मुक्त संवाद

कवितेचे उदंड पीक आले, पण काळाच्या चाळणीत काय टिकणार?

दुसरे राज्यस्तरीय कवी संमेलन व ‘प्रबोधिनी कविरत्न पुरस्कार–२०२६’ सोहळा रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी वर्धा येथील गाडगे बाबा स्मारक सभागृहात झाला. डॉ.राजेंद्र मुंढे या संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांनी संमेलनामध्ये केलेले अध्यक्षीय भाषण…

महाराष्ट्र साहित्य समूह, प्रबोधिनी मंच, चंद्रपूर शाखेच्या वतीने आयोजित या दुसऱ्या राज्यस्तरीय कवी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून आपल्याशी संवाद साधताना मला विशेष आनंद होत आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेले कवी-कवयित्री, त्यांचे वेगवेगळे अनुभव, वेगवेगळे प्रदेश आणि वेगवेगळे जीवनविश्व आज एका व्यासपीठावर एकत्र आले आहे. हा केवळ कवींचा मेळावा नाही; तो मराठी कवितेच्या वर्तमानाचा एक छोटासा आरसाही आहे.

आज महाराष्ट्रात कवितेचे उदंड पीक आले आहे. गावोगावी कविता लिहिली जाते आहे, शहरांत कविता लिहिली जाते आहे, तरुणाई कविता लिहिते आहे, स्त्रिया कविता लिहित आहेत, विविध सामाजिक स्तरांतून कविता पुढे येत आहे. कविता नियतकालिकांत आहे, संग्रहांत आहे, व्यासपीठांवर आहे आणि आता ती आभासी माध्यमांवरही मोठ्या प्रमाणावर व्यक्त होत आहे. कवितेची ही विपुलता निश्चितच स्वागतार्ह आहे. कारण एखाद्या समाजात कविता निर्माण होणे म्हणजे त्या समाजाच्या संवेदना अजून जिवंत आहेत, असे मानायला हरकत नाही. परंतु याच ठिकाणी एक प्रश्नही उभा राहतो— या उदंड पिकातून अक्षय काय राहणार आहे?
हा प्रश्न आजचा नाही. प्रत्येक काळात असे म्हटले गेले आहे, की कविता खूप लिहिली जाते, पण चांगली कविता कमी आहे. एका अर्थाने ही तक्रार कवितेच्या इतिहासा इतकीच जुनी आहे. कारण कोणत्याही काळात निर्माण होणाऱ्या साहित्याचा फार मोठा भाग काळाच्या ओघात मागे पडतो. काही कविता त्या क्षणापुरत्या आवडतात, काही एखाद्या कार्यक्रमात टाळ्या मिळवतात, काही एखाद्या प्रसंगापुरत्या चर्चेत राहतात; पण काळ पुढे जातो तसे त्यांची चमक कमी होत जाते.

मात्र काही कविता काळाच्या पुढेही आपला प्रकाश टिकवून ठेवतात. काळाच्या चाळणीतून शेवटी तेच टिकते, जे अस्सल असते. मराठी कवितेच्या इतिहासाकडे पाहिले तर याची अनेक उदाहरणे दिसतात. संत तुकारामांची कविता तिच्या काळापुरती राहिली नाही. तिच्यातील जीवनसत्य, आत्मपरीक्षण, सामाजिक भान आणि माणसाशी असलेली थेट नाळ आजही तिला जिवंत ठेवते. पुढे केशवसुतांनी मराठी कवितेला आधुनिकतेची चाहूल दिली. मर्ढेकरांनी कवितेच्या आशय-रचनेलाच नवे वळण दिले. कुसुमाग्रज, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ, विंदा करंदीकर अशा कवींनी आपआपल्या काळातील अस्वस्थता, संघर्ष, माणूस आणि समाज यांना स्वतंत्र स्वर दिला. त्यांच्या कविता केवळ ‘चांगल्या कविता’ म्हणून टिकल्या नाहीत; त्या आपल्या काळाशी केलेल्या सर्जनशील संवादामुळे टिकल्या. म्हणूनच अस्सल कविता म्हणजे केवळ सुंदर शब्दांची कविता नव्हे. तिच्या मागे जगलेला अनुभव असतो, जाणिवेची प्रामाणिकता असते आणि आपल्या काळाकडे पाहण्याची स्वतःची दृष्टी असते. दुसऱ्याच्या आवाजाची नक्कल करून मोठी कविता निर्माण होत नाही. कवीने आपल्या अनुभवाच्या मातीतूनच आपला आवाज शोधला पाहिजे.
आजच्या कवितेसमोर हे आव्हान अधिक मोठे आहे. कारण आपण माहितीच्या आणि शब्दांच्या प्रचंड गर्दीत जगत आहोत. एका क्षणात हजारो कविता आपल्या डोळ्यांसमोरून जातात. एखादी ओळ सोशल मीडियावर लोकप्रिय होते, एखादा शब्द व्हायरल होतो, एखाद्या कवितेला क्षणिक दाद मिळते. पण क्षणिक लोकप्रियता आणि दीर्घकालीन साहित्यिक मूल्य या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

