June 19, 2025
Maruti Chitampalli sitting in nature with birds and wildlife around, evoking memories of his forest life
Home » निसर्गात रमणारा साहित्यिक – मारुती चितमपल्ली
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

निसर्गात रमणारा साहित्यिक – मारुती चितमपल्ली

अरण्यवाचनासह प्राणी, पक्षी, वनस्पतींचे वन्य जीवन विषद करणारे ‘अरण्यऋषी’ पद्मश्री मारुती चितमपल्ली (वय ९३) त्यांच्याविषयीच्या आठवणीतील लेख…

अनिलकुमार शाह, जळगाव

मोबाईल – 94222 76902

“सदाहरित जंगलाचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे सर्व झाडे साधारणतः एकाच उंचीची वाढतात आणि लांबून वनराई आणि झाडे एखाद्या कोबीच्या गड्ड्यासारखी दिसतात. प्रचंड वृक्ष कटाईमुळे महाबळेश्वरच्या जंगलात पाऊस जो आधी ३५० – ४०० इंच पडत होता तो आता १५० इंचापेक्षाही खाली आलाय.’ मारुती चितमपल्ली जंगलाचंच मनोगत जणू सांगत होते. पहिल्याच भेटीत आमची घट्ट मैत्री जमली असं नाही, पण कुठेतरी नाळ जुळल्याची खात्री मनोमन त्यांनाही पटली असावी. समान धागा जुळला तो जंगलाची ओढ आणि वाचन यांचाच.. मात्र हळूहळू मितभाषी चितमपल्ली आम्हा सर्वांचे काका आणि मुलांचे आजोबा कधी झाले ते कळलंच नाही.

मितभाषी असलेले काका शांतताप्रिय आहेत. सतत बडबड करणारे लोक त्यांना आवडत नाहीत आणि स्वत:ही खूप बोलणे ते टाळतात. व्याख्याने, मुलाखतीसाठी त्यांना सतत ‘ बोलावणे असते, पण ते म्हणतात, ‘अरे अनिल, मी भाषणे देत फिरलो तर माझं संशोधन, वाचन, लेखन अपूर्णच राहील.’ त्यांचा मूळ पिंड आहे तो संशोधकाचाच. नोकरीत असताना आणि त्यानंतरही सतत निरीक्षण, वाचन आणि लेखन याचाच त्यांनी व्यासंग केला. पुस्तकांवरचे त्यांचे प्रेम हा तर स्वतंत्र लेखाचा विषय व्हावा. फक्त मराठीतच नव्हे तर हिंदी, संस्कृत, इंग्रजी, गुजराती, जर्मन, रशियन इत्यादी भाषांमधील समृद्ध साहित्य त्यांना आकर्षित करीत असते. लोक नोकरीत असताना घरासाठी, आपल्या प्रॉव्हीडंड फंडातून कर्ज काढत असतात. त्यांनी दरवेळी प्रॉव्हीडंड फंडातून कर्ज काढले ते पुस्तके घेण्यासाठी. हे अतिशय दुर्मिळ आणि एकमेवाद्वितीय उदाहरण असावे.

त्यांचा वैयक्तिक पुस्तक संग्रह ७५०० पेक्षा अधिक संख्येचा आहे आणि प्रत्येक पुस्तकाची त्यांच्याकडे नोंद आहे. भारतातील प्राचीन संस्कृत ग्रंथापासून परदेशातील उत्तमोत्तम साहित्यकृती आणि खास करून वनविद्या, जलसंपत्ती, पक्षी आणि या सर्वांशी संबंधित ललित आणि संशोधनपर ग्रंथांचा खजिनाच त्यांनी कष्टपूर्वक जमविला आहे. वाचन, अभ्यास आणि लेखनाच्या बाबतीत त्यांना एक अद्भूत अतृप्ती लाभलेली आहे. या अतृप्तीनेच कदाचित | त्यांना सतत वाचन, प्रवास आणि लेखनमग्न ठेवले असावे.

