May 11, 2026
महात्मा जोतीराव फुले यांच्या नऊ दुर्मीळ चरित्रग्रंथांचा अभ्यास मांडणाऱ्या पुस्तकाचे मुखपृष्ठ
Home » महात्मा फुलेंच्या आरंभिक चरित्रांचा ऐतिहासिक खजिना : विस्मृतीत गेलेल्या नऊ अल्पचरित्रांचा पुनर्शोध
संशोधन आणि तंत्रज्ञान

महात्मा फुलेंच्या आरंभिक चरित्रांचा ऐतिहासिक खजिना : विस्मृतीत गेलेल्या नऊ अल्पचरित्रांचा पुनर्शोध

महात्मा जोतीराव फुले यांच्याविषयी मोठ्या प्रमाणावर लेखन झाले असले, तरी त्यांच्या निधनानंतर लगेच लिहिलेली आणि विस्मृतीत गेलेली आरंभिक चरित्रे सामान्य वाचकांपर्यंत कधीच पोहोचली नव्हती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाने प्रकाशित केलेल्या ‘महात्मा जोतीराव फुले : नऊ जुनी अल्पचरित्रे’ या ग्रंथातून श्रद्धा कुंभोजकर आणि बापूराव घुंगरगावकर यांनी इतिहासातील हा दुर्लक्षित ठेवा संशोधक आणि वाचकांसमोर आणला आहे. समकालीन नोंदी, समाजसुधारणेची ज्वलंत उदाहरणे आणि फुले यांच्या कार्याचे तत्कालीन प्रतिबिंब जपणारा हा ग्रंथ केवळ चरित्रसंग्रह नसून महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचे महत्त्वपूर्ण दस्तऐवजीकरण ठरतो.

लहू गायकवाड, नारायणगाव

इतिहास घडविण्यामध्ये महाराष्ट्राची समृद्धी आहे. मात्र इतिहास लेखनात तो काही कालावधीसाठी मागे होता. याविषयीचे विधान गर्जा महाराष्ट्र या ग्रंथामध्ये माननीय सदानंद मोरे यांनी केले आहे. मराठी माणूस इतिहासाच्या अनभिज्ञतेमध्ये आहे असे ते म्हणतात. हे लिहिण्याचे कारण म्हणजे महात्मा फुले यांच्या विषयी लिहिलेले नऊ चरित्र ग्रंथ बराच काळ फार कमी लोकांना माहीत होते. फुले यांच्या विषयीचे हे चरित्र इतिहास लेखन या निमित्ताने पुढे आणलेल्या दोन्ही संपादक महोदय यांचे मनापासून वाचक म्हणून मी ऋण व्यक्त करत आहे.

महात्मा फुले म्हणजे महाराष्ट्रातील प्रतिभावंत समाज सुधारक आधुनिक मूल्य जपणारी व्यक्ती आणि समाज सुधारण्याच्या क्षेत्रात अग्रगण्य नाव आहे. महात्मा फुले म्हणजे सामाजिक समतेचे अधिष्ठान होय. महात्मा फुले यांच्या विषयी आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये बरेच लेखन झाले आहे मात्र फुले यांच्या विषयी लिहिलेली ही प्रारंभीची चरित्रमाला अजूनही सामान्य वाचकांपर्यंत पोहोचली नव्हती. यास काय म्हणावे. आणि नव्या पिढीला तर ही चरित्र माहितही नसावीत कदाचित.
ज्यांना माहीत असतील ते भाग्यवान आहेत. दोन्ही संपादकांनी आपला मौल्यवान वेळ देऊन या चरित्र ग्रंथांचा शोध घेतला आणि फुले यांच्या विषयीचे हे चरित्र ग्रंथ उत्तम पद्धतीने वाचकांच्या समोर आणले आहेत. इतिहास विभागातील प्राध्यापक बाबासाहेब दूधभाते यांनी यांनी मला हा ग्रंथ मिळवून दिला. या ग्रंथाला इतिहास विभाग प्रमुख श्रद्धा कुंभोजकर यांनी विद्वत्ताप्रचुर प्रस्तावना लिहिली आहे.

