📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 24, 2026
काय चाललयं अवतीभवती

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कार २०२६ जाहीर

Padmashri Vitthalrao Vikhe Patil Literary Awards 2026 announced. Uttam Kamble gets Lifetime Achievement Award; other writers and artists also honoured.

ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे (नाशिक)यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार,संहिता राजन (पुणे) यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार, सुरेंद्र दरेकर (पुणे) यांना पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय विशेष साहित्य पुरस्कार, निवृत्ती जोरी (संगमनेर) यांना पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा साहित्य पुरस्कार,डॉ.संजय गोर्डे (संगमनेर) यांना पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील उत्तेजनार्थ साहित्य पुरस्कार देण्यात येणार आहे.यावर्षीचा पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील समाजप्रबोधन पुरस्कार मराठी अभ्यास परिषद,पुणे या संस्थेला आणि पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय नाट्यसेवा पुरस्कार सचिन शिंदे (नाशिक) यांना,तर पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार मालती इनामदार (नारायणगाव) यांना देण्यात येणार आहे.

शिर्डी: एकात्मिक ग्रामीण विकासाचे आद्य प्रवर्तक,सहकारी साखर कारखानदारीचे जनक व सहकारी चळवळीचे अध्वर्यू पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२६ व्या जयंती निमित्त हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे (नाशिक) यांना साहित्य जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असून, रुपये एक लाख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार (रुपये ५१ हजार व स्मृतिचिन्ह) संहिता राजन (पुणे) यांच्या ‘चल गं सये वारुळाला’ या कथासंग्रहास, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय विशेष साहित्य पुरस्कार (रुपये २५ हजार व स्मृतिचिन्ह) सुरेंद्र दरेकर (पुणे) यांच्या ‘समर ऑफ सेवंटी नाईन’ या कादंबरीस, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा साहित्य पुरस्कार (रुपये १० हजार व स्मृतिचिन्ह ) निवृत्ती जोरी (संगमनेर ) यांच्या ‘खटपट’ या आत्मचरित्रात्मक कादंबरीस व पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील उत्तेजनार्थ साहित्य पुरस्कार (रुपये ५ हजार व स्मृतिचिन्ह) डॉ. संजय गोर्डे (संगमनेर) यांच्या ‘शांतीच्या शोधात’ या पुस्तकास देण्यात येणार आहे. याबरोबरच पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय समाज प्रबोधन पुरस्कार पुणे येथील ‘मराठी अभ्यास परिषदे’स (रुपये २५ हजार व स्मृतिचिन्ह),पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय नाट्यसेवा पुरस्कार (रुपये २५ हजार व स्मृतिचिन्ह) नाशिक येथील सचिन शिंदे यांना आणि तमाशा कलावंत मालती इनामदार (नारायणगाव) यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार (प्रत्येकी रुपये २५ हजार व स्मृतिचिन्ह) देण्यात येणार असल्याची माहिती डॉ.रावसाहेब कसबे यांनी दिली.

साहित्य पुरस्कार देण्याचे हे ३६ वे वर्ष असून, विश्वास पाटील (अध्यक्ष, ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा) यांच्या हस्ते व डॉ. राधाकृष्ण विखे पाटील (मंत्री- जलसंपदा, महाराष्ट्र राज्य) व खासदार डॉ. सुजय विखे पाटील (चेअरमन, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सह. साखर का. प्रवरानगर) यांचे प्रमुख उपस्थितीत पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२६ व्या जयंती दिनी (नारळी पोर्णिमा) गुरुवार दिनांक २७ ऑगस्ट २०२६ रोजी डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात या पुरस्कारांचे वितरण होणार असल्याचे समितीचे निमंत्रक डॉ. राजेंद्र सलालकर यांनी सांगितले. पुरस्कार निवड समितीचे काम डॉ. रावसाहेब कसबे (अध्यक्ष), डॉ. एकनाथ पगार, डॉ. दिलीप धोंडगे व डॉ. राजेंद्र सलालकर यांनी पाहिले.

