वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव
छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी वाचनसंस्कृती बळकट करणे ही काळाची गरज असून, इतिहासाचे वाचन आणि चिंतनातूनच सुराज्याचा मार्ग प्रशस्त होईल, असे प्रतिपादन संयोगिताराजे छत्रपती यांनी केले. वाचनकट्ट्यासारख्या संस्था समाजात इतिहास आणि संस्कार रुजविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कोल्हापूर : “राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे शिवभक्त होते. आज देशाला स्वराज्याबरोबरच सुराज्याचीही नितांत गरज आहे. शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी वाचनाच्या माध्यमातून इतिहास रुजविणे आवश्यक आहे. वाचनकट्ट्यासारख्या संस्था हे महत्त्वाचे कार्य करत आहेत. शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांनी सदैव रयतेचा विचार केला. त्यांचे विचार समाजात पुढे नेण्याची जबाबदारी आजच्या युवकांची आहे,” असे प्रतिपादन संयोगिताराजे छत्रपती यांनी केले.
वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित ‘प्रगल्भ वाचक स्पर्धा’ पारितोषिक वितरण समारंभात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमास राज्य कर विभागाचे सहआयुक्त संजय पवार, शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. नंदकुमार मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. विनय पाटील होते.
कोल्हापूर येथील श्री प्रिन्स शिवाजी बोर्डिंग हाऊस येथे झालेल्या या कार्यक्रमात कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके, पुस्तके आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
भाषेमधून व्यक्तिमत्त्वाची जडणघडण
प्रा. डॉ. नंदकुमार मोरे म्हणाले, “‘असे होते आपले शाहू महाराज’ या पुस्तकावर आधारित आयोजित प्रगल्भ वाचक स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. भाषेमधून व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होत असते. शाहू महाराजांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे मोठे आव्हान वाचनकट्ट्याने समर्थपणे पेलले आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारे शाहू महाराजांचे समाजजीवनातील योगदान या उपक्रमातून प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आहे.”
वाचनकट्ट्याचे उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण
सहआयुक्त संजय पवार म्हणाले, “वाचन संस्कृती बळकट करण्यासाठी आणि शाहू महाराजांचे विचार जनमानसात रुजविण्यासाठी वाचनकट्ट्याचे उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. शाहूंच्या विचारांच्या आधारे विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाची दिशा निश्चित करावी.”
अध्यक्षीय समारोपात प्रा. विनय पाटील म्हणाले, “शाहू महाराजांचे विचार केवळ वाचण्यापुरते मर्यादित न ठेवता ते आचरणात आणणे ही काळाची गरज आहे. वाचनकट्ट्याने समाजासमोर विचारांची समृद्ध खाण उपलब्ध करून दिली आहे.”
प्रास्ताविक युवराज कदम यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पुस्तके व सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली. यावेळी नगरसेवक उमेश पवार, सामाजिक कार्यकर्ते, सतीश पवार, प्रा. संभाजी सावंत, नितीन शिंदे, दिपक परिट, सुनील मोरे, प्रकाश देसाई, प्रा. डॉ. सुनील देसाई, धनश्री पवार, वनिता कदम, डॉ. लीलावती पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन संजीवनी कदम यांनी केले, तर प्राचार्य डॉ. रेखा निर्मळे यांनी आभार मानले.
