fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
July 7, 2026
मुक्त संवाद

मानवी मनाची सुंदरता टिपणारा भावविभोर कवितासंग्रह : निळी सावळी नव्हाळी Review of Nili Savali Navali Poetry Collection

डॉ. स्वाती पाटील यांच्या 'निळी सावळी नव्हाळी' या कवितासंग्रहाचा समीक्षक माणिक गोंडाणे यांनी घेतलेला रसग्रहणात्मक आढावा. प्रेम, निसर्ग, स्त्रीमन आणि जीवनमूल्यांचा भावस्पर्शी प्रवास.
प्रेम, निसर्ग, स्त्रीमन, सामाजिक जाणीवा आणि जीवनातील सूक्ष्म भावछटा यांचा सुरेल संगम घडवणारा 'निळी सावळी नव्हाळी' हा डॉ. स्वाती पाटील यांचा कवितासंग्रह वाचकाला संवेदनांच्या एका नितांत सुंदर प्रवासावर घेऊन जातो. शब्दांची माधुरी, भावनांची प्रामाणिकता आणि काव्याची गेयता यांमुळे हा संग्रह केवळ कवितांचा संच न राहता मानवी मनाच्या कोवळ्या, हळव्या आणि विचारप्रवर्तक विश्वाचा भावस्पर्शी दस्तऐवज ठरतो. समीक्षक माणिक गोंडाणे यांनी या संग्रहातील काव्यवैशिष्ट्यांचा घेतलेला हा रसास्वाद वाचकाला कवयित्रीच्या प्रतिभेची ओळख करून देणारा आहे.

रसिक साहित्यिकांनो निळी सावळी नव्हाळी हा कवितासंग्रह कवयित्री डॉ. स्वाती पाटील सांगली यांच्याकडून विनंतीवरून मागवून घेतला. डॉ. स्वाती पाटील आयुर्वेद शास्त्रातील निष्णात चिकित्सक आहेत. त्या निवेदिका, सूत्रसंचालिका आणि अभिवाचिका असून अनेक साहित्यिक काव्यांग परिवारासी त्यांचा गहण संबंध आहे. कवितेच्या नामनिर्देशीत शीर्षकाच्या संदर्भात त्यांच्या काव्यमय सुंदर ओळी बोलक्या वाटतात.

,”नाजूक नव्हाळी राधेच्या प्रीतीची,
बाहुपाश सख्याचा निळा सावळा,
ओढ वाहते हळुवार स्पंदनी,
निर्झरी वाहतो मायेचा उमाळा
“प्रीत नव्हाळी
(पृष्ठ संख्या ३६. )

“ओढ ” कवितेत कवयित्री घननीळ, मयुर, रोमांचक अंग, अवनी अनावर यातून निसर्ग अन् मानवी आकर्षण विशद करतात की,

“घननीळ सावलीत,
नाचे मनात मयुर,
शहारतो रोम रोम,
धरा होई अनावर.

डॉ. स्वाती कवितेव्यतिरिक्त ललित लेखन, रसग्रहण याचाही रसास्वाद घेतात. या काव्यसंग्रहात ७५ कविता अंतर्भूत आहेत. बहुतेक कवितेत चार ओळींचे चार कडवे आहेत. प्रेमकविता, अभंग, हायकू, समाज वेदनांची आर्तता, निसर्गाची नाविन्यता, मानवी मनातील शीतल भावना व्यक्त करतांना

“कविते, तू येतेस यात त्या कवितेशी असा संवाद साधतात,
“कविते, तू येतेस,
माझ्या अस्वस्थतेला शब्दात कवटाळून घेतेस…
राग, तिरस्कार, व्यथा, वेदना, तुटणं, फुटणं, कोसळणं, रडणं, घुसमट आणि हतबलता, किती भावना मी तुझ्यावरती पेरल्या आणि संयमाने तू थोपटत राहिलीस मलाच.

