जून २०२६ अती उष्ण आणि कोरडा जात आहे परन्तु धोक्याची घंटा देत आहे !
जून २०२६ हा महिना गेल्या सहा दशकांतील सर्वाधिक उष्ण आणि कोरडा ठरत असून सरासरी तापमानात तब्बल २.६ अंश सेल्सिअसची वाढ झाल्याचे निरीक्षण समोर आले आहे. वाढत्या तापमानामुळे पिकांच्या उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून एल निनोच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांवरील अवलंबित्व कमी करून आंतरपीक पद्धती, हवामानाधारित पेरणी आणि कमी पाणी लागणाऱ्या पिकांचा अवलंब करण्याची गरज आहे.
प्रा.डॉ. सुमेरसिंग राजपुत, कृषी शास्त्रज्ञ, तेलबिया संशोधन केंद्र,जळगाव
६० वर्षातील खरीप हंगामात म्हणजे जून ते सप्टेंबर ह्या चार महिन्यात अधिकतम तापमानाची सरासरी कमाल ३६.३ अंश डिग्री सेल्सिअस होती तसेच किमान तापमान सरासरी २६.३ अंश डिग्री सेल्सिअस होती असे हवामान नोंदीवरून लक्षात येते. जून २०२६ महिना आतापर्यंतच्या सरसरीत सर्वात जास्त तापमान असणारा महिना ठरत आहे असे महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत तेलबिया संशोधन केंद्र जळगाव ममुराबाद प्रक्षेत्रावर असलेल्या वेध शाळेतील निरिक्षणातून पुढे येत आहे.
जून महिन्याच्या सरासरी तापमानात २.६ डिग्री सेल्सिअस इतकी वाढ आता पर्यंतच्या तापमानाच्या नोंदीवरून दिसत आहे, याचाच अर्थ असा होतो की हवामान बदलत आहे आणि ही धोक्यांची घंटा नुसत्या वनस्पती वर्गासाठी नाही तर संपूर्ण सजीव जे पृथ्वीवर वावरत आहे ह्यांच्यासाठी म्हणायला हरकत नाही.
२.६ डिग्री सेल्सिअस तापमान वाढ म्हणजे शेतावरील जे पिक उभे आहे त्या पिकांच्या उत्पादनात ४० टक्के घट येणार हे निश्चीत मानून चला, कारण तापमानाचा आणि पीक उत्पादनाचा अतिशय जवळचे नाते आहे. पिकांना लागणाऱ्या सरासरी तापमानापेक्षा १ डिग्री सेल्सिअस जरी तापमानात वाढ झाली तरी उत्पादनात एकदम ३० टक्के घट येत असते. महाराष्ट्र राज्यात कोकणात ह्या वर्षाच्या हंगामात काजू उत्पादक शेतकरी २ डिग्री सेल्सिअस तापमानात वाढ झाल्याने पार झोपून गेले, काजु पिकाचे उत्पादन ६० टक्क्यांहून कमी झाले.
जळगाव जिल्ह्यातील यावल, रावेर, मुक्ताईनगर ह्या तालुक्यातील केळी पिकाच्या बागा जून महिन्यात आलेल्या वादळी वाऱ्यात सापडून भुईसपाट झाल्यात आणि शेतकरी उध्वस्त झाला. २०२६ वर्षातील उन्हाळी हंगाम अतिशय तीव्र तापमानाचा राहिला आहे, सूर्यप्रकाश सर्वात जास्त चटका देणारा आणि जास्त दिवस तापणारा होता त्यामुळे भारी जमिनीला खोलवर भेगा पडल्यात आणि जमिनीच्या भूगर्भाचे तापमान अधिक होते. खरिपात जर पुरेसा पाऊस पडला नाही आणि जमिनीची पाण्याची भूक भागली नाही तर समजून चला उत्पादनात फरक पडणार म्हणजे पडणार, पिक निहाय शिफारशीत रासायनिक खतांच्या मात्रांपेक्षा एक किलो सुद्धा जास्त रासायनिक खते टाकु नका ते पिकांना विष समान होईल हे नक्की.
हवामान विभागाने २०२६ खरीप हंगामात एल निनोचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचे नियोजन काळजी पूर्वक करायला पाहिजे. पारंपरिक आणि एकाच पिकावर अवलंबून न राहता हवामान अंदाज घेऊनच पेरण्या कराव्यात. आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास फायदा नक्की होईल.
एल निनोमुळे पावसाचे प्रमाण कमी होऊन अनेकदा कोरडी अथवा दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. या काळात जास्त पाणी लागणारी पिके सोडून कमी कालावधीत येणारे मूग, उडीद, ज्वारी, कापूस, तूर, बाजरी, तीळ ,भुईमूग, बाजरी, सोयाबीन अशा पिकांची निवड करावी लागणार आहे. यंदा एल निनोमुळे कमी पाऊस पडणार आहे, यासोबतच पावसामध्ये खंडही राहणार आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता सावध भूमिका ठेवणे गरजेचे आहे.
