च केला, ज्यात ७ नवीन स्टेडियम बांधले.तर यंदाच्या स्पर्धेत एकही नवीन स्टेडियम बांधले गेले नाही,तर जुन्याच स्टेडियम्सचे नूतनीकरण करण्यात आले,त्यामुळे अंदाजित खर्च फक्त अंदाजे ७४,००० कोटी रुपये आला,जो मागील २१ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत फारच कमी आहे.तसेच मागील विश्वचषकात ३२ चमूंनी भाग घेतला व ६५ सामने खेळल्या गेले,तर यंदाच्या स्पर्धेत ४८ चमू भाग घेत आहेत व १०४ सामने खेळले जाणार आहे.३९ सामने जास्त खेळविले जाण्याने तिकीट विक्री,प्रायोजकत्व व प्रसारण हक्क यात वृध्दी होईल व त्यामुळे नफा पण जास्त प्रमाणात असेल.
फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा आयोजित करणे तसे जोखीमीचे असते, कारण यातून नफा मिळेलच याची शाश्वती नाही.यजमान शहरे बहुतांश खर्च उचलतात, ज्यात सुरक्षा,पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आणि लॉजिस्टिक यांचा समावेश असतो,तर फिफाला तिकीट विक्री, प्रायोजकत्व, प्रसारण हक्क व वस्तूंची विक्री मधून मोठ्या प्रमाणात नफा मिळतो. तरी पण देश/ शहरे विश्वचषक स्पर्धा आयोजित का करतात? आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी,नागरी अभिमान, दीर्घकालीन पर्यटन लाभाची आशा ही आयोजनामागील मुख्य कारणे आहेत. जागतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे ही स्थानिक नेत्यांसाठी एक लक्षणीय उपलब्धी असते.
पण ज्या विकसनशील देशांची अर्थव्यवस्था कर्जाच्या खाईत आहे आणि ज्यांना शून्यापासून भव्य स्टेडियम्स आणि हॉटेल्स उभी करावी लागतात, त्यांनी अशा स्पर्धा आयोजित करण्याचे टाळावे. यासाठी ब्राझीलचे उदाहरण लक्षात ठेवावे कारण २०१४ मध्ये फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केल्याने ब्राझीलचे १.१२ लाख कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.तसेच कमी लोकसंख्या व भौगोलिक क्षेत्र असलेले देश जे पर्यटकांचा प्रचंड ओघ हाताळू शकत नाहीत किंवा छोट्या भौगोलिक क्षेत्रामुळे सामने पाहण्यासाठी येणाऱ्या लाखो चाहत्यांना सामावून घेऊ शकत नाहीत,अशांनी पण आयोजकत्व स्विकारू नये.फिफा फुटबॉल विश्वचषक आयोजित करणे हा देशासाठी फायद्याचा सौदा ठरू शकतो, मात्र तो पूर्णपणे आर्थिक लाभाचा न राहता दीर्घकालीन पायाभूत सुविधा आणि जागतिक प्रतिमेपुरता मर्यादित असतो.
यात खेद एवढाच वाटतो की फिफा फुटबॉल विश्वचषकाच्या विजेत्या संघाला ४१५ कोटी रुपये मिळणार आहेत व त्यात जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला भारत पात्रता फेरीतच गारद होतो,व केप व्हर्दे,ज्याची लोकसंख्या अकोला शहराच्या लोकसंख्येपेक्षा कमी आहे,अशा पश्चिम आफ्रिकेतील देशाच्या फुटबॉल संघ गतविजेत्या अर्जेंटिनाला अतिरिक्त वेळेपर्यंत कडवी झुंज देऊन जगभरातून प्रचंड वाहवा मिळवितो.याची मुख्य कारणे म्हणजे भारतात तळागाळातील योग्य प्रशिक्षण प्रणालीचा अभाव,खेळाडू शोधण्याच्या यंत्रणेचा कमकुवतपणा आणि क्रिकेटचे अवास्तव प्रेम,अशी मानली जातात. भारताने फुटबॉलमध्ये जागतिक पातळीवर नाव कमविण्यासाठी देशात विखुरलेल्या प्रतिभावान खेळाडूंना शोधण्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागात मोठ्या प्रमाणावर टॅलेंट हंट आयोजित करून गुणवान खेळाडूंना कठोर प्रशिक्षण द्यावे व ‘इंडिया खेलो फुटबॉल’ सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करून त्यांना व्यावसायिक संधीशी जोडण्याचे काम करावे,जेणेकरून पुढील फिफा विश्वचषक फुटबॉल विश्वचषकासाठी भारत पात्र ठरू शकेल.
'एसईपीसी'च्या महासंचालकांचा ऐतिहासिक कोल्हापूर दौरा 'कोल्हापूर आयटी एक्सपोर्ट समिट २०२६' ला आयटी उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
बदलती जीवनशैली,आरोग्याबाबत वाढती जागरूकता आणि पौष्टिक स्नॅक्सची वाढती मागणी यामुळे अन्न प्रक्रिया क्षेत्रात एक्सट्रुजन तंत्रज्ञानाला…
एव्हरेस्टच्या दिशेने टाकलेले प्रत्येक पाऊल म्हणजे केवळ पर्वतारोहण नव्हे, तर स्वतःच्या मर्यादांशी सुरू झालेला संघर्ष…
परमेश्वर सर्वशक्तिमान असला, तरी त्यालाही ज्या एका शक्तीपुढे नतमस्तक व्हावे लागते, ती म्हणजे भक्ती. भक्ताचे…
राष्ट्रे केवळ आपल्या विजयाच्याच नव्हे, तर पराभवाच्या स्मृतीही कशा जपतात, याचे जगातील सर्वोत्तम उदाहरण म्हणजे…
महाराष्ट्रात ५०१२ सहायक प्राध्यापकांच्या मेगा भरतीची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी नव्या कार्यपद्धतीतील गुणांकन,पीएच.डी.ला दिलेले…