.”कविता ९ आणि १५ मध्य तसेच कविता ७४ “सावित्री माय”,” साऊ”,”मी भिडेवाडा” यात त्या सावित्रीबाई फुले तसेच जोतिबा फुले यांचे ऋणनिर्देश करतांना आपल्या ओजस्वी वाणीचा मृदुगंध असा प्रकट करतात,

“तुझ्या ऋणाचे ओझे,
कायमच माझ्या मनी,
होती सावित्री म्हणुनी,
लेक झालीय शहाणी”.
“बांधून शिदोरी पदरी साऊ,
तुझ्या गं त्यागाची,
चालतो ही वाट ज्ञानाची,
आजही खाच- खळग्यांची”,

“व्हॅलेंटाईन” या प्रेम कवितेत कवयित्री प्रियकर प्रियेला पहिल्या नजरेतल्या प्रेमाची अशी साक्ष देतो आहे,

“प्रथम जेव्हा पाहिले तुजला,
सांगतो अता,
व्हॅलेंटाईन होतीस तू माझी पहिलीच सखे”.

वटपौर्णिमा, संसार गणित, जादू, आठवणींचा वसंत झुला, आशा, मन पाऊस हायकू, माझे घर, स्वागत, कोजागिरी, हे चांदणे, जीवन सुंदर आहे, अभंग, माय मराठी, विचारायला हवं एकदा कवीला या सर्व कविता पर्यावरण, कुटुंब वत्सलता, अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, देशभक्ती यांचे दर्शन, सचित्रता, जीवनमूल्य यावर प्रकाश टाकतात. प्रस्तावनेत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. वैजनाथ महाजन डॉ. स्वाती पाटील कवयित्री यांच्या कविता संग्रहाला कोरलेल्या कवितांची लेणी होय असे संबोधतात. पुढे ते आपले अंतरंग असे मोकळे करतात,”कविता, शब्दकळा, काव्यानुभव अशा बहुविध गुणांनी दुग्धशर्करा असल्याचे प्रांजळ मत नोंदवतात. मनोगतामध्ये कवयित्री शालेय शिक्षण नववीपासूनच कविता लिहित असल्याचे सांगून, त्या सुरेल प्रवासातील एक शब्दवेडी असल्याचे तसेच कविता त्यांच्या हृदयात नेहमी स्पंदन करतात अशी स्पष्टता देतात.त्यांच्या गुरू आणि आदर्श यात शांताबाई शेळके ,इंदिरा संत, अरुणा ढेरे, पदमा गोळे यांचा उल्लेख करतात. कवयित्रीची पाठराखण करतांना प्रसिद्ध साहित्यिक सन्मा.देवीदास फुलारी नांदेड लिहितात की,”कवयित्रीचा “निळी सावळी नव्हाळी” हा कवितासंग्रह तरल प्रेमभाव, नवनिर्मिती, जीवनाचे तत्वज्ञान आणि माळरानावरील हिरवी दुलई असल्याची ग्वाही देतात. कवयित्रीच्या प्रतिभेला त्यांच्या कविता गेयता, नादमधुर्यता, तालबद्धता ,रसिकता, प्रगल्भता, जीवनातील सकारात्मता तसेच त्यांचा व्यासंग त्यांच्या साहित्यिक, सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवते. मला काय वाटतंय प्रबुद्ध वाचकांनो, मकरंदाच्या गोड कंठस्थातून कवयित्रीने वितरीत केलेल्या त्यांच्या गुलाबी सुगंधित कविता तालासुरावरच्या सप्तसुरांच्या झंकारीत तारांचे सुगम संगीत परिलक्षित करतात. त्यांचा जीवनानुभव, प्रेरकता, स्फुरण, मांगल्य, आंतरिक वेदना, कवितेतील ओथंबलेला गाभार्थ ही त्यांची मौलिकता, सदृश्यता, विहंगमतेचे प्रामुख्याने तैलचित्र स्पष्ट करते. लोकमान्य चित्रकार मोहम्मद अन्वर हुसेन यांनी मुखपृष्ठ अत्यंत सुबक आणि नाविन्यतापूर्ण तयार केले आहे. येथे मोराचे थैमान घालणे, निळ्या नभाचे निळेपण आणि पर्जन्यासाठी आसुसलेली धरती निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी आतुर असल्याचे प्रत्ययास येते. डॉ. स्वाती पाटील यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा देताना मी माझे परम मित्र प्रा. डॉ. यशवंत पाटील यांच्या कवितेतील काही ओळींचा उल्लेख करणे म्हणजे कवयित्रीचा साहित्याच्या अवीट गोडीला उत्स्फूर्त प्रतिसाद देणे तर्कसंगत होईल असे मला वाटते,

