शेती पर्यावरण ग्रामीण विकास

हवामान बदलाचा शेतीवर घाव : उत्पादन निम्म्यावर येण्याची भीती

विविध पिकांच्या उत्पादकतेवर तापमानवाढीची सुनामी

गेल्या काही दशकांतील हवामानाच्या आकडेवारीचा अभ्यास केल्यास तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे स्पष्ट दिसते. या वाढत्या तापमानाचा आणि बदलत्या मान्सून पद्धतीचा परिणाम विविध पिकांच्या उत्पादनावर होत असून भविष्यात शेतीसमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे.

– प्रा. डॉ. सुमेरसिंग राजपूत, तिळ पैदासकार
अखिल भारतीय समन्वित तिळ सुधार प्रकल्प, तेलबिया संशोधन केंद्र, जळगाव-४२५००१
(मो. ९४०५१३८२६९)

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून डॉ. विलास खर्चे यांची डिसेंबर महिन्यात निवड झाली. त्यानंतर त्यांनी संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांच्यासह विद्यापीठाच्या अखत्यारीतील विविध संशोधन केंद्रांना प्रत्यक्ष भेटी देण्यास सुरुवात केली. या भेटींमध्ये त्यांनी चालू असलेल्या संशोधन कार्याचा आढावा घेतला आणि शास्त्रज्ञांना सविस्तर मार्गदर्शन केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत असलेले कृषी संशोधन केंद्र (ममुराबाद फार्म), जळगाव हे सन १९१३ मध्ये इंग्रजांच्या काळात स्थापन झालेले ऐतिहासिक संशोधन केंद्र आहे. खानदेशाच्या भूमीच्या शिरपेचात मढवलेला नवरंगी कोहिनूर हिरा असे या केंद्राचे वर्णन केले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. कोरडवाहू शेतीसाठी उन्नत संशोधन करण्याच्या दूरदृष्टीने हे केंद्र उभारण्यात आले.

या केंद्रावर कोरडवाहू शेतीतील विविध पिकांवर संशोधन करून देशी कापूस, तिळ, भुईमूग, करडई, मूग आणि उडीद या पिकांच्या अनेक सुधारित वाणांची निर्मिती झाली आहे. त्यामुळे या केंद्राने कृषी संशोधनाच्या क्षेत्रात ऐतिहासिक योगदान दिले आहे. मागील ११३ वर्षांनंतरही या संशोधन केंद्राची चमक आजही कायम आहे.

वेगवेगळ्या कृषी विषयांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनामुळे महात्मा फुले कृषी विद्यापीठाला देशपातळीवर अग्रस्थान प्राप्त झाले असून जागतिक स्तरावरही या विद्यापीठाची ओळख निर्माण झाली आहे. तिळ, मूग, उडीद आणि देशी कापूस या पिकांमध्ये मागील पाच वर्षांत येथून विकसित झालेल्या वाणांनी देशपातळीवर मानाचे स्थान मिळवले आहे. या वाणांच्या लागवडीमुळे शेतकरी उत्पादन वाढवून आर्थिक उन्नती साधत आहेत.

कृषी संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रातील जमिनीची उत्पादकता महाराष्ट्रातील इतर भागांतील जमिनीपेक्षा नैसर्गिकरीत्या अधिक असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. येथील जमिनीत पोटॅश आणि सेंद्रिय कर्बाचे प्रमाण तुलनेने जास्त असल्यामुळे पिकांची गुणवत्ता उत्तम राहते आणि कोरडवाहू परिस्थितीतही अधिक उत्पादन मिळते. येथील खोल काळी, कसदार रेगुर माती कोरडवाहू पिकांसाठी विशेषतः उपयुक्त ठरते.

तेलबिया संशोधन केंद्र, जळगाव येथे ममुराबाद प्रक्षेत्रावर हवामानाशी संबंधित सर्व घटकांची नोंद दररोज दोन वेळा नियमितपणे केली जाते. या केंद्रावर सन १९६५ पासून हवामानाच्या अचूक नोंदी उपलब्ध आहेत. सन १९६५ ते २०२५ या कालावधीतील आकडेवारीचा अभ्यास केल्यास सरासरी ७८०.८ मि.मी. पाऊस सुमारे ५४ दिवसांत पडल्याचे दिसून येते.

मागील ६० वर्षांत २००६ मध्ये सर्वाधिक १४०१.८ मि.मी. पाऊस ५१ दिवसांत पडला, तर २०१२ मध्ये सर्वात कमी ३६६.८ मि.मी. पाऊस ३० दिवसांत झाला. पावसाचे जास्तीत जास्त दिवस ८६ तर किमान ३२ दिवस आढळून आले.

तापमानाच्या नोंदींवरून जळगाव जिल्ह्यात २६ मे १९७३ रोजी कमाल तापमान ४७.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर ८ जानेवारी २०११ रोजी किमान तापमान २.५ अंश सेल्सिअस इतके होते.

मागील ६० वर्षांत खरीप हंगामातील सरासरी कमाल तापमान ३६.३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २६.३ अंश सेल्सिअस आढळते. रब्बी हंगामात सरासरी कमाल तापमान ३२.२ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १५.६ अंश सेल्सिअस आहे. उन्हाळी हंगामात कमाल तापमान ४७.९ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान ३२.० अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे.

