‘कव्वा आलासा’, ‘गेलासा’ अशा विपुल शब्दांची उच्चारण घडण या भाषेत आहे. काही प्रदेशनिविष्ट शब्दही इथे सर्रास वापरले जातात. झाडूसाठी ‘साळोता’ नळासाठी ‘चावी’, दळणासाठी ‘दळाप’, वाजंत्रीसाठी ‘वाजाप’ असे प्रदेशविशिष्ट शब्द आढळतात. ‘चर्चा झालं’, ‘अंघोळ केलं’ अशी कानडी प्रदेश भाषा उच्चारप्रभावित रूपे पाहायला मिळतात.

डॉ. रणधीर शिंदे
मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

कोल्हापूरची बोलीभाषा आगळीवेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण. या बोलीला रांगडेपणाचा आणि उधळेपणाचा खास बाज. विशिष्ट भू-प्रदेश, निसर्ग, सीमावर्ती प्रदेश, लोकजीवन आणि कोल्हापुरी लोक संवेदनस्वभाव यामुळे बोलण्याला वेगळे स्वरूप प्राप्त झाले. सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी विभागलेल्या आणि दुसऱ्या बाजूला कन्नड आणि कोकणी प्रदेशाच्या सीमांनी या भाषेला वेगळे रंगरूप प्राप्त झाले. व्याकरण व्यवस्था, शब्दसंग्रह अनेक भेदांमुळे ती स्वतंत्र वेगळी ठरत नाही. मात्र, इथल्या भौगोलिक व सामाजिक ठेवणीमुळे तिला वेगळे अस्तित्व मिळाले. दीर्घकाळ संस्थांनी राजवट आणि निसर्गपोषणावर भरलेल्या संपन्न प्रदेशाने या लोकजीवनाला वेगळे रंग प्राप्त करून दिले. जॉर्ज ग्रिअसर्नच्या १९०५च्या भारतीय भाषा सर्वेक्षणात कोल्हापुरी बोलीचा इंडो-आर्यन कुळातील भाषा म्हणून निर्देश आहे.

कोल्हापुरातील संस्थानी राजवटीचा लोकव्यवहारावर मोठा ठसा आहे. बौद्ध, कदंब, शिलाहार ते मुसलमान राजवटीशी या प्रदेशाचा संबंध आला. इनामदार, जहागीरदार, शेतकरी, कुणबी, अलुतेदार, बलुतेदार व डोंगराळ प्रदेशातील लोकसमूहांनी या प्रदेशाला आकारित केले. भू-प्रदेश, निसर्ग, लोकजीवन आहारसंस्कृती यांनी या भाषेला वैशिष्ट्यपूर्णता प्राप्त करून दिली. भौगोलिक विविधतेमुळे भाषेने कमालीची विविधता धारण केली.

कोल्हापूरच्या भाषेचे आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणजे येथील स्त्रियांची भाषा. व्याकरणव्यवस्थेत लिंग वचनाबद्दलचा मोठा फरक स्त्रियांच्या भाषेत आहे. ‘येतो’, ‘जातो’, ‘करतो’, ‘आलो’ अशा पुरुषवाचक क्रियापदांत मुली व स्त्रिया बोलतात. एकाचवेळी भरड, रांगडी पुरुषवाचक बोलीरूपाच्या पुनरावृत्तीने त्यास सामाजिक, सांस्कृतिक वेगळेपण प्राप्त झाले. उच्चारणाच्या वेगळ्या धाटणीमुळे त्यास एक भावपरिणामकारकता प्राप्त झाली. मात्र, या ध्वनी उच्चारात माधुर्यभावाचे प्रसारण करणाऱ्या शब्दांची विपुल उपस्थिती असते. ‘काय मर्दिनी’ असा उच्चार केवळ या परिसरातच स्त्रियांच्या तोंडी ऐकायला मिळतो. तसेच ‘बलिवलंय’ (बोलावले आहे) अशा लोभस मृदस्वरव्यंजनाचीही साथ असते. सकृतदर्शनी स्त्रियांची उच्चाररूपे भरड, थेट वाटावीत अशी असतात. मात्र, या उच्चारणपरिणामात आत्मीय गोडवा असतो. ‘कवा आलासा’, ‘येतायसा’, ‘जातायसा’, ‘गेलासा’ अशा अकारान्त प्रत्ययाचा स्वाभाविक गोडवा या भाषेत टिकून आहे.