“फुले मुक्त सुगंध उधळीत,
इतरांस आनंदी करीत,
वृक्ष- वेलीवर फुलतातच ना? , झाडांना लगडणारी फळेसुद्धा,
पक्व होत तृप्ती देतातच ना?”

रसिक साहित्यिकांनो” निळी सावळी नव्हाळी” या कवितासंग्रहाचा परिपाठ करावा आणि डॉ. स्वाती पाटील महोदया यांच्या कवितेतील शब्दांना पारिजातकाचा सडा देऊन त्यांचे ग्रंथावरील प्रेम अबाधित ठेवावे असे मला प्रकर्षांने वाटते. शेवटी संदीप वाकोडे यांच्या गझलेतील चार ओळी रसिकांच्या जीवनमांगल्यांच्या प्रेमळ छठेसाठी ,

“मला वेदनांचा सहारा मिळाला,
मला आसवांचा किनारा मिळाला, तुझे तेवढे चांदणे सोबतीला,
तुझ्या आठवांचा निखारा मिळाला.”

पुस्तकाचे नाव:” निळी सावळी नव्हाळी “कवितासंग्रह
कवयित्री: डॉ. स्वाती पाटील
प्रकाशक: धर्मवीर पाटील, प्रतिभा पब्लिकेशन ईश्वरपूर
पृष्ठ संख्या: १०४
मुखपृष्ठ:अन्वर हुसेन
मूल्य: २०० रुपये

डॉ. स्वाती पाटील यांचा 'निळी सावळी न्हाळी' हा तरल प्रेमभाव कवितासंग्रह आहे. न्हाळीचे नाते एका अर्थाने नवनिर्मितीशी आहे. ही निर्मिती अवकाशातील निरामय निळाई तसेच कृष्णराधेच्या भावबंधातील 'सावळी' या संबोधनाशीही नाते सांगणारी आहे. जिव्हारी दुःखाची समजूत घालता आली आणि वेदनेला स्मितहास्याची किनार लावता आली की जगणं सुसह्य होतं. 

हे जीवनाचं तत्वज्ञान सांगणारी ही कविता कधीकधी हिरव्यागार माळरानावर हिरवी दुलई पांघरण्याची भाषा करते. कविता नसती तर जगणं अवघड झालं असतं अन सावित्री माय झाली नसती तर लेकींना शहाणपणाचा प्रदेश सापडला नसता. ही कवितेची परिभाषा अधिक बोलकी आहे. 

ऋतू येतात, ऋतू जातात मग आठवणींचा वसंत बहरून येतो. या नात्यांचं बेट निर्माण होतं. अनवट नात्यास नाव पण देता येत नाही. यावेळी तुझ्या-माययातला पाऊस देहातीत व्हावा ही काव्यभावना समजून घ्यावी लागते. आचार आणि विचार जेव्हा दोन किनारे होतात तेव्हा मग कवीला आणि कवितेलाही जाब विचारावा लागतो. सकाळ जडावलेली असते. क्वचितप्रसंगी स्वरही बेसूर होतो; पण एकदा षड्ज लागला की मैफल जुळून यायला वेळ लागत नाही. कवयित्री डॉ. स्वाती पाटील यांच्या अभिव्यक्तीला हा षड्ज सापडला आहे.

देविदास फुलारी, नांदेड

Related posts

निर्वासित एक आत्मकथन अन् संघर्षगाथा

झाडीपट्टीतील वाडे : एका लुप्त संस्कृतीचे संक्षिप्त आकलन

मुलांच्या अभ्यासाची चिंता सतावतेय …मग हा करा उपाय

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!