📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 19, 2026
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

‘माती मागतेय पेनकिलर’ : मातीच्या वेदनेचा एक हृदयस्पर्शी आलेख

‘माती मागतेय पेनकिलर’ या कवी सागर जाधव जोपुळकर यांच्या कवितासंग्रहाच्या परीक्षणाचे प्रतिनिधित्व करणारे मुखपृष्ठात्मक चित्र.
शेती, शेतकरी आणि मातीच्या वेदनांना शब्दरूप देणारी कविता जेव्हा वास्तवाचा आरसा बनते, तेव्हा ती केवळ साहित्य राहत नाही, तर काळाचा दस्तऐवज ठरते. कवी सागर जाधव जोपुळकर यांच्या 'माती मागतेय पेनकिलर' या कवितासंग्रहाचा डॉ. नारायण शिवशेट्टे यांनी केलेला अभ्यासपूर्ण वेध, कृषीसंस्कृतीतील आक्रोश, सामाजिक वास्तव आणि संवेदनशील काव्यदृष्टीचा हृदयस्पर्शी मागोवा घेतो. मातीच्या वेदनेपासून माणसाच्या अस्तित्वापर्यंतचा हा प्रवास मराठी कवितेच्या नव्या जाणिवांचा अर्थ उलगडून दाखवतो.

डॉ. नारायण शिवशेट्टे
मराठी विभाग, पानसरे महाविद्यालय अर्जापूर, ता. बिलोली जि. नांदेड.
मो.नं.९४२२५५८५७३ narayanshivshette@gmail.com

मराठी वाङ्मयात कविता हा प्रकार अलीकडे विपुल प्रमाणात लिहिला जात आहे,ही भाषेच्या विकासाच्या आणि समृद्धीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची घटना आहे.अभिव्यक्त होणे हे मानवी प्रज्ञेचे एक विशेष लक्षण असून,ही अभिव्यक्ती ललित कलानुरूप सतत बदलत असते – कधी चित्रातून, कधी शब्दातून, कधी स्वरातून, तर कधी नृत्यातून, अभिनयातून किंवा शिल्पाच्या माध्यमातून ती आविष्कृत होते. आजचे काव्यलेखन पाहून मराठीच्या भवितव्याविषयी मनात आशादायी चित्र निर्माण होते, आणि याची प्रचिती नवोदित कवी सागर जाधव जोपुळकर यांच्या ‘माती मागतेय पेनकिलर’ या कवितासंग्रहातून येते.

कवी सागर जाधव जोपुळकर यांचा ‘माती मागतेय पेनकिलर’ हा पहिलाच कवितासंग्रह असून,या संग्रहास महाराष्ट्रातील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.त्यापैकी कोपरगाव येथील ‘भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार’ विशेष उल्लेखनीय आहे. जळगाव येथील अथर्व पब्लिकेशनने २०२४ मध्ये प्रकाशित केलेला हा संग्रह, अरविंद शेलार यांच्या कवितेला साजेसे मुखपृष्ठ आकर्षक बनला आहे. नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागाचे प्राध्यापक डॉ. पी. विठ्ठल यांनी या संग्रहाची अतिशय मार्मिक शब्दांत पाठराखण केली आहे, ही देखील एक जमेची बाजू आहे.

कवी सागर जाधव यांचा जन्म ९ मे १९९२ रोजी चांदवड, जिल्हा नाशिक येथील एका व्यावसायिक शेतकरी कुटुंबात झाला. कृषी विक्री केंद्र हे त्यांचे व्यवसायाचे मुख्य ठिकाण असून, त्यांचे मातीशी घट्ट नाते आहे. ग्रामीण जीवन, शेतकरी, माती आणि माणसांचा संघर्ष हा त्यांच्या कवितांचा मुख्य गाभा आहे. ‘चांदवडी रुपया साहित्य कला रसिक मंडळा’चे ते एक कार्यकारी पदाधिकारी आहेत.