व्रतस्थ जीवनव्रतीचा सन्मान

उत्तम कांबळे हे मराठी साहित्य आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक महत्त्वाचे नाव आहे.त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील टाकळीवाडी या छोट्याशा गावात १९५६ साली झाला.त्यांचे मूळ गाव बेळगाव मधील शिरगु्प्पी हे आहे.गावात प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी राज्यशास्त्र विषयात पदवी मिळवली. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असल्याने कंपाउंडर, बाईंडर, वर्तमानपत्र विक्रेता, हमाली, बांधकामावर आणि अन्य ठिकाणी मजुरी करीत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.शिवाजी विद्यापीठात वृत्तपत्रविद्या विभागात दोन वर्ष आणि नाशिक येथील एचपीटी महाविद्यालयात अध्यापनाचेही त्यांनी काही काळ काम केले.मात्र त्यांचा पिंड प्रामुख्याने कार्यकर्त्याचा आणि त्याला पोषक असणाऱ्या पत्रकाराचा असल्याने ते जीवनभर पत्रकारितेच्या क्षेत्रातच कार्यरत राहिले.

१९७९ मध्ये कोल्हापूरच्या दैनिक ‘समाज’ मधून त्यांनी आपल्या पत्रकारितेला प्रारंभ केला. १९८२ मध्ये ते दैनिक ‘सकाळ’मध्ये बातमीदार झाले. पुढे याच दैनिकांमध्ये सहसंपादक, संपादक, निवासी संपादक, समूह संपादक अशा महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले. आयुष्यभर शोषित, वंचित, पीडित घटकांचे दुःख समाज समोर मांडून खऱ्या अर्थाने त्यांनी या वर्गाची वकिली केली. लेखक आपल्या अभ्यासिकेत बसून लेखन करतो, मात्र पत्रकार थेट तळागाळातील जनतेत जाऊन अन् राहून समाजाचे दुःख वेशीवर टांगतो.कांबळे या दोन्ही भूमिका निभावीत राहिले. जे प्रश्न पत्रकारितेच्या चौकटीत मांडता येत नाहीत आणि जे सनातन, जटिल आणि मानवी जीवनाला कुंठीत करणारे आहे ते प्रश्न त्यांनी आपल्या साहित्यातून मांडले. त्यामध्ये ‘अस्वस्थ नायक’, ‘श्राद्ध’, ‘पन्नास टक्क्यांची ठसठस’, ‘शेवटून आला माणूस’, ‘बुद्धाचा र्हाट’, ‘मिरवणूक’, ‘कोयत्यावरच कोक’ या कादंबऱ्यांचा समावेश आहे. समाजातील दलित, पीडित घटकांच्या दुःखाला त्यांनी वाचा फोडली. ‘कथा माणसांच्या’, ‘कावळे आणि माणसं’, ‘न दिसणारी लढाई’, ‘परत्या’, ‘रंग माणसांचे’ या कथासंग्रह मधून त्यांनी नातेसंबंधातील संघर्षाची कथा चित्रित केली. प्रस्थापित व्यवस्था आणि त्यात दलितांचे होणारे शोषण कोणत्या प्रकारचे आहे याचे त्यांनी वास्तवदर्शी चित्रण केले. सकाळच्या ‘सप्तरंग’ पुरवणीत ‘फिरस्ती’ नावाचे सदर ते लिहीत. त्यातल्या निवडक २५ लेखांचे पुढे ‘उजेड अंधाराचे आभाळ’ या नावाने पुस्तक प्रसिद्ध झाले. विविध समस्यांवर मात करणाऱ्या माणसांच्या व्यक्तिरेखा त्यांनी यातून रेखाटल्या. ‘जागतिकीकरणात माझी कविता’, ‘पाचव्या बोटावर सत्य’, ‘खूप दूर पोचालोट आपण’, ‘किनाऱ्यावरचा कालपुरुष’ हे त्यांचे लक्षणीय कवितासंग्रह आहेत. ‘अखंड घालमेल’, ‘कुंभमेळ्यात भैरू’, ‘थोडंसं वेगळं’, ‘निवडणुकीत भैरू’, ‘तिरांग्यातून बाप गेला’, ‘जगण्याच्या जळत्या वाटा’, ‘पावलातून बनते वाट’, ‘संघर्ष ज्याचा त्याचा’, ‘श्वास आणि भास’, ‘एक पोकळी असतेच’, ‘काळजात धावतो ससा’, ‘खोल-खोल जगणं’, ‘आजकालचे प्रश्न’, ‘भेगाळलेल्या जखमा’ या ललित लेखनातून त्यांनी समाजाच्या विविध क्षेत्रातील व्यक्तिरेखा चित्रीत करताना आपल्या मन:पटलावरील प्रतिबिंबे शब्दांकित केली.

