मुक्त संवाद

मी देशाचा सातबारा लिहीन म्हणतो

आजच्या सत्ताधारी व्यवस्थेला गावातील माणसाला स्वयंपूर्ण करायचं नाही. त्याला आपल्या अधिपत्याखाली कायमच ठेवायचं आहे. यासाठी धनदांडग्यांच्या घशात तिथल्या जमिनी घातल्या जात आहेत. खरं तर सत्ताधारी व्यवस्था भूमिहीनांना भूमी देण्याचा प्रयत्न करत असते. आता मात्र ज्यांची भूमी आहे, त्यांनाच भूमिहीन करण्याचा डाव रचला जात आहे.

अजय कांडर
लेखक विख्यात कवी, व्यासंगी पत्रकार आहेत. मोबाईल – ९४०४३९५१५५

कवी रमेश सावंत यांच्या ‘मी देशाचा सातबारा लिहीन म्हणतो’ या काव्यसंग्रहातील एकूण कवितेचा आविष्कार हा वर्तमानाचा कोलाहल आहे. आजच्या असत्य युगावर परखड भाष्य करताना ही कविता एक सुंदर स्वप्नवत जग निर्माण करण्याची अभिलाषा बाळगते. मूल्यांचा ऱ्हास, विवेकशून्य वर्तमानस्थिती, मन विषण्ण करत जाणारे नातेसंबंध, जाती-धर्मांचं दुभंगलेपण, मनाचा निर्घृण कोरडेपणा, बंधुत्वाची भावना संपवून समतेला प्राप्त झालेलं विटाळपण, या सगळ्या विदीर्ण अवस्थेतेचं तुकड्या-तुकड्यांचं आजचं एक काळोखं जग हे या कवितांच्या केंद्रस्थानी आहे. या कवितांची ही आशयसूत्रं समजून घेताना आपण आतून हबकून जातो, हे या कवितेचं मोठं बलस्थान आहे.

आज आपण कोणत्या काळात जगत आहोत, याचा अंदाज न बांधता यावा, इतका माणूस भ्रमिष्ट झाला आहे. या भ्रमिष्टाच्या शोकगीताचं निरूपण म्हणून ही कविता वाचकासमोर येते. म्हणूनच या कवितेतून ‘बंधुत्वाच्या पुलाखालून खूप रक्त वाहून तर जाणार नाही ना?’ असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. या कवितांना आजच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, भावनिक, कौटुंबिक लसलसत्या वेदनेचा स्पष्ट चेहरा आहे. तो चेहरा एवढा विद्रूप आहे, की या सर्व चेहऱ्यांमध्ये आपलाही चेहरा मिळून, तो आपणच कधी विद्रूप करून टाकला आहे, याचीही जाणीव होत नाही. हे असं होत जाणं म्हणजे समाजातील लोकशाही मूल्यं नष्ट होऊन समाजाची अराजकतेकडे वाटचाल होण्याचा प्रारंभ असतो. कवी सावंत हे याचीच भयसूचकता या कवितांतून करत असल्यामुळे, आजच्या अरिष्ट काळाची नोंद आपल्या कवितांच्या समर्थ शब्दांतून ते घेत आहेत, असं आपण खात्रीनं म्हणू शकतो.

राष्ट्रवाद आणि खोटी अस्मिता, जातीयवाद आणि धर्मवादीपणा, खोटी भूमिनिष्ठा आणि राष्ट्रभक्तीचा बागुलबुवा या सगळ्याला अलिकडल्या काही वर्षांत इथला विचारशील माणूस, तसेच जो निव्वळ माणूस म्हणून जगू पाहतोय तो तो विटला आहे. या सगळ्याच्या अतिरेकी मानसिकतेतून कधी नव्हे, एवढी इथल्या माणुसकीची पडझड होताना रोज अनुभवास येत आहे. या पडझडीचा आतला आवाज या कवितेच्या ठायीठायी घुमतानाचे स्वर ऐकू येत राहतात. या कवितांतील आजच्या स्थितीच्या या अनुभवातून ‘छिन्न-भिन्न होणं’ फार अस्वस्थ करणारं आहे. म्हणूनच कवी सावंत एके ठिकाणी म्हणतात,”त्या नतद्रष्टांचं काय करू?/जे इतिहासाची/मढी उकरून काढताना/विनाकारणच दडपून टाकत आहेत/माझ्या प्रेयस मायभूमीत उमटणारा समता, बंधुता आणि एकतेचा आवाज.”

