Mumbai Calling: Decline of Marathi Identity in Shivaji Park & Mumbai’s Cultural Struggle
मुंबईत मराठीची अस्मिता फुलविण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्क मैदानावर १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली तेव्हा मुंबई तुमची, भांडी घासा आमची अशी टिंगल टवाळी अमराठी लोकांनी व बड्या माध्यमांनी केली होती. पण आज नेमकी तशीच पाळी मराठी माणसावर महाराष्ट्राच्या राजधानीत आली आहे.
डॉ. सुकृत खांडेकर
महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत मराठी माणूस सतत कमी होत आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेला ६५ वर्षे झाली. मुंबई महाराष्ट्राला सहजासहजी मिळालेली नाही. बॉम्बेचे मुंबईसुध्दा सहजासहजी झालेले नाही. त्यासाठी विधिमंडळात आणि संसदेतही मोठा संघर्ष करावा लागला आहे. मुंबईत रोजगार मिळतो म्हणून देशभरातून वर्षानुवर्षे परप्रांतीयांचे लोढे या महानगरावर आदळत आहेत. गेल्या साडेसहा दशकात राज्यावर अनेक राजकीय पक्षांची सत्ता आली पण मुंबईवर आदळणारे अमराठी भाषिकांचे लोंढे कुणाला थांबवता आले नाहीत. कोकणातसुध्दा परप्रांतीयाची संख्या गेल्या काही वर्षात लक्षणीय वाढली आहे. अशा परिस्थितीत आपल्याच मराठी भाषिक राज्यात मराठी माणसाला रोजगारासाठी, घरासाठी, शिक्षणासाठी, वैद्यकीय उपचारासाठी इकडून तिकडे धावावे लागत असेल तर ते दुर्दैव म्हणावे लागेल.
गिरगाव, दादर, परळ, लालबाग, वरळी, माहीम, भायखळा, चिंचपोकळी, करीरोड, ग्रँट रोड, चर्नी रोड, कुलाबा हा दक्षिण मुंबईतला परिसर पंचवीस वर्षापूर्वीपर्यत मराठी लोकांनी गजबजलेला असायचा. आता सर्वत्र उत्तुंग टॉवर्सचा विळखा पडलेला दिसतो. तीस-चाळीस मजली टॉवर्समधे मराठी लोक किती राहतात हे शोधावे लागते किंवा त्यांचे प्रमाण अतिशय अल्प सापडते. मात्र उत्तुंग इमारतीत बहुसंख्य आलिशान फ्ल’टवर झाडू पोचा, धुणी भांडी , स्वयंपाक पाणी करणाऱ्या माता भगिनी आणि नोकर चाकर मात्र मराठीच सापडतील. मुंबईत मराठीची अस्मिता फुलविण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्क मैदानावर १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली तेव्हा मुंबई तुमची, भांडी घासा आमची अशी टिंगल टवाळी अमराठी लोकांनी व बड्या माध्यमांनी केली होती. पण आज नेमकी तशीच पाळी मराठी माणसावर महाराष्ट्राच्या राजधानीत आली आहे. केवळ व्होट बँक राजकारण करणाऱ्यांना राजकीय नेत्यांना मराठी- मराठी केलेले आवडत नाही. निवडणुकीच्या राजकारणात त्यांची मराठीपेक्षा अमराठी मतदारांवर जास्त भिस्त असते. कारण मुंबईत अमराठी मतदारांची संख्या कितीतरी जास्त आहे. मुंबई घरांची किमती कोटी कोटीवर गेल्याने लक्षावधीच्या संख्येने मराठी माणूस गेल्या दोन अडिच दशकात वसई विरार, नालासापारा, पालघर, नेरूळ, पनवेल, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, बेलापूर, खारघर, आसनगाव, टिटवाळाकडे सरकला आहे. हीच वस्तुस्थिती अभिनेते महेश मांजरेकर यांच्या एका भाषणातून व्यक्त झाली आहे.
शिवाजी पार्कवरही मराठी माणूस उरला नाही, अशी खंत महेश मांजरेकर यांनी व्यक्त करत मुंबईतील मराठी टक्का कमी होतो आहे याकडे लक्ष वेधले आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मुलुंड शाखेचा ११ वर्धापन दिन नुकताच साजरा झाला. या कार्यक्रमात लेखक दिग्दर्शक गजेंद्र अहिरे व अभिनेत्री अंजली वळसणकर यांना कमल शेडगे रंगकर्मी पुरस्कार देण्यात आला. मुंबईतील मराठी टक्का कमी होत असून जे काही मराठीपण शिल्लक आहे ते पुणे व मुलुंडमधे शिल्लक आहे असे मत महेश मांजरेकर यांनी व्यक्त केले. शिवाजी पार्क म्हणजे मराठी माणसाचा गड म्हणून ओळखला जातो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सर्वाधिक विक्रमी सभा शिवाजी पार्क मैदनावरच झाल्या. ते नेहमी या मैदानाचा उल्लेख शिवतीर्थ असाच करीत असत. उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांचे तर शिवाजी पार्कशी ऋणानुबंध आहेत. शिवाजी पार्क ही मराठी माणसाची शान आहे. मराठी खेळाडू, कलाकार व राजकीय नेत्यांचे शिवाजी पार्कशी आपुलकीचे नाते जडलेले आहे, पण उत्तुंग टॉवर्स व व्यापारीकरणाने शिवाजी पार्कचा चेहरा विलक्षण बदलला आहे, महेश मांजरेकरांनी मराठी माणसाची वेदना व्यक्त केली आहे.
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…
मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…
वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…
हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…
विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.…
स्नेहलता मारुती पाटील सन्मानार्थ पुरोगामी सामाजिक, सांस्कृतिक फाऊंडेशन द्वारा आयोजित २रे स्त्रीवादी साहित्य संमेलन यामध्ये…