fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 28, 2026
Home » पत्रकारांनी जरूर वाचावे असे पुस्तक ‘वार्तांच्या झाल्या कथा’ News in the form of stories
मुक्त संवाद

पत्रकारांनी जरूर वाचावे असे पुस्तक ‘वार्तांच्या झाल्या कथा’ News in the form of stories

A detailed review of Rajiv Sabade's Wartanchya Zalya Katha, highlighting ethical journalism, responsible reporting, historic events and valuable lessons for every journalist.
दैनिक सकाळ मध्ये प्रदीर्घकाळ कार्यरत असणारे राजीव साबडे यांनी स्वतःच्या अनुभवांवर लिहिलेले वार्तांच्या झाल्या कथा हे पुस्तक आता पत्रकारितेत कार्यरत असलेल्या प्रत्येकाने वाचलेच पाहिजे.

अरविंद जोशी, ज्येष्ठ पत्रकार, सोलापूर

श्री साबडे यांनी साडेतीन दशके आपली सेवा बजावलेली आहे आणि आता ते निवृत्त झालेले आहेत. म्हणजे एका परीने ते माझ्या पिढीतले पत्रकार आहेत. आता सध्या इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांनी आणि सोशल मीडियाने पत्रकारितेमध्ये जे नवे प्रवाह आणले आहेत ते माझ्या पिढीतल्या पत्रकारांना नक्कीच पटणारे नाहीत. पत्रकारितेतील कित्येक संकल्पना आता बदलून गेल्या आहेत आणि नेमक्या शब्दात सांगायचे तर बिघडून गेल्या आहेत.

अशा वातावरणात पूर्वीच्या पत्रकारितेतील काही संस्कारांचे दर्शन घडवणारे असे लेखन वाचण्यात आले की मनाला थोडे बरे वाटते. श्री साबडे यांनी स्वतः वार्तांकन केलेल्या काही घटनांचे सविस्तर विवेचन केलेले आहे. त्यात पुण्यामध्ये खळबळ जनक ठरलेले जोशी अभ्यंकर हत्याकांड, जनरल वैद्य यांची हत्या, त्यासंबंधात चालवले गेलेले खटले, आचार्य रजनीश यांची पूर्ण कहाणी, टेल्को, राजीव गांधी यांची हत्या, इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीत झालेल्या शीख विरोधी दंगली, इस्रायल मधील युद्धजन्य परिस्थिती अशा काही विषयांचा समावेश आहे. या सर्व कथनाला त्यांनी ललित स्वरूप दिलेले आहे.

पत्रकार आणि लेखक यांच्यात एक मोठा फरक असतो. पत्रकार हा लेखक असतोच असे नाही. आणि त्याच्या बातमीच्या लिखाणाचा आकृतीबंध हा उलट्या त्रिकोणाचा असतो. म्हणजे घडलेली घटना आधी सांगितली जाते आणि पार्श्वभूमी नंतर दिली जाते. परंतु श्री साबडे यांनी आधी पार्श्वभूमी सहित सर्व घटना दिलेल्या आहेत आणि घडलेली घटना, तिचे परिणाम, त्यासंबंधातील न्यायालयीन कामकाज यावर क्रमाक्रमाने प्रकाश टाकलेला आहे. त्यांची ललित लिखाणाची शैली सुद्धा प्रभावी आहे. आणि त्यांनी कव्हर केलेल्या सगळ्या बातम्या आपल्याला माहीत आहेत परंतु त्यांच्या लिखाणातून त्या संबंधातील कितीतरी नवीन माहिती आपल्याला त्यांच्या या पुस्तकातून कळते.

ललित लेखक हे नेहमीच वस्तुस्थितीवर आधारून काहीतरी लिहिताना आपल्या पदरचा मालमसाला त्यात घालतात. आणि काही वेळा मूळ घटनांचा विपर्यास करण्याचे स्वातंत्र्य सुद्धा उपभोगतात. मात्र पत्रकाराला कोणत्याही स्वरूपात लेखन केले तरी हे स्वातंत्र्य घेता येत नाही. साबडे यांनी ते घेतलेले नाही त्यामुळे आपल्याला ललित लेखनाचा आनंद तर मिळतोच परंतु वस्तुस्थिती पासून त्यांची लेखणी कुठेही भरकटताना दिसत नाही.