माणसाला अंधश्रद्धेला कवटाळू दिलं, की अराजकतेचा काळ जवळ येऊ लागतो. हा अराजकतेचाच काळ चालू आहे, असं कवीला वाटतं. त्याची प्रचीती आपल्यालाही वारंवार येत आहे. या अर्थानं कवी सद्यस्थितीतील घटनांचा मागोवा आपल्या कवितांमधून घेताना दिसतो. याचं तीव्र प्रत्यंतर या कवितांमधून येते. एकमेकांविरोधातील विषाची पेरणी समाजात इथं-तिथं करण्याचे प्रयत्न जोरदार चालू आहेत. या सगळ्यामागे विशिष्ट मानसिकता कार्यरत आहे. मात्र सर्व समाज यात भरडला जावा, असं एक षडयंत्र राबवले जात आहे. या षडयंत्रातून माणसाची सकारात्मक क्रियाशीलता नष्ट होऊन आपण सांगू तसाच समाज घडावा, अशी प्रक्रिया अलिकडल्या काळात जोर धरू लागली आहे. या प्रक्रियेचं प्रतिबिंब म्हणून या कवितेकडेही आपण पाहू शकतो. या संदर्भात कवी म्हणतो,

“माझ्या रापलेल्या हातात/
ठोकून पाहिल्या त्यांनी
अंधश्रद्धेच्या कणखर बेड्या/
आणि पेरत राहिले द्वेषाची बीजे/
माझ्या नसानसात वाहणाऱ्या
मानवधर्मी रक्तात/
आता मानवी जिभेला रक्ताची चटक लागलेली आहे.” अशा घटना वारंवार घडताना दिसतात.

पशुपक्षी सहज मरून जावा आणि त्याचं सोयरसुतक कोणाला नसावं, असा माणूस मारला जात आहे किंवा तो अनपेक्षित घटनेनं मरतो आहे. एखाद्याचा मृत्यू ही माणसाच्या मनाला चटका लावणारी घटना कोणी काळी होती; पण हा काळ, या काळातील मृत्यूबद्दलची संवेदनशीलता हरवून ती एक घटना म्हणूनच आता लोकांसमोर येते आणि क्षणार्धात या घटनेचं महत्त्व कमी होऊन माणूस कोरडेपणानं निर्ढावलेल्या मनानं रोजचं जगणं जगू लागतो.

या सगळ्यामुळे कवी प्रचंड अस्वस्थ होताना दिसतो आहे. यात माणसं व्यवस्थेची बळी गेलेली जास्त दिसतात. मृत्यू आणि जनावरांसारखं जगणं त्यांच्या वाट्याला येतं. जीवन मरणाच्या या संघर्षात ज्यांच्या हातात सत्ता आहे, जे समाज वाचू शकतात, असे लोक मात्र हे शांतपणे सगळे पाहत आहेत. त्यांची गिधाड वृत्ती लोकांच्या मरणाला कवटाळते आहे. म्हणूनच कवी म्हणतो,
“मरण स्वस्त झालं/
तेव्हापासून दिसू लागलीय/
मस्तवाल गिधाडांची फौज/
जिवंत माणसांच्या रूपात/
अधाशीपणे वर्दळताना.”
गाव पाणवठ्याचा विकास करता करता गावातील माणसाच्या हातात भिकेची झोळी कधी आली, हेच माहीत नाही. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण म्हणजे ‘खाऊजा’ धोरणात सर्वाधिक भरडला कुठला माणूस गेला असेल तर तो गावातला. या धोरणात गाव ना गाव राहिला, ना गाव शहर होऊ शकलं. गाव आणि शहराच्या मधोमध आता उभा आहे गावचा माणूस. याला कारणीभूत आहेत चुकीची विकासाची धोरणे. गावच्या माणसाची वृत्ती बदलू लागली आहे. त्याला वेगवेगळ्या आमिषानं पछाडलं आहे. तो स्वतंत्र विचारानं जगण्याऐवजी स्वातंत्र्याच्या भ्रामक कल्पनेत तो भ्रमिष्ट झाला आहे. गावच्या माणसाला आपल्याला नेमकं आता काय करायचं आहे, आपण कुणाच्या पाठीमागे उभे रहायचं आहे, याचाच निर्णय घेता येत नाही. त्यामुळे त्याची सुख-शांती रसातळाला गेली आहे. यामुळे तो अधिकच मानसिक कोंडीत सापडला आहे. या सगळ्याचं विदारक चित्रही या कवितांतून आपल्याला वाचायला मिळतं.

