शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांचे अभिनव संशोधन
कोल्हापूर : सध्या भारतात अनेक धरणांची बांधकाम पूर्ण होऊन शंभरी गाठलेली आहे. काही धरणांची स्थिती ही बिकट आहे. काही धरणांना गळती लागली आहे. कोल्हापुरातील काळम्मावाडी धरणाला गळती लागली आहे. अशा या धरणांच्या फुटाचा धोका ओळखून शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी इशारा देणाऱ्या यंत्रणेविषयी विशेष संशोधन केले आहे. या त्यांच्या संशोधनाला जर्मन पेटंट मंजूर झाले आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल अधिविभागातील संशोधक शुभम तानाजी गिरीगोसावी, भूगोल अधिविभाग प्रमुख डॉ. सचिन पन्हाळकर, इचलकरंजीच्या दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालयातील प्रा. परेश मट्टीकल्ली, सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागातील डॉ. गणेश सुनील न्हिवेकर आणि विद्यापीठाच्या नॅनो विज्ञान व तंत्रज्ञान स्कूलचे डॉ. तुकाराम डोंगळे यांनी हे महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे.
‘अॅन इंटिग्रेटेड सिस्टीम फॉर दि डिटेक्शन ऑफ डॅम ब्रिचेस, अर्ली वॉर्निंग अँड इव्हॅक्युएशन असिस्टंन्स’ ( An Integrated System for the Detection of Dam Breaches, Early Warning and Evacuation Assistance ) असे हे अभिनव संशोधन आहे. या अत्याधुनिक प्रणालीद्वारे धरण फुटीचा धोका लवकर ओळखता येतो. त्याद्वारे नागरिकांना तात्काळ इशारा देणे आणि नागरिकांच्या सुरक्षित स्थलांतरास मदत करणे या बाबी तातडीने करता येऊ शकतात.

या संशोधनाचा उद्देश जलाशय तुटणे (Dam Breach) किंवा पूरस्थिती निर्माण होण्याच्या अगोदरच सुस्पष्ट आणि जलद इशारा देणारी एकात्मिक प्रणाली विकसित करणे हा आहे. पारंपरिक पद्धतींमध्ये धरणातील बिघाड, पाण्याचा अचानक वाढलेला प्रवाह किंवा संरचनात्मक ताण याबाबतचे इशारे उशिरा मिळतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि संपत्तीचे नुकसान होते.
या संशोधनात सेन्सर नेटवर्क्स, उपग्रह निरीक्षण, GIS (Geographical Information System), IoT आधारित रिअल-टाइम डेटा ट्रान्समिशन, आणि AI/ML मॉडेल्स यांचा एकत्रित वापर करण्यात आला आहे. ही प्रणाली धरणाच्या संरचनेतील कंपन, पाण्याची पातळी, मातीतील आर्द्रता, व दाबातील बदल यांचे सतत निरीक्षण करते. एखादा धोक्याचा संकेत आढळल्यास, प्रणाली स्वयंचलितपणे विश्लेषण करून संभाव्य ब्रिच (Breach) होण्याची शक्यता मोजते.
धोक्याची पातळी गंभीर असल्यास, अर्ली वॉर्निंग मॉड्युल सक्रिय होतो आणि तो स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन केंद्र, तसेच नागरिकांना मोबाईल अलर्ट, सायरन किंवा डिजिटल पॅनेल्सद्वारे तत्काळ सूचना पाठवतो. Evacuation Assistance System मध्ये रस्त्यांचे नकाशे, सुरक्षित ठिकाणांची माहिती, आणि लोकसंख्येच्या घनतेनुसार स्मार्ट ट्रॅफिक मार्गदर्शन दिले जाते.
या एकात्मिक प्रणालीचे वैशिष्ट्य म्हणजे — ती स्वयंचलित, रिअल-टाइम, कमी खर्चिक आणि स्केलेबल आहे. संशोधनानुसार, या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास आपत्तीपूर्व नियोजनाची कार्यक्षमता वाढते, जीवितहानी 60-70 टक्के पर्यंत कमी करता येते, आणि स्थानिक प्रशासनाच्या प्रतिसादाचा वेग अनेकपट वाढतो.
सारांशतः, ही प्रणाली “Prediction–Alert–Rescue” या तत्त्वावर आधारित असून, भावी पूर आपत्ती व्यवस्थापनासाठी एक अत्याधुनिक, परिणामकारक आणि मानवकेंद्रित उपाय सुचवते.
या तंत्रज्ञानामुळे भविष्यात धरणभंग आणि पूर आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे. या संशोधनाला जर्मन सरकारकडून पेटंट मंजूर झाले आहे.
प्रकल्प संशोधक शुभम गिरीगोसावी यांनी या मॉडेलचे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रात्यक्षिक सादर केले असून या अभिनव प्रणालीला विविध तज्ज्ञ संस्थांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या कार्यासाठी त्यांना दोन राष्ट्रीय आणि एक आंतरराष्ट्रीय असे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.
या संशोधकांचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
