बालमनाला आनंद देत संस्कारांची पेरणी करणाऱ्या कथा!
बालसाहित्य म्हणजे केवळ बालकांचे मनोरंजन नव्हे, तर त्यांच्या कोवळ्या मनावर वाचन, निसर्ग, माणुसकी, कुटुंब, खेळ आणि सामाजिक जाणिवांचे संस्कार करणारे प्रभावी माध्यम होय. बालमनाचे भावविश्व समजून घेत, त्यांच्या परिचयाच्या जगातील घटना-प्रसंगांना कथारूप देत सहज, ओघवत्या आणि संस्कारक्षम शैलीत लिहिलेला डॉ. नरसिंग कदम यांचा ‘गड्या आपुला गाव बरा’ हा बालकथा संग्रह याच अर्थाने लक्षवेधी ठरतो. अकरा बालकथांच्या माध्यमातून बालवाचकांना आनंद देतानाच त्यांच्या मनात निसर्गप्रेम, कुटुंबीयांविषयी जिव्हाळा, क्रीडाप्रेम, पर्यावरण-जाणीव, संवेदनशीलता आणि माणुसकीची बीजे रुजविणारे हे पुस्तक बालसाहित्यातील एक देखणे आणि आश्वासक योगदान म्हणावे लागेल. डॉ.कैलास दौंड, मु.सोनोशी, पो.कोरडगाव ता.पाथर्डी जि.अहमदनगर पिन 414102 भ्रमणध्वनी 9850608611
सध्या बाल साहित्यामध्ये खूप सकस लेखन होताना दिसते. बालकवितांचा रतीब मोठ्या प्रमाणावर घातला जात असला तरीही सकस गद्य लेखन वाचण्याची बालकांची हौस आनंदाने भागावी, त्यांच्यावर वाचन संस्कार व्हावेत, माणूसपणाचे धडे मिळावेत, निसर्ग संस्कार घडावेत यासाठी काही लेखक बालकांचे अंतरंग जाणून घेऊन बालकथा लिहिताना दिसतात. अशा गद्य लेखनाचे बालवाचकांकडून मोठ्या प्रमाणावर स्वागत होताना देखील दिसते. आता बालकथेच्या प्रांतामध्ये अतिशय देखणा बालकथा संग्रह ‘गड्या आपुला गाव बरा’दाखल झाला आहे. या बालकथा संग्रहाचे कथालेखक आहेत अफाट वाचन असणारे, ग्रंथांचा ,पुस्तकांचा व्रतस्थपणे परिचय करून देणारे प्राध्यापक डॉ.नरसिंग कदम!
‘गड्या आपुला गाव बरा’ या कथासंग्रहामध्ये अकरा बालकथांचा समावेश असून या सर्व कथा बालकांच्या अनुभवी विश्वासी निगडित आहेत. त्यामुळे त्यातील घटना आणि प्रसंग स्वाभाविकपणे घडत आहेत असे वाटते. बालकांच्या वर्तनाची आणि त्यांच्या जगण्याची पुरेपूर ओळख नरसिंग कदम यांना असल्याचे या कथा वाचताना प्रतिबिंबित होते. आवड नावाच्या कथेमध्ये किरण नावाचा मुलगा बिया गोळा करण्याचा छंद जोपासत असतो आणि त्या शाळेच्या अवतीभवती फेकून निसर्ग संवर्धन करताना दिसतो. त्याचे मित्र देखील त्याचे अनुकरण करतात. या प्रसंगाने प्रभावित होऊन शाळेमध्ये किरण आणि त्याच्या मित्राचा सत्कार केला जातो. वरवर दिसायला साधी वाटणारी ही बालकथा निसर्ग संवर्धनाचा अमिट संस्कार सहजपणे देऊन जाते.
पेराल तेच उगवते नावाच्या बाल कथेमध्ये घरामध्ये नेहमी भांडण होणारे कुटुंब आहे, घरामध्ये असणारे आजी आजोबा त्यांच्या नातवांना खेळवतात, जीव लावतात, त्यांना समजून घेतात आणि नेमकी हीच गोष्ट त्या मुलांच्या आई-वडिलांना आवडत नाही. त्यातून भांडणे अधिक वाढतात आणि मग आजी-आजोबांची रवानगी वृद्धाश्रमामध्ये करण्यात येते. मात्र या मुलांनी दिलेल्या प्रतिक्रिया ऐकून त्यांचे आई-वडील भानावर येतात व आजी-आजोबांना पुन्हा परत आणतात असा प्रसंग आहे. कुटुंबामध्ये लहान मुले जशी आई-वडिलांकडून शिकत असतात तसेच ते काही गोष्टी आजी आजोबांकडून देखील शिकत असतात आणि समवयस्काकडून देखील काही गोष्टी शिकत असतात या साध्या प्रक्रियेचे भान अनेक कुटुंबामध्ये नसल्याचे दिसते. अशा पालकांचे व बालकांचे डोळे उघडण्याचे काम ही बालकथा निश्चितच करील.
