A detailed review of the biography “Hindutva’s Global Messenger – Swami Vivekananda” by Anjali Gokhale, highlighting the life, philosophy, and global influence of Swami Vivekananda.
स्वामीजींचे विचार समजावून देताना लेखिकेने स्वामीजींच्या तोंडची अनेक वाक्ये उद्धृत केली आहेत. कर्मयोग, भक्तियोग, राजयोग आणि ज्ञानयोगाचे स्वामीजींनी केलेले पृथक्करण अत्यंत सोप्या शब्दांत लेखिकेने सांगितले आहे. त्यामुळे स्वामीजींचे विचार नेमके काय होते हे आपल्याला समजून येते.
सुहास रघुनाथ पंडित, सांगली.
स्वामी विवेकानंद म्हणजे भगवी वस्त्रे परिधान करुन शिकागो येथील सर्व धर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करणारे, श्री रामकृष्ण परमहंसांचे शिष्य,ज्यांनी हिंदू धर्म व हिंदुस्थानची ध्वजा जगात फडकवली…..बस्स ! बहुतांश लोकांना स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल एवढेच माहिती आहे. खरे ना ? पण प्रत्यक्षात स्वामीजींचे व्यक्तीमत्व असे होते की ज्याला अष्टपैलू हा शब्दही तोकडा पडेल. कसे होते स्वामीजी नेमके ? त्यांच्या कार्याचा आवाका केवढा होता ? धर्माविषयी त्यांची मते किती स्पष्ट आणि ठाम होती ? अमेरिकेसह युरोपियन राष्ट्रांना त्यांची भुरळ पडावी असे त्यांच्यात काय होते ? वेद आणि विज्ञान यावरील त्यांचे प्रभुत्व, धर्म आणि देशातील दरिद्रीनारायण यांच्याविषयी त्यांची असलेली मते, विचार आणि प्रत्यक्ष आचार यांचा त्यांनी साधलेला मेळ, युवक आणि शिक्षणपद्धती, उपासना आणि धर्माचरण, आत्मोन्नती आणि समाजोन्नती, त्या काळातील भारतीय महिलांची असलेली अवस्था, ……अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असतील तर मिरज येथील अंजली गोखले लिखित ‘ हिंदुत्वाचे विश्वप्रवक्ते …स्वामी विवेकानंद ‘ हे चरित्र एकदा तरी वाचावे.
एका असामान्य व्यक्तीमत्वाचे जीवन आणि कार्य अत्यंत साध्या, सोप्या भाषेत त्यांनी समजावून दिले आहे. स्वामीजींच्या बालपणापासून ते समाधीस्थ होण्याच्या दिवसापर्यंतचा विशाल कालपट त्यांनी अठ्ठावीस प्रकरणांमधून वाचकांसमोर मांडला आहे. स्वामीजींचे बालपण, तारुण्याच्या उंबरठ्यावरील कॉलेज जीवनातील प्रवेश, त्यानंतर श्री रामकृष्ण परमहंस यांची होणारी भेट, या भेटीनंतर पुन्हा पुन्हा भेट घेण्याची लागलेली ओढ लेखिकेने अत्यंत सुलभपणे रंगवून सांगितले आहे. श्री रामकृष्ण परमहंस यांच्या विषयी एक स्वतंत्र प्रकरण लिहिल्यामुळे वाचकाला त्यांच्याविषयी दुर्मिळ अशी माहिती मिळते. पुढील काळात स्वामीजींच्या कुटुंबावर आलेली संकटे, व्यवहारातील चटके आणि त्यातून गुरुकृपेने बाहेर पडण्याचा उपलब्ध झालेला मार्ग याचे वर्णन येते. आपल्या गुरूंच्या सहवासात स्वामीजींचे व्यक्तिमत्व कसे विकसित होत गेले आणि त्यांच्या आयुष्याची दिशा कशी ठरली हे या सर्व लेखनातून स्पष्ट होते. आपल्या पुढील कार्याचा एक भाग म्हणून स्वामीजींनी केलेली संपूर्ण देशाची पदयात्रा, त्यांचा पहिला परदेश प्रवास, त्यानंतर शिकागो येथील सर्व धर्म परिषदेत त्यांनी केलेले भाषण, या ध्येयापर्यंत पोहचताना आलेल्या अनंत अडचणी, गुरुकृपेने त्यातून बाहेर पडण्याचा मिळालेला मार्ग, त्यांचे अमेरिकेतील कार्य या सर्व घटना लेखिकेने अत्यंत सविस्तरपणे आपल्यासमोर मांडल्या आहेत.
स्वामीजींचे पुन्हा एकदा अमेरिकेला जाणे, त्यांचे इंग्लंडमधील दोन दौरे, तसेच अन्य युरोपीय देशांमधील दौरे, त्यांची व्याख्याने, वेदांत प्रसार, वेदांत आणि विज्ञान यांची सांगड घालण्यासाठी चाललेला आटोकाट प्रयत्न, पश्चिमात्य राष्ट्रांची श्रीमंती आणि भारतातील दारिद्र्य पाहून त्यांच्या मनात चाललेला वैचारिक कोलाहल, रामकृष्ण मिशनची स्थापना, मार्गारेट नोबेल म्हणजेच भगिनी निवेदिता यांच्यासारख्या शिषोत्तमेचा झालेला लाभ, मातृभूमीला परतल्यानंतर झालेले स्वागत, सभा, व्याख्याने, जगभरातील अनेक नामवंत विचारवंत, वैज्ञानिक, तत्त्वज्ञ, धनाढ्य यांच्याशी सर्व विषयावर झालेली चर्चा या सर्व बाबी अत्यंत सूक्ष्मपणे लेखिकेने नमूद केलेल्या आहेत.
समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला भारावून टाकणारे स्वामीजींचे व्यक्तिमत्व ,त्यांचा मनोनिग्रह , त्यांची ध्येयपूर्तीची आस ,या सर्वावर विविध व्याधीमुळे काय परिस्थिती निर्माण झाली होती व त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून स्वामी आपल्या अंतिम ध्येयाकडे कशी वाटचाल करत होते याची कल्पना हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला येते. अनेक प्रकारच्या टीकांना सामोरे जाऊनही , वैयक्तिक बदनामी सहन करूनही , मनाचा तोल न ढळू देता एक संन्यस्त जीवन प्रवासी कशा प्रकारे मार्गक्रमण करत असतो याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे स्वामीजी ! त्यांच्या अलौकिक, असामान्य ,अतुलनीय आणि अविश्वसनीय अशा कार्याचा आढावा घेताना लेखिकेने अनेक लहान-मोठे प्रसंग ,भावनिक प्रसंग ,स्वामीजींना भेटलेली लहान मोठी माणसे ,त्यांच्याशी झालेले संवाद, मतभेद या सर्वांचा उल्लेख केलेला आहे . त्यामुळे स्वामीजींचे कार्य अगदी सहजासहजी पार पडले असे कोणाला वाटत असेल तर ते किती चुकीचे आहे हे समजून येते. स्वामीजींचे विचार समजावून देताना लेखिकेने स्वामीजींच्या तोंडची अनेक वाक्ये उद्धृत केली आहेत. कर्मयोग, भक्तियोग, राजयोग आणि ज्ञानयोगाचे स्वामीजींनी केलेले पृथक्करण अत्यंत सोप्या शब्दांत लेखिकेने सांगितले आहे. त्यामुळे स्वामीजींचे विचार नेमके काय होते हे आपल्याला समजून येते.
शेवटच्या एका प्रकरणात त्यांनी स्वामीजींच्या काही हृद्य आठवणी कथन केल्या आहेत. त्यातून विविध लोकांची त्यांच्याविषयी असलेली मते वाचायला मिळतात.स्वामीजी चार वेळेला महाराष्ट्रात येऊन गेले होते. लोकमान्य टिळक, वि. दा. सावरकर, नाटककार भा. वि. उर्फ मामा वरेरकर यांची व स्वामीजींची झालेली भेट ,त्यांच्यातील विचारांची देवाणघेवाण, स्वामीजींनी केलेले मार्गदर्शन हे सर्व मराठी मनाला रंजक आणि स्फूर्तीदायक वाटणारे आहे.
परमपूज्य श्री रामकृष्ण परमहंस, माता सारदा देवी, भगिनी निवेदिता आणि श्री. गुडवीन यांचे स्वामी विवेकानंद यांच्या जीवनात काय स्थान होते हे या पुस्तकाच्या वाचनानंतर लक्षात येते. गुडवीन हे नसते तर स्वामींचे विचार आपल्या पर्यंत पोहोचेल असते का ? त्यामुळे ते कोण होते हे जाणून घ्यायलाच हवे. प्रा. रोमा रोलॉनी स्वामीजींचे वर्णन ” विश्वात्म्याच्या वाद्यवृंदाने सादर केलेले उत्कृष्ट संगीत ” या शब्दात का करतात हे समजून घेतले पाहिजे.
स्वामीजींच्या पश्चात कन्याकुमारी येथील विवेकानंद शिला स्मारकाबरोबरच विवेकानंद केंद्र या संस्थेचीही निर्मिती करण्यात आली. या विवेकानंद केंद्राचा परिचय व केंद्राचे महाराष्ट्रातील प्रकल्प याविषयी सुद्धा माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे जिज्ञासू वाचकांना त्याचा उपयोग होऊ शकेल.
विवेकानंदांचे व्यक्तीमत्व ‘इंद्रधनुष्यी ‘होते असे लेखिकेने म्हटले आहे. या इंद्रधनुष्याचे सर्व रंग खुलवून दाखवणे हे खूपच अवघड काम आहे. परंतु लेखिकेच्या लेखणीने हे आव्हान पेलले आहे. अवघ्या साडेएकोणचाळीस वर्षांचे आयुष्य लाभलेल्या स्वामीजींच्या आयुष्यातील एक एक दिवस किती मोलाचा होता, आव्हाने आणि प्रतिकुलता यामुळे स्वामीजींना काय काय सहन करावे लागले, परंतु आपले गुरु श्री रामकृष्ण परमहंस व काली माता यांच्यावरील अगाध श्रद्धेमुळे झालेली ध्येयपूर्ती…. हे सर्व वाचताना, स्वामीजी म्हणजे एक दैवी चमत्कारच होते याची खात्री पटते. या चमत्काराला शब्दबद्ध करुन वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्वपूर्ण काम अंजली गोखले यांनी केले आहे. आतापर्यंत त्यांनी विविध प्रकारचे लेखन केले आहे. स्वामीजींचे हे जीवन चरित्र म्हणजे त्यातील मानाचा तुरा आहे.
पुस्तकाचे नाव : हिंदुत्वाचे विश्वप्रवक्ते-स्वामी विवेकानंद
लेखिका. : सौ.अंजली गोखले. संपर्क: ८४८२९३९०११
प्रकाशक. : विवेकानंद केंद्र , मराठी प्रकाशन विभाग, पुणे. संपर्क: ०२०-२४४३२३४२
पृष्ठे. : ३५६
मूल्य. : रु.४००/-
तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…
स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…
आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…
मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…
वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…