स्टेटलाइन –
बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप घडवत मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झालेले Nitish Kumar आता राष्ट्रीय राजकारणाकडे वळले आहेत, तर त्यांच्या जागी भाजपाचे नेते Samrat Choudhary यांनी राज्याच्या २४ व्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. भाजपाच्या दीर्घकालीन रणनीतीचा भाग मानल्या जाणाऱ्या या बदलामुळे बिहारमध्ये नव्या सत्तायुगाची—‘सम्राट पर्वा’ची—सुरुवात झाली असून, आगामी राष्ट्रीय राजकारणावरही त्याचे दूरगामी परिणाम होण्याची चिन्हे दिसत आहेत.
डॉ. सुकृत खांडेकर
दोन दशकाहून अधिक काळ बिहारचे मुख्यमंत्री राहिलेल्या नीतीश कुमार यांनी भाजपाच्या रेट्यापुढे विनम्र होऊन राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच भाजपाचे नेते सम्राट चौधरी यांनी बिहारचे २४ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यात नीतीश कुमार यांचा जनता दल युनायटेड आणि भाजपा यांचे युती सरकार आहे. नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असतील असे जाहीर करून भाजपाने विधानसभा निवडणूक लढवली होती. राज्य विधानसभेत सर्वाधिक आमदार असलेला भाजपा हा नंबर १ पक्ष आहे. पण चार महिन्यातच नीतीश कुमार यांना राष्ट्रीय पातळीवर जाण्याची सुचना मित्र पक्षाकडून आली आणि नितीश कुमार यांना ती मान्य करावी लागली. बिहारमधे आता सम्राट पर्वाची सुरूवात झाली आहे.
२०१४ मधे देशात मोदी पर्व सुरू झाल्यापासून दिड डझन राज्यात भाजपाने स्वबळावर किंवा मित्र पक्षाला बरोबर घेऊन सत्ता स्थापन केली. आजवर बिहारमधे भाजपाचा कधी मुख्यमंत्री झाला नव्हता. हिंदी भाषिक प्रदेशात बिहार या मोठ्या राज्यात आपला मुख्यमंत्री नाही, ही भाजपाला सल बोचत होती. पण भाजपाने मोठ्या खुबीने नीतीश कुमार यांना पाटण्यातून दिल्लीला नेले व मुख्यमंत्रीपदावर सम्राट चौधरींना बसवले. चौधरी हे काही मुळचे भाजपाचे नाहीत, ते संघ परिवारातील नाहीत, ते संघाचे स्वयंसेवक होते असे कधी कोणी सांगितलेही नाही. लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलात ते निष्ठावान कार्यकर्ते होते. नंतर नीतीश कुमार यांच्या जनला दल युनायटेड मधे आले. त्यानंतर बिहारचा वेगाने विकास करण्यासाठी ते भाजपामधे आले. काही काळ जीतनराम मांझीच्या हिंदुस्थान आवाम पक्षात होते. राजद ते भाजपा, हिंआप व जनता दल मार्गे हा त्यांचा चार पक्षातील राजकीय प्रवास एखाद्या कथा – कांदबरीसारखा आहे.
आठ वर्षापूर्वी त्यांनी भाजपामधे प्रवेश केल्यानंतर कधी मागे वळून बघितले नाही. आपल्याला मुख्यमंत्रीपदाच्या सिंहासनावर भाजपाच नेऊ शकतो, हा त्यांना विश्वास होता. बिहारमधील जेष्ठ समाजवादी नेते शकुनी चौधरी यांचे सम्राट हे पुत्र. आपल्या राजकीय प्रवासाची सुरूवात त्यांनी लालू यादव यांच्या राजदपासून केली. सम्राट चौधरी भाजपामधे आल्यापासून पक्षाने सतत त्यांच्यावर संघटनात्मक जबाबदारी देणे सुरू केले. भाजपामधे प्रवेश केल्यापासून त्यांच्या राजकीय करिअरचा आलेख सतत उंचावतच राहिला. वडिल शकुनी चौधरींबरोबर ते अनेक वर्षे राजदमधे राहिले. नंतर नीतीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडमधे गेले. तिथे फारसे मन रमले नाही म्हणून ते जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्थान आवाम मोर्चात गेले. सन २०१८ मधे ते भाजपात आले.
भाजपाचे दिवंगत उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनीच सम्राट यांना भाजपात आणले. त्यावेळी बिहारचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय होते. नित्यानंद यांच्या टीममधे सम्राट यांच्यावर प्रदेश उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली. सन २०२० मधे राज्यात एनडीएचे सरकार स्थापन झाले तेव्हा सम्राट चौधरी यांचा पंचायतराज राज्यमंत्री म्हणून सरकारमधे समावेश झाला. २०२१ मधे एनडीए मधे फूट पडली, तेव्हा सम्राट यांच्यावर विधान परिषदेतील विरोध पक्षनेता म्हणून पक्षाने त्यांच्यावर जबाबदारी सोपवली. विरोधी पक्षनेता म्हणून सम्राट यांनी प्रभावी कामगिरी केली.
