नाशिक – लोककवी विठ्ठल वाघ राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार चांदवड जि. नाशिक येथील कवी सागर जाधव यांच्या माती मागते पेनकिलर या कवितासंग्रहाला जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती निवड समितीचे अध्यक्ष कवी लक्ष्मण महाडिक यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील नामवंत कवी संदीप जगताप व शिवव्याख्याते प्रा. जावेद शेख यांच्या वतीने उत्कृष्ट कवितासंग्रहासाठी लोककवी विठ्ठल वाघ राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. यंदाच्यावर्षी या पुरस्कारासाठी राज्यभरातून १७५ कवितासंग्रह आले होते. मॅग्नस फार्म येथे संपन्न झालेल्या निवड समितीच्या अंतिम बैठकीत या पुरस्कारासाठी सागर जाधव यांच्या कवितासंग्रहाची निवड करण्यात आली. यावेळी मॅग्नस फार्मचे संचालक लक्ष्मण सावळकर, कवी प्रा. संदीप जगताप, प्रा. शशिकांत घुटे उपस्थित होते.
दरवर्षी महाराष्ट्रातल्या एका उत्कृष्ट कवितासंग्रहाला हा पुरस्कार दिला जातो. निवड समितीमार्फत या पुरस्कारासाठी पुस्तकाची निवड केली जाते. कवी लक्ष्मण महाडिक यांच्या निवड समितीने यावर्षी या पुरस्काराची निवड केली. अकरा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अंतिम फेरीमध्ये मोठी चूरस निर्माण झाली होती. परंतु नव्या काळाचे खेड्यातील प्रश्न घेऊन, नव्या प्रतिमा असलेली कविता माती मागते पेनकिलर या कविता संग्रहात बघायला मिळते. तंत्रयंत्रकाळातील कविता या संग्रहात आली आहे. शेतकऱ्यापुढे उभे राहिले नवे प्रश्न या कवितेने सशक्त पणे मांडले आहे. म्हणून हा कविता संग्रह या पुरस्कारासाठी पात्र ठरला. असे निवड समितीने सांगितले.
मान्यवरांच्या हस्ते लवकरच या पुरस्काराचे वितरण मॅग्नस फार्म येथे होणार आहे. सागर जाधव यांना महाराष्ट्रातील अतिशय सन्मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल साहित्य क्षेत्रातले अनेक मान्यवर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.