आता सगळीकडे मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढण्यास मदत होईल. आता प्रश्न हा आहे की रब्बी हंगामात कोणते पिक घ्यायचे ? मका, ज्वारी, गहु, हरभरा, करडई, सूर्यफूल, राजमा असे अनेक पीक रब्बी मध्ये चांगले घेता येतात, परंतु ह्या पिकांच्या जोडीला अजुन एक पीक आपल्याला घेता येईल ते पिक म्हणजे तिळ.
डॉ. एस. डी. राजपूत ( तीळ पैदासकार)
तेलबिया संशोधन केंद्र, म. फु. कृ. वि., जळगाव-४२५ ००१
संपर्क क्रमांक: ९४०५१३८२६९.
अमेरिकेसोबत चालू असलेल्या व्यापारयुद्धामुळे जागतिक व्यापारामध्ये अनिश्चितता आहे. अमेरिकेने लादलेले ५० टक्के शुल्क भारतीय निर्यातीसाठी आव्हान निर्माण करत असताना, भारताने आयात अवलंबित्व कमी करून देशांतर्गत उत्पादन वाढवण्यावर भर दिला आहे. यामुळेच भारतावर जागतिक अन्नधान्य बाजारातील धक्क्यांचा, फारसा परिणाम होताना दिसून येत नाही आणि भविष्यात पण कृषी क्षेत्र बाधित होणार नाही अशी एकंदरीत स्थिती राहील. नीती आयोगाच्या अहवालानुसार भारताने डाळींच्या उत्पादनात जगात अग्रस्थान मिळवले असून, ही बाब वाढत्या लोकसंख्येच्या तसेच अमेरिकेशी सुरू असलेल्या व्यापारयुद्धाच्या पार्श्वभूमीवर अधिक महत्त्वाची ठरली आहे. डाळींचे दरडोई सेवन सातत्याने वाढत आहे. प्रथिनांची मोठी गरज भागवणारा हा मुख्य स्रोत असल्याने, डाळींचे उत्पादन व उपलब्धता ही अन्नसुरक्षेच्या दृष्टीने कळीची बाब आहे. २०३० सालापर्यंत डाळींच्या उत्पादनात स्वयंपूर्णता मिळवणे आणि २०४७ सालापर्यंत त्याचे दुप्पट उत्पादन करणे हे उद्दिष्टे निश्चित करण्यात आलेली आहेत.
भारत हा जगातील सर्वांत मोठा डाळ उत्पादक आणि सर्वांत मोठा उपभोक्ता देश म्हणून उदयास आला आहे. भारतात डाळींचा वापर दिवसागणिक वाढत आहे, भारतात दरडोई डाळ वापर सरासरी २२ ते २४ किलो प्रतिवर्ष आहे ती भविष्यात ३० किलो जाईल. २०२२- २३मध्ये दरडोई वापर १७.१९ किलो/वर्ष होता, जो आयसीएमआर ने सुचवलेल्या १४ टक्के दैनिक ऊर्जेच्या पातळीपेक्षा कमी आहे. जागतिक डाळ उत्पादनात भारताचा वाटा सुमारे २५ टक्के आहे, तर जागतिक उपभोगात ३० टक्के. २०२२-२३ साली भारताने सुमारे २८ दशलक्ष टन डाळींचे उत्पादन घेतले. यामध्ये हरभरा (चणा) हा सर्वांत मोठा हिस्सा घेऊन आघाडीवर आहे. राज्यनिहाय आकडेवारी पाहता मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश ही प्रमुख राज्ये आहेत. केवळ मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोघांनी मिळून देशातील सुमारे ४० टक्के उत्पादन घेतले. विशेषतः महाराष्ट्राने तूरडाळ व हरभऱ्यात महत्त्वपूर्ण वाढ नोंदवली आहे. ह्यात महत्वाचा वाटा महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांनी शोधलेल्या नवीन अधिक उत्पन्न देणारे वाण यांना द्यावा लागेल कारण शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीस संशोधित नवीन वाण कारणीभूत आहेत.