दोन-तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत पडलेली फुट आणि त्या फुटीतून निर्माण झालेल्या सर्वोच्च न्यायालयातल्या खटल्यावर सोशल मीडियामध्ये सातत्याने चर्चा होत होती. विशेष म्हणजे ते वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना सर्वोच्च न्यायालयात काय झालेले आहे याचे वृत्त नित्य मिळत होते आणि त्यावरून प्रत्येक वेळी या खटल्याचा निकाल काय लागेल याचे अंदाज व्यक्त केले जात होते. माझ्यासारख्या गेल्या पिढीतल्या पत्रकाराला ही गोष्ट नक्कीच खटकत होती. कारण मी जी पत्रकारिता शिकलो तिच्यामध्ये, खटल्याचे वार्तांकन करावे परंतु निकाल काय लागेल याचे अंदाज व्यक्त करू नयेत असे शिकवलेले होते. परंतु असे अनेक संकेत बाजूला ठेवून सध्याची पत्रकारिता केली जात आहे.

मागच्या पिढीत मात्र या संबंधात कसा संयम पाळावा हे शिकवले जात होते. जनरल वैद्य यांच्या हत्येनंतर झालेल्या खटल्याच्या कामकाजाचे वार्तांकन करताना न्यायालयाची बेअदबी होणार नाही व लष्कराविषयी लोकांच्या मनातला आदर कमी होणार नाही अशा पद्धतीने आपण संयमाने कसे वार्तांकन करत होतो हे साबडे यांनी लिहिलेले आहे.

सध्याच्या पत्रकारांमध्ये हा संयम राहिलेला नाही. हाती पडेल ती माहिती तिखट मीठ लावून प्रसिद्ध करणे आणि त्यातून कोणाची बदनामी होत असली तरी त्याचे भान न ठेवणे हा सध्याच्या पत्रकारांचा बाणा झालेला आहे. अशा पत्रकारांनी ही संयमित पत्रकारिता करण्याबाबतचे संकेत या पुस्तकातून नक्कीच शिकून घेतले पाहिजेत.

या पुस्तकात जोशी – अभ्यंकर हत्याकांडा विषयीचा जो सविस्तर लेख आलेला आहे. तो पन्नास वर्षांपूर्वीच्या त्या थरारक घटनांची आठवण जागी करणारा आहे. या प्रकरणाचे वार्तांकन करताना आपण स्वतःवर कोणती बंधने घालून घेतलेली होती याचे विवरण साबडे यांनी केलेले आहे. ते शब्दशः देतो म्हणजे नव्या पत्रकारांना एक धडा मिळेल.

‘सकाळ’ च्या परंपरेनुसार संपादक श्री. ग. मुंणगेकर यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांप्रमाणे आम्ही या प्रकरणाच्या वार्तांकनात काही बंधने स्वतःवर घालून ती काटेकोरपणे पाळली होती. क्लेशदायक प्रसंगांची छायाचित्रे न छापणे, भीषणता दाखवणारी वर्णने न करणे , दुर्दैवी कुटुंबीयांच्या मुलाखती न घेणे, भावनातिरेकाने त्यांनी व्यक्त केलेला आक्रोश शब्दातून न मांडणे, निष्काळजीपणाचा दोष कोणावर तरी न ठेवणे, शक्य तिथे पोलिसांनी सुचवलेली बंधने पाळणे, गुन्हेगारांच्या तंत्राचे तपशील न देणे, इत्यादी.

