fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 23, 2026
Home » अरण्यऋषी मारुती चितमपल्ली काळाच्या पडद्याआड, महाराष्ट्र पक्षिमित्रांची आदरांजली
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली काळाच्या पडद्याआड, महाराष्ट्र पक्षिमित्रांची आदरांजली

Portrait of Maruti Chitampalli with background of forests and birds, symbolizing his lifelong dedication to nature

सोलापूरअरण्यवाचनासह प्राणी, पक्षी, वनस्पतींचे वन्य जीवन विषद करणारे ‘अरण्यऋषी’ पद्मश्री मारुती चितमपल्ली (वय ९३) यांचे सोलापुरात बुधवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास निधन झाले. ते गेली काही वर्षे सोलापुरात मूळ गावी वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात पुतण्या श्रीनिवास, भावजय आणि नातवंडे असा परिवार आहे.

चितमपल्ली यांना केंद्र सरकारने अलीकडेच पद्मश्री पुरस्कार जाहीर केला होता. नवी दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारून परतल्यानंतर ते आजारी होते. त्यांच्या पायाला जखम झाली होती. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. हा आजार आणि वार्धक्य यामुळे बुधवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या निधनाने भारतातील जंगलांशी नाळ जुळलेले एक निसर्गप्रेमी अभ्यासू व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. तब्बल ४ दशकांहून अधिक काळ त्यांनी निसर्ग संशोधन लेखन आणि संवर्धनासाठी समर्पित केला.

महाराष्ट्र पक्षिमित्र संघटने सोबत मारुती चितमपल्ली यांचे अगदी चळवळीच्या सुरवातीपासून म्हणजे १९८१ पासुन ऋणानुबंध होते. ते लोणावळा येथे पार पडलेल्या पहील्या संमेलनास उपस्थित होते. त्यानंतर ते १९९३ सालच्या पहील्या विदर्भ पक्षिमित्र संमेलनास उद्घाटक म्हणून लाभले होते. नाशिकच्या १९८५ ला पार पडलेल्या सहाव्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते. विशेष म्हणजे या संमेलनाचे उद्घाटक साहित्यिक वि वा शिरवाडकर हे होते. अमरावती येथे पार पडलेल्या २६ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनास ते उद्घाटक म्हणून लाभले आणि संपूर्ण दोन दिवस थांबून त्यांनी महाराष्ट्रातील अनेक पक्षिमित्रांशी त्यावेळी संवाद साधला होता. २०२० साली त्यांना महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे जिवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिवस ५ नोव्हेंबर हा असुन जगप्रसिद्ध पक्षी अभ्यासक डॉ सालिम अली यांचा जन्मदिवस १२ नोव्हेंबर हा आहे. हा योगायोग साधून महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे नोव्हेंबर मधे ५ ते १२ नोव्हेंबर हा पक्षी सप्ताह साजरा करण्याची २०१७ पासून सुरुवात केली होती, पुढे महाराष्ट्र शासनाने हा पक्षी सप्ताह शासन स्तरावर साजरा करावा यासाठी महाराष्ट्रपक्षीमित्रतर्फे पाठपुरावा करण्यात आला. २०२० ला हा प्रस्ताव शासनाने मंजूर केला. महाराष्ट्र पक्षिमित्रची ही एक मोठी उपलब्धी होती. सरकारने नुकताच त्यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान केला तो दिवस महाराष्ट्र पक्षिमित्रसाठी अभिमानाचा दिवस होता. मारुती चितमपल्ली यांची पुस्तके वाचून आमच्या पिढीतील अनेक जन जंगल आणि पक्षी अभ्यास व संवर्धनाकडे वळलेत. शेवटच्या दिवसापर्यंत त्यांचे आम्हाला मार्गदर्शन मिळाले. महाराष्ट्र पक्षिमित्र त्यांचा सदैव ऋणी राहीन. त्यांचे जाण्यामुळे महाराष्ट्र पक्षिमित्रची अपरिमित हाणी झाली आहे.

डॉ जयंत वडतकर, अध्यक्ष, महाराष्ट्र पक्षिमित्र

गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध, नागझिरा येथील राष्ट्रीय उद्यानात वनाधिकारी म्हणून दिवंगत मारुती चितमपल्ली सरांनी दीर्घकाळ पक्षी निरीक्षणासाठी व्यतीत केला. पुढे मोठ्या स्वरूपात पुस्तक रूपाने अनेक पक्षी व प्राण्यांच्या नोंदी ठेवत वाचकांच्या हाती मोठा ऐवज ठेवला.

अशोक चेपटे, पक्षिमित्र

तुम्ही विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे द्यायची होती…पक्ष्यांच्या नोंदीची डायरी तुमच्याकडून तपासून घ्यायची होती..सोलापूर येथील पक्षी संमेलनात अनेक प्रश्न विचारायचे राहून गेलेत.. ‘पक्षी येती अंगणी ‘ पुस्तकाविषयी तुम्ही खूप काही सांगत होतात.. काळवीट आणि अस्वलाविषयी तुम्ही किती बोलत राहिलात..तुमच्या डोळ्यांनी पुन्हा एकदा माळरान पाहायचं होतं.. तुम्ही विचारलेल्या लांडग्याविषयीची निरीक्षणे मला सांगता आली नाहीत तेव्हा मी नापास झालो होतो.. गुरुजी मला पुन्हा एकदा परीक्षा देऊन पास व्हायचय…

माणिक पुरी, पर्यावरण अभ्यासक

🌿 निसर्गाचे ऋषी🌿

साधं आयुष्य, माफक वाट,
मनात मात्र उंच भरारीची बात।
निसर्ग होता सोबती रोजचा,
शब्द होतं त्यांचं हिरवंगार ओझं।

पद्मश्री, सन्मान, गौरवांचा साज,
पण मनात होता फक्त निसर्गाचा राज।
नाही गर्व, नाही गवगवा,
फक्त शांतपणे निसर्गाचा संवाद हवा।

पाने सळसळली, पक्षी बोलले,
सरांच्या ओळी जीवाला हलवून गेले।
झाडांतून, गवतांतून, गंधांतून ते वाचले,
निसर्गाच्या भाषेत शब्द जुळवून टाकले।

ते होते ऋषीसारखे - मौनात बोलणारे,
नजरेतून ज्ञान देणारे, मार्ग दाखवणारे।
जंगलात रमलेले, शब्दात फुललेले,
मनाच्या खोल तहातुन, आत मिसळलेले।

आज ते नाहीत, तरी सावली त्यांच्या आहे,
प्रत्येक वृक्षाच्या छायेत त्यांची ओळख राहते।
वाऱ्याच्या सुसाटीत त्यांचा श्वास ऐकू येतो,
पावसाच्या थेंबातून त्यांचा स्पर्श उमटतो।

‘मारुती सर’ – आमचा निसर्गगुरु,
त्यांच्या वाटेवर चालणं हेच आमचं श्रध्दाप्रणत सुरु।
त्यांच्या स्वप्नात आपण रंग भरू,
त्यांच्या नावानं निसर्गसेवा अखंड करीत राहू।

एस. निखिल

Related posts

हरवलेला गाव…यंदाच्या प्रतिभा दिवाळी अंकाचा विषय

वैनाकाठ फाऊंडेशनतर्फे साहित्य पुरस्कारांचे वितरण

मुंबई मराठी साहित्य संघातर्फे पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!