महाराष्ट्र : हवामान बदलाला तोंड देऊ शकेल अशा तळागाळातील आदर्श प्रारूपाचा प्रणेता
मुंबई – जलसुरक्षा, ऊर्जा संक्रमण आणि सामूहिक सहभाग या एकात्मिक दृष्टिकोनातून महाराष्ट्र हवामान बदलाशी सुसंगत विकास साध्य करणारे एक आघाडीचे राज्य म्हणून महाराष्ट्र ओळखले जाते. राज्यातील सुमारे 90 % ग्रामीण लोकसंख्या भूजलावर अवलंबून असून हा भाग बहुतांशी कठीण खडकाळ किंवा पर्जन्यछायेचा आहे. त्यामुळे हवामान बदलाशी सुसंगत कृतीची अत्यंत गरजेची आहे.
पर्यावरण विषयक जनजागृती आणि संवाद अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने, पत्र सूचना कार्यालय (PIB) आणि युनिसेफ यांच्यावतीने मुंबईत माध्यमांशी चर्चा करण्यात आली. या चर्चेत सामूहिक हवामान बदल प्रयत्न, युवकांचा सहभाग आणि शाश्वत जल-ऊर्जा प्रारूपांचा महाराष्ट्रात वापर करण्यावर भर देण्यात आला.
पर्यावरणीय साक्षरतेच्या महत्त्वाविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात माध्यमे बजावत असलेल्या सकारात्मक भूमिकेचे पत्र सूचना कार्यालयाच्या (पश्चिम विभाग) महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांनी कौतुक केले. प्रसारमाध्यमे नागरिकांमध्ये केवळ जागरूकता निर्माण करत नाहीत तर पर्यावरण विषयक प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधतात. यामुळे माहितीपूर्ण निर्णय घ्यायला आणि नागरिकांच्या सहभागाला पाठिंबा मिळतो, असे त्या म्हणाल्या.
भारत सरकारच्या लाईफ अर्थात पर्यावरणाशी अनुकूल जीवनशैली या मोहिमेचा एक भाग म्हणून सामूहिक सहभागातून आणि शाश्वत पद्धती अनुसरून जलसंवर्धनाला सक्रिय प्रोत्साहन दिले जात आहे. अमृत सरोवर मोहिमेसारख्या अभियानांमधून ग्रामीण भारतातील सुमारे 68,000 पेक्षा अधिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन झाले आहे. त्यामुळे भूजल पातळी आणि पृष्ठभागावरील पाण्याची उपलब्धता लक्षणीयरीत्या सुधारली आहे. शाळाशाळांमध्ये सुरु करण्यात आलेले इको क्लब विद्यार्थ्यांना पाणी बचतीसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून लहान वयातच जबाबदारीची जाणीव करून देत आहेत.
हवामान बदलावरील राज्य कृती आराखड्यामध्ये (SAPCC) कृषी, जल, आरोग्य आणि परिसंस्थांशी निगडित आव्हानांना तोंड देण्यासाठी एक स्पष्ट पथदर्शी प्रस्ताव निश्चित करण्यात आला आहे. यावर आधारित असलेल्या, माझी वसुंधरा अभियानाने 27,000 हून अधिक गावे, 400 शहरी स्थानिक संस्था आणि 500 महाविद्यालयांना ऊर्जा, जल, शुद्ध हवा, कचरा आणि जैवविविधता या घटकांचा समावेश असलेला पाच-कलमी अजेंड्यात सहभागी करून घेतले आहे.
यामध्ये मुख्य कल्पना म्हणजे युनिसेफ आणि भागीदारांनी समर्थन दिलेली हवामान बदलाला तोंड देऊन शकेल अशी जल-ऊर्जा प्रणाली स्थापन करण्याचा उपक्रम. दुष्काळ प्रवण जिल्ह्यांमध्ये सौर उर्जेवर चालणाऱ्या जलयोजनांमुळे ऊर्जा निर्मितीच्या खर्चात 80 % इतकी घट होते आणि पाण्याची विश्वासार्हता सुधारू शकते, असे पुराव्यांनिशी सिद्ध झाले आहे. ग्रामीण भागातील समुदाय आता भूजलावर अवलंबून राहण्याऐवजी पृष्ठभागावर उपलब्ध असणाऱ्या पाण्याचा योग्य वापर करत आहे. पाण्याची कमतरता असण्याच्या काळातील टंचाई अधिक शाश्वतपणे भरून काढत आहे.