जानेवारी १८९१ मध्ये प्रकाशित पहिले अल्पचरित्र

पहिले अल्पचरित्र आहे स्वतः यशवंतराव फुले यांनी आणि गोविंद गणपत काळे यांनी 1891 मध्ये लिहिलेले रा . रा. जोतीराव गोविंदराव फुले यांच्या चरित्र. आपणा सर्वांना ज्ञात आहे की इसवी सन 1890 मध्ये फुले यांचे निधन झाले. त्यानंतर एका वर्षात हे चरित्र प्रकाशित झाले. अर्थात या चरित्र ग्रंथामध्ये अनेक महत्त्वपूर्ण अशा समकालीन नोंदी आहेत. विस्तार भयास्तव त्या सर्व नोंदी आणि त्याचे सार ग्रंथ परिचयामधून या ठिकाणी देता येणार नाहीत. या चरित्र पुस्तकाचे समकालीन वाङ्मयीन मूल्य आणि संदर्भ मूल्य खूप मोठे आहे. चरित्र इतिहास लेखनातील तो उत्तम ग्रंथ म्हणावा लागेल. या ग्रंथाची निर्मिती करण्यामध्ये जानेवारी 1891 मध्ये स्वतः सावित्री माता फुले यांच्या आग्रह आणि सूचनेनुसार महात्मा फुलेचे हे पहिले चरित्र प्रकाशित करण्यात आले. यापूर्वीही काही इतिहास लेखकांनी या ग्रंथाविषयीचा त्रोटक उल्लेख आपल्या लिखाणात केला आहे.

या प्रथम चरित्र ग्रंथामध्ये फुले यांच्या जीवनातील लहानपणचे काही प्रसंग पुणे मुक्कामातील समकालीन मित्रमंडळी यांच्या विषयी माहिती. शाळा सुरू केल्यानंतर सावित्रीबाईंना झालेला विरोध. फुले यांचे काम म्हणजे बोले तैसा चाले l या वाक्याप्रमाणे आहे असे प्रतिपादन या चरित्र पुस्तकात आहे. मानव मुक्तीसाठी फुले यांनी जे प्रयत्न केले त्याविषयीचे खूप समकालीन चांगले उल्लेख या चरित्र ग्रंथात दिसतात.

दुसऱ्या चरित्रात आहेत हे महत्त्वपूर्ण उल्लेख

दुसरे चरित्र आहे महात्मा फुले यांचे अमरजीवन. शास्त्री नारो बाबाजी महाघट पाटील यांनी हे चरित्र लिहिले आहे. त्यामध्ये फुले यांचे पणजोबा आणि पणजी यांच्यापासून या पुस्तकाची सुरुवात होते. वडील आई व दाई शिक्षण व शेती काम आणि फुले यांचा विवाह कटगुण गावचे चौगुले आणि फुले यांची वंशावळ फुले यांनी केलेली कामे. फुले यांना मराठी, इंग्रजी, उर्दू, कानडी, मद्रासी, गुजराती अशा सहा भाषा येत होत्या हे उल्लेख नव्याने वाचकांच्या समोर येत आहेत. हे एक वाक्य म्हणजे या पुस्तकाचा आत्मा आहे. फुले यांनी केवळ पाण्याचा हौद खुला केला नाही तर त्यांनी सर्व जातीच्या लोकांना सोबत घेऊन सारे पुणे स्वच्छ करून टाकले व सरकारकडून पाणी स्वच्छ करण्यासाठी औषध घेऊन पाण्यात टाकले.

फुले यांनी शाळा काढल्या मात्र शाळेत अध्यापनाचे काम करूनही या कामासाठी त्यांनी पगार घेतला नाही. तसेच त्यांनी काही काळ मिशनरी मधील मुलींच्या शाळेतही अध्यापनाचे काम केले होते. इसवी सन 1888 च्या मे महिन्यात म्हणजे 11 मे रोजी फुले यांना मुंबई कोळीवाड्यात महात्मा ही पदवी देण्यात आली. हा उल्लेख महत्त्वपूर्ण आहे. फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक लिहून पुरे केले आणि 1890 मध्ये न्हावी लोकांची संघटना स्थापन केली आणि येथून पुढे आम्ही महिलांचे केशव पण करावयाचे नाही अशी घोषणा केली.. त्यामुळे ब्राह्मण विधवा स्त्रिया फुले यांना आपल्या कैवारी समजू लागल्या. हा उल्लेख अतिशय समाज सुधारण्याच्या इतिहासात महत्त्वपूर्ण आहे.

१९११ मध्ये तिसरे चरित्र

तिसरे चरित्र पुस्तक आहे स्वामी जोतिराव फुले यांच्या पुण्यतिथी प्रित्यर्थ सत्यशोधकाष्टक संपादक आहेत मोतीराम तुकाराम वानखेडे. हे पुस्तक 1911 मध्ये प्रकाशित झाले.

जगी मानवी हक्क ते सारखेच l
वदे सर्व लोक आहा l एक तोच l
करी यत्न जो सत्य शोधावयाला l
नमस्कार माझा तया जोतिबाला l
अशा प्रकारची आठ कवणे या ठिकाणी आहेत.

चौथे पुस्तक सत्यनिष्ठ जोतीराव फुले.

रामय्या अय्यावारू या चरित्र ग्रंथाचे लेखक आहेत. या पुस्तकाच्या शीर्षकांमध्ये सत्यनिष्ठ हा शब्द महत्त्वपूर्ण आहे. समाज सुधारण्याच्या क्षेत्रामध्ये अनेक लोकांनी फुले यांना विरोध केला पण फुले या विरोधाला जुमानत नव्हते. वयाच्या 21 व्या वर्षी म्हणजे 1848 मध्ये फुले यांनी भिडे वाड्यात मुलींसाठी शाळा सुरू केली. आपण वयाच्या 21 व्या वर्षी किमान त्या शाळेची माहिती तरी वाचली होती का खरे तर असा प्रश्न आपणच आपल्या मनाला विचारायला हवा. त्यामुळेच तर आजच्या मुली शिकू शकल्या. मुलींच्या शिक्षणातील हा मैलाचा दगड आहे. किमान शिक्षण घेत असलेल्या सर्व मुलींनी अर्थात सर्वांनी हे पुस्तक वाचायला हवे.

शिक्षणाने मानवी धर्म बुडत नाही तर माणूस प्रगतिशील होतो विवेकी होतो. ही बाब फुले यांनी पटवून दिली. सर्व मनुष्यप्राणी एका ईश्वराची लेकरे आहेत त्यांच्या दृष्टीने कोणी उंच आणि नीच नाही सर्वांनी सत्याने आणि प्रीतीने सर्वांशी वागावे हा या पुस्तकाचा आत्मा आहे.

पाचवे पुस्तक आहे सत्यमेव जयते.

महाराष्ट्राचा मार्टिन ल्युथर महात्मा ज्योतिराव फुले यांचे हे त्रोटक चरित्र. लेखक व प्रकाशक आहेत अनंत एकनाथ गवंडी. जी गोष्ट सत्य आहे, जी मनाला पटली आहे. जी गोष्ट सदसद विवेक बुद्धीला पटली, जी बाजू सत्याची आहे, म्हणून खात्री वाटली. जी गोष्ट लोकहिताची आहे, ती साध्य करण्यासाठी प्राण गेला तरी बेहत्तर मी एक इंच ही मागे घेणार नाही अशा प्रकारची सत्याची ज्योत फुले यांनी पेटवली होती. या पुस्तकाच्या प्रस्तावनेतील हे वाक्य फुले यांच्या जीवनाचे ध्येय सांगून जाणारे आहे. फुले यांचा मराठी भाषेचा गणिताचा आणि इंग्रजी भाषेचा उत्तम अभ्यास होता इतिहासातील थोर चरित्र वाचून त्यांना इतिहासाची आवड निर्माण झाली होती ते आजन्म विद्यार्थी होते मग आपणही जन्मभर विद्यार्थी का असू नये. असा प्रश्न वाचक म्हणून पडला पाहिजे.

