📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 23, 2026
सत्ता संघर्ष

जंतरमंतरवरील मौन : सोनम वांगचूकांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष का ? Sonam Wangchuk’s hunger strike

Sonam Wangchuk on hunger strike at Jantar Mantar over the NEET paper leak, highlighting students' future, accountability, and democratic protest.
नीट पेपरफुटीने देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले असतानाच शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या जंतरमंतरवर सुरू झालेल्या आंदोलनात पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक उतरले आहेत. त्यांच्या बेमुदत उपोषणाने केवळ शिक्षण व्यवस्थेतील त्रुटीच नव्हे,तर सरकारची आंदोलने हाताळण्याची भूमिका माध्यमांचे बदलते प्राधान्यक्रम आणि नैतिक जबाबदारीच्या राजकारणावरही नव्याने चर्चा सुरू केली आहे.

डॉ. सुकृत खांडेकर

सोनम वांगचूक केंद्रस्थानी…

नीट पेपर फुटीनंतर विद्यार्थी जगतात हल्लकल्लोळ माजला.वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेला तेवीस लाखापेक्षा जास्त विद्यार्थी आपले भविष्य आजमावत होते.पेपर फुटी आणि परीक्षा स्थगित होणे यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होणारच.पेपर फुटीनंतर काही विद्यार्थ्यांनी आत्महत्याही केल्या.अहोरात्र अभ्यास करून परीक्षेला सामोरे जाण्यापुर्वीच पेपर फुटणार असतील तर दोष कुणाचा ? नीट किंवा अन्य स्पर्धा परिक्षांचे पेपर फुटण्याचे प्रकार सतत घडत आहेत. पैशाच्या लोभापायी त्यात भले- भले गुंतले आहेत. शाळेच्या शिक्षक, मुख्याध्याकांपासून ते कोचिंग क्लासच्या संचालकांपर्यंत अनेकांना अटक झाली आहे. वारंवार होणाऱ्या पेपर फुटीच्या घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीला जोर धरू लागला आहे.शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी अभिजीत दीपकेच्या कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीत जंतर मंतरवर सुरू केलेल्या आंदोलनात लडाखचे पर्यावरणवादी नेते सोनम वांगचूक मैदानात उतरले व त्यांनी आमरण उपोषण सुरू केले.

सोनम वांगचूक यांच्या उपोषणाकडे देशातील मिडिया दुर्लक्ष केले.जंतर मंतरवरील वांगचूक यांच्या उपोषणाला प्रसिध्दी देऊन सरकारला कोण दुखवणार ? सन २०११ मधे अण्णा हजारे यांनी लोकपालसाठी दिल्लीत उपोषण केले तेव्हा त्याला वृत्तवाहिन्यांनी अहोरात्र प्रसिध्दी दिली.अण्णांच्या आंदोलनाचे थेट प्रक्षेपण चालू होते.अण्णांच्या आंदोलनाने काँग्रेसप्रणित युपीए सरकारची बदनामी होत होती व अण्णांच्या आंदोलनाला भाजपाचा मागून भक्कम पाठिंबा होता.

अण्णा हजारे यांच्या उपोषण काळात तत्कालीन पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग सरकारमधील मंत्री त्यांना भेटून चर्चा करीत होते,विलासराव देशमुख हे सुध्दा सरकारच्यावतीने दोन वेळा अण्णांना भेटले.अण्णांनी उपोषण सोडावे म्हणून युपीए सरकारचे मंत्री त्यांना विनंती करीत होते.अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे किरण बेदी, अमिर खान आज कुठे आहेत? वांगचूक यांच्याशी सरकारच्यावतीने संवाद करायला कोणी पुढे येत नाही.वांगचूक हे सरकारला ब्ल’कमेल करीत आहेत,असा आरोप भाजपा करीत आहे.

मोदी सरकारनेच सोनम वांगचूक यांच्या पर्यावरणवादी कामाचा गौरव म्हणून पदम पुरस्कार दिला होता. नंतर त्यांनी लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा म्हणून केलेल्या आंदोलनात हिंसाचार झाल्यावर त्यांना देशद्रोही ठरवून जोधपूरच्या तुरूंगात १७० दिवस डांबले. जम्मू- काश्मीरला विशेषाधिकार देणारे ३७० कलम काढून टाकल्यावर याच वांगचूक यांनी मोदी सरकारचे अभिनंदन केले होते. आता सरकारला वांगचूक नकोसे झाले असावेत. तीन आठवड्याच्या उपोषणाने त्यांची प्रकृती कमालीची खालावली आहे. मग त्यांना इस्पितळात नेऊन ऑक्सिजन व सलाईनच्या नळ्या लावून त्यांचे प्राण वाचवणार आहेत का ? संसदेच्या पावसाळी अधिवेशनच्या तोंडावर वांगचूक यांचे आमरण उपोषण सरकारला अ़डचणीचे ठरले आहे.

जंतर मंतरवर अरविंद केजरीवाल ,सुप्रिया सुळे,पवन खेडा,डिम्पल यादव,शबाना आजमी,नसरूद्दीन शहा,स्वरा भास्कर,सबीना दिलैक,रत्ना पाठक, अरूंधती रॉय अशा अनेकांनी सोनम वांगचूक यांची भेट घेऊन उपोषण सोडावे अशी विनंती केली पण लोकसभेतील विरोधी नेते राहुल गांधी तिकडे फिरकले नाहीत, याचीच चर्चा मोठी झाली. वांगचूक म्हणजे दुसरा गांधी असे म्हटले जात आहे, मग राहुल गांधी त्यांना पाठिंबा का देत नाहीत ? असा प्रश्न विचारला जात आहे.