२०२५ मध्ये संपलेल्या खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावुन नेला. सोयाबीन, मुग, उडीद, तिळ इत्यादी पिकांना ह्या बदलत्या हवामानाचा जास्त प्रमाणात फटका बसला आहे. सोयाबीन पिकवणारा शेतकरी हवालदिल झाला कारण ह्या वर्षी सोयाबीन पिकावर आलेला पिवळा विषाणु नावाचा रोग त्यामुळे ५० टक्क्यांपेक्षा जास्त अपेक्षित न मिळालेले उत्पादन आणि त्यातल्या त्यात बाजारात नसलेला उठाव, पडलेले भाव याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
आता सगळीकडे मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढण्यास मदत होईल. आता प्रश्न हा आहे की रब्बी हंगामात कोणते पिक घ्यायचे ? मका, ज्वारी, गहु, हरभरा, करडई, सूर्यफूल, राजमा असे अनेक पीक रब्बी मध्ये चांगले घेता येतात, परंतु ह्या पिकांच्या जोडीला अजुन एक पीक आपल्याला घेता येईल ते पिक म्हणजे तिळ. तिळ एक हमखास उत्पादन देणारे तेलबिया पीक. ज्या पिकाला मागील पाच वर्षांपासून मिळत आहे हमी भावा पेक्षा जास्त दर. कमी कालावधीत, कोणताही जास्तीचा खर्च न करता घेता येणारे शाश्वत पीक.
हरभरा पिकाचे मोहरी, करडई, ज्वारी, ऊस या पिकांबरोबर आंतरपीक घेता येते. हरभऱ्याच्या दोन ओळी आणि मोहरी अथवा करडईची एक ओळ याप्रमाणे आंतरपीक घ्यावे. हरभऱ्याच्या सहा ओळी आणि रब्बी ज्वारीच्या दोन ओळी याप्रमाणे आंतरपीक फायदेशीर आहे. उसामध्ये सरीच्या दोन्ही बाजूस किंवा वरंब्याच्या टोकावर १० सें.मी. अंतरावर हरभऱ्याची एक ओळ टोकण केल्यास हरभऱ्याचे अतिशय चांगले उत्पादन मिळते. त्याबरोबरच हरभऱ्याचा बेवड उसाला उपयुक्त ठरून उसाच्या उत्पादनात वाढ होते.
तिळ: हरभरा आंतर पिक: हरभऱ्याच्या दोन ओळी आणि तिळ पिकाची एक ओळ याप्रमाणे आंतरपीक घ्यावे.
तिळ: हरभरा पीक उत्पादन वाढीसाठी ठळक मुद्दे:
तिळ, हरभरा पिकाचे भरघोस उत्पादन घ्यायचे असेल तर प्रामुख्याने खालील बाबींचे अवलंबन करणे गरजेचे आहे.
