मुक्त संवाद

World Environmental Day Special: आंब्याचं पिल्लू..!

मी लांगीवरूनच दादाला आवाज दिला,“ दादा…ए $$ दादा… मावशे ए $$ मावशे जमलं बरंका एकदम भारी, परतेक खड्ड्यात आंब्याचं पिल्लू उगलं एकदम टरारबुंग …!!” हिरा मावशी माझ्याकडे पळतच आली. लगेच तिकडून दादा म्हणला, “लागलं नेवर्ती आता समदं बराबर रांकीला. आता आपल्या येहरीला बी पाणी उतरण लवकर काळजी नको करू.”

निवृत्ती सयाजी जोरी,
मंडळ कृषी अधिकारी, लासूर स्टेशन ता.गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर.
9423180393.

उन्हाळ्यात पिकलेले आंबे खाऊन बाजूला पडलेल्या कोयांचं मला कधीच काही वाटत नव्हतं. तेव्हा मी फक्त आंबे खाण्यात गुंग असायचो मात्र आंबे संपल्यानंतर त्या कोया खड्डे करून जमिनीत लावायचा लहानपणचा छंद माझ्या मला खूप भारी वाटायचा! उन्हाळा संपल्यावर शाळा नुकतीच सुरू व्हायची तेव्हा जास्तीचा काही अभ्यास नसायचा. शेतात पण पेरण्या होऊन पिकं नुकतीच तासी लागलेली ‘मग करायचं तरी काय?’ हा माझ्या मनात प्रश्न आला की मी सरळ एक कुदळ घेऊन निघायचो. पाऊस चांगला रिचला म्हणजे गवत गोळी, शिप्राट, हरळ असं बरंच काही उगवून आल्यावर भारी वाटायचं. बगलेला अडकवलेल्या पिशवीत वीस पंचवीस कोया सुट्टीच्या दिवशी छोटासा खड्डा करून त्यात दोन कोया टाकून वर थोडी माती ढकल्ली की असं बांधाच्या कडेकडेने सलग नऊ दहा खड्ड्यांमध्ये लागवड झाली की मग शेवटी बादलीने पाण्याची फेरी. हे सगळं मी फक्त माझ्याच भरोशावर करायचो. मागच्या वर्षी केलेला उपक्रम पाऊस वेळेवर आला नव्हता म्हणून दिवाळीपर्यंत जमलं पुढं एकच झाड जगलं याचं मोनोमन वाईट वाटायचं.

मामाच्या घरी शाळेला म्हणून लहानपणी मला जास्तीचं काम नसायचं. दादा (आजोबा) शेळ्या वळता वळता घरासमोरच्या मोठमोठ्या आमराईकडे बघत जेव्हा कायम मला सांगायला लागायचा तेव्हा मी कान टवकारुन ऐकायचो,“ पन्नासेक वरीस तं नक्कीच झाले आस्तिन. मी लहान व्हतो तव्हा लावलेत आम्ही हे आंबे…!सगळेच लै नंबरी चईला भाऊ. एक मधला शेंद्र्या आंबा तं नुस्ता मधाचा गोळाच! आंबरस जर केलाच तं उल्शिक सुद्धा साखर घालायची गरज नही आस्सा…! ” उन्हाळाभर खरंच आंबे खायची खूप चंगळ व्हायची. मनात यायचं,“ जर का आपल्या दादानं हे त्याच्या लहानपणी जर लावले नसते तर आपल्याला काय खायला भेटला असता आज…?”….“ खन्न्या?” हे कानावर पडलेलं दादाचं बोलणं ऐकल्यावर मला पण माझ्या आतून आवाज यायचा अन् आणखी हुरूप चढायचा. मागच्या वर्षी लावलेल्या आंब्यांपैकी फक्त एकच आंबा आतापर्यंत जगला म्हणून मला व हिरा मावशीला जास्त आनंदही नाही आणि दुःखही नव्हतं. यावर्षी पाऊस वेळेवर नव्हता पण काहीही झालं तरी आंबे लावायचेच या उद्देशाने मी बऱ्याच कोया जमा केलेल्या होत्या.



सोपानमामाने यावर्षी उन्हाळ्यात विहिरीवरून घराकडे हजार फूट सायपन आणलं होतं. जिथून पाणी पडायचं तिथून वावरापर्यंत शंभरेक फूट मामानेच घरच्या घरी खालून चारीची माती टाकून लांग तयार केली होती; म्हणजे सायपनच्या बाऱ्यातून पाणी खाली पडलं म्हणजे सरळ उताराच्या दिशेला त्या लांगीने पुढे वावरत जाणार अशी ती मामाची डोकेलिटी होती!आज रविवारची सुट्टी म्हणून मी व हिरामावशीने दुपारीच मनावर घेतलं. लांगीला कुदळीने पाच-सहा खड्डे घेतले त्यात कोया लावल्या. शेवटी ठरल्याप्रमाणे पाणी घातलं आणि आमचा रविवार आम्ही कारणिक लावला.