मातीशी जुळलेले नाते आणि सामाजिक भान

या कवितासंग्रहातील बहुतांश कविता मातीशी अलौकिक नाते सांगणाऱ्या, ते जपणाऱ्या आणि सामाजिक आशयाच्या आहेत. त्यांच्या कवितांचा आविष्कार म्हणजे ओल्या मातीतून रुजणारे डेरेदार कोंबच जणू. रुजणाऱ्या कोंबाबरोबर सुगंधी अक्षरफुलेच पानोपानी उमललेली आहेत. कवी सागर जाधव यांची लेखनशैली मनाला आल्हाददायक साद घालणारी आहे. प्रत्येक कविता ही संवेदनशील कवीमनाची आखीव-रेखीव कोरीव शब्दशिल्प आहे. संग्रहातील कवितांचे परिचयात्मक विश्लेषण करताना लेखणी मंत्रमुग्ध होते, पण त्यांची प्रतिबिंब जशीच्या तशी उमटवताना मनाची घालमेलही होते.
या कवितासंग्रहात एकूण पाच विभाग आहेत, ज्यांना अतिशय नावीन्यपूर्ण शीर्षके दिली आहेत:
१. ह्युमिकशिवाय वाढत नाहीत मुळ्या (कविता क्रमांक १ ते २१)
२. वाऱ्यावर फडफडणारा रंगीत झेंडा (कविता क्रमांक २२ ते ३६)
३. स्वतःवर फॉस्फेटचा स्प्रे मारून घेताना (कविता क्रमांक ३३ ते ५५)
४. हृदयावर कोरून ठेवलेल्या सजीव लेण्या (कविता क्रमांक ५६ ते ६२)
५. शून्यातून वजा झाल्यावर उरलेली इन्फिनीटी (कविता क्रमांक ६३ ते ६८)
या पाचही विभागांच्या सुरुवातीला एक-एक अभंगाचे कडवे दिले आहे,जे आतील भागातील आशयाची आणि कवितेच्या घरंदाजपणाची जाणीव करून देते. एखाद्या सुसंस्कृत घरात शिरताना दारावर टांगलेले आकर्षक तोरण जसे आपले हसतमुखाने स्वागत करते,तसेच हे अभंगाचे चार ओळींचे कडवे वाचकाला आतील कवितेच्या खोलीची कल्पना देते.

पहिल्या भागातील मुक्तछंद रचना, तीन अभंग आणि दोन अष्टाक्षरी रचना मायमातीचे आंतरिक दुःख, वेदना आणि घुसमट अतिशय स्पष्ट आणि जोरकसपणे मांडतात. बहुतांश कविता वाचकाला अस्वस्थ करणाऱ्या भावगर्भ कविता आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या विभागातील कविता कवीच्या भवतालातील सामाजिक जाणीवांसह, सर्व काही असूनही काहीतरी हरवल्याची खंत आणि सल अतिशय दर्जेदार शब्दकळा लेवून वाचकाच्या काळजाचा ठाव घेतात. प्रत्येक कवितेचे शीर्षक इतके आकर्षक आहे की वाचकाला पूर्ण कविता वाचणे भागच पडते. तसेच यातील प्रत्येक कविता वाचकाला काहीतरी नवीन गवसल्याचे आणि ‘माझे दुःख, माझ्या वेदना कोणीतरी शब्दबद्ध करून वाचकांसमोर आणल्या’चे एक वेगळेच समाधान मिळवून देते. ही कविता थेट काळजाला भिडणारी आहे.पुढील चौथ्या व पाचव्या विभागातील कविता, त्यातील अभंग रचना या सामाजिक व्यंगांवर आघात करणाऱ्या, तसेच वाचकाला वास्तवतेचे वस्तुनिष्ठ दर्शन घडवणाऱ्या आणि विचार करायला लावणाऱ्या आहेत. सोबतच नश्वरतेची जाणीव करून देणाऱ्या देखील आहेत. ज्यांना नव्या जाणिवेची कविता कशी असते, कृषी संस्कृतीचे खरे, वास्तव रूप व भविष्य काय आहे हे जाणून घ्यायचे असेल, त्यांनी पर्याय नसलेल्या शून्यराव भनंगपूरकर यांच्या नजरेतून हा कवितासंग्रह जरूर वाचला पाहिजे. एका शून्याचे भावविश्व या कवितांमधून अनुभवले पाहिजे.