*अधिक उत्पादन देणाऱ्या आणि रोग प्रतिकारक्षम वाणांचा वापर
- योग्य जमिनीची निवड आणि पूर्वमशागत
- वेळेवर पेरणी आणि पेरणीचे योग्य अंतर
- बिजप्रक्रिया आणि जिवाणू संवर्धनाचा वापर
- तणनियंत्रण
- पाण्याचे योग्य नियोजन
- रोग आणि किडींपासून पिकाचे संरक्षण
जमीन व हवामान :
हरभरा आणि तिळ पिकास मध्यम ते भारी (४५ ते ६० सें.मी. खोल) पाण्याचा उत्तम निचरा होणारी, कसदार, भुसभुशीत जमीन आवश्यक असते. वार्षिक ७०० ते १००० मि.मी. पर्जन्यमान असणा-या भागात मध्यम ते भारी जमिनीत रब्बी हंगामात भरपूर ओलावा टिकून राहतो.अशा जमिनीत जिरायत हरभ-याचे पीक चांगले येते. उथळ, मध्यम जमिनीत देखील हरभरा आणि तिळ पिक घेता येतात. परंतु त्यासाठी सिंचन व्यवस्था आवश्यक असते. हलकी चोपण अथवा पाणथळ, क्षारयुक्त जमीन ह्या पिकांसाठी लागवडीसाठी वापरू नये. हरभ-यास थंड व कोरडे हवामान, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि पुरेसा ओलावा आवश्यक असतो व असे वातावरण पिकास चांगले मानवते.विशेषत: पीक २o दिवसांचे झाल्यानंतर किमान तापमान सर्वसाधारणत: १o अंश ते १५ अंश सें.ग्रे. आणि कमाल तापमान २५ अंश ते ३० अंश सें.ग्रे. असेल असे तापमान महाराष्ट्रात नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात असते. साधारणत: ५.५ ते ८.६ सामू असणा-या जमिनीत हरभरा पीक चांगले येते.
पूर्वमशागत:
तिळ आणि हरभरा यांची मुळे खोल जात असल्याने जमीन भुसभुशीत असणे आवश्यक असते. खरीप पीक निघाल्याबरोबर जमिनीची खोल (२५ सें.मी.) नांगरट करावी आणि त्यानंतर कुळवाच्या दोन पाळया द्याव्यात. कुळवाच्या पाळ्या दिल्यानंतर काडीकचरा वेचून जमीन स्वच्छ करावी व सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस पेरणीसाठी शेत तयार ठेवावे. पेरणी पूर्वी ८ दिवस स्प्रिंकलरणे जमीन ओलावून घ्यावी. चार दिवसांनी ४५ से मी वर खत पेरून घ्यावे. खरिपात शेणखत किंवा कंपोस्ट दिले नसल्यास हेक्टरी ५ टन कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट नांगरणीपूर्वी जमिनीवर पसरावे.
तिळाचे बियाणे बारीक असते तसेच तिळाच्या झाडाची सुरवातीची वाढ फार हळू होते म्हणून जमिनीची पूर्वमशागत चांगली करून पृष्ठभागाचा थर सपाट, घट्ट व मऊ करावा लागतो.
पेरणीची वेळ:
बागायत क्षेत्रात पाणी देण्याची सोय असल्यामुळे हरभ-याची आणि तिळ पिकाची पेरणी २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबरच्या दरम्यान करावी. बागायत क्षेत्रात कमी खोलीवर (५ सें.मी.) हरभरा आणि तिळ पेरणी केली तरी चालते. पेरणीस जास्त उशीर झाल्यास किमान तापमान खूपच कमी होऊन उगवण उशिरा आणि कमी होते. हरभ-याच्या दोन ओळी आणि तिळ पिकाची एक ओळ याप्रमाणे आंतरपीक घ्यावे. पेरणी करताना दोन ओळीतील अंतर ४५ सें.मी. आणि दोन रोपातील अंतर १० सें.मी. राहील अशा पद्धतीने पेरणी करावी म्हणजे प्रतिहेक्टरी अपेक्षित रोपाची संख्या मिळते. तिळ पिकाची पेरणी दोन ओळीतील अंतर ४५ सें.मी. आणि दोन रोपातील अंतर १५ सें.मी. ठेवावे, साधारण ह्या साठी १.० किलो बियाणे हेक्टरी लागेल.