‘आई समजून घेताना’,‘माझी प्रयोगशील पत्रकारिता’ आणि ‘वाट तुडवताना’ हे त्यांचे आत्मकथनात्मक लेखन मराठी साहित्यात विशेष गाजले. आई समजून घेताना या पुस्तकाची तर अनेक भाषांमध्ये भाषांतरे झाली आणि त्याच्या अनेक आवृत्त्याही निघाल्या. या आत्मकथनांमधून समाजातील संघर्ष करीत जीवनाला आकार देऊ इच्छिणाऱ्या अनेक तरुणांना आपल्या आयुष्याला विधायक वळण देण्याची प्रेरणा मिळाली.

‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या: एक शोध’,‘देवदासी आणि नग्न पूजा’,‘भटक्यांचे लग्न’,‘कुंभमेळा साधूंचा की संधीसाधूंचा’,‘अनिष्ट प्रथा’,‘अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद’,‘कोरोना नंतरचे काटेरी जग’, ‘प्रथा अशी न्यारी’, ‘काळाराम मंदिर सत्याग्रह’, ‘विद्रोहातून क्रांतीकडे’ ही संशोधनपर लेखनातून त्यांनी समाजातील व्यंगावर नेमके बोट ठेवले.सांगली येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते, तर ठाणे येथे झालेल्या ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. या अनुभवावर त्यांनी ‘एका स्वागताध्यक्षाची डायरी’ आणि ‘एका अध्यक्षाची डायरी’ यामधून त्यांनी आजच्या मराठी साहित्य संमेलनाचे स्वरूप, साहित्याचे मर्म आणि उत्सवाच्या स्वरूपाविषयी सूक्ष्म निरीक्षणे नोंदविली आहे.

उत्तम कांबळे यांचे जीवन म्हणजे भारतीय समाज व्यवस्थेच्या तळातील जगणे. मात्र या तळातून उसळी मारून वर येण्यासाठी त्यांनी जो पराकोटीचा संघर्ष केला, तो वर्तमान तरुणांना प्रेरणा देणारा आहे. हा संघर्ष विषमतेविरुद्ध, प्राप्त प्रतिकूल परिस्थिती विरुद्ध, अन्यायविरुद्ध स्वतःला सिद्ध करण्याचा होता.तो त्यांनी यशस्वी केला.मात्र त्यात कुठेही कटुता दिसत नाही.संघर्ष करण्याची तीव्र इच्छाशक्ती आणि प्राप्त परिस्थितीत बदल घडवण्याची जिज्ञासा त्यातून दिसते. या संघर्षातून प्रेरणा घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि गौतम बुद्धांच्या मार्गाने जाणारी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे त्यांच्या लेखनात मानवीयतेचा सर्वत्र प्रभाव जाणवतो.

१९७९ पासून सुरू झालेला त्यांच्या पत्रकारितेचा प्रवास आणि त्या जोडीने अविरत सुरू असलेली त्यांची साहित्य सेवा आजही खंडित झालेली नाही. त्यांच्या या व्रतस्थ जीवनव्रतीचा सन्मान म्हणून त्यांना यंदाचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य सेवा जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार असल्याचे समितीचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कलात्मक लेखनशैलीला प्रेरणा

