September 8, 2024
Irrational thoughts will go away article by rajendra ghorpade
Home » विवेकाचा पहारा असेल तर अविवेकी विचार दूर जाईल
विश्वाचे आर्त

विवेकाचा पहारा असेल तर अविवेकी विचार दूर जाईल

पक्षांचा किलबिलाट काहींना त्रासदायक वाटतो. काहींना त्यांना मारून खाण्याचाही विचार येतो. पण या सर्वांच्या ठिकाणी विवेक जागृत झाल्यास त्या किलबिलाटाने मन कसे आनंदी, प्रसन्न होते याची अनुभुती येऊ शकते. पक्षांच्या आवाजांने आपल्या मनालाही प्रसन्नता लाभते. तो गोड आवाज आपल्या तोंडी आपोआप उत्पन्न होतो. त्यांच्या शब्दांचे स्वर आपण आत्मसात केले तर मनाला आनंद होतो. पण यासाठी मनात तसा विवेकी विचार असायला हवा तरच हे शक्य होते.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

सर्वेंद्रियाच्या आंगणी । विवेक करी राबणी ।
साचचि करचरणी । होती डोळी ।। 206 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 14 वा

ओवीचा अर्थ – सर्व इंद्रियांच्या अंगणात विवेक पहारा करतो व हातापायांच्या ठिकाणी खरोखरच डोळे होतात ( म्हणजेच हातपाय ही कर्मेंद्रिये असूनही त्यांना चांगले व वाईट निवडण्याची शक्ती येते )

रज आणि तम गुणावर इंद्रिये जेव्हा विजय मिळवताता तेव्हा अंगामध्ये सत्वगुणांची वाढ होते. साहजिकच अंगात सात्विक वृत्ती वाढते. अंगातील विवेक जागा होतो. विवेकाचा जागता पहारा रात्रंदिवस सुरू असतो. इंद्रियांच्या अंगणात विवेकाचा जागता पहारा असल्याने दुष्ट विचारांना प्रवेश करणे कठीण जाते. कारण चांगले वाईट निवडण्याची शक्ती या इंद्रियांना सहज प्राप्त होते.

मोह, माया, हाव, वासना यांना इंद्रियांच्या अंगणात प्रवेशच करता येत नाही. विवेकाचा पहारा असल्याने ते यात आलेच तरी ते इंद्रियांच्या घरात प्रवेश करू शकत नाहीत. चांगले वाईट ओळखण्याची शक्ती मिळाल्याने विवेकाने त्यांच्यावर विजय मिळवता येतो. यासाठी मनात सदैव सात्विक विचार उत्पन्न कसे होतील यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. रज आणि तम गुण कसे कमी करता येतील यावर प्रयत्न करणे आवश्यक आहे. मनाने ठरवले तर ते सर्व शक्य आहे. यासाठी मनातच विवेक जागा करण्याची गरज आहे. विवेकी विचाराने आचार विचारांतही फरक पडतो. विवेकाच्या पहाऱ्यामुळे पशुपक्षांची हत्या करायची नाही असा विचार जागृत होतो. कोणी तसे करत असेल तर त्याला रोखण्याचेही सामर्थ्य त्याच्यात उत्पन्न होते.

पिकातील दाणे खातात म्हणून पक्षी हुसकावून लावले जातात त्यांना मारले जात नाही. झाडावर बसलेल्या पक्षाला दगड मारण्याचा विचार जेंव्हा मनात उत्पन्न होतो. तेंव्हा पक्षाला दगड मारताना तो त्यात मृत्यू पावेल याचे भानही मारणाऱ्याला नसतो. पण विवेक जागृत असेल तर ही कृतीच करण्याची इच्छा होत नाही. नुकसान होत असले तरीही त्यांना फक्त त्यापासून हसकावून लावण्याचीच इच्छा उत्पन्न होते. हे केवळ विवेकानेच घडते.

पक्षांचा किलबिलाट काहींना त्रासदायक वाटतो. काहींना त्यांना मारून खाण्याचाही विचार येतो. पण या सर्वांच्या ठिकाणी विवेक जागृत झाल्यास त्या किलबिलाटाने मन कसे आनंदी, प्रसन्न होते याची अनुभुती येऊ शकते. पक्षांच्या आवाजांने आपल्या मनालाही प्रसन्नता लाभते. तो गोड आवाज आपल्या तोंडी आपोआप उत्पन्न होतो. त्यांच्या शब्दांचे स्वर आपण आत्मसात केले तर मनाला आनंद होतो. पण यासाठी मनात तसा विवेकी विचार असायला हवा तरच हे शक्य होते. यासाठी मनातच अहिंसा उत्पन्न व्हायला हवी. मनात अहिंसा असेल तर आचरणात हिंसा उतरणारच नाही. कितीही किलबिलाट पक्षांनी केला तरी आपल्या विचारात सामावलेल्या विवेकाने वाईट विचार उत्पन्नच होत नाहीत. ते किलबिलाटे शब्द आपल्या हृदयात साठवले तर ते शब्द आपल्या शरीरात प्रकट होतात. यासाठी विवेक जागा ठेवून आचरण करत राहील्यास इंद्रियात रज आणि तम कधीच प्रवेश करू शकणार नाहीत.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

प्रियकरात बाप शोधणारी मुलगी

सो ऽ हम भाव म्हणजे काय ?

अनुभवविश्व व्यापून टाकणारा ललितलेखसंग्रह

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading