स्वप्नापलीकडची एव्हरेस्ट वारी.. भाग - १ सह्याद्रीच्या कडेकपारींमध्ये बालपणापासून भटकंती करणाऱ्या एका सामान्य पर्यटकाच्या मनातही कधी एव्हरेस्ट बेस कॅम्पचे स्वप्न नव्हते. मात्र, एका सहज झालेल्या गप्पेतून आणि मोबाईलवरील काही व्हिडिओंमधून सुरू झालेला प्रवास आयुष्याला वेगळे वळण देऊन गेला. 'लेह-लडाख'ची आखलेली योजना बाजूला पडली आणि जगातील सर्वात साहसी समजल्या जाणाऱ्या 'Everest Base Camp' मोहिमेच्या दिशेने पावले वळली. शारीरिक तयारी, मानसिक धैर्य, नवे सहकारी आणि हिमशिखरांच्या हाकेला दिलेला प्रतिसाद यांची ही एका स्वप्नापलीकडच्या एव्हरेस्ट वारीची प्रेरणादायी कहाणी… कुसुमानंद (प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते) 9403464101
शिधासामुग्रीसह धोतरात बांधलेले पातेले पाठीवर घेवून सह्याद्रीचे कडेकपारी, गडकोट आणि ऐतिहासिक रानवाटा तुडवण्याची सुरुवात वयाच्या दहाव्या वर्षीच झालेली. सह्याद्रीच्या कधी कुशीत, तर कधी अंगा-खांद्यावरुन भटकताना माझा मी कधीच रहात नाही. एक वेगळीच ऊर्जा या भटकंतीत संचारलेली असते. पण, आयुष्याच्या उत्तरार्धात किंवा मध्यावर कधीतरी जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टच्या कुशीत म्हणजेच ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ (EBC) वर आपण पाऊल ठेवून उभे राहू, तेथे जोर मारु, असा विचार अगदी स्वप्नाजवळही आजू-बाजूला भटकला नव्हता. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली व्यक्ती सर एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनसिंग नोर्गे एवढीच काय ती माहिती माझ्या सर्वसाधारण ज्ञानात होती.
प्रतिवर्षी किमान दोन नवीन अनवट जागा शोधून तिथे भटकंती करायची, हा माझा आणि सौ चा (पत्नी डॉ. सुप्रिया) गेल्या कित्येक वर्षांचा ठरलेला शिरस्ता ! मात्र, गेल्या दोन वर्षांतील कामकाजामुळे आणि वेळेअभावी यात खंड पडला होता. त्या दोन वर्षांतील उरलेली कसर भरून काढण्यासाठी आम्ही ‘लेह-लडाख’च्या मोहिमेची जय्यत तयारी सुरू केली होती. त्या थंड वाळवंटाचे नकाशे आणि माहिती गोळा करण्यात आम्ही दोघेही गुंतलो होतो.
नेमकी याच काळात रत्नागिरी प्रशासनातील माझे सहकारी आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांच्याशी दररोज जीम, समुद्रकिनारी फिरणं, हाफ मॕरेथानची तयारी, या निमित्तानं दररोजचा सहवास वाढला. सह्याद्रीच्या रौद्र रूपाशी त्यांची झालेली गट्टी थक्क करणारी होती. मांगी-तुंगी, तोरणा ते राजगड असा अंगावर काटा आणणारा ट्रेक, तोही वादळी वारे आणि कोसळत्या धारांत, सलग सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत त्यांनी पूर्ण केल्याचे ऐकून मी अचंबित झालो होतो. एवढ्यावरच न थांबता, महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर ‘कळसुबाई’ देखील सर करून आले होते.
अशातच एक दिवस मोबाईलवर रिल्स पाहता पाहता आमच्या गप्पा एका वेगळ्याच वळणावर गेल्या. गप्पांच्या ओघात ते अचानक म्हणाले, “सातपुते साहेब, मला ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ करायचा आहे!” त्यांच्या या धाडसी इच्छेला बळ देत मी म्हणालो, “माझी मैत्रीण मनीषाने हा ट्रेक पूर्ण केलाय.” मी तात्काळ त्यांना मार्गदर्शक दीपक सावेकर यांचा संपर्क क्रमांक दिला. गायकवाड साहेबांनी त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा समजले की, दीपकरावांची कन्या कस्तुरी हीच या कठीण ट्रेकचे नेतृत्त्व करत असून एक बॅच घेऊन जात आहे. त्यानंतर गायकवाड साहेब कस्तुरीशी पुढील नियोजनाबाबत चर्चा करण्यात पूर्णपणे गुंतले.