युवाशक्तीचा सहभाग आणि जल व्यवस्थापन कार्यक्रमाने 13 जिल्ह्यांमधील 10 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना एकत्र आणले आहे, वॉश ऑडिट, प्लास्टिकमुक्त मोहीम आणि हवामान विषयक मोहिमा – हवामान बदल कॅम्पस प्रयोगशाळेची स्थापना आणि चक्राकार अर्थव्यवस्थेला चालना देऊन या उपक्रमाची व्याप्ती 8 दशलक्षांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचली आहे. जागतिक पातळीवर नोव्हेंबर महिन्यात ब्राझीलमधील बेलेम येथे होणाऱ्या कॉप 30 परिषदेसाठी तयारी सुरू असून महाराष्ट्रही त्यात सहभागी होणार आहे. त्यासाठी राज्यात जलस्रोत नियोजन, कार्बनचे कमीत कमी उत्सर्जन व्हावे यासाठी तरुणांच्या नेतृत्वाखालील नवोपक्रम आणि स्वच्छ आणि हरित सार्वजनिक संस्थांमध्ये एकरूपता या विषयांवर काम सुरू आहे.
माझी वसुंधरा अभियान हे देशातील सर्वात समग्र आणि एकात्मिक पर्यावरणीय उपक्रमांपैकी एक असून स्थानिक प्रशासनाच्या केंद्रस्थानी हवामान बदल अनुकूलन आणि त्यावरील उपाय यासंदर्भातील धोरणांचा त्यात अंतर्भाव आहे, असे माझी वसुंधरा अभियानाचे मिशन डायरेक्टर सुधाकर बोबडे यांनी सांगितले.
जिल्हा आणि शहर हवामान बदल कृती कक्षाच्या स्थापनेमुळे पुराव्यांवर आधारित नियोजन, आंतर विभागीय समन्वय आणि लोकसहभाग यांना बळ मिळेल, असे राज्य हवामान कृती कक्षाचे संचालक अभिजित घोरपडे म्हणाले. अक्षय उर्जेला चालना देणे आणि ऊर्जा कार्यक्षमता वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने नैसर्गिक उपाययोजनांना प्रेरणा तसेच शाश्वत शेतीला चालना देण्यासाठीचे उपाय हे कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आखण्यात आले आहेत, असे ते म्हणाले.
स्थानिक संस्थांना सक्षम करुन आणि युवा समुदायाला या कार्यात सहभागी करुन आम्ही केवळ आजच्यासाठी जलसंवर्धन करत नाही तर भविष्यासाठी हवामानस्नेही तरुण नेतृत्व घडवत आहोत, असे युनिसेफ मुंबईचे वॉश आणि हवामान तज्ञ युसूफ कबीर यांनी सांगितले.
प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी म्हणाले “हवामान बदल आव्हानाला तोंड देण्यासाठी आणि स्थानिक उपायांसाठी दक्षिणेकडील राष्ट्रांमध्ये सहकार्य असणे आवश्यक आहे.”महाराष्ट्राला आणि त्या अनुषंगाने भारताला हवामान बदल अनुकूलन आणि शमन पद्धतींच्या जागतिक स्तरावर आणण्यासाठी विशेषतः स्थानिक उपाययोजनांच्या माध्यमातून प्रोजेक्ट मुंबई अंतर्गत उपाय या विषयी त्यांनी माहिती दिली.
युनिसेफ बरोबरच्या आपल्या सहयोगाच्या माध्यमातून पत्र सूचना कार्यालय माध्यमांना तळागाळातील स्तरावर हवामानबदल बदल कृती यशोगाथेला पाठिंबा देण्यासाठी सक्षम करत आहे, असे पीआयबी मुंबईचे संचालक सय्यद रबीहश्मी यांनी समारोप सत्रात सांगितले. पाणी, ऊर्जा आणि समुदाय आधारित कृतींना एका धाग्यात जोडून कशाप्रकारे माहितीपूर्ण कथाकथन राज्यांच्या सीमारेषा ओलांडून परिवर्तनाला प्रेरणा देते हे महाराष्ट्राने दाखवून दिले आहे, असे ते म्हणाले.
महाराष्ट्र हवामान बदलाच्या अजेंड्याला अधिक तीव्र करत असताना हवामान बदल कृतींना आवश्यक वित्तपुरवठ्याचे विकेंद्रीकरण आणि स्थानिक पातळीवरील निसर्ग-आधारित उपायांना मान्यता देण्याची राज्याची मागणी आहे.
अधिक माहितीसाठी किंवा मुलाखतींच्या आयोजनासाठी, यांच्याशी संपर्क साधावा.
स्वाती मोहापात्रा, संवाद तज्ञ,
युनिसेफ महाराष्ट्र
smohapatra@unicef.org
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