बीजप्रक्रिया आणि जीवाणूसंवर्धन –
बियाण्याची उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेत बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा चोळावे अथवा २ ग्रॅम थायरम २ ग्रॅम कार्बन्डॅझीम एकत्र करून प्रति किलो बियाण्यास चोळावे. यानंतर हरबऱ्याच्या १o किलो बियाण्यास रायझोबियम जिवाणू संवर्धनाचे २५० ग्रॅम वजनाच्या एका पाकिटातील संवर्धन गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे. गुळाचे द्रावण तयार करण्यासाठी एक लिटर पाण्यात १२५ ग्रॅम गूळ घेऊन तो विरघळेपर्यंत पाणी कोमट करावे. बियाणे एक तासभर सावलीत सुकवून लगेच पेरणी करावी. यामुळे हरभ-याच्या मुळावरील ग्रंथीचे प्रमाण वाढून हवेतील नत्र अधिक प्रमाणात शोषून घेऊन पिकास उपलब्ध केला जातो आणि पिकाचे ३ ते ५ टक्के उत्पादन वाढते. साधारण ७० किलो बियाणे/ हेक्टरी लागते परंतु ह्या ठिकाणी ६० किलो बियाणे प्रति हेक्टरी लागेल.
पेरणीची पद्धत आणि बियाणे प्रमाण
हरभऱ्याच्या विविध दाण्यांच्या आकारमानानुसार बियाण्याचे प्रमाण वापरल्याने हेक्टरी रोपाची संख्या अपेक्षित मिळते. सामान्यतः देशी हरभरयाची पेरणी तिफणीने किवा पाभरीने करावी. दोन ओळीतील अंतर ४५ से.मी व दोन रोपातील १० से मी अंतरावर टोकन होईल.
सुधारित वाण: रब्बी हंगामात तिळ घेण्याचा हा नवीन प्रयोग आहे आणि त्यासाठी तिळ पिकाची रब्बी हंगामात येणारे वाण पेरणीसाठी वापरावे. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी यांनी प्रसारित केलेले तिळ पिकाचे वाण टी. एल. टी.१० पेरणीसाठी वापरता येईल. हा वाण पांढरा टपोरा दाणा, मध्यम कालावधीत अधिक उत्पादनक्षम, तेलाचे प्रमाण जास्त, मराठवाडा व लगतच्या विदर्भ विभागातील क्षेत्राकरिता रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी शिफारस.कालावधी (८७-९७ दिवस), ७००-८०० उत्पादन (किलो/हे.).
सुधारित वाणांचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून हरभर्याची लागवड केल्यास सरासरी २५ -३० क्विंटल प्रती हेक्टर मिळते.
हरभरा सुधारित वाण:
विजय: ८५ ते ९० दिवस,उत्पन्न: १४-१५ क्वि/ हे
विशाल: ११० ते ११५ दिवस, सरासरी उत्पन्न : २० क्वि/ हे
दिग्विजय: ९० ते ९५ दिवस,सरासरी उत्पन्न : २५ क्वि/ हे
फुले विक्रम: १०५ ते ११० दिवस, उत्पन्न : १६ -१८ क्वि/ हे
फुले विक्रांत: १०५ ते ११० दिवस, उत्पन्न :३५ -४२क्वि/ हे
फुले विश्वराज: ९५ ते १०५ दिवस, उत्पन्न: २५ ते २८ क्वि/ हे
जाकी ९२१८: १०५ ते ११० दिवस, उत्पन्न :१८-२०क्वि/ हे
साकी ९५९६: १०५ ते ११० दिवस, उत्पन्न १८-२० क्वि/ हे
काबुली वाण,
विराट: ११० ते ११५ दिवस,बागायत : उत्पन्न : १९क्वि/ हे
कृपा: १०५ ते ११० दिवस, प्रायोगिक उत्पन्न :३०-३२क्वि/ हे
पी के वी -२: १०० ते १०५ दिवस,उत्पन्न १२-१५ क्वि/ हे
पी के वी -४: १०० ते ११० दिवस, उत्पन्न १२-१५ क्वि/ हे
पी डी के व्ही कांचन: १०५ ते ११० दिवस, उत्पन्न :३० -३२क्वि/
खते:
प्रती हेक्टरी चांगले कुजलेले ५ टन शेणखत किंवा कंपोस्ट खत शेवटच्या कुळवणीच्या वेळी शेतात पसरावे. पिकाची पेरणी करताना २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ३० किलो पालाश प्रति हेक्टर म्हणजेच १२५ किलो डायअमोनियम फॉस्फेट (डी.ए.पी) अधिक ५० किलो म्युरेट ऑफ पोटेंश अथवा ५० किलो युरिया आणि ३०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट अधिक ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्टरला द्यावे.
