World’s Highest Chenab Railway Bridge – Engineering Marvel in Kashmir
प्रकाश मेढेकर
स्थापत्य सल्लागार
पुणे
भारताचे नंदनवन असणारे काश्मीर आता रेल्वे सेवेने देशाच्या इतर भागांशी जोडले गेले आहे. हे साध्य झाले, काश्मीर खोऱ्यातील एका रेल्वे लिंक प्रकल्पाने . युएसबीआरएल म्हणजेच उधमपुर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्प २७२ किलोमीटरचा असून, त्याची चार प्रमुख भागांमध्ये विभागणी झाली आहे. यामध्ये बारामुल्ला ते काझीगुंड ११८ किलोमीटर , काझीगुंड ते बनिहाल १८ किलोमीटर , बनिहाल ते कटरा १११ किलोमीटर आणि कटरा ते उधमपूर २५ किलोमीटर असा रेल्वे मार्ग आहे. देशातील अभियांत्रिकीच्या विविध प्रकल्पांमध्ये या आव्हानात्मक प्रकल्पाने मानाचा तुरा रोवला आहे. कारण याच मार्गावर आहे “ जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पूल ”. या पुलावरील रेल्वे लाईन ब्रॉडगेज असून त्यासाठी सिंगल ट्रॅक बनवला आहे. प्रकल्पाचा खर्च अंदाजे १४८६ कोटी आला असून पुलाची आयुष्य मर्यादा १२० वर्ष असणार आहे. या पुलाने स्थिरता, टिकाऊपणा आणि सुरक्षितततेच्या सर्व चाचण्या पूर्ण केल्या आहेत.
या पुलाचे स्थान हिमालयाच्या पर्वतरांगांमधील आव्हानात्मक भूप्रदेशात आणि प्रतिकूल हवामानात येते. काश्मीर खोऱ्यातील रियासी जिल्ह्यातील कौरी आणि बक्कल गावांच्या दरम्यान हा पूल येतो. हा पूल चिनाब नदीच्या पात्रापासून ३५९ मीटर उंचीवर असून, आयफेल टॉवर पेक्षा ३५ मीटर अधिक उंच, तर कुतुबमिनार पेक्षा ५ पटीने उंच आहे. पुलाची लांबी १३१५ मीटर असून रुंदी १३.५ मीटर आहे. पुलाला एकूण १७ स्पॅन असून सर्वात मोठा आर्च स्पॅन ४६७ मीटर लांबीचा आहे. आर्च स्पॅनचे वजन १०,६१९ टन भरते. पुलाच्या आधारासाठी स्टीलचे कॉलम आहेत. पुलाची स्लॅब बनवण्यासाठी ८ मीटर लांबी आणि ८ मिलिमीटर जाडीच्या १६१ गर्डर प्लेट्स एकमेकांना जोडण्यात आल्या आहेत. पुलावर तीन ठिकाणी एस्कपांन्शन जॉईंट असल्याने वेगवान रेल्वे धावताना पुलाच्या डेक स्लॅबला कोणताही धोका उत्पन्न होत नाही. डेक स्लॅब आणि स्टील कॉलम यांच्या मधील स्पेरीकल बेअरिंग मुळे पुलावर येणारे संपूर्ण वजन कॉलम द्वारे जमीनीपर्यंत नेले जाते.
या प्रकल्पाची मुहूर्तमेढ सन २००२ मध्ये भारत सरकारने योजली. पुलाची अलाईनमेंट अंबरबर्ग इंजिनिअरिंग कंपनीने केली. प्रकल्पाची प्रत्यक्ष सुरुवात २००४ मध्ये होऊन आर्चचे काम २०२१ मध्ये पूर्ण झाले. २००८ ते २०१० मध्ये सुरक्षितेसाठी पुलाचे काम बंद ठेवण्यात आले होते. अॅफकॉन, अल्ट्रा कन्स्ट्रक्शन, व्हीएसल इंडिया कंपन्यांनी प्रकल्पामध्ये भाग घेतला. कोकण रेल्वे कार्पोरेशनने प्रकल्पाचे नियोजन केले. फिनलँड , जर्मनी, स्विस देशातील सल्लागार प्रकल्पावर नेमण्यात आले होते. अंदाजे ३०० अभियंते आणि १३०० कामगारांनी अहोरात्र काम करून हा प्रकल्प पूर्ण केला.