आम्ही मात्र, आमचा ‘लेह-लडाख’चा प्लॅन कसा यशस्वी करता येईल, आपल्याला सोयीस्कर तारखा कोणत्या, याच तयारीत होतो. तब्बल आठ दिवसांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर गायकवाड साहेबांचा कस्तुरीशी संपर्क झाला आणि ईबीसी ट्रेकची खडान् खडा माहिती त्यांच्या हाती आली. आता त्यांची अधिकृत तयारी सुरू झाली. आम्ही दोघेही २१ किमी मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन, अल्ट्रा मॅरेथॉन आणि सांगलीत पार पडलेल्या कठीण ‘ड्युएथ्लॉन’ (Duathlon) च्या निमित्ताने रोज सकाळी किंवा संध्याकाळी सरावासाठी भेटत असू. या सरावाच्या दरम्यान ‘ईबीसी’च्या गप्पाच जास्त रंगायच्या.
गायकवाड साहेबांचा आता कसून सराव सुरू झाला होता. रोजचा आहार काय असावा, व्यायामाचा क्रम कसा असावा, याचे काटेकोर नियोजन त्यांनी केले होते. त्यांनी आपली सीटही आरक्षित केली होती. मे महिन्यातील १५ तारीख निश्चितही झालेली. त्यांच्या तयारीचा मी साक्षीदार होतो. त्यांच्या या ट्रेकविषयी मी लिहीणार असेही त्यांना आवर्जून सांगितले होते.
मार्च महिन्यात, एका संध्याकाळी सराव करताना त्यांनी मला थेट विचारले, “तुम्ही येताय का माझ्यासोबत ईबीसीला?” मी नेहमीप्रमाणे हसून म्हणालो, “नाही साहेब, आमचे लेह-लडाख ठरले आहे.” पण, त्या रात्री घरात एक वेगळेच नाट्य घडले. मी घरात जाताच सौ. ला सहज म्हणालो, “आपले गायकवाड साहेब ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ला चालले आहेत.” बस, एवढा एकच शब्द पुरेशा होता! आम्ही दोघांनी उत्सुकतेपोटी यू-ट्यूबवर ईबीसीचे व्हिडिओ पाहण्यास सुरुवात केली. तिथले ते विहंगम दृश्य, बर्फाच्छादित शिखरे आणि थ्रिल पाहून आमच्या अंगावर रोमांच उभे राहिले. सौ. ने तर एक पाऊल पुढे टाकत थेट कस्तुरीशी संपर्क साधला. सर्व माहिती घेतली. पैसे ट्रान्सफर केले आणि थेट विमानाचे तिकीटच बुक करुन टाकले.
लेह-लडाखच्या थंड वाळवंटाकडे जाणारे आमचे पाय एका क्षणात साहसी पर्यटनाकडे वळले. जगातील सर्वात साहसी अशा ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’च्या रोमहर्षक वाटेवर आम्ही थेट स्वार झालो !
आता ध्येय बदलले होते आणि वेळ कमी होता. तिथले उणे तापमान, वातावरणातील ऑक्सिजनची कमतरता आणि तिथे जाऊन आलेल्यांचे अनुभव ऐकून मनात धाकधूक वाढू लागली होती. ईबीसीसाठी लागणारी शारीरिक आणि मानसिक क्षमता कमावण्यासाठी आमची तयारी आता अधिक जोमाने सुरू झाली. रत्नागिरीतील ‘नारायणमळी’चा कठीण चढाव यासाठी आमची सराव शाळा बनला. तिथे चढ-उतार करताना आम्ही आमचा स्टॅमिना तपासत होतो. तिकडे सौ तिच्या महाविद्यालयाच्या आशिया खंडातील एक नामवंत रनिंग ट्रॕकवर सराव वाढवत होती. दररोजचे सराव छायाचित्र समुहावर पडत होते.
मनात येणाऱ्या शंका-कुशंका, लागणारे तांत्रिक साहित्य, कपड्यांचे थर (Layering) यावर कस्तुरीशी आमची सतत चर्चा सुरू असायची. ट्रेकिंगच्या साहित्याची खरेदी हा एक मोठा टास्क होता. पुण्याच्या ‘डिकॅथलॉन’ (Decathlon) मध्ये जाऊन सर्वांनी एकत्र खरेदी करण्याचे दोनदा नियोजन झाले. पण, काही ना काही कारणाने ते बारगळले. शेवटी वेळ न दवडता मी आणि सौ.ने कोल्हापूर गाठले. तिथल्या डिकॅथलॉनमध्ये कस्तुरी स्वतः हजर राहिली. तिने आपल्या अनुभवातून आम्हाला योग्य ते साहित्य आणि पोशाख निवडण्यास मदत केली. जे काही शिल्लक राहिले होते, ते आम्ही ऑनलाईन मागवून घेतले. अखेर, बॅगा पॅक झाल्या आणि आम्ही सज्ज झालो.
