May 31, 2026
Home » बियाणे खरेदी करताना शेतकरी बांधवांनी घ्यावयाची काळजी
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

बियाणे खरेदी करताना शेतकरी बांधवांनी घ्यावयाची काळजी

Learn essential precautions while purchasing seeds for Kharif crops. Check seed quality, certification tags, expiry dates, invoices, and avoid fake or substandard seeds.

“जसे बियाणे, तसे पीक” ही शेतीतील अढळ सत्यता आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी केवळ किंमत न पाहता त्याचा दर्जा, वैधता, उगवणक्षमता आणि प्रमाणितपणा तपासणे अत्यावश्यक आहे. थोडीशी जागरूकता मोठे नुकसान टाळू शकते आणि भरघोस उत्पादनाचा मार्गही मोकळा करू शकते.

सुरज सुनिलराव कुलकर्णी, सहाय्यक प्राध्यापक, कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषी महाविद्यालय, बार्शी, मोबाईल – ९४०४२४७९५१
डॉ. रामप्रसाद गायकवाड, यंग प्रोफेशनल-२, कृषी विज्ञान केंद्र, अंबाजोगाई. मोबाईल – ९५६१६०४७०४

आता खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकऱ्यांना खरीपाच्या पेरणीचे वेध लागले आहेत. त्यासाठी राज्यभरात शेतकरी बांधवांची बी-बियाणे, खते व औषधांच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. चांगले उत्पादन मिळवण्यासाठी योग्य बियाण्यांची निवड ही शेतीतील सर्वात महत्त्वाची बाब मानली जाते. परंतु काही वेळा बाजारात बनावट, निकृष्ट दर्जाचे किंवा मुदतबाह्य बियाणे विकले जातात. बियाणे निकृष्ट दर्जाचे निघाले तर शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागू शकते. काही दुकानदार शेतकऱ्यांना पक्की पावती देत नाहीत, त्यामुळे पुढे तक्रार करायची वेळ आल्यास शेतकरी अडचणीत येतो. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी बी-बियाणे खरेदी करताना अत्यंत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

आपल्या भागातील वातावरण व जमिनीचा विचार करून योग्य त्या पिकाची निवड करावी. आपल्या भागासाठी शिफारशीत वाणांच्या निवडीला प्राधान्य द्यावे. मागील दोन-तीन वर्षांच्या अनुभवावरून आपल्या भागात आलेल्या प्रमुख रोग आणि किडींचा अंदाज घेऊन त्यासाठी प्रतिकारक्षम किंवा सहनशील वाण असल्यास त्याची निवड करावी.

सिंचनाच्या व्यवस्थेनुसार योग्य त्या वाणाची निवड करावी. कोरडवाहू जमिनीसाठी शिफारस केलेले वाण कमी पावसाच्या स्थितीतही चांगल्या प्रकारे वाढू शकतात. आपल्या परिसरातील कृषी विभागातील कृषी अधिकारी, शास्त्रज्ञ यांच्यासोबत चर्चा करून नवीन, सुधारित, संकरित वाणांची माहिती घ्यावी. पूर्वीच्या हंगामात अन्य शेतकऱ्यांनी पेरलेल्या बियाण्याच्या अनुभवाची माहिती करून घ्यावी. पिकाची लागवड व पुढील व्यवस्थापन पद्धती तज्ज्ञांकडून समजावून घ्यावी.

उत्तम प्रतीचे, खात्रीशीर व नोंदणीकृत बियाणे विक्रेत्याच्या दुकानातूनच खरेदी करावे. बियाण्याची खरेदी करताना कंपनीचे प्रतिनिधी, विक्रेते किंवा जाहिराती यावर अवलंबून राहून खरेदी टाळावी.

बियाण्याचे प्रामुख्याने मूलभूत/पैदासकार बियाणे, पायाभूत बियाणे, प्रमाणित बियाणे व सत्यप्रत बियाणे असे चार प्रकार पडतात.

१) मूलभूत/पैदासकार बियाणे :
या बियाण्यांची अनुवांशिक शुद्धता १०० टक्के असते. हे बियाणे त्या पीक पैदासकाराच्या देखरेखीखाली तयार केले जाते. हे बियाणे सामान्य शेतकऱ्यांच्या शेतात लागवडीसाठी उपलब्ध नसते. मूलभूत/पैदासकार बियाण्यासाठी पिवळ्या रंगाचे प्रमाणपत्र टॅग लावलेले असते.

२) पायाभूत बियाणे :
पायाभूत प्रकारचे बियाणे तयार करण्यासाठी मूलभूत बियाणे वापरले जाते. पायाभूत बियाण्यांच्या पिशवीवर पांढऱ्या रंगाचा टॅग लावलेला असतो.