भाजपाने मार्च २०२३ मधे त्यांच्यावर बिहार प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. सम्राट यांना चार राजकीय पक्षांचा दांडगा अनुभव. त्यांनी भाजपाचा राज्यात वेगाने विस्तार केला. राजद आणि महाआघाडीवर ते सतत घणाघाती हल्ले करीत. सुशील मोदी यांच्या निधनानंतर भाजपामधे राज्यात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती, ती सम्राट यांनी भरून काढली. २०२४ मधे नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात एनडीएचे सरकार स्थापन झाले ,तेव्हा उपमुख्यमंत्रीपद व सरकारमधील दोन क्रमांकाचे स्थान सम्राट यांना देण्यात आले. लोकसभा निवडणूक काळात तेच प्रदेशाध्यक्ष होते. बिहारमधून भाजपाचे बारा खासदार निवडून आले.
नोव्हेंबर २०२५ मधे झालेली विधानसभा निवडणूक पक्षाने सम्राट चौधरींच्या नेतृत्वाखाली लढवली. मतदारांना आकर्षित करणाऱ्या घोषणा सम्राट यांनीच केल्या. बिहारमधील प्रशासनावरही सम्राट यांनी चांगली पकड निर्माण केली. विधानसभेत भाजपाचे सर्वाधिक म्हणजे ८९ आमदार निवडून आले. तरीही दिलेला शब्द पाळण्यासाठी भाजपाने नीतीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद दिले. मात्र सम्राट यांना उपमुख्यमंत्री करताना त्यांच्याकडे गृह खाते देण्यास भाजपाने नीतीश यांना भाग पाडले. एनडीएच्या सरकारमधे गृहखाते उपमुख्यमंत्र्याकडे असे कधी घडले नव्हते. एनडीएचे सरकार असले तरी मुख्यमंत्री, गृहमंत्री व विधानसभा अध्यक्ष ही तीन पदे भाजपा नेहमीच आपल्याकडे ठेवते. कारण त्या पदांवर सरकारचे भवितव्य अवलंबून असते.
सम्राट चौधरी हे बिहारमधे दबंग नेते म्हणून ओळखले जातात. सामदामदंडभेद सर्वांचा वापर करून सत्ता कशी खेचायची यात ते तरबेज आहेत. नीतीश कुमार हे महाआघाडीचे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर सम्राट जोरदार प्रहार करीत असत. त्यांना सत्तेवरून हटविण्यासाठी त्यांनी एकदा अयोध्या येथे जाऊन मुंडनही केले होते. ५७ वर्षांच्या सम्राट चौधरींकडे संघटन कौशल्य आहे. भाजपाला बिहारमधे कोणी चेहरा नव्हता तो सम्राटच्या रूपाने मिळाला आहे. ते कोईरा जातीचे ( कुशावह ) आहेत. बिहारमधे ओबीसीमधे हा प्रभावी समाज आहे. १९९० मधे लालू प्रसाद यादव यांच्या राजदमधे प्रवेश करून त्यांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. त्यांचे वडिल शकुनी हे मुंगेर जिल्ह्यातील तारापूर मतदारसंघातून सहा वेळा काँग्रेस, समता पार्टी किंवा राजदचे आमदार म्हणून निवडून आले होते.
१९९९ मधे सम्राट हे आमदार म्हणून निवडून आले तेव्हा राबडी देवी यांच्या सरकारमधे कृषीमंत्री म्हणून त्यांचा समावेश झाला. वयाची तेव्हा पंचवीस वर्षे पूर्ण झाली नसताना ते आमदार- मंत्री कसे झाले, असा वाद निर्माण झाला व त्यातून त्यांचे मंत्रीपद गेले. २००० च्या निवडणुकीत ते पुन्हा आमदार म्हणून निवडून आल्यावर राजद सरकारमधे मंत्री झाले. २००५ मधे राजदचा पराभव झाला, पक्षाने त्यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती केली. सन २०१४ मधे सम्राट चौधऱी हे राजदच्या अकरा आमदारांसह बाहेर पडले आणि जीतनराम मांझी यांच्या सरकारमधे मंत्री झाले. मांझी यांना हटवून नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा मात्र सम्राट यांना मंत्रीपद गमवावे लागले.
सम्राट हे भाजपाचे पहिले मुख्यमंत्री आहेत आणि राज्यातील भाजपाचा ओबीसींचा शक्तिशाली चेहरा आहे. सन २०२९ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणूनच भाजपाने पक्षातील निष्ठावंताना बाजुला ठेऊन चार पक्ष फिरून आलेल्या आयाराम सम्राट चौधरी यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. लालू प्रसाद यादव, राबडी देवी, नीतीश कुमार यांचे गेली पस्तीस वर्षे बिहारवर वर्चस्व होते. बिहारमधे आपला मुख्यमंत्री देण्याची खेळी भाजपाने यशस्वी करून दाखवली आहे. पाच महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तारापूर मतदारसंघात मतदारांना आवाहन करताना म्हणाले होते, सम्राट चौधरी यांना प्रचंड मताधिक्यांने निवडून द्या, लवकरच तो खूप मोठा माणूस होणार आहे.
इये मराठीचिये नगरी
मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
👍 Facebook Page Follow करा
