📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 18, 2026
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मिलेट्सपासून उद्योगक्रांती : एक्सट्रुजन तंत्रज्ञानाची सुवर्णसंधी Extrusion Technology New Opportunities

Extrusion technology machine producing healthy millet-based snacks from jowar, bajra and ragi for food processing and rural entrepreneurship.
बदलती जीवनशैली,आरोग्याबाबत वाढती जागरूकता आणि पौष्टिक स्नॅक्सची वाढती मागणी यामुळे अन्न प्रक्रिया क्षेत्रात एक्सट्रुजन तंत्रज्ञानाला नवे महत्त्व प्राप्त झाले आहे. बाजरी, ज्वारी, नाचणी आणि विविध कडधान्यांपासून कमी वेळेत आकर्षक, पौष्टिक आणि मूल्यवर्धित स्नॅक्स तयार करणारे हे तंत्रज्ञान शेतकरी,महिला बचत गट,युवक आणि नवउद्योजकांसाठी रोजगार व उत्पन्नाच्या नव्या संधी निर्माण करत असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे प्रभावी माध्यम ठरत आहे.

कु.मोनिका संतोष गायकवाड (एम.टेक विद्यार्थी ) ८१८०८९८४६६
डॉ. विजया पवार, प्राध्यापक
अन्नप्रक्रिया विभाग,अन्नतंत्र महाविद्यालय वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

एक्सट्रुजन तंत्रज्ञान: उद्योजकतेसाठी नवी संधी

आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे लोकांच्या खाण्याच्या सवयींमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आह.पूर्वी लोक घरगुती,पारंपरिक आणि ताजे पदार्थ खाण्यावर भर देत होते,परंतु सध्याच्या काळात कामाचा ताण,वेळेची कमतरता,शहरीकरण आणि बदलती जीवनपद्धती यामुळे कमी वेळेत तयार होणारे आणि सहज उपलब्ध असलेले खाद्यपदार्थ अधिक लोकप्रिय झाले आहेत.विशेषतः रेडी-टू-ईट आणि कुरकुरीत स्नॅक्सची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.शाळेत जाणारी मुले,कॉलेज विद्यार्थी,नोकरी करणारे युवक,प्रवास करणारे लोक तसेच वृद्ध व्यक्ती देखील चहा किंवा अल्पोपहारासोबत कुरकुरीत आणि चविष्ट पदार्थ खाणे पसंत करतात.त्यामुळे बाजारामध्ये चिप्स,वेफर्स,कुरकुरे,नमकीन,पफ्स,स्टिक्स आणि विविध प्रकारचे एक्सट्रुडेड स्नॅक्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहेत.परंतु बाजारातील अनेक स्नॅक्स पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात तेल,कृत्रिम रंग,फ्लेवर,मीठ आणि रासायनिक घटक वापरले जात असल्यामुळे ते आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर ठरत नाहीत.त्यामुळे ग्राहकांमध्ये आरोग्यदायी,पौष्टिक आणि नैसर्गिक घटकांपासून तयार होणाऱ्या स्नॅक्सची मागणी वाढू लागली आहे.

याच पार्श्वभूमीवर मिलेट्स म्हणजेच बाजरी,नाचणी,ज्वारी,वरई,कांगणी,सामा,कोदो यांसारख्या तृणधान्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.ही धान्ये पोषणमूल्यांनी समृद्ध असून त्यामध्ये प्रथिने,तंतुमय पदार्थ (फायबर),लोह,कॅल्शियम,मॅग्नेशियम,झिंक आणि विविध जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात.नाचणीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे हाडांच्या मजबुतीसाठी ती उपयुक्त ठरते,तर बाजरी शरीराला ऊर्जा देण्यास मदत करते. ज्वारी पचनक्रियेसाठी फायदेशीर असून त्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते.अनेक मिलेट्समध्ये ग्लुटेन नसल्यामुळे ते आरोग्याच्या दृष्टीने अधिक सुरक्षित मानले जातात.त्याचप्रमाणे हरभरा,मूग,मसूर,उडीद आणि तूर यांसारखी कडधान्ये ही प्रथिनांचा उत्तम स्रोत आहेत.मिलेट्स आणि कडधान्यांचा एकत्रित वापर करून तयार केलेले पदार्थ अधिक पौष्टिक,चविष्ट आणि आरोग्यदायी बनतात.त्यामुळे अशा पदार्थांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

भारत हा कृषीप्रधान देश असून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मिलेट्स आणि कडधान्यांचे उत्पादन घेतले जाते.परंतु अनेक वेळा शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारभाव मिळत नाही.कच्च्या स्वरूपात धान्य विकल्यास कमी नफा मिळतो,तर त्याच धान्यांवर प्रक्रिया करून मूल्यवर्धित पदार्थ तयार केल्यास अधिक आर्थिक फायदा मिळू शकतो.उदाहरणार्थ,साधी बाजरी किंवा नाचणी थेट विकण्यापेक्षा त्यापासून कुरकुरीत स्नॅक्स,पफ्स,स्टिक्स किंवा एक्सट्रुडेड पदार्थ तयार करून विकल्यास उत्पादनाची किंमत वाढते आणि ग्राहकांमध्ये आकर्षण निर्माण होते.त्यामुळे शेतकरी स्वतःच्या पिकांपासून प्रक्रिया उद्योग सुरू करून अधिक उत्पन्न मिळवू शकतात.तसेच ग्रामीण भागातील महिला बचत गट,शेतकरी उत्पादक कंपन्या,युवक आणि नवीन उद्योजक यांच्यासाठी हा उद्योग रोजगार आणि स्वयंरोजगाराची मोठी संधी उपलब्ध करून देतो.

