भारताच्या चिंतेचा कॅनव्हास ‘इप्सॉस’ (Ipsos) या आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व्हेक्षण संस्थेने जून २०२६ मध्ये प्रसिद्ध केलेल्या ‘व्हॉट वरीज द वर्ल्ड’ या ताज्या अहवालाने हाच विरोधाभास समोर आणला आहे. ३० देशांमधील २२ हजारांहून अधिक लोकांचे मत आजमावल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. जगाला महागाई आणि गुन्हेगारीचा फटका बसतोय, तर भारतात मात्र ‘बेरोजगारी आणि भ्रष्टाचार’ या दोन मुद्द्यांनी सामान्य माणसाची झोप उडवली आहे. यावरच प्रकाश टाकणारा हा लेख... डॉ. रिता मदनलाल शेटीया, लेखिका अर्थशास्त्र विषयाच्या सहायक प्राध्यापिका आहेत.
जगाचा गाडा वेगाने पुढे पळतोय.तंत्रज्ञान रोज बदलतंय,जीवनशैली उंचावतेय,तरीही सामान्य माणसाच्या मनातली भीती आणि काळजी काही कमी झालेली नाही.पण एक रंजक गोष्ट म्हणजे,संपूर्ण जग ज्या गोष्टींनी चिंतेत आहे,भारताची चिंता मात्र त्यापेक्षा भलतीच वेगळी आहे.
भारतापुढील ४ मोठी आव्हाने:
जागतिक सरासरीचा विचार केला,तर भारतीय नागरिकांच्या मनातील भीतीची कारणे अगदी वेगळी आणि स्पष्ट आहेत:
१. हाताला काम कधी मिळणार? (बेरोजगारी – ४६%):
शहरी भागातील तब्बल ४६ टक्के भारतीयांसाठी बेरोजगारी हा देशापुढील सर्वात मोठा यक्षप्रश्न आहे. जागतिक पातळीवर हेच प्रमाण अवघे २९ टक्के आहे. हातात पदवीची कागदपत्रे असूनही योग्य दर्जाचा रोजगार न मिळणे, ही आजच्या तरुण पिढीची सर्वात मोठी खंत आहे.
२. कारभारातला ‘झोल’ आणि लाचखोरी (भ्रष्टाचार – ३४%):
भारतातील ३४ टक्के नागरिक आजच्या घडीला भ्रष्टाचाराने त्रस्त आहेत. जागतिक स्तरावर हा आकडा २८ टक्के आहे. प्रशासकीय कामांमधील पारदर्शकतेचा अभाव आणि पावलोपावली मोजावी लागणारी किंमत सामान्य माणसाला वैताग आणणारी ठरत आहे.
३. शिक्षणाचा दर्जा अन् वाढता खर्च (२२%):
भारतात शिक्षणाचा वाढता खर्च आणि रोजगाराशी नसलेला त्याचा थेट संबंध, यामुळे २२ टक्के लोक चिंतेत आहेत (जागतिक प्रमाण: १४%). केवळ पुस्तकी ज्ञान देण्याऐवजी मुलांना प्रत्यक्ष कामाचे शिक्षण मिळावे, अशी पालकांची अपेक्षा आहे.
४. निसर्गाचा कोप आणि प्रदूषण (हवामान बदल – २१%):
अनियमित पाऊस, असह्य उन्हाळा आणि वाढत्या प्रदूषणाचा शेती व आरोग्यावर होणारा परिणाम भारतीयांना स्पष्ट दिसतोय. म्हणूनच जागतिक सरासरीच्या (१३%) तुलनेत तब्बल २१ टक्के भारतीय हवामान बदलाबाबत कमालीचे चिंतित आहेत.
जग कशाने त्रस्त आहे?