शाळेत गेल्यावर सारखी अधून मधून इकडची लावलेल्या झाडांची आठवण यायची,“काय झालं असेल?, आपण पाणी तर कमी टाकलं नाही ना? मोड फुटला असंन आता.” असं मी मनातल्या मनात स्वतःला विचारून बघायचो. काल-परवा दादाला पण मी,“कधी उगतीन कोया दादा?, शेळ्या ,बकरं सांभाळ जरा; तिकडं नको जाऊ देऊ; नही तं …. गेलं सगळं!” असं आठवण करून देत होतो. दोन दिवसाआधी शाळेतून आल्या आल्या पहिला चक्कर आंब्यांच्या लांगीला मारला तर दादाने एकदम भारी शक्कल लढवली! त्याने प्रत्येक खड्ड्यावर शेळ्या बकरं जाऊ नये म्हणून बाभळीच्या काट्या टाकल्या. पाणी टाकायला बरोबर जागा ठेवली. ते पाहून मला अन् हिरामावशीला खूप बरं वाटलं. पेरलेल्या बाजऱ्यांना आता पावसाच्या पाण्याची खूपच गरज होती म्हणून दादा सुद्धा पावसाची वाट बघत बोलायचा, “हा जर टायमावर आला ना तं सगळ्यात बाजऱ्या लै जोरात येतीन. आज उद्या झाला मंग महिनाभर पाहायचं काम नही.” मला पण दादा सारखच वाटायचं पण ते फक्त लावलेले आंबे उगवून येण्यासाठी मला बाकी बाजरीचं काही देणं घेणं नव्हतं असं म्हणलं तरी वावगं नाही.

एक- दीड आठवडा असाच कोरडा गेला. दादा बाजरीची लै चिंता करायचा. त्याला वर्षभराच्या पोटापाण्याची काळजी म्हणून त्याचा आटापिटा चालायचा. दुसरं असं तो शेळ्या वळायचा तेव्हा मुक्या लक्ष्मीला खायला गवत नसलं म्हणजे त्या नुसत्या इकडं तिकडं पळायच्या. त्याचं वय झाल्याने त्याला जास्त त्यांच्या मागे पळता येत नव्हतं जर का पाऊस चांगला झाला म्हणजे चारा चांगला व्हायचा मग त्याला सुद्धा थोडा आराम मिळायचा असं त्याचं दुहेरी गणित त्याच्या डोक्यात असायचं.आंबे लावून या रविवारी दोन आठवडे होऊन गेले होते. सोमवारपासून माझी पुन्हा शाळा सुरू झाली. बुधवार गावातला बाजार दिवस. उन्हाळ कांद्याचा मोंढा असायचा. खरा बाजार दिवाळी दसऱ्यानंतर लाल कांदे सुरू झाले की मग असायचा. पावसाळा सुरू होताना मार्केटमध्ये फक्त आतल्या आत व्यापारी आतल्या आत गाड्या भरायचे. बाजारच्या दिवशी मार्केटसमोर एखाद चहाचं हॉटेल लागायचं. इकडं शाळा भरल्यावर नेहमीप्रमाणे मी वर्गात येऊन बसलो. दुपारची मोठी सुट्टी झाली. हवेतल्या दमटपणामुळे गरम जास्त होत होतं. वर आकाशात पावसाच्या ढगांची दाटी व्हायला लागली होती. मी पाचवीत अन् हिरा मावशी सातवीत असा दोन वर्षांचा आमच्यात फरक. शाळेला मळ्यातून गावात बरोबरच जायचो. थोड्याफार प्रमाणात कधी जर आमच्यात कुरबुर झाली की एखादा दुसरा दिवस आमच्यात दुरावा मग परत ते विसरलो की पुन्हा पहिल्यासारखं सुरू व्हायचं. साडेचार वाजून गेले असतील.शाळेचा शेवटचा तास सुरू असेल, वर्गात एकदम उकडल्यासारखं व्हायचं. वहीच्या कडक पुठ्ठ्याने हवा घेतली की मग बरं वाटायचं. पश्चिमेकडून अचानक वारा फिरला अन् धो- धो वळवाचा पाऊस पडला! शाळा सुटल्यावर बाहेरसुद्धा पडता येईना असं झालं. चांगला तासभर पडला असेन. नंतर बारीक बारीक थेंब खूप वेळ पडत होते पण आता थांबून चालणार नव्हतं म्हणून सरळ मी व मावशीने मळ्याचा रस्ता धरला.

