सत्ता संघर्ष

सुनेत्रावहिनींसाठी धावाधाव…

स्टेटलाइन –
विधिमंडळाच्या अधिवेशनात अजितदांदाच्या विमान अपघाती मृत्युवर चर्चासुध्दा घडवली गेली नाही. स्वत: उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी मागणी करूनही तपास सीबीआयकडे सोपवला गेला नाही. मग भाजपाने त्यांच्यासाठी काँग्रेसने बारामतीत माघार घ्यावी अशी विनंती करणे हा केवळ उपचार होता काय ?

डॉ. सुकृत खांडेकर

अजित पवार यांच्या २८ जानेवारी रोजी विमान अपघातात झालेल्या मृत्युनंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात येत्या तेवीस एप्रिल रोजी निवडणूक होत आहे. अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहेत. अजितदादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते, राष्ट्रवादी काँग्रेस ( अप ) चे राष्ट्रीय अध्यक्ष होते. बारामतीतून आठ वेळा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले होते. स्वत:च्या हिमतीवर त्यांनी ४२ आमदार आपल्या पक्षाचे निवडून आणले . राज्याच्या राजकारणात त्यांनी स्वत:चे वेगळे नि भक्कम स्थान निर्माण केले होते. राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या व केंद्रात अनेक वर्षे संरक्षण व कृषी मंत्री राहिलेल्या शरद पवारांचे ते पुतणे होते. काकांच्या पक्षापासून त्यांनी फारकत घेतली तरी त्यांच्याशी कौटुंबिक नाते संबंध शेवटपर्यंत कायम ठेवले होते. आपल्या कार्यक्षम, तडफदार व शिस्तबध्द कार्यपध्दतीने त्यांनी सार्वजनिक जीवनात ठसा उमटवला होता. कार्यकर्त्यांची काळजी घेणारा नेता अशी त्यांची प्रतिमा होती. अशा वलयांकित अजितदादांचे राजकीय वारस म्हणून सुनेत्रावहिंनींवर जबाबदारी आली आहे. दादांच्या आकस्मिक मृत्युनंतर चौथ्या दिवशी त्यांनी उपमुख्यमंत्रीदाची शपथ घेतली तेव्हा किमान दहा दिवस तरी थांबायला नको होते का, अशी त्यांच्यावर टीका झाली. दादांच्या निधनानंतर दोन महिन्याच्या काळात त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या, त्यांचे चिरंजीव पार्थ हे राज्यसभेचे खासदार झाले. अजितदादांच्या पत्नी, पवार कुटुंबाचे वलय आणि अजितदादांच्या आकस्मिक मृत्युने निर्माण झालेली सहानभुती यातूनच वहिनींना बिनविरोध निवडून आणण्यासाठी राजकीय नेत्यांची कशी धावाधाव चालू होती हे सर्व महाराष्ट्राने पाहिले.

स्वत: सुनेत्रा पवार यांनी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ किंवा उबाठा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरेंशी संपर्क साधून बिनविरोध निवडून देण्याचे आवाहन केले यात काहीच गैर नाही. बारामती व कौटुंबिक नाते संबंधामुळे शरद पवारांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना फोन करून त्यांच्या पक्षाने माघार घ्यावी अशी विनंती केली तेव्हा काँग्रेसने शरद पवारांना तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला. शरद पवारांनी केलेल्या एका फोननंतर चक्रे वेगाने फिरली. काँग्रेस पक्ष हा महायुतीत नाही. काँग्रेसला महायुतीच्या विरोधात निवडणूक लढविण्याचा पूर्ण अधिकार आहे. काँग्रेसने संकेत किंवा परंपरा पाळली नाही म्हणून भाजपाच्या नेत्यांनी थयथयाट केला. काँग्रेसने महाराष्ट्राची राजकीय संस्कृती पाळली नाही म्हणून अनेकांनी टाहो फोडला, पण ज्यांनी असा आक्रोश केला त्यांनी आमदाराच्या मृत्युनंतर राज्यात झालेल्या पोटनिवडणुकीत आपल्या पक्षाचे उमेदवार उभे केले अशी बरीच उदाहरणे देता येतील. काँग्रेसने शेवटच्या क्षणी बारामतीतून माघार घेतल्यानंतर हात दाखवून अवलक्षण किंवा गाढव गेलं नि ब्रम्हचर्यही गेलं अशा शब्दात भाजपाने टवाळी केली. त्यावर आमचा विरोध भाजपाला आहे म्हणून आम्ही निवडणूक लढविण्याचे ठरवले होते, असे सकपाळ यांनी स्पष्टीकरण दिले.