आंतरमशागत:
पिकांच्या जोमदार वाढीसाठी शेत सुरवातीपासूनच तणविरहित ठेवणे हे उत्पादन वाढण्याचा दृष्टीने आवश्यक आहे. तण व्यवस्थापनामुळे एकूण उत्पादनात २०.७४ टक्के वाढ होते. पीक २o ते २५ दिवसाचे असताना पहिली कोळपणी आणि ३o ते ३५ दिवसाचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणीनंतर दोन रोपातील तण काढण्यासाठी लगेच खुरपणी करावी. मजुराअभावी खुरपणी करणे शक्य नसल्यास पेरणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असताना (स्टोम्प) पेंडिमिथिलिन या तणनाशकाची २.५ ते ३ लिटर प्रती हेक्टर ५०० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
तीळ पिकामध्ये विरळणी अतिशय महत्वाची असते. पेरणीनंतर ८ ते १० दिवसांनी पहिली विरळणी व १५ ते २० दिवसांनी दुसरी विरळणी करावी. पिकाच्या योग्य वाढीसाठी व अधिक उत्पादन मिळविण्यासाठी हेक्टरी २.२२ लाख रोप संख्या आवश्यक आहे. त्यासाठी पेरणी ४५ से.मी. अंतरावर असल्यास विरळणी ओळीतील दोन रोपातील अंतर १० से.मी. ठेवून करावी.
पाणी व्यवस्थापन:
दोन्ही पिके पाणी देऊन वापश्यावर पेरावी म्हणजे उगवण चांगली होईल.शेताची रानबांधणी करताना दोन साऱ्यातील अंतर कमीतकमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच लांबी जमिनीच्या उतारानुसार कमी ठेवावी, म्हणजे पिकाला प्रमाणशीर पाणी देण्यास सोयीचे होईल. दोन्ही पिकांना गरजे नुसार पाणी द्यावे जसे मध्यम जमिनीत २० ते २५ दिवसांनी पहिले,४५ ते ५० दिवसांनी दुसरे आणि ६५ ते ७० दिवसांनी तिसरे पाणी द्यावे. हरभरा पिकाला सर्वसाधारणपणे २५ से.मी पाणी लागते. प्रत्येकवेळी पाणी प्रमाणशीर (७ ते ८ से.मी )देणे महत्वाचे असते. जास्त पाणी दिले तर पिक उभळन्याचा धोका असतो . स्थानिक परिस्थितीनुसार व जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यांमध्ये अंतर ठेवावे. जमिनीस भेगा पडू देऊ नयेत. जास्त पाणी देऊ नये दिल्यास पाणी शेतात साचून राहते व मुळ कुजव्या रोगाने पिकाचे नुकसान होते.
तिळ पिकाची काढणी:
पिक पक्व झाल्यावर बियाण्यांची गळ होऊन होणारे नुकसान टाळण्यासाठी झाडावरील साधारणपणे ७५ टक्के पाने/ बोंड्या पिवळसर दिसू लागल्यावर पिकाची कापणी करावी. कापणी झाल्यावर पेंढ्या बांधाव्यात. सहा ते आठ पेंढ्यांची खोपडी करून उन्हात चांगली वाळू द्यावी. त्यानंतर पेंढ्या ताडपत्रीवर हाताने/काठीने उलट्या करून झाकाव्यात. बियाणे उफणणी करून स्वच्छ करावे व चांगले वाळवावे. अशा रीतीने सुधारित तंत्र वापरून तीळ लागवड केल्याने तीळीचे आंतरपीक पिक घेतल्यास प्रती हेक्टरी ३ ते ५ क्विंटल उत्पादन मिळवता येईल.
