April 19, 2026
Illustration showing a farmer collecting soil samples for laboratory soil testing to improve crop production and soil fertility
Home » माती परीक्षण – उत्पादन वाढीची पहिली पायरी
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

माती परीक्षण – उत्पादन वाढीची पहिली पायरी

माती परीक्षण: फायदे | सविस्तर माहिती | केव्हा – कधी आणि कसे करावे |

शेतीचे यश केवळ पावसावर किंवा चांगल्या बियाण्यावर अवलंबून नसते; ते मोठ्या प्रमाणात जमिनीच्या आरोग्यावर अवलंबून असते. अनेकदा शेतकरी अंधाधुंद खतांचा वापर करतात, परंतु जमिनीत कोणती अन्नद्रव्ये कमी किंवा जास्त आहेत याची माहिती नसल्याने खर्च वाढतो आणि उत्पादन अपेक्षित मिळत नाही. अशा परिस्थितीत माती परीक्षण ही शाश्वत आणि वैज्ञानिक शेतीची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी ठरते. जमिनीतील पोषक तत्वांचे अचूक विश्लेषण केल्यास संतुलित खत व्यवस्थापन, उत्पादनवाढ आणि जमिनीची दीर्घकालीन सुपीकता टिकवून ठेवणे शक्य होते.

✍🏻 डॉ. अनंत इंगळे,
(कृषि संशोधक व मार्गदर्शक)

कोणतेही पीक घ्यायचे असेल तर सर्वप्रथम आपल्या जमिनीची स्थिती जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या जमिनीची पोत कशी आहे, तसेच जमिनीत कोणती अन्नद्रव्ये कमी किंवा जास्त प्रमाणात आहेत याची अचूक माहिती असल्यास त्यानुसार योग्य नियोजन करता येते. त्यामुळे खतांचा अनावश्यक वापर व खर्च टाळता येतो आणि पिकांचे उत्पादन वाढविण्यास मदत होते.
यासाठी माती परीक्षण करणे अत्यावश्यक आहे.

👉🏻माती परीक्षण शक्यतो उन्हाळ्यात, म्हणजे शेत मोकळे असताना आणि पुढील पिकाच्या लागवडीपूर्वी करावे. त्यामुळे परीक्षण अहवालानुसार योग्य खत व पोषण व्यवस्थापन करणे शक्य होते. सामान्यतः दर २ ते ३ वर्षांनी एकदा माती परीक्षण करणे फायदेशीर ठरते.

🌱 माती परीक्षणाचे फायदे
माती परीक्षणामुळे जमिनीची सुपीकता, pH पातळी आणि प्रमुख पोषक तत्वे (नत्र-N, स्फुरद-P, पालाश-K) यांची अचूक माहिती मिळते.
@ संतुलित खतांचा वापर करता येतो आणि अनावश्यक खर्चात बचत होते.
@ पिकांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.
@ जमिनीचे आरोग्य दीर्घकाळ टिकवून ठेवण्यास मदत होते.
@आधुनिक आणि शाश्वत शेतीसाठी माती परीक्षण हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे.

🌱 माती परीक्षणाचे मुख्य फायदे
१. योग्य खत व्यवस्थापन :
माती परीक्षणातून जमिनीतील पोषक तत्वांचे प्रमाण समजते. त्यामुळे गरजेनुसार संतुलित खतांचा वापर करता येतो आणि अवाजवी खर्च टाळता येतो.

२. पिक उत्पादनात वाढ :
योग्य खत आणि पोषक द्रव्यांच्या संतुलित वापरामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होते.

३. जमिनीचे आरोग्य व पोत समजणे :
मातीचा प्रकार, सामू (pH), क्षारता (EC) आणि सेंद्रिय कर्ब (OC) यांची माहिती मिळते. त्यामुळे जमीन आम्लधर्मी आहे की विम्लधर्मी हे समजते आणि त्यानुसार सुधारणा करता येतात.

४. पिकांचे योग्य नियोजन :
जमिनीच्या गुणधर्मांनुसार कोणते पीक घेणे अधिक फायदेशीर ठरेल हे ठरविण्यास मदत होते.

५. रासायनिक खतांची बचत व संतुलित वापर :
जमिनीला आवश्यक तेवढेच खत दिल्याने खतांवरील अतिरिक्त खर्च कमी होतो.

६. जमिनीची दीर्घकालीन सुपीकता :
मातीचा कस टिकवून ठेवण्यासाठी आणि जमिनीची पोत खालावण्यापासून वाचवण्यासाठी माती परीक्षण अत्यंत आवश्यक आहे.