‘माती मागतेय पेनकिलर’ या कवितासंग्रहाचे खास वैशिष्ट्य म्हणजे कृषी संस्कृती आणि कृषीवल जाणिवा, त्यांचे वास्तविक व सद्यस्थितीतील भयाण स्वरूप वाचकांसमोर मांडताना मातृभाषेबरोबरच इंग्रजी भाषेतील जशाच्या तशा शब्दांचा कवीने आणि कवितेने स्वीकार केला आहे. वाचकही ते अंगवळणी पडल्यासारखे सहज स्वीकारतो, कारण ती काळाची गरज आहे, कवितेची मागणी आहे.

अंकुरणाऱ्या कोंबाला अन् तुकोबांच्या गाथेला अर्पण केलेला कवी सागर जाधव जोपुळकर यांचा ‘माती मागतेय पेनकिलर’ हा काव्यसंग्रह म्हणजे शेतकऱ्यांच्या आयुष्यातील रात्रंदिन संघर्षाचा एक जिवंत आलेख आहे. मुक्तछंद, अष्टाक्षरी आणि अभंग वृत्तात साकारलेल्या या कविता केवळ मातीच्या वेदना मांडत नाहीत, तर संपूर्ण प्रकृतीचा आणि कुणब्याचा आक्रोश शब्दांकित करतात.निर्यात बंदी, कांदा चाळ आणि बँकांकडे गहाण राहिलेली डोरली अशा दाहक वास्तवाला कवी विठुरायासमोर परखडपणे मांडतो. विशेष म्हणजे, यात मातीच्या वेदनेची सांगड स्त्रीच्या वेदनेशी घातली गेली असून, कवीची संवेदनशीलता स्त्री-जाणिवांच्या शक्तिपीठाभोवती प्रदक्षिणा घालताना दिसते.

कविता म्हणजे केवळ ‘कल्पनांच्या मोहक पाकळ्यांचा पसारा’ न राहता गावगाडा, राजकारण आणि वास्तवतेच्या परिघातून जाणारी एक धगधगती जाणीव आहे. ‘देणं’ सारख्या कवितांमधून येणारी हतबलता काळजाला हात घालते. कल्पनेपेक्षा वास्तवाच्या अधिक जवळ जाणारा आणि स्थानिक प्रश्नांना वैश्विक परिमाण देणारा हा संग्रह आधुनिक मराठी काव्यप्रांतातील एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे.

मातीची वेदना, शेतकऱ्याचा आक्रोश

जमिनीशी जुळलेल्या माणसाला शेतीमातीची आंतरिक वेदना माहीत असते, कारण तो तिच्या वेदनेच्या मुळाशी जगलेला असतो. माणूस ग्रामीण असो वा शहरी, त्याची मुळे मातीशी जुळलेली असतात. देश कितीही प्रगत झाला तरी जोवर शेतीप्रधान संस्कृती आहे, तोवर शेतीच्या आधारावरच माणसाची प्रगती अवलंबून आहे, हे शाश्वत सत्य आहे. कारण शेती अनेक उत्पन्न देते. शेतीमातीची वेदना जगणारा माणूस म्हणजे शेतकरी आणि ती वेदना आपल्या शब्दातून उजागर करणारा माणूस हा कवी. शेतीमातीची वेदना कवितेतून प्रकर्षाने येणे हे तितकेच आवश्यक आहे. शेतीमातीची ठसठशीत वेदना मातीशी नाळ असणारे युवा संवेदनशील कवी सागर जाधव जोपुळकर यांच्या ‘माती मागतेय पेनकिलर’ या कवितासंग्रहात दडलेली आहे. सरळ सरळ माती आपल्या वेदनेने कण्हत आहे, तिला दुखण्याचे औषध हवे आहे. माणसाचे जसे दुखणे असते तसे शेतीमातीचेही दुखणे असते ही प्रतिमा भारी आहे. माणसांच्या अस्वस्थतेप्रमाणे मातीच्या वेदनेची अस्वस्थता सागर जाधव जोपुळकर यांच्या कवितेत दिसून येते.
कवी शेतकऱ्याच्या जीवनातील विदारक सत्य मांडतो:
“उगवलं तसं पिकतय
पिकलं तसं विकतय
हातातला रुपया
पडत चाललाय गहाण
बैल विकला गाय विकली गाभण
अन् ठेवलय तारण कुरणाचं रान” (पृ.१४)

