स्टेटलाइन

देशात भाजप नंबर एकचा पक्ष आहे. पक्षाचे अठरा कोटी सदस्य आहेत. या पक्षाला सत्ता आणि ऐश्वर्य प्राप्त झाले आहे. पण जनसंघाच्या काळापासून पक्ष कसा वाढला, भाजपाची स्थापना झाल्यावर पक्षाचा विस्तार कसा झाला अशा अनेक आठवणींनी अनेकांच्या मनात नितीन नबीन यांच्या पदग्रहण सोहळ्यात गर्दी केली होती.

डॉ. सुकृत खांडेकर

देशातील सर्वात मोठ्या बलाढ्य व सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचे बारावे अध्यक्ष म्हणून नितीन नबीन यांनी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात सूत्रे घेतली. जे. पी. नड्डा यांचे वारस म्हणून आलेले नितीन नबीन हे देशात फारसे कुणाला माहिती नव्हते. बिहारमधे भाजपचे पाच टर्म आमदार असलेल्या नितीन नबीन यांची पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणन निवड झाली, याचे अनेकांना आश्चर्य वाटले. दिल्लीला येण्यापूर्वी ते बिहारमधे नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमधे रस्ते बांधणी मंत्री होते. देशात मोदी पर्व सुरू झाल्यापासून पक्षाची लक्षणीय घोडदौड चालू आहे. मोदींनी पंतप्रधान म्हणून आणि भाजपाप्रणित एनडीए सरकारने केंद्रात हॅटट्रीक संपादन केली आहे. या घडीला वीस राज्यांत भाजप स्वबळावर किंवा मित्र पक्षाबरोबर सत्तेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन नेते पक्षात सर्वोच्च आहेत. मोदींचा करिष्मा व शहांचे संघटन कौशल्य ही भारतीय जनता पक्षाची मोठी पुंजी आहे. राज्यात मुख्यमंत्री कोण आहे किंवा प्रदेशाध्यक्ष किंवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहे, या नावाला आता महत्व राहिलेले नाही. मोदी आणि शहा या जोडीने भाजपला यशाच्या उत्तुंग शिखरावर नेले आहे. त्यामुळे बिनचेहऱ्याचा मुख्यमंत्री किंवा प्रदेशाध्यक्ष आला तरी पक्षाचा जनाधार कमी होत नाही. नड्डा यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपपदावर झालेली निवड जशी आश्चर्यकारक होती तसेच नितीन नबीन यांची पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड होईल याची कोणी कल्पना केली नव्हती.

नितीन नबीन यांची पक्षाच्या या सर्वोच्च पदावर बिनविरोध निवड झाली. पदग्रहण समारंभाला भाजपचे अनेक केंद्रीयमंत्री, अनेक मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हजर होते. त्यांचे अभिनंदन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, नितीन नबीन आता पक्षाशी संबंधीत बाबींमधे माझे बॉस असतील, मी त्यांचा कार्यकर्ता आहे. मी माझ्या कामाचा लेखा जोखा त्यांना सादर करीन, आता ते माझा सीआर ( गोपनीय अहवाल ) लिहितील…नितीन नबीन यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला तेव्हा मावळते अध्यक्ष जे. पी. नड्डा, राजनाथ सिंह, अमित शहा व नितीन गडकरी हे चार माजी अध्यक्ष उपस्थित होते.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नबीन यांना झेड सुरक्षा मिळाली आहे. नड्डा यांनाही ते पक्षाचे अध्यक्ष झाल्यावर झेड सुरक्षा मिळाली होती. पक्षाची सुत्रे हाती घेताच दुसऱ्याच दिवशी त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर केरळचे इन चार्ज ( निवडणूक प्रभारी ) म्हणून जबाबदारी सोपवली आहे, तसेच चंदिगड महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीतही पक्षाचे निरीक्षक म्हणून त्यांच्यावर काम सोपवले आहे. विनोद तावडे हे अनेक वर्षे बिहारचे पक्षाचे प्रभारी होते. बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षाला जे प्रचंड यश मिळाले त्यात तावडे यांचे मोठे योगदान होते.

यापुर्वी त्यांनी हरियाणाचे प्रभारी म्हणून काम करतानाही तेथे भाजपची सत्ता स्थापन करण्यात तावडे यांनी मोठी कामगिरी बजावली होती. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले, राज्याचे मंत्री आशिष शेलार यांच्यावर पक्षाने निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवली होती. आता शेलार यांच्यावर पक्षाचे नवे राष्ट्रीय अधयक्ष नितीन नबीन यांनी बंगळुरू महापालिकेच्या महापौर निवडणुकीत पक्षाचे निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवली आहे.

नितीन नबीन यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा काळ हा तीन वर्षांचा आहे. लोकसभा निवडणूक सन २०२९ मधे आहे. कदाचित लोकसभा निवडणूक संपेपर्यंत नबीन यांना त्यांच्या पदाचा कार्यकाल मिळू शकतो. नितीन नबीन यांना भाजपचा सर्वात तरूण राष्ट्रीय अध्यक्ष असा मान प्राप्त झाला आहे. नितीन नबीन हे कट्टर कार्यकर्ते आहेत. त्यांनी केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री शहा यांचे आभार मानले. एका सामान्य कार्यकर्त्याला राष्ट्रीय अध्यक्षपदावरून काम करण्याची संधी देणारा भाजपा हा एकच पक्ष आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