शाळेमध्ये शिक्षक मिळत नाही म्हणून शिक्षण देण्याची आणि शिक्षक घडवण्याची सुरुवात घरापासून केली पाहिजे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे फुले दांपत्य.
फुले यांनी सुरू केलेले बालहत्या प्रतिबंधक गृह पाहिल्यावर न्यायमूर्ती रानडे लाल शंकर उमिया शंकर यांनी किती सकारात्मक धडा घेतला हा बोध महत्त्वपूर्ण आहे. अशाच प्रकारचे एक गृह त्यांनी पंढरपूर मध्ये उभे केले हा उल्लेख मीदेखील नव्याने वाचला. त्यासाठी संपादक महोदयांचे मनापासून आभार.

शेतकऱ्यांच्या कष्टमय परिस्थिती विषयी फुलेंनी मांडलेले अखंड अर्थपूर्ण आहेत. आपल्याला ज्याप्रमाणे अभंग. आठवतात तसे फुले यांचे अखंड मुखोदगत व्हायला हवेत. खरे तर आगामी काळात महात्मा फुले यांचे अखंड या विषयावर विश्लेषणात्मक स्वतंत्र पणाने सामाजिक संशोधन करता येण्यासारखे आहे. हे बीज या पुस्तकांमध्ये पेरले आहे.

दलपत सिंह चव्हाण यांची 1927 मध्ये पुस्तिका

ज्योति महात्मा ज्योतिराव फुले यांच्या चरित्रावर त्रोटक निबंध. दलपत सिंह चव्हाण यांनी 1927 मध्ये ही पुस्तिका लिहिली. ज्येष्ठ विचारवंत पंजाबराव देशमुख यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे. पुस्तकाच्या अंतरंगामध्ये विभाग सुरू होताना काही इंग्रजी लेखकांच्या मतांचा उल्लेख केला आहे. जन्माला येऊन जे कर्तव्य करावयाचे होते ते मी केले हे फुले यांचे वाक्य आपल्या डोळ्यात अंजन घालणारे आहे.

कुंभार यांचे वीस उपमुद्यांचे १९३८ मध्ये प्रकाशित पुस्तक

श्री सत्यमेव जयते महात्मा ज्योतिराव फुले हे लेखक व प्रकाशक बळीराम नागोजी कुंभार याचे पुस्तक 1938 मध्ये प्रकाशित झाले. या पुस्तकामध्ये वीस उपमुद्यांचा समावेश आहे. फुले यांच्या जन्मापासून त्यांची योग्यता आणि उपसहार असा विस्तृत मजकूर या पुस्तकात आहे. पांडुरंग राजाराम घोगरे अध्यक्ष मराठा विद्या प्रसारक संस्था धुळे यांनी 11 नोव्हेंबर 1938 मध्ये या पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिली. श्री कुंभार यांनी ही पुस्तके लिहिण्यापूर्वी फुले यांची पूर्वीचे चरित्र वाचली होती हे महत्त्वपूर्ण आहे. नेहमी चांगले करावे हीनदीन समाजाच्या सर्वांगीण उन्नतीचे कामे यासाठी आपला देह झीजवावा. हा या पुस्तकाचा सार आहे. केवळ शिक्षण नाही तर शारीरिक शिक्षण महत्त्वपूर्ण आहे ही बाब फुले यांनी लहुजी बाबा वस्ताद यांच्या माध्यमातून सिद्ध करून दिली. या पुस्तकात महात्माजींची योग्यता म्हणजे फुले यांचे कार्य मूल्यमापन तीन पानांमध्ये केले आहे. महात्मा फुले यांनी आज हिंदुस्ताना मध्ये देशहिताच्या दृष्टीने प्रमुख समजल्या जाणाऱ्या सर्व चळवळीचा प्रारंभ केला हे वाक्य विचार करायला लावणारे आहे म्हणजे फुले किती दूर पहात होते आणि दूरदृष्टी किती उत्तम होती याचा हा भक्कम पुरावा आहे.

