शेती पर्यावरण ग्रामीण विकास

बळीराजाचं ‘बाटुक’ आयुष्य — कवितेतून उमटलेली जिव्हारी लागणारी वेदना

शेतकऱ्याचं वास्तव जगणं मांडणारी कलाकृती – झालं बाटुकाचं जिणं
जगाला अन्न देणारा शेतकरी आज स्वतःच्या पोटासाठी झगडतोय—ही केवळ परिस्थिती नाही, तर एक शोकांतिका आहे. कर्ज, अवकाळी पाऊस आणि बाजारभावाच्या अनिश्चिततेत सापडलेल्या बळीराजाच्या जगण्याची हतबल कहाणी कवी आकाश भोरडे यांच्या ‘झालं बाटुकाचं जिणं’ या कवितासंग्रहातून तीव्रतेने समोर येते.

प्रशांत वाघ,
संपर्क – ७७७३९२५०००

स्वतःच्या टीचभर पोटाची खळगी भरण्याची भ्रांत असतांना जगाच्या पोटाची काळजी करणारा कोणी असेल तर तो म्हणजे शेतकरी, आणि म्हणूनच या कष्टकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटले गेले आहे. हल्ली शेतीमालाला रास्त भाव मिळत नाही, हाती आलेले पिक कधी कधी अवकाळी पावसाने वाहून जाते, कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्याचे जगणे म्हणजे केवळ शेतातील बुजगावण्यासारखे झाले आहे. दरवर्षी शेतीसाठी लाखो रुपयांचे कर्ज घ्यायचे, मात्र पर्जन्यमानाचा अनियमितपणा, हमी भावाची कमतरता अशा या ना त्या कारणांनी घेतलेले कर्ज मातीत मिसळून जाते, आणि जगाचा पोशिंदा कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतो इतकी विदीर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीवर भाष्य करणारी पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील कवी आकाश हरिभाऊ भोरडे यांची झालं बाटुकाचं जिणं ही काव्य साहित्य कलाकृती वाचनात आली.

झालं बाटुकाचं जिणं या शीर्षकातच शेती आणि शेतकरी यांच्या मातीमोल होत असलेल्या परिस्थितीची जाणीव होते. वर्षभर शेतीत राब राब राबायचे, रक्ताचे पाणी करून मातीत घाम पेरायचा, आणि वर्षाकाठी हाती आलेले पिक अत्यंत कवडीमोल भावाने विकायचे अशी परिस्थिती या शीर्षकात व्यक्त केली आहे. ज्याप्रमाणे शेतात पिक आल्यावर ज्वारीच्या कणसाला वर्षभर दाणे लागत नाहीत, त्याची वाढ होत नाही, आलेले पिक वांझ राहते त्या पिकाला काहीच अर्थ राहत नाही त्याला बाटुक म्हटले जाते तसेच शेतकऱ्याचे जीवन बाटुकासमान झाले आहे. म्हणूनच कवी आपल्या कवितेते लिहितो की –
बाप कष्टकरी माझा,
त्याचं उंच उंच मन.
सारा अन्याय सोसून,
झालं बाटुकाचं जिणं

झालं बाटुकाचं जिणं या कवितासंग्रहाच्या मुखपृष्टावरील चित्रातून जगाच्या पोशिंद्याची वास्तव परिस्थिती मांडली आहे. काळ्या मातीत कोरड्या पडलेल्या विहिरीला लावलेला गळफास शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्त्याचे प्रतिक आहे तर विहिरीच्या काठावर ज्वारीच्या कणसाजवळ उघड्या अंगाने बसलेल्या जगाच्या पोशिंद्याची हतबलता अभिप्रेत होते.

कवी आकाश भोरडे यांच्या झालं बाटुकाचं जिणं या कवितासंग्रहातून सामाजिक आशयाची मांडणी केली आहे, परिस्थितीने गांजलेल्या समाजाचे वास्तव चित्रण आपल्या कवितेतून कवीने मांडले आहे. जगाचा पोशिंदा जगासाठी अन्नधान्य तयार करतो, त्याचवेळी जग पंचपक्वान्न तयार करून खात असतांना जगाचा पोशिंदा मात्र हातावर मिरची भाकर घेऊन खात असतो हे वास्तव मांडताना माझा बाप शेतकरी या कवितेत कवी म्हणतात की –
माझा बाप शेतकरी, कष्ट करीतो मातीत .
पंचपक्वान्न नसे पोटी, मिरची भाकर हातात.

