आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ. माणिकराव खुळे, जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे. ९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.
१- मान्सून कुठपर्यंत पुढे सरकला ?
मान्सून ने १४ दिवसाच्या विश्रांतीनंतर महाराष्ट्रात पुढे काहीशी प्रगती केली आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्हा ओलांडून रायगड जिल्ह्याच्या अलिबागपर्यन्त तर मध्य महाराष्ट्रात सातारा सोलापूर जिल्हे ओलांडून पुणे जिल्ह्यात मावळ मुळशी पुणे पर्यन्त तसेच दक्षिण अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा कर्जत जामखेडपर्यन्त आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्याचा बराचसा भाग व्यापत मान्सून ने पुढे वाटचाल केली. त्याचबरोबर मान्सून च्या ह्याच अरबी समुद्रीय शाखेनेच तेलंगणा राज्यातून मान्सून दक्षिण विदर्भातील गडचिरोलीतील ‘ सिरोंचा ‘ तालुक्याच्या प्रवेशद्वारापर्यंत येऊन ठेपला आहे.
२- मान्सून मुंबईत कधी?
मान्सून पोहोचलेल्या या सर्वच ठिकाणी पावसाने हजेरी लावली नसली तरी मान्सून चे वारे तेथपर्यंत पोहोचले आहेत. मान्सूनच्या पुढील आगमनासाठी वातावरण अनुकूल असुन येत्या २-३ दिवसात मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात मान्सून पुढे झेपावेल, असे वाटते.
३-कश्यामुळे मान्सून पुढे सरकला?
पावसाळी हंगामात समुद्रसपाटी च्या पातळीत स्थिरावणारा हवेच्या कमी दाबाचा पुर्वो-पश्चिम आस काहीसा दक्षिणेकडे सरकला आहे. आज तो पंजाब हरियाणा ऐवजी राजस्थान बिहार उत्तरप्रदेश राज्यातून पास होत आहे. तसेच वायव्येकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्याचा जोर कमी झाला आहे. अरबी समुद्रात साडे तीन ते पावणेचार किमी. दरम्यान असणाऱ्या प्रत्यावर्ती वाऱ्याच्या प्रणाली विरळतेकडे गेली आहे. त्यामुळे मान्सूनी वाऱ्यांना बळकटी मिळाली असून महाराष्ट्रात मान्सूनची वाटचाल झाली आहे.
४-सध्याची उष्णतेची लाट व रात्रीचा उकाडा?
आजपासून पुढील ४ दिवस म्हणजे शुक्रवार दि. २६ जूनपर्यंत विदर्भात भाग बदलत उष्णतेची तीव्र लाट तसेच रात्रीच्या उकाडा जाणवेल, असे वाटते.