शेती करणे साधे काम नाही. शेतीत जीव ओतावा लागतो. जीव ओतता ओतता शेतकऱ्याचा जीवही जातो. शेतीसाठी घ्यावे लागणारे कर्ज शरीरापेक्षा जड व्हायला लागते, तेव्हा शेती नको करावीशी वाटते. शेतात पीक पिकते तेव्हा शेतकऱ्याचा आनंद न मावणारा असतो, पण कर्जात बुडालेल्या शेतकऱ्याचा आनंद काही वेळातच हिरावला जातो आणि त्याच्या वाट्याला केवळ नैराश्य येते. त्यावेळी शेतकऱ्याला अनेक सल्ले येतात – शेती विकावी, तिथे प्लॉट पाडावा, बाप-दादांच्या मुडद्यावर. मग कशासाठी पेरण्या कराव्या लागतील, कशाला वखर चालावा लागेल, वावरात मोठे नगर उभारून शेतकऱ्याला मोकळा श्वास घेता येईल आणि कॉलनीला आपले नावही लावता येईल. ही शेतकऱ्याची कैफियत मांडणारे सत्य सागर जाधव जोपुळकर यांच्या पहिल्याच कवितेत येते.

दुष्काळ, पावसाची अनिश्चितता आणि त्याचे शेतकऱ्याच्या जीवनावर होणारे परिणाम कवी अत्यंत प्रभावीपणे मांडतो:

“दुष्काळानं गाठली सीमा
वावर पडले उघडे
झाले खायचे वांदे
भुईचे केले तुकडे” (पृ.१७)

शेती ही पावसाच्या भरवशावर केला जाणारा जुगार आहे. कधी पाऊस बरसला तर एवढा की त्याला थांब म्हणून म्हणावे लागत नाही आणि कधी कितीही आर्जवे केली, कोंबडे-बकरे कापले तरी पाऊस येण्याचे नावही घेत नाही. कारण पावसाला ऐकू येत नाही. जर पावसाला ऐकू आले असते तर शेतकरी दुष्काळग्रस्त कधीच राहिला नसता, कधीही त्याला कुठले कर्ज घ्यावे लागले नसते, कुठलेच वावर उघडे पडले नसते, वावराला वाली उरला असता, खायचे वांदे झाले नसते, कधीच भुईचे तुकडे झाले नसते. शेतकऱ्याची अस्वस्थता केव्हाच कुठल्या शेतकऱ्याला मांडावी लागली नसती.

शेतीसाठी काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्याकडे बचत म्हणून शेवटी काही शिल्लक राहत नाही. इतका तो रिकामा होत जातो. शेतीच्या जुगारात त्याने लावलेला विश्वास पाण्यासारखा दिवसेंदिवस विरत जातो. तो हार मानत नाही, तो खचत नाही, न थकणारा शेतकरी असला तरी तो शेवटी माणूस आहे. त्याला आपली वेदना आहे, दुखणे आहे. हे दुखणे तो रोजच जगत आहे. हे दुखणे त्याची ताकद बनलेली आहे. शेतीसोबतच त्याला आपले घर चालवायचे आहे. हातावर मोजण्याइतपत त्याच्याकडे पैसे उरतात. त्यातून त्याला हंबरणाऱ्या गुरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करायची आहे, शेतीसाठी बी-बियाणे, फवारणीसाठी खत असो किंवा विहिरीच्या ओल्याव्यासाठी मोटर पंप बसवणे असो, या सर्वांचे देणे-घेणे करून त्याला त्याच्या खाण्यासाठी बचत करायची आहे. एवढा आटापिटा शेतकऱ्याला करावा लागतो.