संहिता राजन या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या आजच्या आघाडीच्या तरुण नवलेखिका आहेत.जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत या क्षेत्राचा आता मराठी भाषिक समाजातही समावेश झालेला आहे. देशातील बंगळुरू, पुणे, हैदराबाद, मुंबई ही या क्षेत्राच्या प्रभावाची शहरे म्हणून आता ठळकपणाने ओळखली जातात.या शहरात आणि संगणक क्षेत्रात आता ग्रामीण भागातील तरुण अभियंते जागतिक संगणकीय परिभाषेच्या संरचनेचे काम करीत असतात. ते आधुनिक स्वरूपाची संगणकीय भाषा आणि प्रणाली निर्माण करतात.यामध्ये देशातील सर्वच भाषिक तरुण आणि तरुणींनी आपली बौद्धिक क्षमता सिद्ध केली आहे. या संगणकीय कार्यप्रणालीचे एक अतिव्यापक कार्यक्षेत्र आता अस्तित्वात आले आहे. हे जग पूर्णतः नव्या कार्यशैलीचे आणि नव्या मूल्यव्यवस्थेचे तयार होऊ लागले आहे. ते प्रामुख्याने जागतिकरणाच्या तालावर चालणारे आणि नव्या स्वैर जीवनशैलीची मागणी करणारे आहे. अशा नवख्या जगात वावरताना प्रस्थापित मूल्यवस्थेतून आलेल्या नवतरुण-तरुणींचा या नव्या मूल्यव्यवस्थेशी घनिष्ठ संपर्क सुरु झाला आहे. त्या संपर्कातून निर्माण होणाऱ्या जीवनव्यवहाराचे अत्यंत भेदक चित्रण त्यांनी आपल्या वेगवेगळ्या कथांमधून केले आहे. स्त्री संगणक अभियंत्यांच्या अस्तित्वाभोवती निर्माण झालेल्या नव्या नेपथ्याची कशा प्रकारे मांडणी होऊ लागली आहे त्याचे भेसूर चित्र त्यांनी आपल्या कथांमधून केले आहे. हे चित्र वास्तवदर्शी, भयव्याकुळ, करूण, चिंताजनक, नवखे आणि प्रस्थापित मूल्यवस्थेची मोडतोड करणारे आहे. ते एकाच वेळी स्त्रीच्या अस्तित्वाचे, स्वातंत्र्याचे, तिच्या बौद्धिक सामर्थ्याचे चित्रण आहेच; त्याचवेळी ती नव्या व्यवस्थेत कशाप्रकारे वावरताना दिसते आहे, याचेही चित्र संहिता राजन यांनी, ‘चल ग सये वारुळाला’ या संग्रहातील विविध कथांमधून केले आहे. मराठी साहित्यामध्ये एक तरुण लेखिका धीटपणाने आपले अनुभव शब्दांकित करतेच, याशिवाय ती एका नवख्या जगाचे वास्तवदर्शी चित्र मराठी भाषिकांसमोर मांडते आहे. या क्षेत्राचे जे आकर्षण वर्तमानकाळी समाजाला निर्माण झाले आहे, ते किती भ्रामक आणि चिंताजनक आणि प्रस्थापित सांस्कृतिक व्यवस्थेची मोडतोड करणारे आहे, याचीही जाणीव करून देणारे आहे, असे समितीला वाटते. त्यांच्या या कलात्मक लेखनशैलीला अधिक प्रेरणा देण्यासाठी त्यांना यंदाचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे असे डॉ. कसबे यांनी सांगितले.

‘समर ऑफ सेवंटी नाईन’चा सन्मान

सुरेंद्र दरेकर हे अर्थशास्त्राचे निवृत्त प्रोफेसर आहे.अर्थशास्त्रातील सिद्धांत अभ्यासणे आणि शिकवण्याबरोबरच हे शास्त्रीय सिद्धांत मानवी जीवनाशी कशा प्रकारे निगडित झालेले असतात याचा त्यांनी अनुभव घेतला आहे. हे अनुभव त्यांनी आपल्या कादंबरी लेखनातून चित्रित केले आहे. मानवी जीवन व्यवहारामागे तत्त्वतः मानवी नातेसंबंध, मूल्यव्यवहार आणि कौटुंबिक संबंधातील ताण तणाव कारणीभूत असततात. बाह्यत: भावनिक संबंधांनी विणलेले नातेसंबंध अंततः व्यावहारिक सूत्रांनी प्रेरित झालेले असतात. याचा सूक्ष्म शोध त्यांनी आपल्या लेखनातून घेतला आहे. मानवी मनाचे, जीवनव्यवहाराचे, नातेसंबंधाचे, कौटुंबिक संरचनेचे आणि भोवतालातील समाजव्यवहाराचे सूक्ष्म आणि अंतर्गत अनुभव त्यांनी आपल्या ‘समर ऑफ सेवंटी नाईन’ या कादंबरीतून चित्रित केले आहे. ही कादंबरी मराठी साहित्यात निश्चितच नव्या अनुभवाची भर घालणारी आहे, असे समितीला वाटते. त्यांना यंदाचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय विशेष साहित्य पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

