संशोधन आणि तंत्रज्ञान

या एका निर्णयाने बदलले मानवजातीचे भविष्य !

विचारांचा, ज्ञानाचा सन्मान !

हिमयुगातील कडाक्याच्या थंडीत गुहेसमोर पेटलेल्या अग्नीशेजारी एक तरुण विचारात गुंग बसला होता. इतरांसाठी तो ‘वाया गेलेला’ होता; पण त्याच विचारांनी मानवजातीचा प्रवास बदलणार होता. एका भुकेल्या जंगली कुत्र्याशी केलेल्या मैत्रीपासून सुरू झालेली ही कथा आहे शक्तीवरून विचाराकडे झालेल्या मानव उत्क्रांतीची—ज्ञान, विज्ञान आणि सभ्यतेच्या जन्माची.

डॉ. विलास शिंदे, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

हिमयुगाच्या शेवटच्या कालखंडात एक महत्त्वाचा बदल झाला. शक्तीच्या सहाय्याने रक्षण करणारा टोळी प्रमुख बनत असे. मात्र शक्ती हेच सर्वस्व नाही, हे मानवाच्या लवकरच लक्षात आले. जो विचार करू शकतो, तोच टोळीला सुरक्षित ठेऊ शकतो, हेही लक्षात आले.‍ विचार करणे म्हणजेच चिंतन करणे, हे ज्ञान निर्मितीसाठी महत्त्वाचे असते. आजही ‘वाचाल तर वाचाल’ हे सुभाषित ‘वाचन प्रेरणा दिन’ आणि अन्य अनेक कार्यक्रमामधून श्रोत्यांच्या कानावर पडत असते. मात्र वाचन ही प्रक्रिया पुस्तक निर्मितीपूर्वीपासून सुरू होती. हे वाचन पंचेंद्रियांच्या सहाय्याने होत असे. निसर्गाचे वाचनच सुरू होते. या वाचनातून मनात प्रश्न येऊ लागले. सुरुवातीपासूनच आकाशातील तारे पाहून ते का चमकतात, रात्रीच का दिसतात, ते इतक्या दूर कसे, झाडे वेगवेगळी का असतात, त्यांना फळे कशी लागतात, सगळ्याच फुलांची फळे का होत नाहीत, पाऊस कसा पडतो, असे अनंत प्रश्न पडत. अर्थात असे प्रश्न एखाद्यालाच पडत.

अर्थात या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी एखाद्या टोळीतील एखादाच प्रयत्न करत असे. त्यामुळेच विचारवंतांची संख्या सुरुवातीपासूनच कमी आहे. अन्य लोकांची धारणा आजच्यासारखीच ‘मला काय त्याचे’ अशी असायची. त्या काळात पृथ्वीवरील शाकाहारी प्राणी आपले भक्ष्य आहेत, आणि मांसाहारी प्राणी आपल्याला भक्ष्य बनवतात, अशी मानवाची धारणा होती. त्यातही हत्तीसारख्या मोठ्या शाकाहारी प्राण्यांच्या वाटेला तो जात नसे. नाहीतरी हत्ती हा मानवाचा तसा पहिला गुरू. हत्ती एकटा सापडला, तर वाघ, सिंह आकाराने लहान असूनही त्याची शिकार करत. मात्र हत्ती टोळीत असताना, त्या टोळीकडे असे हिंस्र प्राणी वाकड्या नजरेने पहाण्याचे धाडस करत नसत. हे पाहूनच आदिमानवाने टोळी करून रहाण्यास सुरुवात केली. अशा मानसिकतेतून मानवाने अनेक प्राण्यांना अंकित बनवले, त्यांना तो पाळू लागला. मात्र याची सुरुवातही अपघाताने झाली.