वांगचूक म्हणतात, मुझे उम्मीद हैं की, राहुल गांधी आयेंगे, नही आए, तो उनका छोटापन होगा… वांगचूक यांचे असे बोलणे काँग्रेसला खटकले. पेपर फुटीच्या मुद्यावर काँग्रेसची एनएसयूआय व युवक काँग्रेस रस्त्यावर आंदोलन करीत आहेत. पण मिडियातून त्याला प्रसिध्दी मिळत नाही. काँग्रेसची महागाई, बेरोजगारी, पेपर फुटी, जीएसटी, मणिपूर, आदी विषयांवर सतत आंदोलने चालू आहेत, तेव्हा वांगचूक यांना राहुल गांधीची आठवण झाली नाही. राहुल गांधींनी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यत चार हजार किमी ची भारत जोडो यात्रा केली तेव्हा त्यांनी कुणाचा पाठिंबा मागितला नव्हता, याचीही आठवण करून दिली जात आहे.

प्रभु रामचंद्राची तिजोरी लुटली जात असताना शांत बसणारे सरकार नागरिकाच्या आंदोलनाला काय किमत देणार? असा प्रश्न मनसेचे बॉस राज ठाकरे यांनी विचारला आहे.देशातील आंदोलने चिरडण्याचा घाट सरकारने घातला आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.१९५६ मधे लाल बहादूर शास्त्री हे रेल्वेमंत्री होते. त्यावेळी तामिळनाडूत झालेल्या रेल्वे अपघातात दिडशे लोक मृत्युमुखी पडले. शास्त्री यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून कोणताही विलंब न लावता मंत्रीपदाचा आपणहून राजीनामा दिला होता. आता नैतिक जबाबदारी स्वीकारून कोणीही मंत्री आपणहून राजीनामा देण्यासाठी पुढे येत नाहीत आणि त्यांनी राजीनामा द्यावा असे त्यांचे हायकमांडही त्यांना सांगतही नाही.

२०१५ मधे राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे व परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याच्या मागणी केली गेली होती. तेव्हा राजनाथ सिंह म्हणाले होते, मोदी सरकारमधे राजीनामे होत नाहीत…गेल्या बारा वर्षात मोदी सरकारमधील एकाही मंत्र्याने नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिलेला नाही. केवळ परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी राजीनामा दिला, कारण त्यांच्यावर मी टू मधे सापडल्याचे गंभीर आरोप झाले होते.

मणिपूरच्या इरोन चानू शर्मिला यांनी केलेले उपोषण १६ वर्षे चालले. सशस्र दलाला अस्फा कायद्यानुसार केंद्र सरकारने विशेषाधिकार दिले, त्याच्या निषेधार्थ ४ नोव्हेंबर २००० रोजी उपोषण सुरू केले. तिसऱ्याच दिवशी यांच्यावर पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला व त्यांना अटक करून इस्पितळात नेले. तेथे जबदस्तीने फिडींग ट्यूब मधून त्यांना द्रव पदार्थ दिले. ९ ऑगस्ट २०१६ रोजी त्यांनी आपले उपोषण संपवल्याचे जाहीर केले.

सोनम वांगचूक यांनी लडाख मधील जनतेला अधिकार व हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली.
( १ ) दि. २६ जानेवारी २०२३ रोजी सोनम यांनी लडाखला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासाठी १८ हजार फूट उंचीवर असलेल्या खारदुंगला खिंडीत पाच दिवसांचे उपोषण केले. तेथे उणे ४० अंश सेल्लिअस तापमान होते. सरकारने त्यांना घरातच नजर कैदेत ठेवले.
( २ ) दि. १८ जून २०२३ रोजी वांगचूक यांनी लेह येथील एनडीएस स्टेडियम मधे पुन्हा उपोषण केले व पाच दिवसांनी सोडले.
( ३ ) सप्टेंबर २०२४ मधे सोनम यांनी लेह ते दिल्ली अशी एक हजार किमी ची १३० लोकांसह पदयात्रा काढली. तीस सप्टेंबर रोजी पोलिसांनी त्यांना सिंधू सीमेवर रोखले.
( ४ ) ५ ऑक्टोबर २०२४ पासून दिल्लीतील लडाख भवन येथे त्यांनी उपोषण सुरू केले. स्टुडंटस फेरडेशन ऑफ इंडियाने त्यांना पाठिंबा दिला होता. गृहमंत्रालयाने आश्वासन दिल्यानंतर २१ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांनी उपोषण सोडले.
( ५ ) २५ सप्टेंबर २०२५ रोजी वांगचूक यांना हिंसाचार भडकविल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केली, राष्ट्रीय सुरक्षा अधिनियमाखाली ( एनएसए ) त्यांना जोधपूरच्या तुरूंगात पाठवण्यात आले. १७० दिवसांनंतर १४ मार्च २०२६ रोजी त्यांची तुरूंगातून सुटका झाली.

सोनम यांचे वडिल सोनम वांग्याल हे १९८४ मधे, ४२ वर्षापूर्वी लडाखमधील समुहाला एसटी चा दर्जा मिळावा म्हणून उपोषणाला बसले होते तेव्हा इंदिरा गांधींनी त्यांची भेट घेऊन त्यांचे उपोषण सोडवले होते. ते जम्मू काश्मीर विधिमंडळात अनेक वर्षे आमदार होते. १९७५ मधे ते राज्यात मंत्री होते.
सोनम वांगचूक म्हणतात- मै ना गांधी हूँ , और ना हिरो, मै बस एक आम नागरीक हूं…

Related posts

मंत्री अनेक मग कोकणाकडे दुर्लक्ष का ?

राहुल गांधी आणि रायबरेली…

अती उत्साहापोटी “संचार साथी” च्या सक्तीचा प्रयोग अंगलट !

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!