भूरी म्हैस नावाची बालकथा ग्रामीण जीवनातील शेतकरी कुटुंबामध्ये असणाऱ्या पाळीव प्राण्याचे महत्त्व विविध अंगाने अधोरेखित करते. भाऊंनी हळीच्या बाजारातून आणलेली भुरी म्हैस कुटुंबातील सर्वांनाच लळा लावते, ती दूधही चांगले देते, योगायोगाने तिला वगारीच होतात डोणगा होत नाही त्यामुळे ती आर्थिक दृष्ट्या कुटुंबाला सुबत्ता देते. मात्र दुर्दैवाने ती पान लागून म्हणजे सर्पदंश होऊन मरते, या शोकांत बालकथेमुळे बालवाचकांना हुरहुर लागून जाईल. भावनिक विकासासाठी अशा गोष्टी देखील बालकांच्या वाचनात यायला हव्यात, त्यामुळे संवेदनशीलता वाढते, पर दुःखाची जाणीव होते, मनामध्ये माणूसपणाचा भाग वाढतो.
‘गड्या आपुला गाव बरा’ या बालकथेमध्ये एका सुंदर गावाचे चित्र लेखकाने खुबीने उभे केलेले आहे, आपला गाव अगदी गोष्टीतल्या इतका सुंदर नसला तरी तो तितका सुंदर व्हावा असे प्रत्येक वाचकाला ही बालकथा वाचून नक्कीच वाटेल. तर पर्यावरणपूरक पंचमी या बालकथेमध्ये सलीम आत्तार सर विद्यार्थ्यांना नैसर्गिक घटकापासून रंग निर्मितीची माहिती देतात व मुले तशी कृती करून आनंद साजरा करतात.यातून शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाची विक्री व्हावी. शेतकऱ्याला आर्थिक हातभार लाभावा आणि शेतकऱ्या बद्दल आदर भाव निर्माण व्हावा अशा प्रकारचे विचार मांडले.
आज सर्वत्र मोबाईलच्या दुष्परिणामाविषयी आणि अति वापरा विषयी सर्वत्र आणि सर्वकाळ बोलले जाते मात्र तरीही मोबाईलचा वापर कमी होत नाही या पार्श्वभूमीवर मी मोबाईल बोलतोय ही बालकथा बालवाचकांना बरेच काही सांगून जाईल. मैदानी खेळाचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. या बालकथेतील कथा नायक प्रताप खो खो खेळामध्ये तालुका जिल्हा आणि राज्यस्तरावर विजय मिळवतो, आपला खेळ सांघीक असल्यामुळे तो स्वतः त्याचे श्रेय घेणेदेखील टाळतो. आरोग्य हीच संपत्ती हे सूत्र सांगणारे मुख्याध्यापक विद्यार्थ्यांच्या मनावर खेळाचे महत्त्व बिंबवतात.
छंद प्रेमी ही देखील मुलांच्या लक्ष केंद्रित करण्याची, विविध प्रयोग काळजीपूर्वक करण्याची आणि त्यामध्ये तल्लीन होण्याची महती सांगणारी बालकथा आहे, थांबले की त्याचे डबके बनते म्हणून मी थांबलो नाही हे या कथेतील कथा नायकाचे शब्द बालवाचकांनी सतत ध्यानी ठेवावेत अशा योग्यतेचे आहेत.
क्रीडा हा तर विद्यार्थ्यांचा म्हणजे बालकांचा स्थायीभाव समजला जातो. गावामध्ये डोंबाऱ्याचा खेळ येणार असतो , पाहायला मिळणार नाही म्हणून विद्यार्थी बेचेन असतात मात्र विद्यार्थ्यांचे मन ओळखून त्यांना डोंबाऱ्याचा खेळ बघण्याची संधी देणारे शिक्षक देखील भेटतात, पाहिलेल्या खेळाची घरी कृती करून पाहण्याचा बालकांचा स्वभाव त्यातून कधी कधी होणारी फजिती देखील लेखकाने कसरत या बालकथेत खूप रंजकतेने मांडलेली आहे.
एका शिक्षकामुळे सावरगावात अनेक खेळाडू तयार होतात आणि एक शेतकऱ्याचे गाव खेळाडूचे गाव बनते. या कथेचे नावच खेळाडूचे गाव असे आहे. तर केवळ शाळेमध्ये पाणी वाचवा विषयावर निबंध लिहून समाधान मानण्यापेक्षा जलमित्र कथेतील बालनायक पाणी वाचवा चा संदेश प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे संधी मिळेल तिथे पोहोचवतो.
या सर्वच बालकथा वाचायला सहज, सोपी भाषा शैली आणि परिचयाचा कथेतील परिसर यामुळे बांधवाचकांना या कथा नक्कीच भुरळ पाडतील अशा आहेत. या बाल कथेसाठी शितल शहाणे यांनी छानदार चित्रे काढली आहेत. मुखपृष्ठ तर अधीकच नयनरम्य असे आहे.आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे नामवंत प्रकाशक दत्ता डांगे यांच्या इसाप प्रकाशनाने हा बालकथा संग्रह प्रसिद्ध केलेला आहे.सर्वांनी अवश्य वाचावा असा हा बालकथा संग्रह आहे.
पुस्तकाचे नाव – गड्या आपुला गाव बरा
लेखक – डॉ. नरसिंग कदम
प्रकाशक – इसाप प्रकाशन
