शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सुपर अलनिनो परिस्थितीला पुरून उरणारी मूग-उडीदाची नवी वाणे

खरीप २०२६ हंगामात ‘सुपर अल निनो’मुळे महाराष्ट्रासह देशातील मान्सून कोअर झोनमध्ये पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता व्यक्त होत असताना, शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. मात्र बदलत्या हवामानाशी जुळवून घेणारी, कमी कालावधीत उत्पादन देणारी आणि अल्प पाण्यातही तग धरणारी मूग व उडीदाची नवीन वाणे या संकटावर प्रभावी उपाय ठरू शकतात. जळगाव येथील कृषी संशोधन केंद्राच्या दीर्घकालीन हवामान नोंदी आणि संशोधनाच्या आधारे विकसित झालेल्या ‘फुले सुवर्ण’ आणि ‘फुले वसु’ या वाणांमुळे कोरडवाहू शेतकऱ्यांना आशेचा नवा किरण मिळाला आहे.

डॉ. सुमेरसिंग राजपुत, कडधान्य पैदासकर, जळगाव

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अखत्यारीतील जळगाव येथील कृषी संशोधन केंद्र (ममुराबाद फार्म) हे महाराष्ट्राच्या कृषी संशोधन क्षेत्रातील एक ऐतिहासिक आणि मानबिंदू ठरलेले केंद्र आहे. सन १९१३ मध्ये, ब्रिटिश राजवटीच्या काळात स्थापन झालेल्या या संशोधन केंद्राला खानदेशच्या शिरपेचातील कोहिनूर हिरा म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. कोरडवाहू शेतीच्या विकासासाठी आणि शाश्वत कृषी संशोधनासाठी दूरदृष्टी ठेवून या केंद्राची स्थापना करण्यात आली.

गेल्या शतकभरात या केंद्राने कोरडवाहू शेतीसाठी विविध पिकांवर महत्त्वपूर्ण संशोधन केले असून, देशी कापूस, तीळ, भुईमूग, करडई, मूग आणि उडीद यांसारख्या पिकांच्या अनेक दर्जेदार वाणांची निर्मिती येथे झाली आहे. या संशोधनामुळे केवळ महाराष्ट्रालाच नव्हे, तर देशाच्या कृषी विकासालाही मोठी चालना मिळाली आहे.

स्थापनेपासून आजपर्यंतच्या ११३ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात या केंद्राने आपल्या संशोधनाची गुणवत्ता आणि उपयुक्तता कायम राखली आहे. त्यामुळे कृषी संशोधन क्षेत्रातील या ऐतिहासिक संस्थेचे महत्त्व आजही अबाधित असून, तिची कीर्ती काळानुरूप अधिक उजळत गेली आहे.

या संशोधन केंद्रात हवामानाशी संबंधित विविध घटकांच्या नोंदी दिवसातून दोन वेळा नियमितपणे आणि काटेकोरपणे घेतल्या जातात. सन १९६५ पासूनच्या हवामानविषयक नोंदी येथे उपलब्ध असून, त्या संशोधक आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरल्या आहेत.

सन १९६५ ते २०२५ या कालावधीतील हवामानाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले असता, या परिसरात सरासरी ७८०.८ मिलिमीटर पाऊस सुमारे ५४ पावसाळी दिवसांत झाल्याचे दिसून येते. मागील ६० वर्षांच्या नोंदींनुसार, सन २००६ मध्ये सर्वाधिक १,४०१.८ मिलिमीटर पर्जन्यमान केवळ ५१ दिवसांत नोंदविण्यात आले. याउलट, सन २०१२ मध्ये सर्वात कमी म्हणजे ३६६.८ मिलिमीटर पाऊस केवळ ३० दिवसांत झाला होता.

पावसाच्या दिवसांच्या संख्येचा विचार केला असता, एका वर्षात सर्वाधिक ८६ पावसाळी दिवसांची नोंद आढळते, तर किमान पावसाचे दिवस ३२ इतके नोंदविण्यात आले आहेत. या दीर्घकालीन हवामान नोंदींमुळे परिसरातील पर्जन्यमानातील चढ-उतार, हवामानातील बदल आणि त्यांचा शेतीवर होणारा परिणाम यांचा अभ्यास अधिक अचूकपणे करता येतो.