पक्की बैठक

त्यांच्या कुठल्याही लेखनाला वाचनाची पक्की बैठक आहे. मग ती अतिशय तरल अशी निळावंतीची कथा असो वा प्रचंड कष्टाने आणि अनेक वर्षाच्या संशोधनाने सिद्ध झालेला पक्षीकोश असो. नक्की पुरावा आणि स्वत: ची खात्री झाल्याशिवाय कुठलंही विधान करायचं नाही, हे तत्त्व त्यांनी सतत पाळलं आहे. एकदा जळगावला आले असता पाण्यावरून चर्चा सुरू होती. जैन धर्माचरणात सांगितलेल्या पाण्याच्या काटकसरीने वापराबद्दल आम्ही बोलत होतो. त्यात जळगावातील एक जैन व्यक्ती या धर्माचरणानुसार तीन-तीन, चार-चार महिने अंघोळ न करताही अतिशय टवटवीत राहतात आणि कांदा, लसूण न खाल्ल्याने त्यांच्या अंगाला दुर्गंधीही येत नाही, अशी माहिती मी देताच त्यांना आपल्याला भेटता येईल का ? असा प्रश्न पटकन विचारून खात्री करण्याच्या त्यांच्या नेहमीच्या हातोटीने ते नोंदीची, तयारी करीत होते. या भेटीमागचे आकर्षणाचे आणखी एक कारण होते ते म्हणजे मारुती काका आयुष्यभर कांदा, लसूण आणि मसाल्याचे पदार्थ न खाता राहिले आहेत. नावड किंवा धर्माचरण म्हणून नव्हे तर जंगलात वावरताना उग्र वासाचे पदार्थ खाल्ल्यास आपल्या शरीराला, घामाला उग्र वास येतो. तो प्राण्यांना पटकन जाणवतो. संशोधनासाठी आणि निरीक्षणासाठी जंगलात प्राण्यांच्या जितक्या जवळ जाता येईल तितके चांगले. मात्र हा उग्र वास या कामात अडथळा आणतो. प्राणी लगेच वासावरून दचकतात अन् लांब निघून जातात. तसे होऊ नये म्हणून उग्रवासाचे पदार्थ खायचे नाहीत, हा नियम कटाक्षाने ते पाळतात. इतकेच काय तर जंगलात जाताना एकदा गव्यांची लिद फासली. कारण गव्यांची घाणेंद्रिये अतिशय तीक्ष्ण असतात.

जळगावला त्या व्यक्तीची मग आम्ही भेट घेतली. त्यांच्याशी बोलताना नोंदवहीत टिपणे, लिहिणे चालू होते. प्रत्येक नोंदीसह खातरजमा करणारा किंवा नवीन माहिती मिळविणारा प्रश्न ते विचारीत आणि त्याच्या उत्तरादाखल मिळालेल्या माहितीची नोंद करीत. त्यांची अशी एक नोंदवही सतत सोबत असते. नोंदवही काय साईजची, कशी असावी, नोंदी कशा असाव्यात याचे नियम त्यांनी स्वतः बनवून आयुष्यभर ही सवय नियमितपणे पाळली. व्यंकटेश माडगूळकर त्यांच्याबाबतीत म्हणायचे की, चितमपल्लींच्या फक्त नोंदवह्या घेऊन संपादीत करून छापल्या तरी त्यांचं एक विपुल अन् अद्भूत भांडार मराठी साहित्यात उपलब्ध होईल. त्यांच्या संशोधक वृत्तीचा आणखी एक अनुभव आम्ही घेतला. जळगाव जवळच्या पालच्या जंगलात राहिलेला कुणीतरी गृहस्थ त्यांना भेटला. त्याचे एक विलक्षण निरीक्षण त्याने काकांना सांगितले.

थंडीत वानरे जंगलात लाकडे जमा करून शेकोटी करतात. त्यांना अग्नी प्रज्वलित करता येत नाही. मात्र ते जमविलेल्या लाकडांभोवती टोळीने बसतात आणि त्या लाकडातील अग्नीतत्त्व डोळ्यांनी शोषून घेतात. नंतर ही लाकडे आपण जाळायचा प्रयत्न केला तरी जळत नाही, पेटतही नाहीत. याची खात्री झाली नाही, पुरावा नाही म्हणून त्यांनी ही गोष्ट कुठेही लिहिलेली नाही. पालच्या जंगलात आणि आजूबाजूच्या परिसरात दोन दिवस याविषयी माहिती मिळवण्यासाठी मी स्वतः त्यांच्यासोबत पायपीट केली. अशीच पायपीट पवनी ते चंद्रपूर आणि राजूरच्या जंगलात मी त्यांच्यासह आणि पवनीच्या भीमसेन पाटलांसह चांदीकवडी पक्ष्यांच्या शोधासाठी केली आहे. हा वारसा त्यांनी डॉ. सलीम अलींकडून घेतला. याच अभ्यासूवृत्तीच्या आधारे त्यांनी कै. नरहर कुरुंदकरांना त्यांच्या एका लेखातील पक्ष्यांबद्दलच्या काही ओळी बदलायला लावल्या होत्या. आणि याच संशोधक वृत्तीने मृगपक्षीशास्त्राचा अनुवाद करण्याआधी सतत १२ वर्षे त्यांनी आधी संस्कृत अध्ययन केले. पुराव्यासह अनुवाद तपासला. मगच प्रसिद्धीला दिला.