टाळ्या म्हणजे कवितेच्या गुणवत्तेचे अंतिम प्रमाणपत्र नाही. पुरस्कार हेही अंतिम सत्य नाही. प्रसिद्धी ही तर त्याहूनही अस्थिर गोष्ट आहे. शेवटी कविता टिकवते ती तिच्यातील अंतःशक्ती.म्हणून प्रत्येक कवीने आपल्या कवितेला एक कठोर प्रश्न विचारला पाहिजे—मी हे का लिहिले? हे माझे स्वतःचे आहे का? या कवितेत माझा स्वतंत्र अनुभव आहे का? माझ्या शब्दांच्या मागे माझे जगणे उभे आहे का? आणि ही कविता माझ्यानंतरही कुणाच्या मनात थांबेल का?हा प्रश्न विचारण्याची सवय कवीला स्वतःचा पहिला समीक्षक बनवते.

कविता लिहिली म्हणजे ती कविता झालीच असे नाही. शब्दांची मांडणी, यमक, लय, प्रतिमा, भावुकता किंवा एखादी प्रभावी ओळ एवढ्यावर कविता पूर्ण होत नाही. कवितेला अंतःसंगीत लागते, पण त्याचबरोबर अर्थाची खोलीही लागते. तिच्यात अनुभवाचे तापमान लागते. कधी ती प्रश्न विचारते, कधी अस्वस्थ करते, कधी अंतर्मुख करते आणि कधी आपल्या सभोवतालच्या वास्तवाकडे नव्या डोळ्यांनी पाहायला भाग पाडते. म्हणून मला नेहमी वाटते— कवितेचा केवळ ओघ नको; तिच्यात ओज हवे. ओघातून कविता वाचली जाऊ शकते; पण ओजामुळे ती स्मरणात राहते.

आजच्या कवींसाठी ‘स्व-संपादन’ हा फार महत्त्वाचा विषय आहे. आपण कविता लिहितो, ती आपल्याला प्रिय असते. ती आपल्या अनुभवातून आलेली असल्यामुळे तिच्याशी आपले भावनिक नाते निर्माण होते. पण म्हणून प्रत्येक लिहिलेली ओळ छापलीच पाहिजे, प्रत्येक कविता संग्रहात गेलीच पाहिजे किंवा प्रत्येक कविता व्यासपीठावर वाचलीच पाहिजे, असे नाही.

कवीने स्वतःच्या कवितेवर प्रेम करावे; पण तिच्यावर दया करू नये. कधी एखादी कविता बाजूला ठेवावी लागेल, एखादी ओळ काढावी लागेल, एखादा कडवे कमी करावे लागेल, तर ते करण्याचे धैर्यही कवीकडे असले पाहिजे. कवितेवर पहिला हक्क कवीचा असला, तरी तिच्यावर पहिली कठोर नजरही कवीचीच असली पाहिजे. हा स्व-संवाद जितका प्रामाणिक, तितकी कविता अधिक सक्षम होण्याची शक्यता.

याच संदर्भात प्रस्थापित आणि नवोदित यांचे नातेही महत्त्वाचे आहे. प्रस्थापितांनी नव्या कवींना नाके मुरडू नयेत. कारण आज ज्याला आपण ‘नवा’ म्हणतो, त्याच्यात उद्याचा महत्त्वाचा कवी दडलेला असू शकतो. प्रत्येक साहित्यिक परंपरेला नवे रक्त, नवी भाषा आणि नवी दृष्टी लागते. पण त्याच वेळी नव्या कवींनीही केवळ व्यासपीठ मिळाले म्हणून समाधानी होऊ नये. व्यासपीठ हे कवितेचे अंतिम ध्येय नाही; चांगली कविता हे ध्येय आहे. आपल्याला किती वेळा बोलावले जाते यापेक्षा आपण काय लिहितो, हे अधिक महत्त्वाचे आहे.

आणि म्हणूंनच अशा छोट्या कवी संमेलनांचे महत्त्व मोठे आहे.मोठ्या साहित्यिक संस्थांच्या भव्य व्यासपीठांना आपले महत्त्व आहेच; पण कविता जिवंत ठेवण्याचे खरे काम अनेकदा अशाच छोट्या, आत्मीय व्यासपीठांवर होत असते. येथे नव्या कवीला पहिली संधी मिळते, त्याची कविता ऐकली जाते, त्याला प्रतिसाद मिळतो, त्याला आपल्या लेखनाचा विचार करण्याची प्रेरणा मिळते.

