विश्वाचे आर्त

साधनेची लढाई नेमकी कशासाठी ?

आणि शरीरजात आघवें । हे नाशवंत स्वभावें ।
म्हणोनि तुवां झुंजावें । पंडुकुमरा ।। १३६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय २ रा

ओवीचा अर्थ – आणि शरीर म्हणून जेवढे आहे. तेवढे सगळे स्वभावतः नाशवंत आहे, म्हणून अर्जुना तूं लढावेंस, हे योग्य आहे.

आपली सध्याची सर्व लढाई ही स्वतःच्या शरीरासाठीच सुरू आहे. कितीही पैसा कमविला तरी तो शरीरासाठीच वापरला जातो. पोटापूरते खाऊन आपली गरज भागत नाही. समाधानही वाटत नाही. हाव आपणाला स्वस्थ बसू देत नाही. शरीरामुळे, देहामुळे आपणास ओळख आहे. असाच आपला समज होतो. देहाला मिळालेले नाव हीच आपली ओळख होऊन बसते. स्वतःची खरी ओळख आपण विसरतो. अन् मनामध्ये शरीराविषयी विशेष आकर्षण निर्माण होते. सर्व घडामोडी शरीराभोवतीच सुरू राहातात. पण हे शरीर नाशवंत आहे. ही जाणिवच आपल्या मनामध्ये राहात नाही. उतारवयात शरीर थकल्यानंतर मग विचार चक्र सुरू होते. आपण कोण आहोत याची ओळख करून घेण्याची इच्छा होते. साधनेची लढाई ही स्वतःला ओळखण्यासाठी आहे. स्वतःला जाणून घेऊन जीवन जगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा. असे केल्यास या जगात सुख-शांती नांदेल.

साधनेतून स्वतःची ओळख करून घ्यायची असते अन् स्वतः आत्मज्ञानी व्हायचे असते. जीवन जगताना ही जाणिव सदैव राहावी यासाठी साधना आहे. अनुभुती घेऊन जीवन सुखकर करण्यासाठी साधना आहे. साधना ही यासाठी करायची आहे. साधना करताना ही अनुभुती येत असते पण मन त्यात गुंतत नाही. मन त्यामध्ये रमत नाही. मनाची स्थिरता साधण्यासाठी एकांतस्थळी साधना करावी. मंदिर किंवा एखाद्या मठामध्ये जाऊन साधना करावी. बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो याच जागा साधनेसाठी का ? मन साधनेत रमण्यासाठी या जागा उत्तम आहेत. विशिष्ट अवस्था प्राप्त होण्यासाठी या जागांना महत्त्व आहे. सत्संग हा यासाठीच आहे.

घरात साधना करताना अनेक अडथळे येतात. आपणास काहीही काम नसले, कोणतीही घाई नसली तरीही मनाची स्थिरता साधत नाही. मन सतत इतरत्र भटकत राहाते. त्यातच घरातील अनेक गोष्टींनी आपले मन सतत विचलित होते. असे का होते ? साधनेसाठी वेळ असूनही असे होते. कारण घरातील छोट्या छोट्या गोष्टी, वस्तूही आपले मन विचलित करत असतात. साधनेपूर्वी सकाळी वाचनात आलेल्या वृत्तपत्रातील बातमीने किंवा टिव्ही सुरु असलेल्या एखाद्या घटनेचा परिणाम आपल्यावर होतो अन् साधनेत मन त्याच गोष्टीत गुतूंन राहाते. इतकेच काय घरात पडलेला पसाराही आपले मन विचलित करतो. एखादी जुनी वस्तू साधनेपूर्वी पाहीली असली तर तीच वस्तू साधनेत समोर येते अन् मग मन त्यातच गुंतते. घरातील भांड्याच्या आवाजाने किंवा जेवणाच्या वासानेही मन विचलित होते. कोणती वस्तू आपले मन विचलित करेल हे सांगता येत नाही. वेळ पाहण्यासाठी मोबाईल जवळ ठेवला असला तर आपले लक्ष वारंवार त्याकडे जाते. साधनेत लक्ष न राहाता मोबाईलमध्येच आपले मन गुंतते.

धकाधकीच्या या जीवनात घरात साधना करणे हे एक मोठे आव्हानच आहे. कारण मनाला नियंत्रित ठेवण्यासाठी आपणाला मोठी कसरत करावी लागते. यासाठीच घरात पसारा असणार नाही याची काळजी घ्यावी लागते. आपले मन भरकटेल अशी कोणतीही वस्तू जवळ असू नये याची काळजी घ्यावी लागते. एकंदरीत विचार केला तर एकादृष्टीने साधना आपणास एक चांगले वळण लावते. विशेष म्हणजे आपल्या कामात त्यामुळे एक वेगळेपणा येतो. जागरूकता येते. मन विचलित झाले तरी त्या चिंतनाने यातून एखादी चांगली कल्पनाही सुचते. भेडसावणारे प्रश्न सुटतात. सकारात्मक विचार करण्याची वृत्ती वाढते. सत्संगाचीही सवय लागते.

हळूहळू मनाची एकाग्रता वाढते. मनाला साधनेची गोडी लागते. साधनेची ही लढाई जिंकण्यासाठी मात्र आपणास आपली खरी ओळख करून घ्यावी लागते. शरीर अन् आत्मा वेगळा आहे, याची अनुभुती येण्यासाठी अन् ही अनुभुती नित्य राहाण्यासाठी साधनेत एकाग्रता महत्त्वाची आहे. ही ओळख नित्य राहाणे म्हणजेच आत्मज्ञानी होणे.

राजेंद्र जलादेवी कृष्णराव घोरपडे

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

जागतिक अर्थकारणाच्या नव्या समीकरणांचा वेध घेणारे ‘ब्रिक्स अँड इंडिया’ ‘BRICS & INDIA: PROSPECTS & CHALLENGES

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…

4 hours ago

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

16 hours ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

1 day ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

1 day ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

2 days ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

2 days ago