fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 7, 2026
Home » ठाकरे, पवार आता ममता बॅनर्जी…
सत्ता संघर्ष

ठाकरे, पवार आता ममता बॅनर्जी…

From Uddhav Thackeray and Sharad Pawar to Mamata Banerjee, political rebellions and Operation Lotus have reshaped India's opposition landscape.
पक्ष स्थापन करणाऱ्या नेत्यांच्या हातूनच त्यांचे पक्ष निसटण्याची राजकीय पुनरावृत्ती आता योगायोग राहिलेली नाही. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यानंतर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनाही पक्षांतर्गत बंडाचा फटका बसत असल्याचे चित्र उभे राहिले आहे. सत्तेचे केंद्रीकरण, बंडखोरांची ताकद आणि भाजपाच्या राजकीय रणनीतीच्या पार्श्वभूमीवर भारतीय राजकारणात "सरकार आमचे आणि विरोधकही आमचे" या नव्या समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे.
– डॉ. सुकृत खांडेकर

महाराष्ट्रात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार असताना २०२२ मधे शिवसेनेत बंड झाले, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सेनेचे ४० आमदार भाजपाच्या छत्रीखाली एनडीएत सामील झाले. आमचीच शिवसेना खरी असा दावा शिंदेंनी केला व तो निवडणूक आयोगाने मान्यही केला. शिवसेना हे पक्षाचे नाव व धनुष्य बाण हे निवडणूक चिन्ह शिंदे यांच्या पक्षाला मिळाले. ठाकरेंचा पक्ष उबाठा सेना म्हणून ओळखला जाऊ लागला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या पक्षावर एकनाथ शिंदे यांनी कब्जा मिळवला. शिवसेना फोडल्याचे बक्षिस म्हणून शिंदे यांना भाजपाने सुरूवातीला अडिच वर्षे मुख्यमंत्रीपद व २०२४ च्या निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्रीपद बहाल केले.

मोदी – शहांचे भक्कम पाठबळ शिंदेना लाभल्यामुळेच भाजपाचे ऑपरेशन लोटस यशस्वी झाले. शिंदे व त्यांचे सहकारी भाजपामधे गेले नाहीत व भाजपानेही त्यांना त्यांच्या पक्षात घेतले नाही. ठाकरेंची शिवसेना संपली नाही पण संकुचित झाली आणि शिंदेंची शिवसेना भाजपाच्या कळपात सत्तेत भागीदार झाली. ठाकरेंच्या शिवसेनेतील बंडखोर आज भाजपाचे निष्ठावान मित्र म्हणून भुमिका पार पाडत आहेत. मुंबई ते सुरत, गुवाहटी, गोवा असा जो बंडखोरांनी प्रवास केला, त्यामागे नियोजन, संरक्षण, ताकद आणि पटकथा ही भाजपाची होती . स्वत: देवेंद्र फडणवीस हे अंधाऱ्या रात्री बंडखोर नेत्यांच्या गाठीभेट घेत होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना महाराष्ट्रात शिवसेना- भाजपा युती पंचवीस वर्षाहून अधिक काळ एकत्र नांदली.

१९९५ मधे युतीचे पहिले सरकार शिवसेनेचे मनोहर जोशींच्या नेतृत्वाखाली स्थापन झाले पण पुढे सत्तेच्या राजकारणात भाजपाला शिवसेनेचा अडसर वाटू लागला. मोदींचा केंद्रात उदय झाल्यापासून भाजपा एकदम मोठा भाऊ झाला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पक्षातील सहकारी मंत्र्यांकडून बंडाचा झेंडा फडकवला जाईल व पक्षाचे दोन तुकडे केले जातील याची स्वत: उद्धव यांनाही कल्पना नसावी. ठाकरेंना एकाकी पाडले जाईल अशी कोणाला वाटले नव्हते. पण भाजपाच्या कुशल- मुत्सद्दी रणनितीने शिवसेनेच्या पक्षप्रमुखालाच खच्ची करण्याचे काम केले. चार वर्षानंतरही ठाकरे व त्यांची शिवसेना त्यातून सावररेली नाही.

महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसचा दुसरा प्रयोग २०२३ मधे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर झाला. अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे ४२ आमदारांनी बंडाचा झेंडा फडकवला. शरद पवारांच्या नेतृत्वालाच त्यांनी आव्हान दिले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रस पक्ष आमचाच असा दावा केला. शिवसेना फॉर्म्युल्या प्रमाणाचे निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या नेतृत्वाखालील पक्षाला मान्यता दिली व घड्याळ हे निवडणूक चिन्हही दिले. सोनिया गांधींच्या विदेशी जन्माच्या मुद्यावर आवाज उठवून शरद पवार , तारीक अन्वर व पी. ए. संगमा यांनी १९९९ मधे मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. आज सुनेत्रावहिनी पवार यांच्या पक्षातील जे सत्तेच्या पदांवर दिसत आहेत त्या सर्वांना शरद पवारांनीच मोठे केले आहे. पण भाजपाच्या खेळीत शरद पवारांचा पक्ष खच्ची करण्यात आला. आज अजिदादादांचा पक्ष सत्तेत असला तरी भाजपाचा निष्ठावान मित्र म्हणून काम करावे लागते आहे.