भारताचे चित्र एकीकडे असताना, उर्वरित जगातील परिस्थिती मात्र वेगळी आहे. जागतिक स्तरावर गुन्हेगारी व हिंसाचार (३२%), वाढती महागाई (३२%) आणि गरिबी व सामाजिक विषमता (२९%) हे तीन मुद्दे अव्वल स्थानी आहेत. सायबर गुन्हे, गँग वॉर, इंधन-अन्नधान्याचे भडकलेले भाव आणि श्रीमंत-गरीब यांच्यातील वाढती दरी यामुळे जगातील बहुतांश देश होरपळून निघत आहेत. भारतात मात्र या तिन्ही समस्या जागतिक सरासरीच्या तुलनेत थोड्या कमी तीव्रतेने जाणवत आहेत.
काय आहेत उपाय?
या अहवालाने देशाच्या धोरणकर्त्यांसमोर एक उघडा आरसा धरला आहे. भारताला जर खरोखरच आर्थिक महासत्ता बनायचे असेल, तर खालील आघाड्यांवर तातडीने काम करावे लागेल.
- रोजगाराचे चित्र कसे बदलावायचे?
केवळ पदव्या वाटण्याऐवजी महाविद्यालयांमध्येच उद्योगांना लागणारे व्यावहारिक आणि डिजिटल कौशल्य शिकवणे गरजेचे आहे. लहान-मध्यम उद्योगांना (MSME) जाचक अटींमधून मुक्त करून सुलभ कर्ज दिल्यास स्थानिक पातळीवर रोजगाराचा मोठा विस्तार होऊ शकतो. तसेच, सर्व संधी केवळ बड्या शहरांत न ठेवता लहान शहरांमध्ये स्टार्टअप्सचे जाळे विणायला हवे. - भ्रष्टाचारावर ‘डिजिटल’ प्रहार:
सरकारी सेवा पूर्णपणे ऑनलाईन आणि ‘फेसलेस’ केल्या, तर लाचखोरीला आपोआप पायबंद बसेल. याशिवाय, भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणाऱ्या सामान्य माणसाला संरक्षण देणारी तक्रार निवारण यंत्रणा अधिक मजबूत करायला हवी. - शिक्षण व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलणे:
खासगी शाळा-कॉलेजांच्या अवाजवी फीवर नियंत्रण आणायचे असेल, तर सरकारी शिक्षण संस्थांचा पायाभूत आणि शैक्षणिक दर्जा सुधारावाच लागेल. पारंपरिक अभ्यासक्रमाला फाटा देऊन कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), कोडिंग आणि आधुनिक शेती-तंत्रज्ञानाचा शालेय स्तरापासूनच समावेश करायला हवा. - पर्यावरणाचा तोल सांभाळणे:
सौर ऊर्जा, ई-वाहने आणि वृक्षारोपण यांना कागदावरून काढून लोकांची रोजची सवय बनवावे लागेल. शहरांमधील कचरा आणि सांडपाण्याचे नियोजन वेळेत केले नाही, तर भविष्यातील आरोग्यसंकट भीषण असेल.
जग काय करू शकते?:
जागतिक स्तरावरील गुन्हेगारी व महागाई रोखण्यासाठी देशांमधील आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सायबर सुरक्षा मजबूत करावी लागेल. युद्धांमुळे विस्कळीत होणारी अन्न व इंधनाची पुरवठा साखळी सुरळीत ठेवणे आणि श्रीमंतांवर न्याय्य कर लावून तो पैसा तळागाळातील लोकांच्या शिक्षणासाठी व आरोग्यासाठी वापरणे, हाच जगापुढील शाश्वत मार्ग आहे.
‘व्हॉट वरीज द वर्ल्ड’ हा अहवाल म्हणजे केवळ आकडेवारीचा खेळ नाही, तर तो देशाच्या धोरणकर्त्यांसाठी एक धोक्याची घंटा आहे. आज भारताकडे तरुणाईची खूप मोठी ताकद आहे. पण या तरुणांच्या हाताला जर वेळेत काम, भ्रष्टाचारमुक्त वातावरण आणि दर्जात्मक शिक्षण मिळाले नाही, तर ही ताकद देशापुढील सर्वात मोठे आव्हान बनू शकते. त्यामुळे वेळेवर दिलेला हा इशारा ओळखून ठोस पावले उचलणे, हेच देशाच्या हिताचे ठरेल!