हल्ली जागतिकीकरणामुळे सर्वच क्षेत्रात अमुलाग्र बदल होत चालले आहे, जसे चांगले बदल होत आहेत तसे वाईट देखील बदल होत आहेत, माणसाच्या आयुर्मानात बदल होऊन वयाची शंभरी गाठणारा माणूस आता पन्नाशी पार करू शकत नाही. हातात स्मार्ट फोन आल्यामुळे बालपणातच मुले मैदानी खेळ, सूरपारंब्यासारखे खेळ विसरत चालले आहे काळाच्या ओघात सर्वच बदलत चालले आहे. जसे अद्ययावत तंत्रज्ञान प्रगत झाले तसे माणूस आपले माणूसपण विसरत चालला आहे म्हणून कवी काळाच्या ओघात या कवितेत मांडतात की –
काळाच्या ओघात
सारं काही बदलत चाललंय,
जागतिकीकरणाच्या दुनियेत,
माणूसपण हरवत चाललंय

झालं बाटुकाचं जिणं या कवितासंग्रहात कवीने एकूण शहात्तर कवितांचा समावेश केला असून सर्वच कविता शेतीमाती आणि सामाजिक आशयाच्या आहेत. माझा बाप शेतकरी, बळीराजाची दौलत, उभा जोंधळा जोंधळा, माझ्या बापाची शाळा, काळाच्या ओघात, धन्य धन्य शेतकरी माझा, बाप रात्रंदिवस राबतो, माझा बाप, बळीराजा, घामाचा गंध यासारख्या कविता शेतकऱ्याच्या वास्तव जीवनातील परवड, आर्थिक, सामाजिक परिस्थितीचे वर्णन करणाऱ्या आहेत. कवी आकाश भोरडे यांचा हा पहिलाच कवितासंग्रह असल्याने त्यांच्या कवितांमधून नवखेपणाच्या पाउलखुणा दिसून येतात. कवितेतील आशय समाजाभिमुख असला तरी कवी एकाच वर्तुळात फेरफटका मारताना दिसून येतात. कवितेच्या मांडणीत आणि कवितेचा आकृतीबंध यात कवींचा नवागतपणा जाणवला.

पाठीत मणक्याचा त्रास असतानाही वेळप्रसंगी मफलरने कंबर बांधून रात्रंदिवस काम करणाऱ्या बापाच्या कष्टाला कवीने ही कलाकृती समर्पित केली असून कवितेच्या माध्यमातून आकाशाला गवसणी घालणारा आकाश अशा शब्दात प्रा. कुंडलिक शांताराम कदम यांनी कवी आकाश भोरडे यांचे कौतुक करून कवीला पुढील लेखनासाठी बळ दिले आहे. पाठ्यपुस्तकातील प्रसिद्ध कवी हनुमंत चांदगुडे यांची लाभलेली प्रस्तावना हे या कलाकृतीचे भाग्य आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ संदीप सांगळे यांनी ब्लर्बच्या माध्यमातून केलेली पाठराखण कवीला आणि वाचकांना प्रेरणा देणारी आहे. प्रसिद्ध मुखपृष्ठचित्रकार अरविंद शेलार यांच्या कल्पकतेने कलाकृतीतील साहित्याशी सांगड घालून साकारलेल्या मुखपृष्ठामुळे कलाकृतीला वेगळी ओळख निर्माण झाली असून पुण्याचे परिस पब्लिकेशन यांनी या कलाकृतीचे प्रकाशन करून ही कलाकृती वाचकांच्या हवाली केली आहे.

पुस्तकाचे नाव – झालं बाटुकाचं जिणं
साहित्य प्रकार – कवितासंग्रह
कवी – आकाश भोरडे, शिरूर, पुणे संपर्क – ९१५६७१५२७५
प्रकाशक परिस पब्लिकेशन, पुणे
किंमत – १८० रुपये
मुखपृष्ठचित्रकार- अरविंद शेलार, कोपरगाव

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

8 hours ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

9 hours ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

17 hours ago

Weather Forecast : १७ ऑगस्टपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…

18 hours ago

फिदेलसोबत १०० वर्षे : अमेरिकन दादागिरीसमोर न झुकलेल्या क्रांतिकारकाची कहाणी

फिदेल कास्त्रो यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अखिल भारतीय किसान सभेकडून अभिवादन नवी दिल्ली :क्यूबाच्या क्रांतीचे कमांडर-इन-चीफ, जननेते…

1 day ago

कोल्हापूरच्या युवा दिग्दर्शकाच्या ‘अनघा’ला जम्मू फिल्म फेस्टिव्हलची पसंती

https://youtu.be/xcTeVoV7ItY कोल्हापूर येथील युवा चित्रकार व दिग्दर्शक स्वप्निल बळवंत पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या “अनघा” या…

2 days ago