गावात विकास आणू पाहणारे कोण असतात? गावच्या विकासाची घाई कोणाला झालेली असते? या प्रश्‍नांच्या मुळाशी गेल्यावर गावच्या आजच्या दुःखाचं नेमकं कारण आपल्याला सापडू शकतं. गाव विकासाचं तारण करतं, हे व्यवस्थेतून लाभाचा मलिदा खाणारे व्यवस्थापक असतात. बौद्धिक वाढीने ते सुमार असतात, मात्र गावच्या विकासाचं मॉडेल बनवण्याचे अधिकार सत्ताधारी व्यवस्थेशी लागेबांधे राखत आपल्या हाती ठेवतात आणि गाव भकास करून विकास करण्याची स्वप्नं लोकांच्या नजरेत उतरवण्यात यशस्वी होतात. लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन हे सहज करता येतं;परंतु असं विकासाचं मॉडेल दीर्घकाळ माणसाला सुखी करू शकत नाही, याची जाणीव गावच्या माणसाला नसते. ज्या अपवादात्मक माणसाला ती असते, तो इतरांना जाणीव करून देण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मात्र त्यालाच वेड्यात काढलं जातं. खरं तर कुठल्याही गावचा विकास करण्यासाठी तिथली भूमीच एक ‘रोल मॉडेल’ असतं. मात्र यासाठी गावचा शाश्वत विकास करण्याची उर्मी असणारी माणसं त्या भूमीत असावी लागतात. ती माणसं नसतील तर किंवा त्या भूमीतील माणसं आपली भूमीनिष्ठा, आपला स्वाभिमान कवडीमोलाने विकून गावावर आक्रमण करणाऱ्या बाहेरच्या बाजार व्यवस्थेला शरण जात असतील तर गावाचं गावपण हरवायला आणि त्यातून माणूस सततचा अस्वस्थ राहायला वेळ लागत नाही. कारण असं झालं, की गावातील घर-शेती-शिवार देशोधडीला लागायला वेळ लागत नाही. पर्यायानं गावातील माणूसच देशोधडीला लागतो.

आजच्या सत्ताधारी व्यवस्थेला गावातील माणसाला स्वयंपूर्ण करायचं नाही. त्याला आपल्या अधिपत्याखाली कायमच ठेवायचं आहे. यासाठी धनदांडग्यांच्या घशात तिथल्या जमिनी घातल्या जात आहेत. खरं तर सत्ताधारी व्यवस्था भूमिहीनांना भूमी देण्याचा प्रयत्न करत असते. आता मात्र ज्यांची भूमी आहे, त्यांनाच भूमिहीन करण्याचा डाव रचला जात आहे. यातून रमेश सावंतसारखा कवी प्रचंड अस्वस्थ होतो आणि त्या अनुभूतीतूनच हा कवी निराशेच्या आवेगातून म्हणतो,”
वणवा होऊन जाळा म्हणतो/
त्यांच्या मुजोर ठोकशाहीला/
ज्यांनी बेचिराख केलीत
तुमची घर, शेतशिवार अन माणसांनाही!
माणसांना, त्यांच्या तोंडातील घासाला बेचिराख करता करता माणसाचं एकोप्यानं राहण्याचं सांस्कृतिक संचीतही नष्ट करण्याची जी प्रक्रिया जोरात चालू आहे, या सगळ्याचा सशक्त उद्गगार म्हणजे कवी सावंत यांची ‘मी देशाचा सातबारा लिहीन म्हणतो’ मधील कविता होय.

पुस्तकाचे नाव – मी देशाचा सातबारा लिहीन म्हणतो ( काव्यसंग्रह )
कवी – रमेश सावंत
प्रकाशन – अष्टगंध प्रकाशन, ठाणे
पृष्ठे – ६४ किंमत – १५० रुपये

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

7 hours ago

Weather Forecast : १७ ऑगस्टपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…

8 hours ago

फिदेलसोबत १०० वर्षे : अमेरिकन दादागिरीसमोर न झुकलेल्या क्रांतिकारकाची कहाणी

फिदेल कास्त्रो यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अखिल भारतीय किसान सभेकडून अभिवादन नवी दिल्ली :क्यूबाच्या क्रांतीचे कमांडर-इन-चीफ, जननेते…

21 hours ago

कोल्हापूरच्या युवा दिग्दर्शकाच्या ‘अनघा’ला जम्मू फिल्म फेस्टिव्हलची पसंती

https://youtu.be/xcTeVoV7ItY कोल्हापूर येथील युवा चित्रकार व दिग्दर्शक स्वप्निल बळवंत पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या “अनघा” या…

1 day ago

शेतकऱ्याचं जगणं, मरणं आणि मरणानंतरची परवड सांगणारं नाटक : ‘कर्जबळी’

शेतकऱ्याच्या कष्टाला निसर्गाची साथ मिळत नाही, कर्जाच्या विळख्यातून त्याची सुटका होत नाही आणि अखेर आत्महत्येचा…

1 day ago

महात्मा फुले विचार आणि कार्य या विषयावर दीर्घ काव्य स्पर्धा Mahatma Phule Thoughts and Work Poem Competition

राष्ट्र सेवा दल महाराष्ट्र आणि समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे आयोजनस्पर्धेसाठी कविता पाठविण्याची अंतिम तारीख :…

2 days ago