भाजपाने ऑपरेशन लोटस चा तिसरा प्रयोग नुकताच पश्चिम बंगालमधे केला. वाट्टेल ते करून सलग पंधरा वर्षे सत्तेवर असलेल्या ममता बॅनर्जी यांचा पराभव करायचा याचा चंग भाजपाने बांधला होता. निवडणूक काळात साडेतील लाख केंद्गीय सुरक्षा सैनिक राज्यात तैनात होते. निवडणुकीच्या तोंडावर मुख्य सचिव, पोलीस आयुक्त अशा पाचशेपेक्षा जास्त बड्या नोकरशहांच्या बदल्या केल्या. पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, दोन डझन केंद्रीयमंत्री, दिड डझन भाजपाचे मुख्यमंत्री , विविध राज्यातील हजारो कार्यकर्ते तैनात होते. भाजपाचे २०७ आमदार विजयी झाले. भाजपाने सर्व ताकद पणाला लावूनही तृणमल काँग्रेसचे ८० आमदार निवडून आले. ही संख्या विरोधी पक्ष म्हणून कमी नाही, ममता अजून संपलेल्या नाहीत, हे भाजपाच्या लक्षात आले. ममता यांचे एकेकाळचे निकटवर्तीय सुवेंधू अधिकारी यांनाच भाजपाने मुख्यमंत्री केले. निकालानंतर तृणमूल काँग्रेसच्या आमदारांच्या घरी पोलिसांच्या चकरा वाढू लागल्या. तपास यंत्रणांचे फोन येऊ लागले.

ममता यांनी बोलविलेल्या पक्षाच्या आमदारांच्या बैठकीला ८० पैकी ६० गैरहहजर राहीले. पक्षविरोधी कारवायांबद्दल दोघा आमदारांना पक्षातून निलंबित केले. निलंबित केलेल्या आमदारांनेच आपल्याबरोबर तृणमूल काँग्रेसचे ५९ आमदार आहेत असा दावा करून विधानसभा अध्यक्षांकडून पक्षाला मान्यता मिळवली व विरोधी पक्षनेता म्हणूनही मंजुरी मिळवली. ममता यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्या कारभाराला कंटाळून व त्यांना दोष देऊन या बंडखोरांनी वेगळी चूल मांडली. ममता यांनी पक्षाचे सल्लागार रहावे, अशी त्यांना ऑफर दिली. ममता यांनी काँग्रेसमधे असताना डाव्या पक्षाच्या विरोधात वर्षानुवर्षे रस्त्यावर लढे दिले. अंगावर पोलिसांच्या लाठ्या झेलल्या. १९९८ मधे तृणमूल काँग्रसची स्थापना केली. बंगाली अस्मिता सदैव तेवत ठेवली. त्यांच्या लोकप्रियतेपुढे डावे पक्ष व काँग्रेसही संपली.

आता त्यांनी उभा केलेल्या पक्षावर त्यांच्याच पक्षातील बंडखोर आमदारांनी कब्जा मिळवला आहे व विधानसभा अध्यक्षांनी त्यांना हिरवा कंदिलही दाखवला आहे. पंश्चिम बंगालमधे तृणमूलच्या बंडखोरांना भाजपाने आपल्या पक्षात घेतले नाही. भाजपाचे तृणमूलीकरण करायचे नाही, असे त्यांना बजावले. त्यांना विरोधी पक्ष नेता पद मिळाले. त्यांना विरोधी पक्षात बसावे लागेल. सरकार आमचे व विरोधी पक्षही आमचाच असे भाजपाचे सूत्र आहे. ममता यांच्याकडे वीस आमदार राहिले आहेत. उध्दव ठाकरेंचे झाले तशी ममता बॅनर्जींवर भाजपाने पाळी आणली आहे. ममता कोलकतात काली घाटमधील घरात नव्हे तर पुन्हा रस्त्यावर उतरलेल्या दिसतील. भाजपा विरूध्द तृणमूल आणि पोलीस विरूध्द ममता असा संघर्ष बघायला मिळेल.

Related posts

आपमधील ‘गद्दार’ की राजकीय डाव? ऑपरेशन लोटसने केजरीवालांच्या नेतृत्वाला मोठा धक्का

जगभरातील संसदांमध्ये महिला अल्पसंख्यच !

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे विचार आजही मार्गदर्शक

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!