मधल्या ओढ्याला तुफान पाणी आलं होतं. त्यावरचा वसंत बंधारा जवळपास निम्मा भरला एवढं पाणी होतं ते! वरून वाहतं पाणी चालूच होतं म्हणजे रात्रीतून तो शंभर टक्के भरणार याची खात्री होती. पुढं गेलो तर मामाच्या घराशेजारची चारी तुडुंब वाहत होती. डफड्याच्या उंच माळावरून चोहीकडंच लवनातलं संपूर्ण दिसायचं. तिथून आजूबाजूला पाहिलं तर सगळ्या शेतांमध्ये पाणी चमचम करत होतं. घरी आलो तर पहिलं आंब्यांकडे जाऊन बघितलं तर खड्डे भरून पाणी ओसंडून वाहत होतं ते पाहिल्यावर खूप बरं वाटलं. थोड्याच वेळात अंधार पडला. आज मात्र जमिनीची खरंच शांतता झाली होती. जेवण झाल्यावर दादाला विचारलं, “ दादा जमंन का रे लावलेल्या आंब्यांच्या कोयांचं आता?” दादा म्हणला, “ काळजीच मिटली आता!” दादा असं म्हणल्यावर मला पण लै भारी वाटलं अन् थोड्याच वेळात जेवण करून मी झोपी गेलो.

सकाळी उजाडलं तेव्हा आजूबाजूच्या झाडांवर पाखरांचा किलबिलाट सुरू होता. मला खरं त्याच आवाजाने जाग आली. उठून आजूबाजूला बघितलं तर रात्री चोहीकडे साचलेलं पाणी भुईच्या पोटात अचानक गडप होऊन गेलं होतं! त्याचं मला खूप नवल वाटलं . पहिलं आंब्यांकडे जाऊन येऊ म्हणून तिकडं गेलो. पहिल्या खड्ड्याकडे पाहिलं तर …मज्जाच मज्जा…. त्यात तपकिरी-लाल कोंब उगवायला लागला होता! पुढच्या खड्ड्यांमध्ये पण तसंच दिसलं! ते बघून माझ्या आनंदाला पारावारच राहिला नव्हता! घराकडे दादा सकाळी सकाळी उठून शेळ्यांची सोड बांध करत होता. सरूमामीने अंगणाची झाडलोट करून चुल्हीवर आंघोळीचं पाणी ठेवलेलं होतं. मी लांगीवरूनच दादाला आवाज दिला,“ दादा…ए $$ दादा… मावशे ए $$ मावशे जमलं बरंका एकदम भारी, परतेक खड्ड्यात आंब्याचं पिल्लू उगलं एकदम टरारबुंग …!!” हिरा मावशी माझ्याकडे पळतच आली. लगेच तिकडून दादा म्हणला, “लागलं नेवर्ती आता समदं बराबर रांकीला. आता आपल्या येहरीला बी पाणी उतरण लवकर काळजी नको करू.” मावशीला पण आंबे उगवल्याचा खूप आनंद झाला. मागच्या वर्षी लावलेले आंबे दिवाळीपर्यंत कसेबसे जगले पण पुढं त्यांना पाणीच राहिलं नव्हतं म्हणून ते तसेच जळून गेले होते. यावर्षी असं काही होणार नव्हतं. चार-दोन दिवसात सगळेच आंबे वाढी लागले; कोवळी लुसलुशीत पानं सकाळच्या उन्हात खूप मस्त चमकायची. रोज शाळेला जायच्या अगोदर मी तिकडं चक्कर मारून यायचो. दररोज सकाळी ते बघून माझं मन अगदी प्रसन्न व्हायचं.थोड्याकी दिवसात माझी बी शाळा अन् अभ्यास जोशात सुरू झाला…..

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

12 hours ago

विरोधकांचा आवाज क्षीण झालायं… की सरकार अधिक बळकट झालंय ? Monsoon session of the legislature

मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…

1 day ago

इतिहास वाचनातूनच संस्कार अन् सुराज्याची जडणघडण : संयोगिताराजे छत्रपती Good State Formed Through Reading History

वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…

1 day ago

अर्पणामागचा भाव : शुद्ध भक्तितत्त्वाचा ज्ञानेश्वरीतील अमृतसंदेश Pure Bhakti from Dnyaneshwari |

हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…

1 day ago

आकाशातील ढग व युद्धाच्या धगीत अडकलेली अर्थव्यवस्था ! an economy caught in the grip of war

विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.…

2 days ago

स्त्रीवादी साहित्याची नवी दिशा : डॉ. ऊर्मिला चाकूरकर यांचे अभ्यासपूर्ण अध्यक्षीय भाषण New direction of feminist literature

स्नेहलता मारुती पाटील सन्मानार्थ पुरोगामी सामाजिक, सांस्कृतिक फाऊंडेशन द्वारा आयोजित २रे स्त्रीवादी साहित्य संमेलन यामध्ये…

2 days ago