मागील ६० वर्षांच्या तापमानविषयक नोंदींचा अभ्यास केल्यास जळगाव जिल्ह्यात हवामानातील लक्षणीय चढ-उतार स्पष्टपणे दिसून येतात. उपलब्ध आकडेवारीनुसार, २६ मे १९७३ रोजी जिल्ह्यातील कमाल तापमान ४७.९ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले, तर ८ जानेवारी २०११ रोजी किमान तापमान २.५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याची नोंद आहे.

खरीप हंगामातील मागील ६० वर्षांच्या सरासरी तापमानाचा विचार करता, कमाल तापमान ३६.३ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २६.३ अंश सेल्सिअस इतके आढळते. रब्बी हंगामात सरासरी कमाल तापमान ३२.२ अंश सेल्सिअस असून किमान तापमान १५.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले आहे. उन्हाळी हंगामात तापमानाचा कडेलोट अधिक जाणवतो. या कालावधीत कमाल तापमान ४७.९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून किमान तापमानाची सरासरी ३२.० अंश सेल्सिअस इतकी आढळते.

सन २०१४ ते २०२५ या मागील बारा वर्षांच्या कालावधीत जून ते सप्टेंबर या मान्सून महिन्यांमध्ये सरासरी ६७५.२ मिलिमीटर पाऊस सुमारे ३७ दिवसांत झाला आहे. या कालावधीत पर्जन्यमानातील तफावत लक्षणीय असून, सर्वाधिक ८२१.१ मिलिमीटर तर किमान ४२०.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच पावसाच्या दिवसांची संख्या वर्षानुसार बदलत राहिली असून ती सरासरी २३ ते ४५ दिवसांच्या दरम्यान आढळून आली आहे. ही आकडेवारी परिसरातील हवामानातील अनिश्चितता आणि बदलत्या पर्जन्यमानाच्या प्रवृत्तीवर प्रकाश टाकते.

हवामानविषयक दीर्घकालीन आकडेवारीचा अभ्यास केल्यास जळगाव जिल्हा मान्सूनच्या पावसाच्या दृष्टीने तुलनेने विश्वासार्ह मानला जाऊ शकतो. उपलब्ध हवामान नोंदींनुसार, गेल्या ६५ वर्षांत एकही असे वर्ष आढळत नाही की ज्यामध्ये जिल्ह्यात पाऊसच झाला नाही. पर्जन्यमानात वर्षानुवर्षे चढ-उतार दिसून येत असले, तसेच काही वर्षे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असली, तरी मान्सूनचा पाऊस पूर्णपणे दडी मारल्याची नोंद आढळत नाही. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतीसाठी मान्सून हा आजही प्रमुख आणि विश्वासार्ह जलस्रोत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, खरीप २०२६ हंगामात देशावर ‘सुपर अल निनो’चा प्रभाव राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रावर, विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मान्सून कोअर झोनवर होण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, या भागांमध्ये सरासरीपेक्षा सुमारे ४३ टक्क्यांपर्यंत कमी पर्जन्यमान होऊ शकते.

विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश क्षेत्र मान्सून कोअर झोनमध्ये मोडते. देशातील तसेच राज्यातील कोरडवाहू शेतीचा मोठा भाग याच पट्ट्यात असल्याने, येथील पर्जन्यमानातील घट शेती उत्पादनावर थेट परिणाम करू शकते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या कोअर झोनमध्ये मान्सून कमकुवत राहण्याची शक्यता असून, खरीप हंगामातील पिकांसमोर पाण्याची टंचाई आणि अवर्षणासदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानातील या संभाव्य बदलांचा विचार करून पीक नियोजन आणि जलव्यवस्थापनावर विशेष भर देणे आवश्यक ठरणार आहे.

सुपर अल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामासाठी शाश्वत पीक नियोजन आवश्यक

सुपर अल निनोचा प्रभाव सप्टेंबर महिन्यापर्यंत राहण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने, खरीप हंगामातील पिकांवर त्याचा थेट परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पिकनियोजन अधिक सावधपणे करण्याची गरज निर्माण झाली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय उपलब्ध आहे त्यांनी ठिबक सिंचन, तुषार सिंचन तसेच रेन गन यांसारख्या आधुनिक सिंचन पद्धतींचा अवलंब करून पाण्याचे योग्य नियोजन करावे. यामुळे उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करून पिके सुरक्षित ठेवता येतील.