१९३९ मध्ये मानकर यांचे पुस्तक

आठवे पुस्तक आहे महात्मा फुले आनंदराव अवधूत मानकर 1939 मध्ये हे पुस्तक प्रकाशित झाले. अमेरिकेत ज्याप्रमाणे बुकर टी वॉशिंग्टन त्याचप्रमाणे हिंदुस्थानात ज्योतिराव फुले होऊन गेले. या पुस्तकामध्ये फुले यांचे बालपण शिक्षण आई-वडील आयुष्याचे ध्येय शिक्षण कार्य धार्मिक कामगिरी चरित्राचे सार या मुद्द्यांचा समावेश केला आहे. महात्मा फुले यांनी महाराष्ट्राचा बहुजन समाज जागृत केला त्यास बळकटी आणली आणि राष्ट्र बळकट केले. या वाक्यावरून आपल्याला बरेच काही समजू शकेल.

१९२७ मध्ये प्रधान यांचे पुस्तक

Jyotiba Fule 1927 मध्ये भालचंद्र विठ्ठल प्रधान यांनी हे पुस्तक लिहिले. A life so full of activities, self conseration, industry and tanacity, terminated in the year 1890. पृष्ठ 178 वरील हा इंग्रजी मजकूर वाचकांनी मुळापासून वाचावा. संपादक महोदयांनी परिशिष्ट एक मध्ये महात्मा फुले यांनी सत्य दीपिका या वृत्तपत्राला पाठवलेली जाहिरात जरूर पहावी. परिशिष्ट दोन मध्ये सत्यशोधक समाजाचे 1873 ते 76 या कालावधीतील अहवाल दिले आहेत. परिशिष्ट तीन मध्ये महात्मा फुले जन्मशताब्दी निमित्त श्रीधर पंत टिळक यांच्या भाषणाचा वृत्तांत नवे विचार या शीर्षकाने छापला आहे. खरोखरच सामाजिक सुधारण्याच्या संदर्भात फुले यांनी वाचकांना समाज सुधारकांना नव्याने विचार करायला भाग पाडले.

या संपूर्ण चरित्रांचे एक दस्तऐवजीकरण करून श्रद्धा कुंभोजकर आणि बापूराव घुंगरगावकर यांनी ज्योतीरावांच्या आयुष्याशी संबंधित असलेले प्राथमिक तपशिलांचे आरंभिक स्वरूपाचे दस्तऐवज वाचकांच्या समोर ठेवले आहेत. फुले यांच्या द्विशताब्दीची सुरुवात होताना दोन संशोधकांनी केलेले हे उत्तम काम म्हणजे फुले यांना कृतिशील पद्धतीने वाहिलेली ही आदरांजली आहे.

या 9 चरित्रांमधील काही पुस्तकांची पाने उपलब्ध नाहीत. आगामी काळात ज्या व्यक्तीच्या संग्रहामध्ये ही मूळ पुस्तके असतील त्यांनी ती उपलब्ध करून द्यावी अशी विनंती करतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने इतिहास विभागाच्या मार्फत हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. ग्रंथाचे मुखपृष्ठ महात्मा फुले आणि त्यांचे चिरंजीव यशवंत असे आहे. संपादक महोदयांनी जी प्रस्तावना लिहिली त्यातील एक ओळ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फुले यांचे चरित्र लिहीत होते ते पूर्णत्वास गेले नाही. असा उल्लेख आगामी संशोधकांना संशोधन करण्यासाठी बीज पेरणारा आहे.
आगामी काळात नूतन संशोधकांनी याचा शोध घेऊन बाबासाहेबांची फुले यांच्या विषयी काढलेली ती टिपणे कोठे आहेत ? अजून आहेत का याविषयी आपण शोध घेतला पाहिजे ?

पुस्तकाचे नाव – महात्मा जोतीराव फुले नऊ जुनी अल्पचरित्रे
संपादन – श्रद्धा कुंभोजकर, बापूराव घुंगरगावकर
प्रकाशक – इतिहास विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे.

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

दृकश्राव्य दिवाळी अंक म्हणजे मराठी साहित्यातील क्रांती – श्रीराम पेंडसे

धरणफुटीचा धोका ओळखून सतर्कतेचा इशारा देणाऱ्या यंत्रणेला जर्मन पेटंट मंजूर

भारताने हिमोफिलियासाठी केलेल्या जीन थेरपी चाचणीला यश

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!