“हंबरणाऱ्या गुरांचे
गर्भार मातीचे
कोरड्याठाक विहिरींचे
अन् बंद वीज तारांचे
अशी सगळ्यांचीच देणं पार करून
हाती राहिलेत अवघे एकशे साठ रुपये
इंडरेलचा डबा घेण्याइतपत” (पृ.२५)

शेतात पीक पिकवणे आता सोपे राहिले नाही. काळ जसा बदलतोय तसा निसर्गाचा स्वभाव बदलतोय. या स्वभावाच्या भरवश्यावर उभे असलेले सारे आयुष्यपण शेतकरी लावतो. हे आयुष्यपण त्याला खूप शिकवते. पण पिकले ते विकले याचे समायोजन शेतकऱ्याला जमले तरच त्याची मेहनत फळाला येईल, नाहीतर हे न जमणारे समायोजन त्याच्या बायकोपोरांसाठी भविष्य अंधारात ढकलण्यासारखे आहे. निसर्गाच्या चक्रीवादळात पावसासह ओली माती वाहून जाताना डोळ्यात उरते ते दुष्काळात वाहून गेलेली शेती आणि दाटून आलेले पाणी. मातीमध्ये आयुष्यभर शेतकरी राबत असतो, सांधत असतो. कारण तो दुवा असतो शेतीमातीचा.
“जमलं नाही बापाला
नफ्याचं समायोजन करणं
तरीही बाप सांधत असतो
काळ्या मातीच्या भेगांमधले
नफ्या तोट्याचे दुवे” (पृ.२९)
किंवा
अंगावरच्या हिरव्या अवयवातून
उगळून पाहतेय ती
स्वतःचं मरण पण
तिचं गर्भार असणंच पुरावा आहे
माती जिवंत असल्याचा.(पृ.३१)
ही माती जिवंत असल्याचे वास्तव चित्रण कवीने अधोरेखित केले आहे.

सामाजिक वास्तवाचे भेदक चित्रण

कवी केवळ शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरच थांबत नाही, तर सामाजिक वास्तवाचेही भेदक चित्रण करतो. डिजिटल युगातील आव्हाने आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तो संवेदनशीलतेने मांडतो:
“वासनाने भरलेल्या
डिजिटल कॅमेऱ्याच्या भीतीने
बदलून घेतलाय तिने
स्वतःचा वॉलपेपर” (पृ.६४)
किंवा

“ती फक्त आतल्या आत
स्वतःला डायल करते
आणि ऐकत असते
‘इस मार्ग की सभी लाइने व्यस्त है'” (पृ.६४)

सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामध्ये किती खरे डिजिटल जग आणि किती खोटे डिजिटल जग हा फरक आपल्याला स्वतःला शोधावा लागतो. समोर येणारा काळ हा आव्हानांचा आहे. कोण कुठली वासनांध नजर ठेवून असेल हे सांगताना येणारा काळ भीतीदायक तर नसेल ना, असे कवी सुचवू पाहतो. साधा व्हॉट्सॲप प्रोफाइल डीपी एखाद्या मुलीने बदलला तर येणारे अनेक ‘ब्युटीफुल डीपी’चे मेसेजेस कित्येक मुलींच्या मनात भीती निर्माण करतात. न राहून मुलींना ‘नो प्रोफाइल डीपी’ ठेवावा लागतो. कुणाची नजर आपल्याकडे असू नये यासाठी ती एकांत जगण्यासाठी स्वतःला व्यस्त करून घेत असते. ‘माणूसपणाचं खुजेपणा’ या कवितेतून कवीने माणसा माणसातील दुरावा याचा शोध घेतला आहे. माणसाने आपले विश्व स्वतः पुरतेच मर्यादित केले आहे. कवी लिहितात ,
‘आता मी झोंबलं पाहिजे
जुन्या जखमांना रक्ताळले पाहिजे
म्हणजे पुन्हा येणार नाहीत फुटवा
चांगुलपणाचा
अन् बोन्साय ठेवता येईल
मला माझ्यातल्या
माणूसपणाचे खुजेपण!’ (पृ.७६)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे आजच्या काळात होणारे विडंबनही कवीला अस्वस्थ करते:
“असंही तुझा मावळा
तरी कुठं उरलाय
तो झालाय स्वतःच
कपाळावर भगवा अन्
फेसबुकवर हॅशटॅग लावून राजं!” (पृ. ९५)
किंवा
“पण आहे गरज तुझ्या
महाराष्ट्र धर्म पाळणाऱ्या विचारांची” (पृ.९७)
किंवा
“तू दिसला ज्योतिबाला कुळवाडी भूषण
लिहिली भिमाने राज्यघटना तुझ्या स्वराज्याच्या प्रेरणेने
सार्थ ठरला ‘छत्रपती’ तुझ्या वारशाला ‘शाहू’
असे अनंत आहेत शिवराया
शाहू-फुले-आंबेडकर नावाने
तुझे बलशाली बाहू” (पृ.९७)