शेतीसंस्कृती व लोकजीवनाने काही वेगळे शब्द घडविले आहेत. भात, काजू व ऊस शेतीने अशा शब्दांची सुरुवात केली. डोंगराळ, अतिदुर्गम भागातील विरळ मानवी समूहानेही नव्या शब्दांची व उच्चारण लकबीची भर टाकली. ‘इरलं’, ‘टोकणं,’ ‘तरवा’, ‘बेजमी’, ‘हुरदं’, ‘झोमडं’ असे शब्द त्यामुळेच आढळतात. चंदगड, आजरा, गगनबावडा, गडहिंग्लज, पन्हाळा, शाहूवाडी या प्रदेशातील लोकभाषेच्या व्याकरण, शब्दसंग्रह आणि सुरावटीत कमालीची विविधता दिसते. या भाषेत प्रेमवजा आज्ञाही असते. ‘यायला लागतंय, नाही म्हणायचं न्हाय’, ‘यंदा द्यायचा दणका काढून’ अशी रूपेही दिसतात. नामाच्या विशिष्टतादर्शक सुलभ उच्चारणातून प्रेमभावाचे प्रसारण करण्याची लकब भाषेत आहे. उदा. ‘दसुदा’, ‘वसुदा’, ‘शामादा’, ‘अण्णादा’ ‘दा’ उत्तरप्रत्यय लावून शब्दांचे सुलभीकृत पॅटर्न्स तयार करणे हा एक या समूहबोलीचा विशेष आहे. उच्चारणातले दीर्घत्व काढून टाकून प्रसंगी मध्य स्वरव्यंजनाचा लय करून शब्द तयार करण्याची वृत्ती या भाषेत आहे. ‘शंक्रोबा’, ‘भैरोबा’ असे न म्हणता ‘भैरी’, पोह्यासाठी ‘फव्वं’, ‘मधघर’ अशी उच्चारणरूपे तीमध्ये आहेत.

कोल्हापुरी बोलण्यावर प्रचलित भाषिकांना अनेक धक्के बसतात. ‘शिस्तात’ हा शब्दवापरही याच प्रकारचा, तसेच नववधू-वरांचे कपडे खरेदीसाठी ‘मुलाचे कपडे काढायचे आहेत’, तर ‘रांडेच्या’ या शब्दाचा वापर इतका विपरीत व बहुअर्थप्रसवी केवळ कोल्हापुरात वापरला जात असावा. नकार, तिरस्कार, जवळीकता, निकटता व आत्मीय द्योतकतेचा अर्थ या शब्दांतून व्यक्त केला जातो. एवढेच नव्हे तर मुस्लिम मराठीत ‘रांडेकू’ असाही उच्चार होतो. व्याकरणिक विशेषात या भाषेत नपुसंकलिंगी भाषारूपांचा वापर होतो. ‘कुठं गेलं रं ते’, ‘हे आमचं’, ‘तुमचं’ इ. तसेच शब्दांचा अनेकवचनी वापरही विपरितपणे केला जातो. ‘चैन’चे चैनी, ‘भूक’चे भुका, असे.

‘कव्वा आलासा’, ‘गेलासा’ अशा विपुल शब्दांची उच्चारण घडण या भाषेत आहे. काही प्रदेशनिविष्ट शब्दही इथे सर्रास वापरले जातात. झाडूसाठी ‘साळोता’ नळासाठी ‘चावी’, दळणासाठी ‘दळाप’, वाजंत्रीसाठी ‘वाजाप’ असे प्रदेशविशिष्ट शब्द आढळतात. ‘चर्चा झालं’, ‘अंघोळ केलं’ अशी कानडी प्रदेश भाषा उच्चारप्रभावित रूपे पाहायला मिळतात. ‘परपंच्या’, ‘बजार’, ‘उंडग्यानू’, ‘कावबारणे’, ‘खांडूक’, ‘माही’, ‘गदबाळलं’, ‘हुबाल्या’, ‘हेमलं’, ‘कडू बेणं’, असे शब्दही आढळतात. कानडी प्रभावाचे द्योतक म्हणून ग्रामनामे व व्यक्तिनामेही विपुल आढळतात. जुन्या काळात गडहिंग्लजचा या शब्दाचे रूप ‘गडइंग्लज’ किंवा ‘हिंग्लज’ असे होते, तर हातकणंगलेचे ‘हातकलंगडा’. ‘आगा कुठं चाललाय गा’, ‘तंबाखू धर गा जरा’, ‘जाशील बस की’, ‘आगा बस गा’ अशी दीर्घ उच्चाररूपे या भाषेत आहेत. या साऱ्या भाषिक लकबांकडे पाहिले की, येथील सामूहिक जाणिवेत निवांतपणा, अघळपणाला विशेष महत्त्व असल्याचे ध्यानात येते. सामाजिक परिस्थितीतून काही क्षेत्रविशिष्ट शब्द तयार केले आहे. ते आता सार्वत्रिक अंगवळणी पडले आहेत. ‘वडाप’ असा एक नवाच शब्द रिक्षासंस्कृतीने व वृत्तपत्रसृष्टीने घडविला. ‘वढा, डांबा आणि पळवा’ अशा तिहेरी शब्दांतून तो घडविला आहे.

