विश्वाचे आर्त

नित्य नव्या अनुभुतीमुळेच नियमित पारायणे

तेथ हरु म्हणे नेणिजे । देवी जैसें कां स्वरूप तुझे ।
तैसें हें नित्य नूतन देखिजे । गीतातत्त्व ।। ७१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १ ला

ओवीचा अर्थ – त्यावर शंकर म्हणाले, हे देवी ज्याप्रमाणे तुझ्या स्वरुपाचा थांग लागत नाही, त्याचप्रमाणे गीतातत्त्वाचा विचार करावयास जावे, तेंव्हा ते रोज नवीनच आहे असे दिसते.

जेवण आपण रोजच करतो. दररोज तेच तेच पदार्थ असतील तर ते खाताना कंटाळा येतो. एकच भाजी रोज खायला नकोशी वाटते. दररोज जेवणात वेगवेगळ्या भाज्या असतील तर जेवणाचा आनंद वाटतो. दररोज काही ना काही तरी नवीन खावे असे वाटते. असा बदलही अंगाला मानवतो. म्हणजेच नित्य बदल असेल तर त्याची गोडी अधिक वाढते. प्रत्येक वेळी नवीन हवे म्हणजे त्यामध्ये रस अधिक वाटतो. तसे गीतेचे तत्त्वज्ञान आहे. ज्ञानेश्वरीही अशीच आहे. गीतेचे श्लोक, ज्ञानेश्वरीतील ओव्या त्याच आहेत. पण दरवेळी वाचनात येणारा अनुभव, होणारा बोध हा वेगळा आहे. यामुळे त्याचे पारायण करताना कंटाळा येत नाही.

दरवेळी काहीतरी वेगळे शिकायला मिळते. नवनवे बोध होत राहतात. वाचनाची गोडी त्याचमुळे वाढत राहाते. सृजनशीलता, नवनिर्मिती होत राहीली तर वाचताना कंटाळा येत नाही. काळ बदलला, वेळ बदलली तरी त्यातील तत्त्वज्ञान तेच आहे. ओव्या, श्लोकही तेच आहेत. काळानुसार त्यात बदल होत नाही उलट नव्या युगातही त्याच ओव्या आपणाला आपलेसे करून टाकतात. कारण त्यात नव्यापणाचा विचार आहे. काळाशी सुसंगत, बदलशी सुसंगत असे ते तत्त्वज्ञान आहे. शास्त्र तेच असते फक्त त्याचा वापर काळानुसार बदलत असतो. ठिबक सिंचन पूर्वीही होते अन् आताही आहे. झाडाच्या मुळाशी पाणी घालावे हे शास्त्र आहे फक्त आता बदलत्या परिस्थितीनुसार त्यात बदल झालेला पाहायला मिळतो. मडक्याची जागा आता पाईपने घेतली आहे. पाईपला छिद्रे पाडून झाडाच्या मुळाशी पाणी घातले जात आहे.

ज्ञानेश्वरी, गीता तत्त्वज्ञान हे संपूर्ण विश्वाला लागू पडते. देश बदलला म्हणून मग त्या ओव्यात किंवा श्लोकात बदल होत नाही. भाषा बदलेल पण श्लोक किंवा ओवी मात्र तीच असेल. फक्त त्यातून होणारा बोध, अनुभुती ही त्या त्या परिस्थितीही सुसंगत असते. त्यामुळे हे तत्त्वज्ञान, हे शास्त्र जगभरात वापरले जाणारे आहे. चालणारे आहे. नित्य नुतन विचारांमुळे यात आवडही कायमस्वरुपी टिकूण राहते. युगानुयुगे हे तत्त्वज्ञान याचमुळे परंपरेने टिकून आहे. हे तत्त्वज्ञान नव्यापिढीसाठीही मार्गदर्शक असे आहे.

रसायनशास्त्रामध्ये रासायनिक प्रक्रियेचे प्रयोग केले जातात. एकाच रासायनिक प्रक्रियेच्या प्रयोगात दरवेळी मिळणारी आकडेवारी ही बदलत राहाते. कारण प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या रसायनाच्या गुणवत्तेचे प्रमाण हे एकच नसते. ते बदलत असल्याने मिळणाऱ्या निकालाची आकडेवारीही बदलत राहते. असेच जीवनाचे आहे. जीवनात रोज तोचतोच पणा नसतो. सूर्य तोच आहे, चंद्र तोच आहे. पण येणारी सकाळ, उजाडणारा दिवस हा वेगळा आहे. नवा बदल घेऊन तो येत असतो. यातील आनंद आपण टिपायला शिकले पाहीजे. नव्या बदलाबरोबर नवा आनंदही मिळत राहतो. तसा बदल आपण आपल्यात केल्यास जीवन नित्य आनंदी राहते.

रोज येणारे वृत्तपत्र त्याच त्याच बातम्या देत असेल तर आपणास ते वाचायला नको वाटते. साहजिकच आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. वाचायलाही नित्य नुतन काहीतरी हवे असते. तसा बदल आपणास अपेक्षित असतो. नव्या लेखमाला, नवी सदरे यासाठीच वृत्तपत्रात नित्य दिली जातात. वाचक त्यामुळे खिळून राहातो. नव्या मांडणीचे प्रयोगही नित्य केले जातात. हे बदल हे त्यासाठीच असतात. नित्यनुतन हवे असते. मग ज्ञानेश्वरी अन् गीतेचे तेच तेच श्लोक, ओव्या वाचताना आपणाला कंटाळा का येत नाही ? पारायणाचा कंटाळा यायला हवा , पण तसे होत नाही. कारण त्या ओव्या, ते श्लोक आपणास नित्यनुतन अनुभुती देत असतात. नवा बोध त्यातून मिळतो म्हणूनच या ग्रंथाची पारायणे नित्य होत राहतात.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

सृष्टी निर्माण झाली कशी? श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेले गूढ काय?

सृष्टीकडे पाहिले की असंख्य रूपे, जीव, शक्ती आणि घडामोडी आपल्याला दिसतात. या विराट पसाऱ्यामागे नेमकी…

11 hours ago

सर्व महामानवांच्या सामर्थ्याची बेरीज म्हणजे भारत: डॉ. श्रीपाल सबनीस

कोल्हापूर : भारत हा कोणत्याही एका महामानवाचा,एका धर्माचा किंवा एका विचारपरंपरेचा नाही. बुद्ध, महावीर, संत…

13 hours ago

अंदाजाची शेती संपणार? ड्रोन, सेन्सर अन् एआय ठरवणार पिकांचे भवितव्य ! Smart Farming with Drone and AI Techique

डिजिटल क्रांती: समृद्ध शेतीचा पाया/ 'स्मार्ट शेती, भरघोस प्रगती' ड्रोनची फवारणी, मोबाईलवर मातीचे रिपोर्ट आणि…

14 hours ago

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कार २०२६ जाहीर

ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे (नाशिक)यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार,संहिता राजन (पुणे)…

17 hours ago

२२ परीक्षा रद्द, दोन हजार नोकऱ्या मात्र धोक्यात!

स्टेटलाइन - झारखंडच्या राजकारणात सध्या सत्तेच्या खुर्चीपेक्षा विद्यार्थ्यांच्या संतापाची ताकद मोठी ठरताना दिसत आहे. रांचीच्या…

1 day ago

३६ हजार बंद उद्योगांचे वास्तव!

विशेष आर्थिक लेख. महाराष्ट्रातील ३६ हजारांहून अधिक कंपन्या गेल्या पाच वर्षांत बंद झाल्याची माहिती संसदेत…

2 days ago