हिमयुगाच्या अखेरच्या काळात कडाक्याची थंडी पडली होती. तोपर्यंत आपले पूर्वज गुहेमध्येच रहात असत. गुहेच्या दाराशी अग्नी प्रज्वलीत करून ठेवलेला असे. त्याचे दोन फायदे मिळत होते. एकतर थंडी कमी जाणवत असे. थंडीपासून जीव वाचत असे आणि गुहेतील लोकांपर्यंत जंगलातील हिंस्र प्राणी जात नसत. मानव सोडून अन्य सर्व प्राणी अग्नीला भीतात. ते अग्नीच्या आजूबाजूला जात नसत. अशीच एकदा कडाक्याची थंडी पडली होती. आदिमानवांची एक टोळी आफ्रिकेच्या मध्यभागी एका गुहेत रहात होती. त्या टोळीतील एक तरूण इतरांपेक्षा वेगळा वागत असे. इतर लोक प्राण्यांच्या पायाचे ठसे पाहून कोणता प्राणी असावा, केवळ याचाच अंदाज बांधत. हा तरूण मात्र तो ठसा किती खोल आहे, कोणत्या बाजूला ते ठसे धुसर होत गेले आहेत, हे तपासत असे. यातून त्याला तो प्राणी कोणत्या दिशेला गेला, कधी गेला, याचा अंदाज येऊ लागला. हा तरूण शिकारीला जात नसे. कायम विचारात गुंग असे. इतर लोकही त्याला बरोबर घेत नसत. ते त्याला आजच्या भाषेत ‘वाया गेलेला’ समजत असत.

एका रात्री कडाक्याची थंडी पडली होती. शिकारीला गेलेले इतर लोक थकल्याने गुहेत झोपले होते. या तरूणाला मात्र झोप येत नव्हती. त्याने त्या दिवशी त्याच्या वाटणीचे मांसही खाल्ले नव्हते. तो आगीजवळ उब घेत विचार करत बसला होता. अचानक तेथे एक जंगली कुत्रा पळत आला आणि बसला. तो जंगली कुत्रा घाबरलेला होता. कदाचित त्याच्या मागे दुसरा कोणी प्राणी लागला असावा. तो भुकेजलेलाही होता. तो तरूण त्याच्याकडे पाहून उठला. गुहेत गेला आणि आपल्या वाटणीचे मांस खात बसला. तो कुत्रा त्याच्याकडे आशाळभूतपणे पहात होता. त्या तरूणाला त्या कुत्र्याच्या डोळ्यात भूक दिसली. त्या तरूणाने स्वत:च्या वाट्यातील एक हाड त्या कुत्र्यासाठी दगडावर ठेवले. कुत्रा त्या तुकड्याजवळ जाऊन अंदाज घेऊ लागला. असे अन्न खाण्याची त्याला सवय नव्हती. वास घेऊन ते मांस खाण्यायोग्य आहे म्हटल्यावर त्याने ते हाड उचलले आणि शांतपणे चघळत भूक शांत करू लागला.

एक दिवस त्या तरूणाने अन्न दिले आणि त्या कुत्र्याने त्याच्याशी दोस्ती केली. तो कुत्रा आता रोज रात्री येत असे. तो तरूणही त्याला रोज अन्न देत असे. अखेर हे गुपित फुटले. यांची दोस्ती टोळीतील इतर लोकांच्या लक्षात आली. त्यांनी त्या तरूणाला विरोध केला. तो कुत्रा एक दिवस त्याच्या टोळीतील इतर प्राण्यांना घेऊन येईल आणि टोळीवर हल्ला करतील, अशी भिती त्यांना वाटत होती. मात्र त्या तरूणाने कोणाचेच ऐकले नाही. कुत्र्याबरोबरची दोस्ती कायम ठेवली. अखेर नेहमीप्रमाणे त्याचा नाद सोडून दिला.