यातून पत्रकारांना बरीच काही शिकण्यासारखे आहे. हा संयम मला महत्त्वाचा वाटतो कारण 26 / 11 च्या मुंबईवरील हल्ल्याच्या वेळी आपल्या देशातल्या वृत्तवाहिन्यांनी अतिरेक्यांना पकडण्यासाठी आपल्या कमांडो कडून कोणते डावपेच आखले जात आहेत याचे वार्तांकन केले होते. त्यामुळे ते डावपेच पाकिस्तानात बसलेल्या त्यांच्या सूत्रधारांना कळत होते आणि ते अतिरेक्यांना त्यांची माहिती देऊन आपल्या कमांडोचे काम अवघड करत होते. तेव्हा वृत्तवाहिन्यांनी हे वार्तांकन करू नये अशी विनंती त्यांना करण्यात आली. परंतु या बेजबाबदार वृत्तवाहिन्यांनी अशा प्रकारे आपल्या हक्कावर ‘बंधन’ घातले जाणार असेल तर आपण सरकारच्या बातम्यांवर बहिष्कार घालू अशी धमकी दिली. या पार्श्वभूमीवर मला पत्रकारांनी कशी संयमित पत्रकारिता केली पाहिजे, या संबंधातील साबडे यांचे लेखन महत्त्वाचे वाटते.

वार्तांच्या झाल्या कथा या पुस्तकात याशिवाय पुणे शहराच्या विकासातील पारशी समाजाचे योगदान, राजीव गांधी यांचे योगदान आणि त्यांचा अध:पात, अटल बिहारी वाजपेयी यांचे व्यक्तिमत्व आणि त्यांच्याही झालेल्या काही चुका इत्यादी संस्मरणीय लेख आहेत. ते जरूर वाचले पाहिजेत. त्यांच्या निमित्ताने देशाच्या दोन दशकांचा राजकीय इतिहास आपल्यासमोर उलगडला गेलेला आहे.

पुस्तकाचे नाव – वार्तांच्या झाल्या कथा
लेखक- राजीव साबडे
प्रकाशकरोहन प्रकाशन
पृष्ठे ३२० किंमत ४९५ रुपये

गोष्टीरूपी बातम्या अर्थात  वार्तांच्या झाल्या कथा

मुद्रित माध्यमांचा पूर्ण दबदबा असतानाच्या काळात ३४ वर्षे पत्रकारिता केलेल्या राजीव साबडे यांनी स्थानिक विषयांपासून जागतिक स्तरापर्यंत अनेक घटना, घडामोडींचं प्रत्यक्षदर्शी वार्तांकन केलं. अनेक मोठ्या राजकारणी नेत्यांचा सहवास त्यांना लाभला. देश हादरवणाऱ्या अनेक घटना, प्रसंगांचे भीषण परिणाम त्यांनी पाहिले, अनुभवले आणि वार्तांकित केले. पूर्वी केलेल्या आपल्या या वार्तांकनाच्या संदर्भाना ललित लिखाणाची जोड देऊन त्यांनी केलेल्या लेखांच्या मांडणीमुळे वाचताना ते प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात; मग ते पुण्यात घडलेलं जोशी-अभ्यंकर हत्याकांड असो, राजीव गांधींची हत्या असो, दिल्लीमधील शिखांचं हत्याकांड असो की पोलंडमधील ऑशविट्झच्या छळ छावणीची भेट असो… साबडेंनी ही सर्व वर्णनं इतकी जिवंत करतात की, काही काळापूर्वी वर्तमानपत्रात वाचलेली ती बातमी आता कथेसमान वाटू लागते. पुस्तकातील इतर लेख जसं की, पुण्याच्या विकासामधील बावाजींचं योगदान, टेल्को आणि पुण्याचं घनिष्ठ नातं, सोनेरी काळ अनुभवलेला रजनीश आश्रम आणि त्याची उतरती कळा, अटल बिहारी वाजपेयींसोबत अनुभवलेले मौलिक क्षण असे सर्वच लेख मनाला स्पर्शून जातात आणि तो काळ डोळ्यासमोर उभा करतात.

'सत्य-असत्याशी मन केले ग्राही, मानियले नाही बहुमता' या संत तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे या लेखनात त्यांनी अनेकांना न रुचणारं आपलं कर्तव्यकठोर मतप्रदर्शनही केलं आहे. या 'कथा' एकमेकांपासून वेगळ्या असल्या तरी त्यातील समान सूत्र चिकित्सक पत्रकाराच्या वेधक दृष्टीचं आहे. अनेकांगी वार्तांकनातून निर्माण झालेल्या गोष्टीरूपी बातम्या अर्थात वार्तांच्या झाल्या कथा !

Related posts

धरणाच्या तळाशी दबलेली माणुसकी

पारायण का करावे ?

सृजनगंधी कवडसे…

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!