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे विचार सर्वदूर आहेत. त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालणे म्हणजे आयुष्य खऱ्या अर्थाने जगणे आहे. असा राजा यांचा आदर्श प्रत्येक जण आपल्या काळजात नोंद करून घेतो, पण तो आदर्श केवळ फॅशनपुरता मर्यादित राहत असल्याचे सोशल मीडियातून दिसून येते. कपाळावर नुसते चंद्रकोर लावून, छत्रपती शिवाजी महाराजांचा गेटअप-ड्रेस लावून कुणी छत्रपती शिवाजी महाराज बनत नाही. तर त्यांचे विचार आपल्यात अंमलात आणून महाराष्ट्र धर्म हाच खरा मानव धर्म आहे हे पालन करणे हेच सोयीचे आहे.

कवी सर्जनशील विचार करणारा असतो, तो सृजनाची निर्मिती करणारा असतो. त्याच्या शब्दातून उद्याच्या आशेची नवी किरणे तो मागत असतो. सागर जाधव जोपुळकर यांची कविता आशादायी आहे. प्रतीके-प्रतिमा यांचा योग्य तिथे वापर झालेला दिसतो. कवितेने मातीसाठी पेनकिलर होणे हे स्वीकारार्ह आहे. माती, शेती, शेतकऱ्याचे प्रश्न, बी-बियाणे, गायब होत चाललेल्या मुली, बाप, आंदोलन, मुकमोर्चा, नॉट रिचेबल असणाऱ्या मुली, गुरुजींनी शिकवलेले ए फॉर ॲसिड, महामानवांचे समता विचार, कवितेचे महत्त्व हे सर्व सागर जाधव जोपुळकर यांच्या कवितेत येतात. सागर जाधव जोपुळकर यांची कविता मातीचे प्रश्न मांडणारी आहे, अस्वस्थ करणारी आहे, शेतकऱ्याची दशा आणि दिशा सांगणारी आहे. एकूणच कविता मातीच्या वेदनेची मुळे शोधणारी कविता आहे.

शेतकरी माणूस केवळ राबणारा हात नाही तर तो आपल्या कळ्या मातीचा ‘मराठी आवाज’ आहे पण आज हीच माती रडते तिला वेदना होत आहेत. तिला आता औषधांची – पेनकिलरची गरज पडते. ‘ माती मागतेय पेनकिलर’ हा केवळ कवितांचा संग्रह नाही तर आधुनिक शेती आणि माणसांच्या संघर्षाचा एक प्रखर क्ष- किरण आहे. यातल्या कविता म्हणजे कांदा चाळ, निर्यात बंदी आणि बँकाकडे गहाण पडलेल्या बापाच्या डोळ्यातलं पाणी आहे. ही कविता केवळ कल्पनेच्या पाकळ्या रमत नाही तर ती थेट काळजाला हात घालते. हा कवितासंग्रह आजच्या काळाचा दाहक दस्ताऐवज आहे. ‘माती मागतेय पेनकिलर’ एक अस्सल ग्लोबल आणि मातीशी नाळ जोडणारा प्रवास आहे.

कवितासंग्रह : माती मागतेय पेनकिलर
कवी ः सागर जाधव जोपुळकर
प्रकाशकअथर्व पब्लिकेशन, जळगाव
किंमत ः १९५ रुपये

Related posts

वेदनेची गाथाः पाय आणि वाटा

हातमाग कुटिरोद्योगाची स्थिती

संक्रांतीपासून मान्सून बाहेर व थंडी आत

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!