३) प्रमाणित बियाणे :
हे पायाभूत बियाण्यांपासून तयार केले जाते. प्रमाणित बियाणे हे नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या शेतावर तयार केले जाते. याचे उत्पादन प्रमाणीकरण एजन्सीच्या देखरेखीखाली होते व एजन्सीद्वारे मंजूर केले जाते. या बियाण्यास निळ्या रंगाचा टॅग असतो.

४) सत्यप्रत बियाणे :
सत्यप्रत बीजोत्पादनासाठी प्रमाणित बियाण्यांचा वापर करतात. हे बियाणे शेतकरी शेतावर तयार करू शकतात. मात्र या बियाण्यांची अनुवांशिक शुद्धता चांगली असणे गरजेचे आहे. सत्यप्रत बियाण्यास हिरव्या रंगाचा टॅग असतो.

जसे आपण रोजच्या वापरातील वस्तूंची वैधता दिनांक (Expiry Date) तपासतो तसेच पॅकींगबंद बियाण्याची सुद्धा एक वैधता असते. बियाण्याची वैधता तपासणी दिनांकापासून ९ महिने असते, तर नूतनीकरण केलेल्या बियाण्याची वैधता ६ महिन्यांपर्यंत असते. या बाबी पाहूनच बियाणे खरेदी करावे. मुदतबाह्य तसेच पॅकिंग फोडलेले बियाणे खरेदी करू नये.

बियाणे खरेदी करताना बियाण्याच्या बॅगवरील प्रमाणपत्र टॅग अगोदर तपासून घ्यावा. त्यावर खालील माहितीची खात्री केल्यानंतरच बियाणे खरेदी करावे :
त्यामध्ये पिकाचे नाव,,जाती व प्रकार, बीज परीक्षणाची तारीख, उगवणक्षमता,,भौतिक शुद्धता, चाचणीची तारीख, बियाण्याचा वर्ग,,लॉट नंबर, कंपनीचे नाव व संपर्क आदीची माहिती काळजीपूर्वक वाचावी.

प्रमाणित बियाण्याच्या टॅगवर ( खूण चिठ्ठीवर ) अधिकाऱ्याची सही असल्याची खात्री करून घ्यावी. याशिवाय बियाण्यास कीड किंवा रोग प्रतिबंधक कीटकनाशकाची प्रक्रिया केली असल्यास त्याचा उल्लेख आणि नावे टॅगवर असावीत.

ऑनलाईन किंवा अनधिकृत स्त्रोतांवरून बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी सावध राहावे. सध्या सोशल मीडियावर किंवा ऑनलाईन जाहिरातींमधून बियाणे विक्री वाढली आहे. अत्यल्प दरात “विशेष वाण” देण्याचे आमिष दाखवले जाते. परंतु शेतकऱ्यांनी विश्वासार्ह कंपनी किंवा अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करावी. नोंदणी नसलेल्या व्यक्तींवर किंवा फसव्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नये.

सदोष बियाणे कसे ओळखावे?

ज्या वेळेस आपण प्रमाणित बियाणे खरेदी करतो, त्या बियाण्याच्या पिशवीवर किंवा टॅगवर प्रमाणित केलेल्या प्रमाणकापेक्षा किंवा दिलेल्या माहितीप्रमाणे जर बियाण्यांची गुणवत्ता नसेल तर त्यास सदोष बियाणे म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने त्याची उगवणक्षमता पोषक परिस्थितीत पेरल्यानंतर खूपच कमी असेल, तर बियाणे सदोष आहे असे समजावे. त्याची भौतिक शुद्धता म्हणजेच त्यातील काडीकचरा, इतर पिकांचे बी किंवा तणांचे बी यांचे प्रमाण टॅगवरील माहितीपेक्षा जास्त प्रमाणात असल्यास सदर बियाणे सदोष आहे असे समजावे. सदर बियाण्याची अनुवांशिक शुद्धता नसल्यास म्हणजेच बियाण्याचा एकसारखेपणा, झाडांचे बाह्य गुणधर्म यामध्ये एकसारखेपणा नसल्यास तसेच झाडांची कणसे, शेंगा, ओंब्या किंवा फळे यामध्ये विविधता आढळल्यास सदर बियाणे अनुवांशिकदृष्ट्या अशुद्ध आहे असे म्हणतात. तसेच शेतकऱ्यांनी वातावरणातील बदलाचा विचार करूनच बियाण्याची निवड करावी. कारण जरी बियाणे शुद्ध असले तरी वातावरणातील बदलामुळे अपेक्षित उत्पादन मिळेलच असे नाही.