ग्रामीण भागामध्ये कमी गुंतवणुकीत अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची मोठी क्षमता आहे.स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध होणारा कच्चा माल,कमी उत्पादन खर्च आणि वाढती बाजारपेठ यामुळे मिलेट आधारित स्नॅक्स उद्योग फायदेशीर ठरू शकतो.सुरुवातीला लहान प्रमाणात घरगुती पातळीवर उत्पादन सुरू करून स्थानिक बाजार,किराणा दुकाने,शाळा,महाविद्यालये,आठवडी बाजार आणि ऑनलाइन माध्यमातून विक्री करता येते.सध्या ग्राहक घरगुती,पारंपरिक आणि पौष्टिक पदार्थांना अधिक पसंती देत असल्यामुळे अशा उत्पादनांना चांगली मागणी मिळत आहे.या उद्योगामुळे ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी मिळते तसेच युवकांना रोजगार उपलब्ध होतो.त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होते.
अन्न प्रक्रिया क्षेत्रामध्ये एक्सट्रुजन हे आधुनिक आणि प्रभावी तंत्रज्ञान मानले जाते.या प्रक्रियेमध्ये धान्यांचे पीठ,मसाले,कडधान्यांचे पीठ आणि इतर आवश्यक घटक एकत्र करून मशीनच्या साहाय्याने विशिष्ट आकाराचे पदार्थ तयार केले जातात.या प्रक्रियेमध्ये मिश्रणाला दाब आणि तापमान दिले जाते, त्यामुळे पदार्थ फुगलेले,कुरकुरीत आणि आकर्षक बनतात.एक्सट्रुजन तंत्रज्ञानामुळे रिंग्स,पफ्स,स्टिक्स,ट्विस्ट्स आणि इतर विविध आकारांचे स्नॅक्स मोठ्या प्रमाणात तयार करता येतात.या प्रक्रियेमुळे उत्पादनाचा वेळ कमी लागतो,उत्पादनाची गुणवत्ता टिकून राहते आणि साठवण क्षमता वाढते.तसेच कमी तेलामध्येही चविष्ट आणि कुरकुरीत पदार्थ तयार करता येतात,ज्यामुळे ग्राहकांना आरोग्यदायी पर्याय उपलब्ध होतो.

एक्सट्रुजन तंत्रज्ञानामुळे धान्यांचे मूल्यवर्धन होऊन त्यांना अधिक बाजारमूल्य प्राप्त होते.यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा चांगला दर मिळू शकतो. तसेच या उद्योगामध्ये प्रक्रिया,पॅकेजिंग,वाहतूक आणि विक्री यांसारख्या विविध स्तरांवर रोजगाराच्या संधी निर्माण होतात.आज भारत सरकार देखील “श्री अन्न” अभियानाच्या माध्यमातून मिलेट्सच्या वापराला प्रोत्साहन देत आहे.विविध शासकीय योजना,प्रशिक्षण कार्यक्रम आणि आर्थिक सहाय्याद्वारे शेतकरी आणि उद्योजकांना मिलेट आधारित उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.त्यामुळे मिलेट आधारित एक्सट्रुडेड स्नॅक्स उद्योग हा भविष्यात ग्रामीण विकास, रोजगार निर्मिती आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावणारा उद्योग ठरू शकतो.

एक्सट्रुजन तंत्रज्ञान म्हणजे काय ?

अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये एक्सट्रुजन तंत्रज्ञानाला खूप महत्त्व आहे.साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास,विविध धान्यांचे पीठ,कडधान्यांचे पीठ, मसाले,मीठ,पाणी आणि इतर आवश्यक घटक एकत्र करून मशीनच्या साहाय्याने वेगवेगळ्या आकाराचे खाद्यपदार्थ तयार करण्याच्या प्रक्रियेला एक्सट्रुजन प्रक्रिया असे म्हणतात.या प्रक्रियेमुळे कुरकुरीत,चविष्ट आणि आकर्षक पदार्थ कमी वेळेत तयार करता येतात.आज बाजारामध्ये मिळणारे कुरकुरे,पफ्स,स्टिक्स,रिंग्स,सेवसारखे पदार्थ आणि अनेक प्रकारचे स्नॅक्स हे अशाच प्रकारच्या प्रक्रियेमधून तयार केले जातात.ही प्रक्रिया आधुनिक असून अन्न प्रक्रिया उद्योगात मोठ्या प्रमाणात वापरली जाते.