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्या पक्षातच सारे काही अलबेल नाही असे अनेकदा दिसून आले. त्या जेव्हा दिल्लीला गेल्या, तेव्हा प्रफुल पटेल किंवा सुनिल तटकरे त्यांच्यासोबत विमानतळावर दिसले नाहीत. तटकरे यांच्या रायगडमधील किंवा पटेल यांच्या विदर्भातील सभेत बॅनरवरून अजितदादांचे फोटो गायब होते. सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात पटेल, तटकरे यांच्या नावापुढे त्यांच्या पदांचा उल्लेख नव्हता. त्यातून पुन्हा पार्थ यांनी काँग्रेसने बारामतीतून माघार घ्यावी, म्हणून आम्ही कोणी त्यांना फोन करणार नाही, असा बाणा दाखवला. काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊन फॉल होत आहे असे बोलून ऐन निवडणुकीत काँग्रेसला अंगावर घेतले व नव्या वादाला तोंड फोडले. एकीकडे सुनेत्रावहिनींची बिनविरोध निवड व्हावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, सुप्रिया सुळे, रोहित पवार, असे अनेकजण प्रयत्न करीत होते व दुसरीकडे खासदार पार्थ त्यावर पाणी ओतताना दिसले. स्वत: रोहित पवार यांनी पार्थ यांच्यावतीने दिलगिरी व्यक्त करून वादावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला. खासदार झाल्यावर पार्थ यांच्या बोलण्यात अहंकार निर्माण झाला आहे की राजकीय परिपक्वता नव्हती ? त्याचे पिताश्री अजित पवारांनी १९९१, १९९२ मधे काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली व जिंकली होती. १९९९ ते २००४ या काळात काँग्रेसप्रणित महाआघाडीच्या सरकारमधे अजितदादा मंत्री होते याचा पार्थ यांना विसर पडलेला असावा. राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतेक नेते हे काँग्रेसच्या माध्यमातूनच मोठे झाले आहेत हे पार्थ यांना ठाऊक नसावे.

सुप्रिया सुळेंनीही आपल्या नव्याने खासदार झालेल्या पुतण्याचे कान टोचले. त्या म्हणाल्या, भारतीय राजकारणात व भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेसचे योगदान फार मोठे आहे. देशाच्या पंतप्रधानापासून ते ग्रामपंचायतीच्या सरपंचापर्यंत, महिला आरक्षणापासून ते देशाने जिंकलेल्या युध्दापर्यंत काँग्रेसची भूमिका महत्वाची राहिलेली आहे. लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार असला तरी मर्यांदांचे भान राखले पाहिजे. आम्ही सर्वानी काँग्रेसला जवळून पाहिले आहे. मी अनेकदा काँग्रेसच्या साथीने निवडून आले आहे. मी आणि अजितदादा आम्ही दोघेही काँग्रेसच्या तालमीतच लहानाचे मोठे झालो आहोत…

काँग्रेसने उमेदवारी मागे घेताना सन २०२९ मधे बारामतीतून काँग्रेस लढणार असे जाहीर करून टाकले. तोपर्यत राष्ट्रवादी काँग्रेस ( अप ) व शिवसेना ( शिंदे ) या भाजपाच्या मित्र पक्षांची काय अवस्था असेल त्याची आतापासूनच झलक दिसू लागली आहे. अजितदादा हयात असताना ते कधी भाजपाबरोबर फरफटताना दिसले नाहीत. मोदी- मोदी अशी माळ त्यांनी भाषणात ओढली नाही. आपल्या पक्षाचा अजेंडा वेगळा आहे, विचारसरणी वेगळी आहे, याचे भान त्यांनी कायम ठेवले. यापुढे सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखालील पक्षाला भाजपा तेवढी मोकळीक देणार आहे का ?

अजितदादांच्या विमानअपघाती मुत्यूनंतर राज्यात पोलीस स्टेशनवर साधा एफआयआर नोंदवला गेलेला नाही, रोहित पवार मुंबई व बारामतीत एफआयआर नोंदवायला गेले तेव्हा पोलिसांनी कसा नकार दिला हे सर्व राज्याने बघितले आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात अजितदांदाच्या विमान अपघाती मृत्युवर चर्चासुध्दा घडवली गेली नाही. स्वत: उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी मागणी करूनही तपास सीबीआयकडे सोपवला गेला नाही. मग भाजपाने त्यांच्यासाठी काँग्रेसने बारामतीत माघार घ्यावी अशी विनंती करणे हा केवळ उपचार होता काय ?

गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर त्यांची कन्या प्रितम या बीड मतदारसंघातून ७ लाखाच्या विक्रमी मताधिक्याने खासदार म्हणून निवडून गेल्या होत्या. आर. आर आबापाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुमन या तासगावमधून विधानसभेवर १ लाख १२ हजार मतांनी विजयी झाल्या होत्या. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र विश्वजित पलुस- कडेगाव मतदारसंघातून विधानसभेवर बिनविरोध निवडून आले होते. शिवसेनेचे बाळा सावंत यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी तृप्ती मुंबईतील वांद्रे पूर्वमधून १९५०० मतांनी आमदार म्हणून विजयी झाल्या होत्या. मुंबईतील अंधेरी पूर्वमधून शिवसेनेचे रमेश लटके यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी ऋतुजा विजयी झाल्या होत्या. नांदेडमधून वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र रवींद्र निवडून आले होते. बारामतीतून सुनेत्रावहिनी यांचा विजय पक्का आहेच पण मताधिक्य किती दिड की दोन लाख हे ४ मे रोजी समजेल.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी
Tags: Ajit Pawar deathBaramati bypollBaramati electionBJP allianceby-election analysisby-election Indiacampaign strategyCongress Maharashtraelection campaignelection scenarioelection trendselectoral battlegovernance MaharashtraIndia bypollsIndia politics newsIndian politicsIye Marathichiye NagariLeadership Crisisleadership transitionMaharashtra ElectionMaharashtra politicsNCP Ajit factionNCP Politicsparty dynamicsparty leadershipPolitical Analysispolitical debatepolitical developmentspolitical influencepolitical legacypolitical narrativepolitical news Indiapolitical rivalrypolitical shiftspolitical strategyPublic Opinionregional politicsSharad Pawarstate politics IndiaSunetra Pawarsympathy votevoter sentimentअजित पवार निधनइये मराठीचिये नगरीकाँग्रेस महाराष्ट्रजनमतनिवडणूक चित्रनिवडणूक ट्रेंडनिवडणूक प्रचारनिवडणूक लढतनेतृत्व बदलपक्ष नेतृत्वपक्षीय समीकरणपोटनिवडणूकपोटनिवडणूक विश्लेषणप्रचार रणनीतीप्रादेशिक राजकारणबारामती निवडणूकबारामती पोटनिवडणूकभाजप आघाडीभारत राजकारण बातम्याभारतीय राजकारणमतदार भावनामहाराष्ट्र निवडणूकमहाराष्ट्र राजकारणराजकीय घडामोडीराजकीय प्रभावराजकीय बदलराजकीय रणनीतीराजकीय वादराजकीय वारसाराजकीय विश्लेषणराजकीय स्पर्धाराज्य राजकारणराष्ट्रवादी काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेस अपशरद पवारशासनसहानुभूती लाटसुनेत्रा पवार

Recent Posts

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

6 hours ago

विरोधकांचा आवाज क्षीण झालायं… की सरकार अधिक बळकट झालंय ? Monsoon session of the legislature

मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…

18 hours ago

इतिहास वाचनातूनच संस्कार अन् सुराज्याची जडणघडण : संयोगिताराजे छत्रपती Good State Formed Through Reading History

वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…

1 day ago

अर्पणामागचा भाव : शुद्ध भक्तितत्त्वाचा ज्ञानेश्वरीतील अमृतसंदेश Pure Bhakti from Dnyaneshwari |

हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…

1 day ago

आकाशातील ढग व युद्धाच्या धगीत अडकलेली अर्थव्यवस्था ! an economy caught in the grip of war

विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.…

2 days ago

स्त्रीवादी साहित्याची नवी दिशा : डॉ. ऊर्मिला चाकूरकर यांचे अभ्यासपूर्ण अध्यक्षीय भाषण New direction of feminist literature

स्नेहलता मारुती पाटील सन्मानार्थ पुरोगामी सामाजिक, सांस्कृतिक फाऊंडेशन द्वारा आयोजित २रे स्त्रीवादी साहित्य संमेलन यामध्ये…

2 days ago