बियाणे खरेदी करताना कृषी विभागाकडून परवाना प्राप्त असलेल्या अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करावी. रस्त्याच्या कडेला, अनोळखी व्यक्तीकडून किंवा कमी किमतीचे आमिष दाखवणाऱ्या विक्रेत्याकडून बियाणे घेणे टाळावे. यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार व प्रमाणित बियाणे मिळण्याची शक्यता वाढते, तक्रार केल्यास विक्रेत्याविरुद्ध कारवाई करता येते तसेच नुकसानभरपाई मिळवण्यासाठी पुरावे उपलब्ध राहतात.

परवानाधारक विक्रेत्याकडूनच बियाण्याची खरेदी करतानाही प्रामुख्याने बीज प्रमाणीकरण यंत्रणेने प्रमाणित केलेले बियाणे खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे. टॅगवरील सर्व माहिती वाचून त्याविषयी खात्री झाल्यानंतर शेतकऱ्यांनी विक्रेत्याकडून बियाणे खरेदी करावे. त्यांच्याकडून बियाणे खरेदीचे पक्के बिल घ्यावे. अनेक शेतकरी घाईत किंवा ओळखीमुळे पावती घेत नाहीत. ही सर्वात मोठी चूक ठरू शकते.

पावतीमध्ये खालील बाबी स्पष्ट असाव्यात :

  • विक्रेत्याचे नाव व पत्ता
  • बियाण्याचे नाव व वाण
  • कंपनीचे नाव
  • लॉट नंबर
  • खरेदीची तारीख
  • बॅगची संख्या व वजन
  • किंमत

पक्की पावती का महत्त्वाची ?

भविष्यात जर बियाण्यात काही दोष आढळला तर कृषी विभागाकडे किंवा ग्राहक मंचाकडे तक्रार करण्यासाठी पावती हा सर्वात महत्त्वाचा पुरावा असतो. त्याशिवाय तक्रार ग्राह्य मानली जात नाही.

खरेदी केलेले बियाणे वापरण्यापूर्वी बियाण्याची पिशवी नेहमी खालच्या बाजूने फोडावी. ज्या बाजूला टॅग असेल ती बाजू सुरक्षित ठेवावी. बॅगवरील टॅग काढू नये. तसेच बॉक्स असेल तर त्यावरील माहिती सुरक्षित राहील याची काळजी घ्यावी. बियाण्याचा थोडा नमुना पिशवीत किंवा बॉक्समध्ये राखून ठेवावा. म्हणजे बियाणे सदोष आढळल्यास तक्रार केल्यानंतर तपासणी अधिकाऱ्यांना सदर बियाण्याचा नमुना देता येईल.

पेरणी करताना शक्यतो दोन वेगवेगळ्या लॉटचे बियाणे एकत्र करून पेरणी करू नये. जमिनीत योग्य ओलावा असताना पेरणी करावी. पेरणी केलेली तारीख नोंद करून ठेवावी. पेरणीनंतर ४ ते ७ दिवसांत बियाण्याची उगवण झालेली दिसून येते.

पेरणीनंतर टॅगवरील प्रमाणापेक्षा उगवण कमी झाल्यास किंवा पिकात मोठ्या प्रमाणात भेसळ आढळल्यास बियाणे निरीक्षकाकडे लेखी तक्रार करावी. बियाण्याची उगवणक्षमता कमी असल्यास संबंधित विक्रेता व बियाणे उत्पादक कंपनी यांच्यावर बियाणे कायदा १९६६ मधील कलम १० नुसार कायदेशीर कारवाई होऊ शकते.
छापील वजनापेक्षा कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री किंवा इतर तक्रारीसाठी नजीकच्या कृषि विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

बियाण्याविषयी काही तक्रार असल्यास जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार द्यावी. कमी दर्जाच्या बियाण्यामुळे आर्थिक नुकसान झाले असल्यास जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदवून नुकसानभरपाई मागता येते.

शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • नेहमी पक्की पावती घ्या
  • परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करा
  • बियाण्याचे लेबल तपासा
  • मुदतबाह्य बियाणे घेऊ नका
  • शिफारस केलेले वाण निवडा
  • पॅकेट, टॅग आणि बिल जतन करा
  • संशय आल्यास त्वरित तक्रार करा

बियाणे हे शेती उत्पादनाचे मूलभूत साधन आहे. योग्य बियाण्यांची निवड आणि सावध खरेदी केल्यास उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होऊ शकतो. परंतु थोडा निष्काळजीपणा मोठ्या नुकसानास कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवाने जागरूक ग्राहक बनणे ही काळाची गरज आहे. “पक्की पावती घ्या, दर्जेदार बियाणे वापरा आणि फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करा” हा संदेश प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.

Related posts

कणखर साग…

हा प्रश्न मराठी साहित्याला कधी पडेल ?

टिकाऊ आर्थिक विकास अन् हरित भारत

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!