सतत वाचन

वनखात्यातील त्यांच्या संपूर्ण सेवाकाळात त्यांचे वाचन अभंग राहिले. आयुष्यभर त्यांची संशोधक वृत्ती आणि वाचन, लेखन सुरूच आहे. त्यांची नोकरी सरकारी खात्यात. त्यात जंगल खाते म्हटलं की, अभक्ष्य भक्षण. खरं म्हणजे काहीही भक्षण आणि विविध व्यसने न बाळगणारा माणूस या खात्यात विरळाच. आणि हे असे नसले तरी रोजचे सरकारी रुटीन म्हणजे माणसाच्या संवेदनशीलतेवर वरंवटाच फिरतो. मन नुसते निबरच नाही तर कोडगेही होते. अशा जागी सरळ, सज्जन माणूस सहजासहजी टिकू शकत नाही. त्याला या सर्वात राहून, सर्व प्रकारचे सरकारी त्रास सहन करून शाकाहारी मारुतीकाकांनी त्यांची तरल संवेदनशीलता जपली. सरकारी सेवेत फोनवरून होणारे अवेळचे हुकूम आणि त्याचा होत असलेला व्यत्ययाचा अनुभव म्हणून वयाच्या जवळजवळ सत्तरीपर्यंत । त्यांनी घरी फोनच घेतला नव्हता ! प्रवास आणि लेखन हे अखंड चालू रहावं यासाठी हा अट्टहास.

नैसर्गिक लेखन

हे सर्व करताना कुठेही प्रसिद्धीची अवास्तव हाव नाही. अनावश्यक प्रसिद्धी आणि व्याख्याने यापासून सतत त्यांनी स्वत:ला दूर ठेवले. उगमापाशी नदीचे पाणी स्वच्छ, नितळ, आरोग्यदायी असते. काही नद्यांचे उगमाजवळचे पाणी तर वर्षानुवर्षे साठवून ठेवले तरी त्यात रोगजंतू होत नाहीत. चितमपल्लींनी त्यांच्या मनाला आणि लेखनाला या शहरी गढूळतेपासून यशस्वीपणे वाचविले आहे.

नियमबद्ध जीवन

त्यांची दिनचर्याही एखाद्या तपस्व्यासारखी आहे. पहाटे उठल्यावर ते ध्यान करतात. त्यांच्यासह राहण्याचा जितक्यावेळा योग आला तेव्हा ध्यानानंतर निरव शांततेत चाललेल्या ओंकाराचे मला नेहमी आकर्षण वाटते. आसने आणि प्राणायामादरम्यान कृष्णमूर्तीनी शिकवलेली काही आसने ते करतात. त्यानंतर औषधी वनस्पती आणि नागलीपासून बनविलेल्या खास भुकटीचा उकाळा ते घेतात.

नंतर पायी फिरायला जाणे. फिरून आल्यानंतर नाश्ता. नंतर वाचन-लेखन. टपाल, फोन काही असल्यास ते पाहणे, बाहेरची कामे आटोपून जेवण. थोडी वामकुक्षी. पुन्हा सायंकाळी ६.३० पर्यंत वाचन, लेखन. रात्रीचे जेवण ८ वाजता आणि १० वाजता झोपणे. त्यांचे म्हणणे आहे की, पहाटे लवकर उठणे आणि लवकर झोपणे, रोज व्यायाम आणि मिताहार हे आरोग्य उत्तम राखण्यासाठी आवश्यक आहे. अभ्यासकाने तर दिनचर्या आणि आहार हे कटाक्षाने सांभाळले पाहिजे. त्यांना प्रवासाचाही अजिबात कंटाळा येत नाही. जळगावला आले की त्यांची पहिली ताकीद असते, कुणालाही कळवू नका. म्हणजे आपल्याला शांततेत राहता येईल. एकदा तर ते दिवाळी अंकासाठीचे लेख शांततेत लिहिता यावेत म्हणून १०-१२ दिवस आमच्या घरी येऊन राहिले होते.