आता तो तरूण काही वेळ कुत्र्याबरोबर घालवून झोपत असे. काही दिवसानंतर त्या टोळीच्या ठिकाणाचा शोध लांडग्याच्या टोळीला लागला. रात्रीच्या वेळी लांडग्याच्या टोळीने गुहेवर हल्ला केला. तो तरूण जरी झोपला असला, तरी कुत्रा जागा होता. कुत्रा लांडग्याचा सुगावा लागताच भुंकू लागला. तो कुत्रा अचानक भुंकू लागल्याने लांडगे भांबावले. त्यात गुहेच्या दरवाज्यात पेटलेली आग होती. लांडगे पळून गेले. मात्र तोपर्यंत टोळीतील इतर लोक जागे झाले. बाहेर आल्यानंतर, कुत्र्याने आपल्यावरील संकट टाळले, हे त्यांच्या लक्षात आले. आता सर्वच लोक त्या कुत्र्याला सांभाळू लागले. कुत्रा हा पहिला प्राणी जो माणसाने पाळला. अशा रितीने अपघाताने जवळ आलेला प्राणी माणसाचे आयुष्य बदलू लागला. पुढे असेच एक कोकरू टोळीच्या जवळ आले. त्याला टोळी कापणार होती. मात्र एका मुलीने त्याचे प्राण वाचवले आणि पहिली शेळी पाळली. माणूस जनावरे पाळू लागला. त्यांची लोकर, दुध आणि भाकड झाल्यावर मांसासाठी वापर सुरू झाला.

तरीही शक्तीने टोळीचे रक्षण करणारा टोळीप्रमुख असायचा. एकदा त्या टोळीच्या गुहेच्या आजूबाजूला एका हिंस्र प्राण्याचे ठसे आढळून आले. तेव्हा त्याच विचार करणाऱ्या तरूणाने तो प्राणी तेथून दूर गेला असल्याचे सांगितले. मात्र टोळीचा विश्वास बसला नाही. आठेक दिवस लोकांनी पहारा दिला. मात्र तो प्राणी काही आला नाही. तरूणांचे म्हणणे खरे ठरले. तेव्हापासून विचार करणाऱ्याला महत्त्व प्राप्त झाले. तो टोळीचा प्रमुख बनू लागला. हा विचाराचा नव्हे तर, त्यामागील चिंतनाचा सन्मान होता. विचारातून ज्ञान, ज्ञानातून विज्ञान आणि विज्ञानातून तंत्रज्ञान, प्रवासाची ही सुरुवात होती.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी
Tags: ancient historyancient humansancient wisdomanimal domestication historyanthropologycognitive evolutioncultural evolutionCultural Historydomestication of dogearly civilizationearly humansearly innovationearly societyevolution storyfire discoveryfirst domesticated animalfirst leaderhuman curiosityhuman developmenthuman evolutionhuman intelligencehuman progressice age humansinnovation historyintellectual evolutionIye Marathichiye Nagariknowledge creationknowledge journeymind over muscleorigin of knowledgeorigin of scienceorigin of technologypower of thoughtprehistoric discoveryprehistoric lifeprehistoric survivalprimitive thinkingprimitive tribesreasoning powerrise of civilizationscience originsocial developmentsocietal transformationsurvival instinctssurvival to sciencethinking mindthinking revolutiontribal leadershiptribal lifewolf to dogअग्नीचा शोधअस्तित्व संघर्षआदिम जीवनआदिम समाजआदिमानवइये मराठीचिये नगरीउत्क्रांती कथाकुतूहलकुत्र्याचे पाळीवपणचिंतनचिंतनशील मनजंगली जीवनज्ञान परंपराज्ञान प्रवासज्ञाननिर्मितीज्ञानाचा उगमटोळी जीवनतंत्रज्ञानाचा उगमनिसर्ग वाचननेतृत्वनेतृत्व परिवर्तनपहिला नेतापहिला पाळीव प्राणीप्राचीन मानवप्राचीन संस्कृतीप्राणिसंगोपनप्राण्यांचे पाळीवपणबुद्धिमत्ताबौद्धिक उत्क्रांतीमानव इतिहासमानव उत्क्रांतीमानव कथामानव प्रगतीमानव विकासमानवी प्रवासमेंदू विकासलांडगा ते कुत्राविचार क्रांतीविचारशक्तीविज्ञान प्रवासविज्ञानाचा जन्मशक्ती विरुद्ध विचारसभ्यता निर्मितीसभ्यतेचा उगमसंस्कृती विकाससामाजिक उत्क्रांतीसामाजिक परिवर्तनसांस्कृतिक बदलहिमयुग

Recent Posts

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

11 hours ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

23 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

1 day ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

2 days ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

2 days ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

2 days ago