इकडे गायकवाड साहेबांनीही शासकीय कामानिमित्त मुंबईत गेले असता, तिथल्या डिकॅथलॉनमधून आपल्या ट्रेकचा संपूर्ण बस्ता बांधला. या अद्भुत प्रवासासाठी आता आम्ही एकूण सातजण एकत्र आलो होतो. अनोळखी चेहरे, पण ध्येय एकच! या सर्वांची एकमेकांशी गट्टी व्हावी, म्हणून १२ मे च्या रात्री आम्ही सर्वजण ‘व्हिडिओ कॉल’द्वारे एकमेकांशी जोडले गेलो. कस्तुरीने अत्यंत कौशल्याने अंतिम सूचना दिल्या. ‘चेक-इन बॅगेज’मध्ये काय असावे, ‘कॅबीन बॅग’मध्ये कोणत्या वस्तू हव्यात, आपत्कालीन औषधे कोणती, या सर्व गोष्टींची उजळणी झाली. व्हिडिओ कॉल संपला, पण डोळ्यांतील नवखेपण जाऊन तिथे एक अनामिक उत्साह दाटून आला होता. त्या रात्री डोळे मिटल्यावर सह्याद्रीचे कडे डोळ्यांसमोरुन दूरवर जात होते. एव्हरेस्टच्या पांढऱ्याशुभ्र, नयनरम्य कडा धूसरपणाने जवळ येत होत्या. हिम कणांच्या दुलईत, हिमस्वप्नात रंगून गेलो होतो. आता प्रतीक्षा होती ती फक्त प्रत्यक्ष उड्डाणाची…!
‘हवेतून’ जमिनीवर..भगवान गौतम बुध्दांच्या भूमीत..
१५ मे रोजी पुण्यातून रात्रीचे विमान काठमांडूला आम्हाला नेणार होते. आम्ही विमानतळाच्या आत प्रवेश केला. बोर्डींग पास घेतले. चेक इन, सुरक्षा तपासणी याचे सोपस्कार पूर्ण करुन गेट क्रमांक 6 वर स्थिरावलो. बऱ्याच वेळाने गेट क्रमांक अचानक बदलले गेले. आमचे विमान गेट क्रमांक ८ वर येणार असल्याचा फलक चमकू लागला.
घुमणाऱ्या आवाजात उद्घोषणा झाली आणि गेट क्रमांक ८ वरुन बोर्डींग पास तपासून आम्हा सर्वांना विमानात सोडण्यात आले. मध्यरात्र उलटून दुसरा दिवस सुरु झालेला. कप्तान बिपीन आणि सह कप्तान पंकज यांनी घोषणा केली, ‘पुणे ते दिल्ली उडान दोन तासात पूर्ण केली जाईल.’ सोबत विमानात विलिंडा, कुमकुम, श्वेता आणि सिमरन या केबिन क्रु असणार असल्याची उद्घोषणा ऐकायला मिळाली.
विमानात चार-चार हवाई सुंदरी असल्याचे ऐकून मी सहजच मिश्कीलपणे सौ ला म्हणालो, ‘विमानात चार हवाई सुंदरी आहेत हं!’ त्यावर तिनेही तितक्याच हजरजबाबीपणे टोमणा मारला ‘एक तर तुझ्या बाजूलाच बसली आहे!’ तिच्या या उत्तराने मी जागेवरच गपगार झालो. खरतरं त्या चारपैकी दोन नावे तिनेच मला ऐकून सांगितली होती.
निर्धारित वेळेपेक्षा २० मिनिटे उशिरा आमचे विमान धावपट्टीकडे निघालेले होते. सुरक्षा नियमांची सूचना देणाऱ्या उद्घोषणेवर केबीन क्रू प्रात्यक्षिके दाखवत होती. धावपट्टीकडे जाणाऱ्या विमानात एका पाठोपाठ एक उद्घोषणा सुरु होती. ‘केबीन लाईट कम की जाएगी’, आणि आतील प्रकाश मंदावला. आतल्या आत जणू टीपूर चांदणं पडल्याचा भास झाला. रिव्हर्स गियरमधून बाहेर पडत विमान धावपट्टीवर जाण्यास आतुरलेले होते. ते गतीने धावू लागले. एका क्षणी पृथ्वीवरुन काढता पाय घेत ते आकाश कवेत घेण्यास अवकाशात झेपावले.