तर ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा नाही आणि जे पूर्णतः मान्सून पावसावर अवलंबून आहेत, त्यांनी कमी कालावधीत येणारी, कमी पाण्यात तग धरणारी आणि बदलत्या हवामानाला सहनशील अशी पिके निवडणे फायदेशीर ठरेल. यामध्ये मूग पिकाचे ‘फुले सुवर्ण’ हे वाण अत्यंत उपयुक्त ठरते. कमी पावसाच्या परिस्थितीतही हे वाण चांगली वाढ दर्शवते. या वाणात प्रोलिनचे प्रमाण तुलनेने अधिक असल्याने अवर्षणग्रस्त परिस्थितीत ते स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यास सक्षम असते. या जातीची लागवड ३० × १० सेमी अंतरावर केल्यास हेक्टरी सुमारे ३,३३,३३३ रोपांची संख्या मिळते. हे पीक अवघ्या ६० दिवसांत काढणीस तयार होते, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ते फायदेशीर ठरते.

कापूस व तूर पिकांमध्ये आंतरपीक म्हणून या वाणाचा वापर केल्यास दुहेरी लाभ मिळू शकतो. तसेच उडीद पिकाचे ‘फुले वसु’ हे वाणही तितकेच सक्षम असून लवकर पक्वतेला येणारे आहे. खरीप हंगामात या वाणाचा अवलंब केल्यास अल निनोच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करणे तुलनेने सोपे ठरू शकते.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी
Tags: Adaptive Farmingagricultural developmentAgricultural Innovationagriculture extensionagriculture researchagronomyClimate Changeclimate resilient cropsCotton Intercropcrop managementCrop ResilienceCrop VarietyDrought ManagementDrought Tolerant CropsDry Spelldryland farmingfarm advisoryfarm productivityfarmersFarming TechnologyIndia AgricultureintercroppingJalgaon Research CenterKhandeshKharif 2026kharif cropsLow Rainfall FarmingMaharashtra agricultureMonsoonMoong VarietyMPKVPhule SuvarnaPhule VasuPulse BreedingPulse cultivationpulse productionpulsesRainfall DeficitRainfed AgricultureScientific Farmingseed selectionsoil moistureSuper El NinoSustainable AgricultureTur IntercropUrad Varietywater conservationWater StressWeather forecastYield Stabilityअवर्षणआंतरपीकउडीदउडीद लागवडउत्पादन वाढउत्पादनक्षमताकडधान्य पिकेकडधान्य पैदासकमी पाऊसकापूसकृषी नवकल्पनाकृषी विकासकृषी विज्ञानकृषी सल्लाकृषी संशोधनकोरडवाहू शेतीखरीप २०२६खरीप हंगामखानदेशजलसंधारणजळगाव संशोधन केंद्रठिबक सिंचनतुषार सिंचनतूरदुष्काळदुष्काळ व्यवस्थापनपर्जन्यमानपाणी व्यवस्थापनपावसावर आधारित शेतीपिकांची तग धरण्याची क्षमतापीक व्यवस्थापनपीक संरक्षणफुले वसुफुले सुवर्णबदलते हवामानबीज निवडमहात्मा फुले कृषी विद्यापीठमहाराष्ट्र शेतीमूगमूग लागवडरेनगनशाश्वत शेतीशेतकरीशेती तंत्रज्ञानसुधारित वाणसुपर अल निनोहवामान अंदाजहवामान अनुकूल शेतीहवामान बदल

Recent Posts

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

5 hours ago

विरोधकांचा आवाज क्षीण झालायं… की सरकार अधिक बळकट झालंय ? Monsoon session of the legislature

मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…

17 hours ago

इतिहास वाचनातूनच संस्कार अन् सुराज्याची जडणघडण : संयोगिताराजे छत्रपती Good State Formed Through Reading History

वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…

1 day ago

अर्पणामागचा भाव : शुद्ध भक्तितत्त्वाचा ज्ञानेश्वरीतील अमृतसंदेश Pure Bhakti from Dnyaneshwari |

हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…

1 day ago

आकाशातील ढग व युद्धाच्या धगीत अडकलेली अर्थव्यवस्था ! an economy caught in the grip of war

विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.…

2 days ago

स्त्रीवादी साहित्याची नवी दिशा : डॉ. ऊर्मिला चाकूरकर यांचे अभ्यासपूर्ण अध्यक्षीय भाषण New direction of feminist literature

स्नेहलता मारुती पाटील सन्मानार्थ पुरोगामी सामाजिक, सांस्कृतिक फाऊंडेशन द्वारा आयोजित २रे स्त्रीवादी साहित्य संमेलन यामध्ये…

2 days ago