या प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम धान्ये आणि कडधान्ये स्वच्छ करून त्यांचे पीठ तयार केले जाते.त्यानंतर त्या पिठामध्ये मसाले,मीठ,तेल आणि आवश्यकतेनुसार पाणी मिसळले जाते.हे मिश्रण मशीनमध्ये टाकले जाते.मशीनच्या आत एक फिरणारी दांडी असते,जिला स्क्रू प्रणाली असे म्हणतात.ही दांडी सतत फिरत राहते आणि मिश्रणाला पुढे ढकलण्याचे काम करते.मिश्रण पुढे जात असताना त्यावर दाब आणि घर्षण निर्माण होते.त्याच वेळी मशीनमध्ये उष्णता देखील दिली जाते.उष्णता,दाब आणि घर्षण यांच्या एकत्रित परिणामामुळे मिश्रण शिजू लागते आणि त्यामधील घटक मऊ होऊन एकसारखे बनतात.

एक्सट्रुजन प्रक्रियेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मिश्रण तयार करणे,शिजवणे आणि आकार देणे या तिन्ही प्रक्रिया एकाच मशीनमध्ये आणि एकाच वेळी पूर्ण होतात.पारंपरिक पद्धतीमध्ये प्रत्येक काम वेगवेगळे करावे लागते.उदाहरणार्थ आधी मिश्रण तयार करणे,नंतर शिजवणे आणि शेवटी आकार देणे अशी प्रक्रिया असते.त्यामुळे वेळ,मेहनत आणि खर्च जास्त लागतो.परंतु एक्सट्रुजन प्रक्रियेमध्ये हे सर्व काम सतत आणि जलद गतीने होते.त्यामुळे उत्पादन लवकर तयार होते आणि कामासाठी कमी मजूर लागतात.

मशीनच्या शेवटी एक विशेष भाग असतो,ज्यामध्ये वेगवेगळ्या आकाराची छिद्रे असतात.मिश्रण या छिद्रांमधून बाहेर येताना त्याला ठराविक आकार मिळतो.उदाहरणार्थ स्टिक्स,गोल रिंग्स,पफ्स किंवा इतर आकर्षक आकार तयार होतात.मशीनमधून बाहेर पडताना पदार्थावरील दाब अचानक कमी होतो.त्यामुळे पदार्थ फुगून हलके आणि कुरकुरीत बनतात.यामुळे ग्राहकांना आवडणारे चविष्ट स्नॅक्स तयार होतात.त्यानंतर हे पदार्थ वाळवले किंवा तळले जातात आणि त्यावर मसाला लावून पॅक केले जाते.

या तंत्रज्ञानाचे अनेक फायदे आहेत.कमी वेळेत मोठ्या प्रमाणात उत्पादन करता येते.पदार्थांची गुणवत्ता एकसारखी राहते आणि साठवण क्षमता वाढते. या प्रक्रियेमध्ये कमी तेल वापरूनही कुरकुरीत पदार्थ तयार करता येतात.त्यामुळे आरोग्यदायी स्नॅक्स तयार करणे शक्य होते.तसेच पदार्थ आकर्षक दिसत असल्यामुळे ग्राहकांना ते जास्त आवडतात.मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील लोक अशा पदार्थांना पसंती देतात.

ग्रामीण भागातील शेतकरी,महिला बचत गट आणि नवीन उद्योजकांसाठी हे तंत्रज्ञान खूप फायदेशीर ठरू शकते.बाजरी,नाचणी,ज्वारी,मका,तांदूळ आणि विविध कडधान्ये वापरून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार करता येतात.यामुळे शेतमालाला चांगला भाव मिळतो आणि उत्पादनाचे मूल्य वाढते. कमी जागेमध्ये आणि कमी गुंतवणुकीत हा उद्योग सुरू करता येतो.सध्या लोक पौष्टिक आणि आरोग्यदायी पदार्थांकडे जास्त लक्ष देत असल्यामुळे मिलेट आधारित स्नॅक्सना बाजारात चांगली मागणी आहे.

एक्सट्रुजन प्रक्रिया ही सतत आणि जलद गतीने चालणारी प्रक्रिया आहे.मशीन सुरू झाल्यानंतर मिश्रण सतत आत टाकले जाते आणि तयार पदार्थ सतत बाहेर येत राहतात.त्यामुळे वेळेची बचत होते आणि कमी वेळेत जास्त उत्पादन मिळते.उत्पादन खर्च कमी होतो आणि उद्योगातून चांगला नफा मिळण्यास मदत होते.म्हणूनच आज अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये एक्सट्रुजन तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे.

Related posts

शेतकऱ्यांनाही मिळावा भविष्य निर्वाह निधी

दिशादर्शक अर्थात चुंबकसूची !

मध काढा पोळं तेथेच ठेवून…

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!