सन २०१४ ते २०२५ या कालावधीत जून ते सप्टेंबर महिन्यांदरम्यान सरासरी ६७५.२ मि.मी. पाऊस सुमारे ३७ दिवसांत पडल्याचे आढळते. पावसाचे प्रमाण कमाल ८२१.१ मि.मी. तर किमान ४२०.२ मि.मी. इतके होते. पावसाचे दिवस सरासरी २३ ते ४५ इतके होते.

या हवामानाच्या आकडेवारीवरून जळगाव जिल्हा मान्सून पावसावर अवलंबून असलेला जिल्हा असल्याचे स्पष्ट होते. येथे खरीप, रब्बी आणि उन्हाळी असे तीन हंगाम स्पष्टपणे दिसून येतात. उष्ण व कोरडे हवामान असूनही विविध पिकांसाठी येथे अनुकूल परिस्थिती आढळते. जिल्ह्यात तालुकानिहाय वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी आढळतात. सरासरी जमिनीत पोटॅश अन्नद्रव्याचे प्रमाण पुरेसे असतानाही देशात सर्वाधिक रासायनिक खतांचा वापर याच जिल्ह्यात होत असल्याचे वास्तव आहे. यामुळे पिकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होत आहे.

खरीप हंगामातील पिके मान्सून पावसावर अवलंबून असल्यामुळे हवामानातील बदलांचा त्यांच्यावर मोठा परिणाम होत आहे. मागील काही वर्षांपासून मान्सून साधारण दोन आठवडे उशिरा येत असल्याचे दिसते. त्यामुळे कडधान्ये व तेलबिया पिकांची पेरणी वेळेवर होत नाही आणि उत्पादन घटते. परिणामी या पिकाखालील क्षेत्र कमी होत चालले आहे.

मान्सूनचा पाऊस कमी दिवसांत जास्त प्रमाणात पडत असल्याने जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण घटत आहे. अनेकदा मान्सून उशिरा सुरू होतो आणि सप्टेंबरमध्ये जास्त पाऊस पडतो. त्यामुळे जूनमध्ये लागवड केलेली पिके पक्वतेच्या अवस्थेत असताना पडणाऱ्या पावसामुळे त्यांचे मोठे नुकसान होते.

वाढत्या तापमानाचा सर्व पिकांच्या उत्पादकतेवर गंभीर परिणाम होत आहे. तापमानात सुमारे २ अंश सेल्सिअस वाढ झाल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. काही परिस्थितींमध्ये उत्पादन ५० टक्क्यांपर्यंत किंवा त्याहूनही कमी होऊ शकते. सध्या वाढत्या तापमानावर दीर्घकालीन ठोस उपाय उपलब्ध नाहीत. निसर्गावर पूर्ण नियंत्रण विज्ञानालाही मिळालेले नाही, हे वास्तव स्वीकारावे लागते.

तथापि बदलत्या हवामानात तग धरणाऱ्या पिकांच्या जाती विकसित करण्याचे संशोधन विद्यापीठाच्या विविध संशोधन केंद्रांवर सुरू आहे. कुलगुरूंच्या सूचनेनुसार हवामानअनुकूल शेती तंत्रज्ञानावर आधारित संशोधनालाही प्राधान्य दिले जात आहे.

जैवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने विकसित केलेले सुधारित वाण वापरल्यास उत्पादन वाढवणे शक्य आहे. कीड-रोग प्रतिकारक, अजैविक ताण सहन करणारे वाण हवामान बदलाच्या परिणामांवर मात करण्यास मदत करू शकतात.

हवामान बदलामुळे धान्य व तेलबिया पिके लवकर पक्व होण्याची शक्यता आहे; मात्र वाढलेल्या तापमानामुळे उत्पादनात घट होईल. हिवाळ्यातील तापमानवाढ पशुधनासाठी काही प्रमाणात अनुकूल ठरू शकते, पण उन्हाळ्यातील तापमानवाढीचे दुष्परिणाम गंभीर असू शकतात. वातावरणातील कार्बन डायऑक्साइड वाढल्याने तणांची वाढही वाढण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर जैवतंत्रज्ञान, उत्तम सिंचन व्यवस्था, मृदा व्यवस्थापन, ओलावा संवर्धन आणि उष्णतेला तग धरणाऱ्या पिकांच्या जाती विकसित करणे अत्यावश्यक ठरणार आहे. शून्य मशागत, जनुकीय सुधारित ताण सहन करणारे वाण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हवामान बदलाचे दुष्परिणाम कमी करता येऊ शकतात.

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हवामानअनुकूल शेती विकसित करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या दिशेने संशोधन वेगाने पुढे जाऊन त्याचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य महात्मा फुले कृषी विद्यापीठ यशस्वीपणे करेल, याबद्दल शंका नाही.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

Dnyneshwari Tips On Karma : कर्म सोडू नका तर त्यातला अहंकार सोडा अन् चमत्कार पाहा

आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…

14 hours ago

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

1 day ago

विरोधकांचा आवाज क्षीण झालायं… की सरकार अधिक बळकट झालंय ? Monsoon session of the legislature

मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…

2 days ago

इतिहास वाचनातूनच संस्कार अन् सुराज्याची जडणघडण : संयोगिताराजे छत्रपती Good State Formed Through Reading History

वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…

2 days ago

अर्पणामागचा भाव : शुद्ध भक्तितत्त्वाचा ज्ञानेश्वरीतील अमृतसंदेश Pure Bhakti from Dnyaneshwari |

हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…

2 days ago

आकाशातील ढग व युद्धाच्या धगीत अडकलेली अर्थव्यवस्था ! an economy caught in the grip of war

विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.…

3 days ago