‘शांतीच्या शोधात’ चा बहुमान

निवृत्ती जोरी हे स्वातंत्र्य स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या-दुसऱ्या पिढीतील तरुण. त्यांनी शिक्षणासाठी संघर्ष करीत नोकरी मिळवली. तिथेही वेगळ्या प्रकारचा संघर्ष केला आणि नव्या व्यवस्थेत स्वतःला सिद्ध करण्याची जबाबदारी सांभाळली. सामान्य घरातील आणि खेड्यातून आलेल्या तरुणाला नोकरी मिळवल्यानंतरही घर, कुटुंब, गाव, नातेसंबंध यांना सांभाळताना जो अनुभव येतो, त्यातून मनाची जी घालमेल होते त्याचे फार जिवंत चित्रण त्यांनी आपल्या ‘खटपट’ या आत्मचरित्रात्मक कादंबरीतून व्यक्त केले आहे. त्यांच्या या संघर्षमय जीवनाच्या लेखनाला अहिल्यानगर जिल्हा पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याचबरोबर संगमनेर येथील डॉ. संजय गोर्डे हे एक संवेदनशील माणूस आहे. वर्तमानकाळी पैशाच्या मागे धावणारा माणूस जीवनातील सत्व आणि स्वत्व हरून बसलेला आहे. सतत धावपळ करणारा माणूस समाधान आणि मनशांती पासून दूर गेला आहे. अशावेळी आपल्या भोवताली वावरणाऱ्या माणसांमधून आणि त्याच्याशी येणाऱ्या संबंधातून मनाला शांतीचा शोध आणि बोध होऊ शकतो याचा अनुभव त्यांनी आपल्या ‘शांतीच्या शोधात’ या पुस्तकातून मांडला आहे. त्यांना अधिक प्रेरणा देण्यासाठी त्यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येणार आहे.

मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या संस्थेचा सन्मान

पुणे येथील ‘मराठी अभ्यास परिषद’ ही संस्था इ.स. १९८२ पासून मराठी भाषेच्या विकास आणि संवर्धनासाठी काम करीत आहे. डॉ. अशोक केळकर, प्रा. प्र. ना. परांजपे आणि मॅक्सीन बर्नसन हे संस्थेचे संस्थापक सदस्य होते. सध्या प्रा. डॉ. आनंद काटीकर संस्थेचे अध्यक्ष आहेत. दरवर्षी मराठी भाषेच्या हिताच्या आणि समृद्धीच्या अनुषंगाने पूरक ठरणाऱ्या कार्यशाळा, व्याख्याने, परिसंवाद, अशा अनेक उपक्रमांचे आयोजन ही संस्था करते. मराठी भाषेचा वापर वाढण्यासाठी प्रोत्साहन देणे, भाषाविषयक लेखन व संशोधनाला प्रोत्साहन देणे, भाषाविषयक कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींना मार्गदर्शन करणे ही संस्थेची उद्दिष्टे आहेत. या संस्थेचे ‘भाषा आणि जीवन’ हे त्रैमासिक इ.स.१९८३ पासून नियमितपणे प्रकाशित होत आहे. त्यात भाषाविषयक सैद्धांतिक विचारविमर्श, भाषांतरित साहित्याची चिकित्सा, भाषा आणि जीवन यांतील अनेकपदरी संबंधांची निरीक्षणे आणि त्यावरील भाष्य व अनेक रोचक सदरे प्रकाशित होतात. मराठीत केवळ भाषेला वाहिलेले व इतक्या प्रदीर्घ काळ प्रकाशित होणारे हे एकमेव नियतकालिक आहे. मराठी भाषा, साहित्य चिंतन, भाषा संवर्धन, या दृष्टीने संस्थात्मक पातळीवरून दीर्घकाळ मराठी भाषेसाठी काम करणारी ही महत्वाची संस्था आहे, असे समितीला वाटते.त्यांच्या या कार्याचा सन्मान करण्यासाठी या संस्थेला यंदाचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय समाजप्रबोधन देऊन गौरविण्यात येणार आहे.

बहुपेढी अन् हरहुन्नरी कलावंताचा सन्मान

सचिन शिंदे हा आजच्या नाट्यकर्मीमधील धडाडीचा रंगकर्मी आहे. हौशी नाट्यप्रयोगापासून प्रायोगिक नाटकांसाठी काम करतानाच, आजच्या व्यावसायिक नाटकांसाठी सामाजिक जाणीवने काम करणाऱ्या संवेदनशील नाट्य नाट्यकर्मींमध्ये त्याचा समावेश होतो. मराठी रंगभूमीवर पहिल्यांदाच ‘नाट्यचौफुला’ अंतर्गत सलग चार नाट्यप्रयोगांचे महाराष्ट्रभर त्याने प्रयोग केले. ‘मानसरंग’ सोबत नाटकाच्या माध्यमातून मानसिक आरोग्यावर जनजागृती घडविली. रेल्वे प्लॅटफॉर्म वरील अनाथ मुलांना बरोबर घेऊन ‘हमारी दुनिया’ या नाटकाचा त्याने थेट दिल्लीत प्रवेश प्रयोग केला. महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत सलग तीन वर्ष त्याने प्रथम क्रमांक पटकावला. आतापर्यंत १५ चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. ३ मराठी चित्रपटांचे व एका मराठी सिरीयलचे दिग्दर्शन केले. लता मंगेशकरांसोबत ‘मैत्र जीवाचा’ हा मराठी अल्बम निर्मिती ही त्याच्या कलात्मक असोशीची निदर्शक आहे. सध्या झी मराठी साठी ‘अवघा रंग एक झाला’ व ‘वेध भविष्याचा’ या दोन कार्यक्रमाची तो निर्मिती करतो आहे. साधारण आजपर्यंत एकूण ३५ नाटके व ५० च्या वर एकांकिकेचे त्याने दिग्दर्शन केले. अशा बहुपेढी आणि हरहुन्नरी कलावंताला यंदाचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय नाट्यसेवा पुरस्कार देण्यात येणार आहे.

जोपासलेल्या कलेचा गौरव

मालती इनामदार या गेली पन्नास वर्षांपासून तमाशा कलेची सेवा करत आहेत. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांनी आपली आई (राष्ट्रपती सुवर्णपदक विजेते) विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या फडात काम करायला सुरुवात केली. त्याआधी त्यांनी भरत नाट्य मंदिरामध्ये नृत्य संगीताचे धडे घेतले. बहीण मंगला बनसोडे या तमाशा फडात तर दुसरी बहीण संध्या माने (सोलापूरकर) या फडातही त्यांनी काम केले. त्यानंतर १९९४ पासून त्यांनी स्वतःचा ‘मालती इनामदार तमाशा फड’ या नावाने तमाशा फड सुरू केला. आज मालती या एक ज्येष्ठ तमाशा कलावंत म्हणून परिचित आहेत. लावणी नृत्य, गायन व अभिनय अशा बहुरंगी भूमिका करीत त्यांनी अस्सल मराठमोळा जुना तमाशा जपला. विविध विषयाच्या किंवा प्रसंगाच्या निमित्ताने त्यांनी सादर केलेले वगनाट्य लोकरंजनाचे काम तर करतेच याशिवाय त्यातून होणारे लोकशिक्षणही महत्त्वाचे असते, असे समितीला वाटते. त्यांच्या या कार्याचा आणि त्यांनी जोपासलेल्या कलेचा गौरव म्हणून यंदा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव पाटील कलागौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार असल्याचे समितीचे निमंत्र-सदस्य डॉ. राजेंद्र सलालकर यांनी सांगितले.

Related posts

कुडोपी सड्यावरील कातळशिल्‍पांची ‘घुंगुरकाठी’च्या पुढाकाराने स्वच्छता मोहीम

सकारात्मकपणे काम करणारी आजची तरुणाई सर्वांसाठी प्रेरक : माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे

ओसरगांव येथे १५ फेब्रुवारी रोजी कोकणभूमी साहित्य कला संमेलन

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406