देशात भाजप नंबर एकचा पक्ष आहे. पक्षाचे अठरा कोटी सदस्य आहेत. या पक्षाला सत्ता आणि ऐश्वर्य प्राप्त झाले आहे. पण जनसंघाच्या काळापासून पक्ष कसा वाढला, भाजपची स्थापना झाल्यावर पक्षाचा विस्तार कसा झाला अशा अनेक आठवणींनी अनेकांच्या मनात नितीन नबीन यांच्या पदग्रहण सोहळ्यात गर्दी केली होती. मंदिर वहीं बनाऐंगे, जहाँ हुए बलिदान मुखर्जी का, वह काश्मीर हमारा है, एक देश मे दो विधान, दोन निशान , दोन प्रधान नहीं चलेगा… अयोध्येत भव्य राम मंदिर उभारले गेले, काश्मीरला विशेषाधिकार देणारे ३७० कलमाचे संरक्षण मोदी सरकारने काढून टाकले. केवळ लोकभा व विधानसभेत नव्हे तर महापालिका निवडणुकांमधेही जनतेची पसंती भाजपला आहे हे महाराष्ट्रातील निकालाने दाखवून दिले आहे असे नवीन अध्यक्ष नितीन नबीन यांनी अभिमानाने सांगितले. राष्ट्र पहले, पार्टी बाद में और खुद सबसें अखिर में असा आदर्श असलेल्या पक्षात आपण काम करतो, याचा नबीन यांनी आवर्जून उल्लेख केला.

यावर्षी २०२६ मधे देशात पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ,आसाम या राज्यात विधानसभा निवडणुका आहेत. सन २०२७ मधे उत्तर प्रदेश , उत्तराखंड , पंजाब, गोवा , मणिपूर या राज्यात निवडणुका होतील. तसेच पुढील वर्षी राष्ट्रपती व उपराष्ट्रपतींची निवडणूक आहे. हे सर्व आव्हान पक्षाध्यक्ष म्हणून नितीन नबीन यांना पेलायचे आहे. भाजपच्या ४६ वर्षाच्या कालखंडात पंधरा अध्यक्ष झाले. अटल बिहारी वाजपेयी हे पक्षाचे पहिले अध्यक्ष होते ( १९८० ते १९८६ ), त्यांनी सुत्रे हाती घेतली तेव्हा ते ५५ वर्षाचे होते. नंतर लालकृष्ण अडवाणी अध्यक्ष झाले . ( १९८६ ते १९९१ ) , त्यांनी सूत्रे हाती घेतली तेव्हा ते ५८ वर्षाचे होते. नंतर मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी, कुशाभाऊ ठाकरे, बंगारू लक्ष्मण, जेना कृष्णमूर्ती, वेंकय्या नायडू, लालकृष्ण अडवानी, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, राजनाथ सिंह, अमित शहा, जे. पी. नड्डा अध्यक्ष झाले आणि आता वीस जानेवारी २०२६ पासून नितीन नबीन यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत. लालकृष्ण अडवानी यांनी तीन वे‌ळा व राजनाथ सिंह यानी दोन वेळा पक्षाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली.

नड्डा यांना सन २०२३ च्या प्रारंभी २०२४ मधे होणाऱ्या लोकसभा निवडणुका संपेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. पण त्यानंतर दिड वर्षांने नवीन अध्यक्षांची निवड झाली. नवीन अध्यक्ष कोण होणार याविषयी अनेक तर्क वितर्क केले गेले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शिक्कामोर्तब त्यासाठी आवश्यक होते. नोव्हेंबर २०२३ मधे छत्तीलगड मधे झालेल्या विधानसभा निवडणुकीत नितीन नबीन यांच्यावर सहप्रभारी म्हणून पक्षाने जबाबदारी सोपवली होती. नंतर छत्तीसगड मधे झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्यावर निवडणूक निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. नवीन तरूण चेहरे निवडायचे व त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी द्यायची हेच धोरण नितीन नबीन यांची निवड करताना पक्षाने राबवले. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव सहाय, ओरिसाचे मुख्यमंत्री मोहनचरण माझी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची निवड करताना नवा चेहरा व तरूणांना प्राधान्य हाच विचार पक्षाने केला.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

हळदीचे कंद सडतायत, पीक मरतंय? कारणे ओळखा, वेळीच करा प्रभावी व्यवस्थापन ! Turmeric Rhizome Rot and Wilt

हळद पिकातील कंद सड व मर : कारणे, लक्षणे आणि प्रभावी व्यवस्थापन हळद आणि अद्रक…

1 day ago

सृष्टी निर्माण झाली कशी? श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेले गूढ काय?

सृष्टीकडे पाहिले की असंख्य रूपे, जीव, शक्ती आणि घडामोडी आपल्याला दिसतात. या विराट पसाऱ्यामागे नेमकी…

3 days ago

सर्व महामानवांच्या सामर्थ्याची बेरीज म्हणजे भारत: डॉ. श्रीपाल सबनीस

कोल्हापूर : भारत हा कोणत्याही एका महामानवाचा,एका धर्माचा किंवा एका विचारपरंपरेचा नाही. बुद्ध, महावीर, संत…

3 days ago

अंदाजाची शेती संपणार? ड्रोन, सेन्सर अन् एआय ठरवणार पिकांचे भवितव्य ! Smart Farming with Drone and AI Techique

डिजिटल क्रांती: समृद्ध शेतीचा पाया/ 'स्मार्ट शेती, भरघोस प्रगती' ड्रोनची फवारणी, मोबाईलवर मातीचे रिपोर्ट आणि…

3 days ago

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कार २०२६ जाहीर

ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे (नाशिक)यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार,संहिता राजन (पुणे)…

3 days ago

२२ परीक्षा रद्द, दोन हजार नोकऱ्या मात्र धोक्यात!

स्टेटलाइन - झारखंडच्या राजकारणात सध्या सत्तेच्या खुर्चीपेक्षा विद्यार्थ्यांच्या संतापाची ताकद मोठी ठरताना दिसत आहे. रांचीच्या…

3 days ago