परंपरा केवळ ग्रंथांमध्ये जतन होत नाही; ती माणसांमधून पुढे जाते. आज येथे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ अशा विविध प्रदेशांतून कवी-कवयित्री आले आहेत. प्रत्येक प्रदेशाची स्वतःची भाषा, लय, जीवनानुभव आणि सामाजिक वास्तव आहे. या विविधतेतून मराठी कविता अधिक समृद्ध होते. मराठी कवितेचे खरे सामर्थ्य तिच्या एकसुरीपणात नाही; ते तिच्या बहुविध स्वरांमध्ये आहे.मात्र या बहुविधतेतही एक धागा समान असला पाहिजे—कवितेची प्रामाणिकता. कवीने आपल्या काळापासून पळून जाऊ नये. आपल्या सभोवतालचे दुःख, आनंद, संघर्ष, विसंगती, प्रेम, निसर्ग, राजकारण, बाजार, तंत्रज्ञान, बदलते नाते आणि बदलता माणूस—या सगळ्याकडे त्याने स्वतःच्या संवेदनशील नजरेने पाहिले पाहिजे. कविता वास्तवाची केवळ नोंद नसते; ती वास्तवाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न असते. म्हणूनच आजच्या या संमेलनातून मी सहभागी सर्व कवींना एकच सांगू इच्छितो—
कवितेच्या गर्दीत हरवू नका; स्वतःचा आवाज शोधा.
शब्दांच्या गर्दीत उभे राहू नका; अर्थाच्या बाजूने उभे राहा.
कवितेचा ओघ वाढविण्यापेक्षा तिच्यात ओज निर्माण करा.

आपल्यापैकी प्रत्येकाची कविता अमर होईलच असे नाही. तसे होणेही आवश्यक नाही. पण आपण लिहिलेल्या अनेक कवितांमधून एखादी कविता अशी जन्माला आली, जी आपल्या काळाचे दुःख, स्वप्न, अस्वस्थता किंवा माणुसकी आपल्या शब्दांत घेऊन पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली—तर तेच कवी म्हणून आपले मोठे यश असेल. कारण शेवटी—

कविता ही केवळ शब्दांची रचना नसते; ती काळाशी केलेली एक दीर्घ बातचीत असते. ही बातचीत अधिक खरी होऊ दे, अधिक अस्सल होऊ दे, अधिक ओजस्वी होऊ दे. या संमेलनातून अनेक कविता जन्माला येऊ देत आणि त्यांतून काही कविता काळाच्या चाळणीतून पुढे जाऊन अक्षय होऊ देत—हीच या प्रसंगी माझी मनापासूनची शुभेच्छा.

कविता लिहीत राहू या;
पण त्याहून महत्त्वाचे—
अशी कविता लिहू या, जी काळाला थांबवून आपल्याशी बोलायला भाग पाडेल. धन्यवाद!

डॉ. राजेंद्र मुंढे,
आर्वीनाका, ज्ञानेश्वरनगर वार्ड ९, वर्धा . ४४२००१ चलभाष : ९४२२१४००४९
Email – rajendramundhe004@gmail.com

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

अन्न वाचवायचे की प्लास्टिक? दोन्ही समस्यांवर बायो-फिल्म्स देणार का उत्तर? Biofilms For Plastic Free Packaging

अन्न उद्योगातील हरित क्रांती: प्लास्टिकमुक्त पॅकेजिंगसाठी 'बायो-फिल्म्स' आणि 'स्मार्ट इंडिकेटर्स'चा वापर अन्न ताजे आहे की…

12 minutes ago

‘माझी ईडी चौकशी’ : विनोदातून जीवनाकडे पाहण्याची प्रसन्न दृष्टी

गंभीर विषयांकडेही खेळकरपणे पाहत वाचकांच्या चेहऱ्यावर हसू फुलविणारे लेखक सुनील पांडे यांच्या ‘माझी ईडी चौकशी’…

14 hours ago

दरवाढीमागे इथेनॉल नव्हे धोरणातील विसंगती कारणीभूत ! sugar Price Rise Issue

विशेष आर्थिक लेख... सणासुदीच्या तोंडावर साखरेने ग्राहकांना अक्षरशः ‘कडू’ धक्का दिला आहे. देशातील अनेक बाजारांत…

16 hours ago

ब्रिक्स परिषदेतून सांस्कृतिक कूटनीतीचा नवा अध्याय Cultural Diplomacy and Global Cooperation: BRICS Global Impact Forum 2

सांस्कृतिक संवादातून जागतिक सहकार्याची नवी दिशा ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका म्हणजेच ‘ब्रिक्स’…

1 day ago

भूजल आटत आहे, नद्या प्रदूषित होत आहेत; भारताचे जलभविष्य काय? India water crisis sustainable water management

भारताच्या लोकसंख्येचा वाढता भार, हवामान बदलाचे परिणाम, भूजलाचा अतिरेकी उपसा आणि पाण्याचे अकार्यक्षम व्यवस्थापन यामुळे…

2 days ago

शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास अन् रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे Shivaji Maharaj: A Warrior of Extraordinary Military Strategy

शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे कादंबरीकार मेधा देशमुख भास्करन कोल्हापूर -…

2 days ago