नियोजित प्रकल्पाची जागा अति दुर्गम भागात होती. पुलाच्या पायापर्यंत मशिनरी, बांधकाम साहित्य, कामगार यांना नेण्यासाठी ५ किलोमीटर लांबीचे रस्ते सर्वप्रथम बांधावे लागले. कोणत्याही पुलाचे बांधकाम करताना त्याचा पाया मजबूत असावा लागतो . पुलाच्या जागी असणारा डोलोमाईट खडक हा मृदू असून आणि त्यामध्ये तडे आढळले. दरीचा उतार ४३ ° अंशापासून ७७ ° पर्यंत असुरक्षित होता. या तीव्र आणि धोकादायक उताराला टप्पाटप्प्याने स्थिर करावे लागले . स्फोटके वापरून जमिनीची लेवल करण्यात आली. पोकळ खडक दूर करण्यात आला. हायड्रॉलिक, केमिकल आणि मेकॅनिकल पद्धतीने रॉकबोल्टिंग , ग्राऊटिंग , शॉर्टक्रीटचा वापर करून खडकाचे मजबुतीकरण करण्यात आले आहे. कमानीचा मुख्य स्टील कॉलम १३७ मीटर उंचीचा आहे . त्यासाठी ५० मीटर लांब , ३६ मीटर रुंदीचे काँक्रीट फाउंडेशन करावे लागले. मुख्य आर्चसाठी स्टील आणि त्यामध्ये काँक्रीट भरलेले सीलबंद बॉक्स तयार करण्यात आले. नटबोल्टच्या साह्याने बॉक्सचे विविध भाग एकमेकांना जोडण्यात आले. त्याचप्रमाणे संरचनेच्या विविध भागांना जोडण्यासाठी अंदाजे ५८४ किलोमीटर वेल्डिंग करावे लागले . त्याचे अंतर जम्मू तवी ते नवी दिल्ली दरम्यानच्या अंतराइतके भरेल. पुलाच्या उभारणीसाठी जगातील सर्वात मोठी ९१५ मीटर लांबीची केबल क्रेन वापरण्यात आली . संपूर्ण पुलाला गंज प्रतिरोधक रंग दिला असून त्याचा टिकाऊपणा १५ वर्ष कालावधीचा असेल . पुलाच्या उभारणीसाठी २८,६६० टन स्टील , ४००० टन रीन्फोर्सड स्टील , ६६००० घन मीटर काँक्रीट , ८४ किलोमीटर लांबीची केबल आणि ८ दशलक्ष घनमीटर उत्खनन करण्यात आले.
हा पूल देशाच्या भूकंपप्रवण क्षेत्रातील झोन ४ मध्ये येतो. परंतु संरचना करताना झोन ५ मधील भूकंप शक्तींचा विचार करण्यात आला. दहशतवादी हल्ला रोखण्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचा सल्ला घेऊन पुलाला स्फोट प्रतिरोधक बनवला आहे. पुलावरून रेल्वे १०० किलोमीटर प्रति वेगाने धाऊ शकते . पूल २६६ किलोमीटर प्रती /तास पर्यंतच्या वाऱ्याच्या वेगांना तोंड देण्यासाठी डिझाईन केला आहे . पुलामध्ये ८ रिश्टर स्केलचा भूकंप आणि ४० टनाच्या समतुल्य उच्चतीव्रतेच्या स्फोटकांच्या हल्ल्याचा विरोध करण्याची ताकद आहे . उणे २० अंश ते अधिक ४० अंश तापमानाला तोंड देण्याची क्षमता या पुलामध्ये आहे. पुलाच्या डिझाईन आणि बांधकामासाठी बीएस : ५४०० हा मूलभूत मार्गदर्शक तत्त्व म्हणून वापरण्यात आला. आर्च कमानी मध्ये ३६ मीटर लांबीचे २ अॅप्रोच स्पॅन असून दोन्ही बाजूला दरी पूल आहेत . पुलाच्या दोन टोकाला १३० मीटर आणि १०० मीटर उंचीचे मनोरे असून त्यांना केबल्सच्या सहाय्याने एकमेकांना आधार दिला आहे . पुलाच्या कामाचे फॅब्रिकेशन जास्तीत जास्त साइटवर करण्यात आले . पूल उभारणीमध्ये गुणवत्ता आणि अभियांत्रिकी तंत्रज्ञान यामध्ये कोठेही तडजोड करण्यात आली नाही . जम्मू ते काश्मीर या भागात पूर्वीच्या काळात रेल्वे नव्हती . या प्रकल्पामुळे उधमपूर , श्रीनगर , बारामुल्ला हे रस्त्याने होणारे १५ तासाचे अंतर रेल्वेमुळे फक्त ५ ते ६ तासात पार करण्यात आपण यशस्वी झालो आहोत.
सृष्टीकडे पाहिले की असंख्य रूपे, जीव, शक्ती आणि घडामोडी आपल्याला दिसतात. या विराट पसाऱ्यामागे नेमकी…
कोल्हापूर : भारत हा कोणत्याही एका महामानवाचा,एका धर्माचा किंवा एका विचारपरंपरेचा नाही. बुद्ध, महावीर, संत…
डिजिटल क्रांती: समृद्ध शेतीचा पाया/ 'स्मार्ट शेती, भरघोस प्रगती' ड्रोनची फवारणी, मोबाईलवर मातीचे रिपोर्ट आणि…
ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे (नाशिक)यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार,संहिता राजन (पुणे)…
स्टेटलाइन - झारखंडच्या राजकारणात सध्या सत्तेच्या खुर्चीपेक्षा विद्यार्थ्यांच्या संतापाची ताकद मोठी ठरताना दिसत आहे. रांचीच्या…
विशेष आर्थिक लेख. महाराष्ट्रातील ३६ हजारांहून अधिक कंपन्या गेल्या पाच वर्षांत बंद झाल्याची माहिती संसदेत…