🌱 माती परीक्षण कधी करावे ?
माती परीक्षण एप्रिल–मे महिन्यांत (उन्हाळ्यात) किंवा रब्बी पिकांची काढणी झाल्यानंतर करणे सर्वात योग्य ठरते. यामुळे खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी खत व्यवस्थापनाचे योग्य नियोजन करता येते.
👉🏻सामान्यतः दर २ ते ३ वर्षांनी एकदा माती परीक्षण करणे जमिनीच्या आरोग्यासाठी आणि चांगल्या उत्पादनासाठी आवश्यक आहे.

🌱 माती परीक्षण का करावे ?
माती परीक्षणाद्वारे जमिनीची सुपीकता, pH, सेंद्रिय कर्ब (OC) तसेच प्रमुख अन्नद्रव्ये नत्र (N), स्फुरद (P), पालाश (K), झिंक (Zn) आणि सल्फर (S) यांची पातळी समजते.
या माहितीच्या आधारे पिकांना आवश्यकतेनुसार संतुलित खतांचा वापर करता येतो. त्यामुळे
✅ खतांचा खर्च कमी होतो
✅ जमिनीची सुपीकता टिकून राहते, पोत सुधारण्यास मदत होते
✅ शाश्वत शेतीद्वारे उत्पादन वाढवणे शक्य होते.

🌱 माती परीक्षण कुठे करावे ?
माती परीक्षण खालील ठिकाणी करता येते –
@ कृषी विज्ञान केंद्रे (KVK)
@ तालुका किंवा जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय
@ सरकारी मान्यताप्राप्त माती परीक्षण प्रयोगशाळा
@ कृषी विद्यापीठे
या प्रयोगशाळांमध्ये मातीतील N, P, K, pH, EC आणि इतर पोषक तत्वांचे परीक्षण केले जाते.

🌱 माती परीक्षणासाठी नमुना कसा घ्यावा ? (प्रक्रिया)
✅ वेळ आणि ठिकाण :
पीक काढल्यानंतर आणि नवीन खत टाकण्यापूर्वी नमुना घ्यावा. शेताचा रंग, पोत आणि उंची यानुसार शेताची विभागणी करावी.
✅ लागणारी साधने :
स्वच्छ खुरपे, फावडे किंवा कुदळ वापरावी. नमुना घेताना वापरलेली अवजारे गंजलेली नसावीत.
✅ ‘V’ आकाराचा खड्डा :
शेतात नागमोडी (झिगझॅग) पद्धतीने ६ ते ८ ठिकाणी ६ ते ८ इंच खोल ‘V’ आकाराचे खड्डे घ्यावेत.
✅ माती गोळा करणे :
खड्ड्याच्या एका बाजूची वरपासून खालपर्यंत सुमारे २–३ सेमी जाडीची माती खुरप्याने काढून बादलीत जमा करावी.
✅ मिश्रण / माती मिसळणे (Quartering Method) :
सर्व ठिकाणांहून गोळा केलेली माती स्वच्छ कागदावर किंवा ताडपत्रीवर एकत्र करावी. माती ओली असल्यास ती सावलीत सुकवावी.
✅ नमुना तयार करणे :
मिश्रित मातीचे चार समान भाग करावेत. समोरासमोरील दोन भाग काढून टाकावेत आणि उरलेले दोन भाग पुन्हा मिसळावेत. ही प्रक्रिया माती अर्धा ते एक किलो होईपर्यंत करावी.
✅ पिशवीत/ बॅग मध्ये भरणे :
अंतिम माती स्वच्छ प्लास्टिक/ कापडी पिशवीत भरून त्यावर खालील माहिती लिहून लेबल लावावे –
शेतकऱ्याचे नाव
शेताचा गट नंबर
पिकाचा तपशील
तारीख

🌱 माती परीक्षणासाठी नमुना घेताना घ्यावयाची काळजी
👉🏻बांधावरील, झाडाखालील किंवा जनावरे बसण्याच्या ठिकाणची माती घेऊ नये.
👉🏻ज्या ठिकाणी अलीकडे खत टाकलेले आहे त्या ठिकाणचा नमुना घेऊ नये.
👉🏻माती ओलसर असल्यास ती सावलीत वाळवावी; उन्हात वाळवू नये.

माती परीक्षण करणे काळाची गरज आहे, जेणेकरून आपल्याला पिक व्यवस्थापन करणे शक्य होईल, खतांचा संतुलित आणि एकात्मिक वापर करता येईल जमिनीचे आरोग्य सुधारेल आणि एकंदरीत खर्चात बचत होऊन उत्पादनात ही वाढ करता येईल, त्यामुळे येणाऱ्या हंगामात
“माती परीक्षण करूया : जमिनीचे आरोग्य जपूया”

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

आशा आहे शेतकरी आत्महत्या थांबण्याची…

वेळीच ओळखा निसर्गाचा धोक्याचा इशारा

यंदा तांदुळ अन् उसाचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!