विमान बाहेर झेपावले तसे आतून पेंगुळलेल्यांचा ‘झोपावल्या’ चा प्रत्यय आला. झोपमोड झालेल्या बाळाने अनेकांचा वरच्या पट्टीत लागलेला ‘खर्ज’ तोडायला सुरुवात केली. सुटलेली तार क्षणार्धात पुन्हा जोडली गेल्याने जागोजागी त्याचे ‘स्वर’ सुस्कार ऐकू येण्यास सुरुवात झालेली. माझ्या बाजूला बसलेल्या माझ्या प्रिय हवाई सुंदरीनेही तिच्या परीने ‘सुरात सूर’ मिसळलेला.
पुण्याचा पसारा मागे सुटत गेला. एरव्ही जमिनीवरुन आकाशात दिसणारे नभांगण आता आकाशातून जमिनीवर अवतरल्यासारखे भासत होते. त्या अंधःकारमय, अथांग अवकाशात विमानाबरोबर मी ही गडप होवून गेलो.
‘खराब मौसम..’ कप्तानाचा हा आवाज ऐकला तसा मी गडपेतून जागा झालो. पहाटेचे सव्वा तीन वाजलेले. दिवसभर प्रदूषणाच्या धुराड्यात धावणारी दिल्ली शांतपणे पहुडलेली दिसत होती. अंगणातून आकाशात तारकापुंजाचे झुंबर दिसावे, अगदी तसे खाली दिल्लीचा नजारा दिसत होता. तारकापूंज गडद होत गेला. हळूहळू गावं जवळ येत खुणावू लागली.
धावून दमलेले निद्राधीन विमान जमिनीच्या खांद्यावर पाय रोवण्यासाठी आसुसलेले होते. त्यासाठी ते एकदा उजव्या बाजूला तर एकदा डाव्या बाजूला कूस बदलत खाली उतरु पहात होते. झुंबर तुटून ते इतस्ततः पसरावे त्याप्रमाणे जमिनीवरचा विस्तीर्ण देखावा नजरेत भरत होता. ‘आपण जमिनीवर पाय ठेवतोय’, अशी लँडींगची उद्घोषणा झाली. ठिपके दिसणाऱ्या इमारती मोठ्या गडद होत गेल्या. जमिनीला चाकांचे पाय रोवून विमान यशस्वीपणे दिमाखात उभे राहिले.
काठमांडूला जाणारे आमचे विमान टर्मिनल ३ वर उभे होते. तेथे जाण्यासाठी शटल बस उभी होती. या बसमधून १५ मिनिटानंतर आम्ही तेथे पोहचलो. बहुतेकजण ‘इबीसी’ ट्रेकला जात असल्याचे बसमधून जाणवले होते. इमिग्रेशननंतर पुन्हा कडक सुरक्षा तपासणीला सामोरे जावे लागले. यावेळी बूटदेखील काढावा लागला. ४ – सी वर प्रचंड गर्दी होती.
विमान ७-०५ वाजता धावपट्टीकडे निघाले. धावणाऱ्या चाकांनी अधिक गती घेत मधूनच आपले पाय पोटात घेत विमानाने जमिनीची साथ सोडली. तसे आम्ही सगळे आता ‘हवेत’ होतो. एअर इंडियाच्या या आंतरराष्ट्रीय विमानात सुरुवातीलाच एका बाजूला, चार तर दुसऱ्या बाजूला चार अशी ‘बिझीनेस’ क्लास बैठक व्यवस्था होती. त्यानंतर ‘प्रिमियम इकॉनॉमी’ आणि शेवटी ‘इकॉनॉमी’क्लास व्यवस्था होती.
काही वेळातच कप्तानाच्या उद्घोषणेनंतर केबीन क्रू ने ‘व्हेज, नॉनव्हेज’ची विचारणा करुन स्वादिष्ट नाश्ता देण्यास सुरुवात केली. कॉफी, आम्लेट, मिश्र फळांसह दही, अमूल बटर वगैरेंचा त्यात समावेश होता. याचा आस्वाद घेत आमचा प्रवास पुढे सरकत राहिला. काही वेळात कप्तानाचा गंभीर पण उत्साही आवाज पुन्हा ऐकायला मिळाला.
‘लँडींग की तैयारी कर रहे है..’ कप्तानाच्या या उद्घोषणेनंतर काही वेळातच काठमांडूच्या ‘त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर’ लँड झालो. भगवान गौतम बुध्दांच्या भूमीत उतरलो. आम्ही ‘हवेतून’ थेट ‘जमिनीवर’ आलो..जगातील सर्वाधिक उंच असणाऱ्या शिखराच्या पायथ्याशी जाण्यासाठी..!