कोल्हापूर परिसरातील तरुणांच्या भाषेचा एक वेगळाच बाज आहे. कट्ट्यावरची भाषा अशी वेगळी परिभाषा येथे अस्तित्वात आहे. ग्राम्य वाटाव्या अशा शब्दांचे सुलभीकृत संदेशन हेही कोल्हापुरी भाषेचे वेगळे परिमाण आहे. टपोरी, अधिक विन्मुक्त वाटावी अशी ती बोलीरूपे आहेत. ‘काय भावा’, ‘नाद नाही करायचा,’ ‘काटा कीर्रर्र’, ‘खटक्यावर बोट, जाग्यावर पल्टी’ अशी अनेक बेधडक उच्चारणरूपे अवतीभवती भेटत राहतात. एक प्रकारची जीवनातील बेफिकीर वृत्ती व स्वातंत्र्याचा अधिकाधिक उधळमोकळा आविष्कार करणारी शब्दरूपे तरुणांच्या बोलण्यात असतात.

शंकर पाटील, महादेव मोरे, नामदेव व्हटकर यांच्या साहित्यात सीमाभाग व कोल्हापूर परिसराची भाषा आहे. १९८० नंतर मात्र राजन गवस, आनंद पाटील, कृष्णात खोत, किरण गुरव, अशोक पाटील, रफीक सूरज यांच्या लेखनातून या भाषेचा अत्यंत लक्षणीय आणि वेधक आविष्कार झाला. अप्पासाहेब खोत यांनी कथाकथनातून कोल्हापुरी बोली महाराष्ट्रभर पोहोचवली.

एकंदरीत कोल्हापुरी भाषेला, बोलण्याला एक विशिष्टता प्राप्त झाली आहे. भूप्रदेशाची विविधता, लोकजीवन, संस्थानी विरासतीची छाया, कालस्थळ-भू-प्रभाव आणि व्यक्तिभाषा यांनी ती घडलेली आहे. या भाषाविष्कारात मुक्तपणा, रांगडेपणा मोकळेढाकळेपणा, स्वातंत्र्याची अधिकची कांक्षा, अर्थाचा विपरीत वापर आणि लोकसमूहाच्या संथ, निवांत भावजीवनाचा संपृक्त आणि दणकट आविष्कार झाला आहे. हा भाषेचा अस्सल बाज इथल्या माणसाने सर्वप्रकारची बाह्य आव्हाने परतावून लावत जिवा-भावाने सांभाळला आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

Dnyneshwari Tips On Karma : कर्म सोडू नका तर त्यातला अहंकार सोडा अन् चमत्कार पाहा

आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…

31 minutes ago

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

20 hours ago

विरोधकांचा आवाज क्षीण झालायं… की सरकार अधिक बळकट झालंय ? Monsoon session of the legislature

मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…

1 day ago

इतिहास वाचनातूनच संस्कार अन् सुराज्याची जडणघडण : संयोगिताराजे छत्रपती Good State Formed Through Reading History

वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…

2 days ago

अर्पणामागचा भाव : शुद्ध भक्तितत्त्वाचा ज्ञानेश्वरीतील अमृतसंदेश Pure Bhakti from Dnyaneshwari |

हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…

2 days ago

आकाशातील ढग व युद्धाच्या धगीत अडकलेली अर्थव्यवस्था ! an economy caught in the grip of war

विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.…

2 days ago