हरभरा पिक काढणी :
हरभरा पिक ११०-१२० दिवसामध्ये तयार होते . पिक ओलसर असताना काढणी करू नये . घाटे कडक वाळल्यानंतर मगच हरभर्याची काढणी करून मळणी करावी . यानंतर धन्यास ६-७ दिवस कडक उन द्यावे . हरभरा कोठीमध्ये साठवून ठेवावा. त्यामध्ये कडू लिंबाचा पाला (५ टक्के) घालावा. त्यामुळे धान्याला कीड लागत नाही.
रब्बी हंगामात तिळ पिकात मुख्यतः खालील रोगांचा प्रादुर्भाव होईल त्या साठी विशेष काळजी घ्यावी लागेल:
- पर्णगुच्छ – हा रोग मायकोप्लाझमा सारख्या विषाणूंमुळे होतो. रोगाचा प्रसार तुडतुडे मार्फत होतो. जोपर्यंत पिक फुलोऱ्यात येत नाही तोपर्यंत या गोराची लक्षणे दिसुन येत नाहीत. पिक फुलोऱ्यात असतांना फुलांचे रुपांतर बारीक पानात होऊन त्याचा गुच्छ तयार होतो.
- भुरी – झाडाच्या पानावर पांढरी भुकटी पसरल्यासारखी दिसते. पाने पिवळसर होऊन गळतात.
रोग नियंत्रणाचे उपाय:
१. पेरणीसाठी रोगाची बाधा न झालेले उत्तम प्रतीचे बियाणे वापरावे व बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी.
२. डायथेन एम-४५, १२५० ग्रँम किंवा कॉपर ऑक्झीक्लोराईड १५०० ग्रँम ५०० लिटर पाण्यात मिसळून प्रती हेक्टरी फवारणी करावी.
३. भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी २० किलो ३०० मेष गंधकाची धुरळणी किंवा विरघळणारे गंधक १२५० ग्रँम ५०० लिटर पाण्यात मिसळून प्रती हेक्टरी फवारणी करावी.
४. रोगग्रस्त झाडे/ झाडांचे भाग तोडून नष्ट करावेत.
कीड:
साधारणपणे किडी व रोगांमुळे पिकाचे २०-३५ टक्के नुकसान होते. तिळ पिकावर प्रामुख्याने पाने गुंडाळणारी/ फळ पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव होतो. तसेच रस शोषण करणाऱ्या तुडतुडे, पांढरी माशी चा प्रादुर्भाव प्रामुख्याने होतो. तीळ पिकावर पाने गुंडाळणारी अळीचा प्रादुर्भाव नियमितपणे दिसुन येतो. या किडीचे पतंग कोवळ्या पानावर अंडी घालतात. अळी पानांची गुंडाळी करून आतील भाग खाते. फुले आल्यानंतर फुलातील भाग खाते व बोंडे लागल्यानंतर छिद्र पाडून आतील भाग खाते. तसेच तीळ या पिकावर तुडतुडे, कोळी व पांढरी माशी या पानांतील रस शोषून घेणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव देखील होतो. त्याशिवाय तुडतुडे, मायकोप्लाझमा सारख्या विषाणूंचा प्रसार करतात.
हरभऱ्यावर केसाळ आळी, मावा, फुलकिडे, मावा या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो परंतु घाटे अळी ही हरभ-यावरील मुख्य कीड आहे. हरभरा पिकाचे घाटे अळी ३०-४० टक्के नुकसान होते. कीड नियंत्रण प्रभावी होण्याकरिता एकाच कीटकनाशकाचा सारखा वापर न करता फवारणीकरिता आलटून-पालटून औषधे वापरावीत.
इये मराठीचिये नगरी
मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
👍 Facebook Page Follow करा