व्याख्यानांच्या बाबतीत एकदा बोलताना त्यांनी सांगितले की, “व्याख्यानांची निमंत्रणे येतच राहतात. पण त्यात मी रमलो तर माझे वाचनलेखन बाजूलाच राहील. ” साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर त्यांची पहिली प्रतिक्रिया होती की, “सतत फोन, मुलाखती, निमंत्रणे आणि प्रवास यामुळे आता निदान वर्षभर तरी माझ्या वाचन-लेखनात व्यत्यय येत राहणार.’

नव्या पिढीचा विचार

त्यांचे म्हणणे आहे की, ज्यांना मला जाणून घ्यायचे आहे, त्यांनी माझ्या पुस्तकांचे वाचन करावे. मला अजून बरेच वाचन, संशोधन आणि लेखन करावयाचे असून काही मूलभूत कोश मराठीत तयार करावयाचे आहेत. त्यामुळे जो वेळ हाताशी आहे तो वाया न घालवता पुरेपूर वापरला पाहिजे. पुढच्या पिढीच्या हातात देण्यासारखे बरेच आहे. ते दिले नाही तर मलाच अपराध्यासारखे वाटेल. जोपासलेली अभ्यासूवृत्ती, प्रचंड वाचन, तीक्ष्ण निरीक्षण, संशोधनासाठी लागणारी चिकाटी आणि तरल ललित लेखनासाठीची संवेदनशील वृत्ती या गुणांमुळे कितीतरी नवीन गोष्टी त्यांनी मराठीत आणल्या. एक वेगळे विश्व त्यांनी मराठी साहित्यात उभे केले आहे. जंगल, पशु-पक्षी, वनस्पती याविषयीच्या लेखनाचे एक नवीन समृद्ध दालनच त्यांनी खुले केले. या सर्वांमागची त्यांची कारणमिमांसा सांगताना ते म्हणतात, ‘माझा छंदच माझ्या पोटापाण्याचा व्यवसाय होता. या योगामुळेच मला हे साध्य झाले. त्यांच्या जंगल, प्राणी, वनस्पती, पक्षी या सगळ्यांच्या अभ्यासातून त्यांनी मराठी भाषेला जवळपास एक लाख नवीन शब्द दिले आहेत.

संतमय सहवास

वनस्पती कुळातील ऋषितुल्य टवटवीत माणसाला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळणे हा त्या पदाचाही सन्मान झाला. आता त्यांचा पक्षीकोश प्रसिद्ध झालेला आहे. पशुकोश प्रकाशकाकडे दिलेला आहे आणि वृक्षकोश पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी ते एकटे समुद्राकाठी एक वर्ष जाऊन राहिले. तेथे त्यांनी समुद्र आणि खास करून मासे यांचा अभ्यास केला आणि त्यावर आधारित मत्स्यकोशची तयारी केली. त्याची टिपणे तयार केली. वयाच्या ७५ व्या वर्षीसुद्धा एखाद्या विषयाच्या अभ्यासासाठी कुणीतरी समुद्रकिनारी एकटे कोकणात राहतो हेच मुळी अतिशय दुर्मिळातले दुर्मिळ उदाहरण आहे. त्यामुळेच टाइम्स ऑफ इंडिया सारख्या देश-विदेशात प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्राने त्यावर अग्रलेख लिहून त्याची दखल घेतली. कुठल्याही प्रवासाचा त्यांना मनाने कधीही कंटाळा आला नाही. शरीराने त्यावर निर्बंध आणले इतकेच. नुकतेच विदर्भातले प्रदीर्घ काळाचे वास्तव्य सोडून त्यांनी जन्मगावी सोलापूरला प्रयाण केले आहे. तेथे वनखात्याने त्यांची पुढील संशोधन लेखन यासाठी सोय करून दिली. हा त्यांच्या संशोधक वृत्तीचा आणि उत्तम सेवा खात्यात दिल्याचा सन्मानच. हे देखील एक दुर्मिळ उदाहरण म्हणावे लागेल. त्यांचा सहवास आम्हाला संतांच्या सहवासासारखा वाटायचा. प्रत्येक वेळी त्यांना भेटल्यावर एक नवी उर्जा मिळत राहायची.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading